पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या केंद्रीय राज्यमंत्रीमंडळात निवड झाल्यानंतर नवनिर्वाचित मंत्र्यांची जन आशीर्वाद यात्रा काढण्यात आली होती. यातच संपूर्ण ठाणे जिल्ह्यात केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांनी पाच दिवस भेटी दिल्या. याचदरम्यान शेवटच्या दिवशी यात्रेची सांगता झाल्यानंतर त्यांनी एका खुर्चीला वंदन करून तिच्यासमोर ते नतमस्तक झाले. यानंतर त्यांनी असे का केले ? याबद्दल काही लोक अनभिज्ञ आहेत.
राजकारण असोत किंवा इतर कोणतेही क्षेत्र प्रत्येकाची सुरुवात ही तळा गाळातून आणि शून्यातूनच होत असते. आणि शून्यातुन सुरुवात करून केंद्रीय राज्यमंत्री पद मिळवणारे कपिल पाटील हे देखील त्यातीलच एक. कपिल पाटील यांनी ज्या खुर्चीला वंदन केले ती केंद्रीय खुर्ची नसून ज्या खुर्चीने त्यांना घडवलं ती ही खुर्ची होती. राजकारणात पहिलं मिळालेलं मोठं यश म्हणजे हीच खुर्ची जिला कपिल पाटील यांनी विनम्रपणे हात जोडले. ती खुर्ची होती सरपंच पदाची. म्हणूनच कपिल पाटील यांनी कुटुंबातील लोकांना घेऊन थेट ग्रामपंचायत कार्यालय गाठले.

कपिल पाटील यांनी राजकारणात प्रवेश केला त्यावेळी म्हणजेच १९८८ मध्ये ते दिवे अंजूर गावासाठी ग्रामपंचायत निवडणूक लढवत होते. आणि याच गावचे ते सरपंच बनले होते. सरपंच पदाच्या लहान मात्र गावात प्रचंड मान असणाऱ्या खुर्चीवरून कपिल पाटील यांचा राजकीय प्रवास सुरु झाला होता. या खुर्चीवरून पुढे एवढा मोठा प्रवास होईल असे त्यांनी स्वप्नात देखील पाहिले नव्हते. सरपंच कपिल पाटील ते केंद्रीय मंत्री कपिल पाटील हा प्रवास ज्या खुर्चीमुळे शक्य झाला त्या खुर्चीला मी कधीही विसरणार नाही अशी भावना त्यांनी यावेळी व्यक्त केली आणि त्यांना गहिवरून आले. आयुष्यात कितीही उंची गाठा पण पहिल्या पायरीला कधीही विसरू नका असा संदेश कपिल पाटलांनी यातून लोकांना दिला आहे. यातून कपिल पाटील हे किती भावनिक आहेत याचाच एक प्रत्यय लोकांना आला आहे.
-संतोष दिवाडकर
