कल्याण पश्चिमेत चाळीवर कोसळला अंडर कन्स्ट्रक्शन इमारतीचा लोखंडी रॅम्प
कल्याण :- पश्चिमेतील बिर्ला कॉलेज नजीक कोकण वसाहतीच्या चाळीच्या घरांवर १६ मजली निर्माणाधीन इमारतीचा लोखंडी रँम्प ९ रुमवर पडल्याने या रूमचे पत्रे फुटले आहेत. तसेच दोन रुमवर आंब्याचे झाड कोसळल्याने या रूमचे देखील पत्रे फुटल्याची घटना घडली. सुदैवाने दैवबलव्तर असल्याने जिवितहानी टळली. घराचे पत्रे फुटल्याने ११ कुटुबीयांचे संसार उघड्यावर आले आहेत. त्यामुळे या घटनेला जबाबदार कोण? निसर्ग की बिल्डर ? अशी चर्चा सुरू झाली असून कोण भरपाई देणार? असा सवाल निर्माण झाला आहे.
कल्याण डोंबिवली मध्ये मंगळवारी सायंकाळी वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाल्याने कल्याण मधील बिर्ला कॉलेज नजीक कोकण वसाहत चाळ नं ३३ च्या ९ खोल्यांवर १६ मजली निर्माणाधीन इमारतीचा लोखंडी रँम्प् (परांची) संध्याकाळी ८ च्या दरम्यान कोसळला. या घटनेत सुमारे ९ खोल्यांच्या छप्पराचे पत्रे फुटले मात्र सुदैवाने जिवित हानी झाली नाही. वंदना शिर्के, दिपक सुर्वे, वसंती कदम, दिंगबर चिंदरकर, संतोष सुर्वे , दिलिपकुमार चव्हाण, रजंना खरात, जयनंद व्ही कुदंर, राजु उपाध्याय, यांच्या घराचे पत्रे तुटल्याने ऐन दसारा सणाच्या तोंडावर संसार उघाड्यावर पडले आहेत. तर त्याच परिसरात आंब्याचे झाड पडल्याने अभय धनावडे, श्रीपाद कुलकर्णी यांच्या खोल्याचे पत्रे फुटले.
या दोन्ही घटनेत सुदैवाने जिवितहानी झाली नाही.दरम्यान या नुकसानीला जबाबदार कोण असा सवाल निर्माण झाला आहे याची नक्की कोण भरपाई देणार यासाठी घटनाग्रस्त नागरिक बोलत आहे. या घटनेचे गांभीर्य ओळखून आपत्कालीन निधीतून खर्च करावा असा सूर आवळला जात आहे.
-रोशन उबाळे

