मनसेचे कल्याण ग्रामीणचे आमदार राजू पाटील यांनी क.डों.म.पा. प्रशासनाच्या कामकाजावर असंतोष व्यक्त केला आहे. पालिका प्रशासन फक्त दंडात्मक कारवायाच करण्यावर भर देत असून कोरोनासाठी करावयाचा उपाययोजना फक्त कागदावरच आहेत असे म्हणत राजू पाटील यांनी क.डों.म.पा. ची तुलना नवी मुंबई महानगरपालिकेशी केली आहे.
कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रा अंतर्गत आयुक्त डॉ.विजय सूर्यवंशी यांनी काही निर्बंध लादले आहेत. शिवाय राज्य सरकारने देखील कठोर निर्बंध लादले आहेत. या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर महापालिका प्रशासन दंडात्मक कारवाया करीत आहेत. पोलीस स्थानकात गुन्हे दाखल होत आहेत. परंतु याच बरोबर पालिका प्रशासनाने कोरोना रोखण्यासाठीच्या उपाययोजनावर जास्तीत भर द्यावा असे राजू पाटील म्हणत आहेत. नवी मुंबई महानगरपालिका कशा पद्धतीने काम करते हे त्यांनी त्यांच्या फेसबुकद्वारे सांगितले आहे.
“कल्याण-डोंबिवली व नवी मुंबई या दोन्ही महापालिकांमध्ये प्रशासक म्हणून आयुक्तच सर्वेसर्वा आहेत. हाताशी असलेली यंत्रणा कमी अधिक असू शकते परंतु कामाची पद्धत पण महत्वाची आहे. नवीमुंबईत आरोग्यसेवक भरती करून लसीकरण केंद्र वाढवून कोरोनाशी लढा द्यायचा चाललेला प्रयत्न दिसत आहे. सोबतच पोलिस प्रशासनाला बरोबर घेऊन लोकांच्या हालचाली मर्यादीत करण्यावर तिकडे भर दिला जात आहे. तर आमच्या केडिएमसीत फक्त दंडात्मक कारवाईवर भर दिलेला दिसत आहे. बाकीच्या उपाययोजना फक्त कागदावरच दिसत आहेत. आधीच आरोग्यसेवेचा बोजवारा उडालेला असताना आग सोमेश्वरी व बंब रामेश्वरी असे करण्यात काय अर्थ आहे ? केडिएमसी प्रशासनाने जास्तीत जास्त लसीकरणावर भर द्यावा, उगीचच ‘टार्गेट’ दिल्याप्रमाणे व्यापारी व दुकानदारांना त्रास देऊ नये. पालिकेला हेच ‘टार्गेट’ मध्ये अडकलेले मनुष्यबळ इतर ठिकाणी लसीकरण केंद्र व दवाखान्यात वापरता येतील. लोकांनी पण घालून दिलेले बंधन पाळलेच पाहिजेत व ते आता गंभीरपणे पाळताना पण दिसत आहेत. मग अश्यावेळी आठवड्यातून २/३ दिवस दुकाने उघडण्यास परवानगी द्यायला काय हरकत आहे ? त्यानंतरही नियम तोडले गेले तर कडक कारवाई जरूर करावी. परंतु प्रशासनाने प्राधान्याने जास्तीत जास्त लक्ष व वेळ आरोग्यसेवा व लसीकरणावर द्यावा. आता या कोरोनाचा प्रसार लॅाकडाऊन नाही तर लसीकरणानेच कमी करता येईल.”
राजू पाटील (आमदार,कल्याण ग्रामीण)