‘अहो नगरसेवक कोणे ?’ शिवसेनेच्या पदाधिकाऱ्या समोर राजू पाटील यांनी व्यक्त केला मनसे नगरसेविकेचा अभिमान

उल्हासनदी बचाव मोहिमेला सुरू असलेल्या आंदोलनाला मनसे आमदार राजू पाटील यांनी भेट दिली होती. या दरम्यान त्यांनी नितीन निकम, कैलास शिंदे आणि उमेश बोरगावकर यांच्याशी उल्हासनदी प्रश्नावर चर्चा केली. शिवाय मनसे पक्षाचा जाहीर पाठिंबा देखील दर्शवला.

मनसे आमदार राजू पाटील यांच्या समवेत मनसेचे पदाधिकारी व कार्यकर्ते देखील उपस्थित होते. याच वेळी जवळच्याच भागातील मोहने कोळीवाडाच्या मनसे नगरसेविका सुनंदा कोट देखील त्यांच्या समवेत उपस्थित होत्या. यावेळी राजू पाटील यांना राहुल कोट यांनी प्रभागात येण्याची विनंती केली. या विनंतीला मान देत “तुमच्या प्रभागात छान आहेत रस्ते” असे म्हणत राजू पाटील यांनी मनसेच्या नगरसेविका सुनंदा कोट यांच्या गेल्या पाच वर्षांच्या कामाची पोचपावती दिली. याचवेळी आंदोलनकर्ते तसेच शिवसेना पदाधिकारी कैलास शिंदे यांनी देखील त्यांचा प्रभाग स्वच्छ असल्याचे सांगितले. मनसे आमदार राजू पाटील यांनी लगोलगच “अहो नगरसेवक कोणे?” असा असा प्रश्न शिंदे यांना करीत मनसे नगरसेविकेचे कौतुक केले.

सुनंदा कोट या क.डो.म.पा. तील १० नगरसेवकांपैकी १ आहेत. त्यांचे पुत्र राहुल कोट हे देखील मनसेचे पदाधिकारी आहेत. गेल्या पाच वर्षांत त्यांनी प्रभागात विविध विकासकामे केली होती तसेच कोरोना काळातही त्यांनी लोकांना मदतीचा हात पुढे केला होता. याचीच पोच पावती म्हणून मनसेच्या आमदारांनी त्यांच्याबद्दल अभिमान व्यक्त केला असल्याचे मनसेचे पदाधिकारी सांगतात.

व्हिडीओ पहा

‘…अन्यथा कल्याण डोंबिवलीतील लाखो लोकांचं आयुष्य धोक्यात’ – मनसे आमदार राजू पाटील

उल्हास नदी बचाव मोहिमेसाठी मनसेचे माजी नगरसेवक नदी पात्रात धरणे आंदोलनाला बसले आहेत. या आंदोलनाला मनसे आमदार राजू पाटील यांनी देखील भेट दिली आहे. या नदीमुळे लाखो लोकांचे आरोग्य धोक्यात असल्याचे त्यांनी सांगितले.

क.डो.म.पा. क्षेत्रातील लाखो लोकांची तहान उल्हासनदी भागवत आहे. मोहने पंप हाऊस येथून या नदीतील पाणी उचलले जाते. आणि शुद्धीकरण करून नागरिकांना पाठवले जाते. मात्र हे पाणी उचलण्यापुर्वीच या नदीत सांडपाणी कुठलीही प्रक्रिया न करता सोडले गेले आहे. या सांडपाण्यामुळे संपूर्ण नदी विषारी जलपर्णीने व्यापून गेली आहे. ही जलपर्णी मोठ्या प्रमाणात पाणी शोषून घेते आणि दिवसेंदिवस वाढीस लागत आहे. या नदी साठी दरवर्षी आंदोलन करावे लागते. ठोस उपाययोजना राबवली जावी याकरिता नितीन निकम आणि काही समाजसेवक धरणे आंदोलनाला बसले आहे. त्यांच्या या आंदोलनाला सर्वपक्षीय लोकांनी भेटी दिल्या तर अनेक संस्था व संघटनांनी पाठिंबा दिला.

उल्हास नदी साठी सुरू असलेल्या या आंदोलनाला मनसेचे आमदार राजू पाटील यांनी देखील भेट दिली. उल्हासनदी साठी आश्वासन दिलं जातात परंतु होत काहीच नाही. या नदीसाठी राज्य सरकारने पुढाकार घ्यायला हवा. हा प्रश्न स्थानिक स्वराज्य संस्थांकडून सुटणारा नाही. पर्यावरण, जलसंधारण आणि प्रदूषण या तिन्ही विभागांनी मिळून ठोस उपाययोजना राबवायला हवी. अन्यथा लाखो लोकांचे आरोग्य धोक्यातच जाणार असे मत मनसे आमदार राजू पाटील यांनी व्यक्त केले. तसेच नितीन निकम आणि काही समाजसेवकांनी सुरू केलेल्या आंदोलनाला त्यांनी मनसे कडून जाहीर पाठिंबा दर्शविला आहे

माजी नगरसेविका संगीता गायकवाड यांच्या वतीने मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन

प्र.क्र.९० चिकणीपाडा येथे माजी नगरसेविका संगीता गायकवाड यांच्या वतीने मोफत आरोग्य तपासणी व शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराचा प्रभागातील असंख्य नागरिकांनी लाभ घेतला. तसेच शिबिराचे आयोजन केल्या बद्दल आयोजकांचे आभार मानले.

शिवसेनेच्या माजी नगरसेविका संगीता गायकवाड या गेली पाच वर्षे प्रभाग क्रमांक ९० चिकणीपाडाच्या नगरसेविका म्हणून काम करीत होत्या. संगीता गायकवाड यांनी प्रभागातील नागरिकांसाठी मोफत आरोग्य तपासणी व शस्त्रक्रिया शिबीर आयोजित केले होते. आरोग्यम धनसंपदा फाउंडेशन, तेरणा स्पेशालिटी हॉस्पिटल – रिसर्च सेंटर, तेरणा डेंटल कॉलेज व ईशा नेत्रालय यांच्या संयुक्त विद्यमाने हे शिबिर आयोजित करण्यात आले होते.

आयोजित शिबिराचा लाभ प्रभागातील असंख्य नागरिकांनी घेतला. या शिबिरात मोफत डोळे तपासणी, दातांची तपासणी, विविध आजारांची तपासणी केली गेली. या नंतर हृदय,अन्ननलिका,एपेंडीक्स,कॅन्सर,यकृत,मणके,किडनी,मुतखडा,गर्भाशय,हाडांचे फ्रॅक्चर अशा विविध शस्त्रक्रिया करण्यात येणार आहेत. प्रभागातील गरीब नागरिकांसाठी हे शिबीर लाभदायक ठरले असल्याचे नागरिक सांगतात. तसेच गरजू व गरजू लोकांसाठी असे शिबिर आयोजित करायलाच हवे असे मत प्रभागाच्या तत्कालीन नगरसेविका संगीता गायकवाड यांनी व्यक्त केले.

संगीता गायकवाड यांनी आयोजित केलेल्या शिबिरात शिवसेना ठाणे जिल्हा प्रमुख गोपाळ लांडगे, कल्याण पूर्व विधानसभा सहसंपर्क प्रमुख शरद पाटील, माजी नगरसेवक निलेश शिंदे, परिवहन सभापती मनोज चौधरी, शिवसेना शिवसेना उपशहर प्रमुख हर्षवर्धन पालांडे, महिला शहर संघटक पुष्पा ठाकरे, युवासेना शहर अधिकारी संजय मोरे, सागर घायवट, वैशाली पेटकर, सचिन राणे, सुरेश काळे, विवेक बर्वे, निंबाळकर, सूरज विर, संतोष दिघे, छबुताई रणसिंगे आदी महिला आघाडी तसेच शिवसेना युवासेना पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

“… तर मग कल्याणात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी रस्त्यावर उतरणार” – जगन्नाथ शिंदे

उल्हासनदी प्रदूषण मुक्त करण्यासाठी ‘मी कल्याणकर’ ही सामाजिक संस्था गेल्या तीन दिवसांपासून धरणे आंदोलन करण्यासाठी नदीपात्रात बसलेली आहे. क.डों.म.पा.चे माजी नगरसेवक नितीन निकम आणि त्यांच्या समवेत काही समाजसेवक देखील या आंदोलनासाठी बसलेले आहेत.

नितीन निकम हे गेल्या पाच वर्षांपासून सातत्याने उल्हासनदी प्रश्नावर आंदोलने करीत आहेत. उल्हासनदी पत्रातील परिस्थिती पुन्हा एकदा दयनीय झाली आहे. नागरिकांच्या हिताचा प्रश्न असल्याने त्यांना राजकीय पक्ष व संघटनांचा पाठिंबा दरवेळेस मिळतो. जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे तसेच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी स्वतः निकम यांच्या आंदोलनाला मागील वेळेस भेट दिली होती.

उल्हास नदी प्रश्नावर सुरू असलेल्या धरणे आंदोलना संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष जगन्नाथ शिंदे यांनी स्वतः आंदोलनकर्त्यांची आंदोलन स्थळी जाऊन भेट घेतली आणि समस्या जाणून घेतली. आंदोलनाचा गंभीर विषय अद्यापही प्रशासन मनावर घेत नसल्याचे दिसून येत आहे. हा प्रश्न सोडवण्यासाठी ते सबंधित यंत्रणांच्या भेटीगाठी घेणार आहेत. जर प्रशासनाने हा तिढा सोडवला नाही तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी रस्त्यावर उतरून आंदोलन करेल असा इशारा जगन्नाथ शिंदे यांनी दिला आहे.

क.डों.म.पा. क्षेत्रात निवडणूक जवळ आलेली असताना शिवसेना,भाजपा,मनसे आदी पक्षांनी याच महिन्यात विविध विषयावर आंदोलने पुकारली होती. आणि याच आंदोलनातुन राजकीय पक्षांनी आपले शक्तिप्रदर्शन केले. आता राष्ट्रवादी काँग्रेस देखील उल्हास नदी प्रश्नावर आंदोलन करण्याचा तयारीत आहे. त्यामुळे उल्हास नदी प्रश्न प्रशासनाने सोडवला नाही तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी काही दिवसांत रस्त्यावर उतरताना दिसू शकेल. आणि असा इशाराही जिल्हाध्यक्ष जगन्नाथ शिंदे यांनी आता दिला आहे.

राज ठाकरेंमुळे महापालिकेत कॅबिन मिळाली आणि आता पक्ष सोडला. – नव्या शहराध्यक्षाची घणाघाती टीका.

डोंबिवलीत मनसेच्या वतीने कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यात भाषण करताना मनसेच्या नव्या डोंबिवली शहराध्यक्षांनी मनसे सोडलेल्यां वर घणाघाती टीका केली.

मागील आठवड्यात डोंबिवली मध्ये मनसेला दोन मोठे धक्के बसल्याचे पहायला मिळाले. एक म्हणजे शहराध्यक्ष पद सोडून राजेश कदम यांनी शिवसेनेत प्रवेश केला तर मनसेचे विरोधी पक्ष नेतेपद भूषविलेले मंदार हळबे यांनी भाजपामध्ये प्रवेश केला. यानंतर डोंबिवलीच्या शहराध्यक्षपदी मनोज घरत यांची पुन्हा एकदा नियुक्ती करण्यात आली.

डोंबिवलीत पार पडलेल्या महाराष्ट्र सैनिक मेळाव्यात बोलताना मनोज घरत यांनी पक्ष सोडून गेलेल्यांवर नाव न घेता सडकून टिका केली. जे गेले त्यांनी स्वतःचा इमान विकला आहे. त्यांनी स्वतःला विकलंय असे त्यांनी आरोप केले. तर राज साहेबांमुळे ज्यांना इतके वर्ष महापालिकेत केबिन मिळाली ते देखील स्वार्थीपणे सोडून गेलेत. आपण इमान विकायचा नाही असा घणाघाती आरोप त्यांनी मनसे सोडून गेलेल्यांवर केला आहे. डोंबिवलीत आयोजित पक्षाच्या मेळाव्यातून ते बोलत होते. मनोज घरत यांची नियुक्ती झाल्या नंतर मनसेने कल्याण डोंबिवलीत पक्ष बांधणी करण्यास सुरुवात केली असल्याचे दिसून येते.