कल्याण जवळील मलंगगड भागात पर्यटकांची बुडुन मृत्युमुखी पडण्याची मालिका संपलेली दिसत नाही. शनिवारी एकाचा मृत्यू झाल्यानंतर रविवारी सलग दुसऱ्या दिवशी खरड जवळील बंधाऱ्यात बुडुन एका इसमाला प्राण गमवावे लागले आहेत. मागील दीड महिन्यातील ही चौथी दुर्घटना असून आतापर्यंत सहा जणांचा जीव गेलेला आहे.
वडाळा येथील कमलानगर भागात राहणारा अश्रफ मोहम्मद आरिफ शेख हा २३ वर्षीय तरुण आपल्या ८ मित्रांसोबत मलंगगड येथे आला होता. या दरम्यान तो याच भागातील खरड गावाजवळ असलेल्या बंधाऱ्यात पोहण्यासाठी उतरल्याची माहिती आहे. आणि याचदरम्यान पाण्यात बुडुन त्याचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच हिल लाईन पोलीस घटनास्थळी दाखल झाले. स्थानिकांच्या मदतीने मृतदेहाचा शोध घेऊन मृतदेह पाण्याबाहेर काढण्यात आला. या घटनेचा अधिक तपास आता पोलिसांकडून केला जात आहे.

पावसाळा सुरू झाल्या नंतर मलंगगडच्या निसर्ग सौन्दर्याकडे शहरी भागातील पर्यटक आकर्षित होतात. शहरापासून जवळ असल्याने येथे शनिवार रविवार पर्यटक गर्दी करतात. यामुळे अनेकदा पर्यटक, स्थानिक रहिवासी आणि पोलिसांमध्ये शाब्दिक चकमकी व परिणामी गुन्हे देखील दाखल होत असतात. मात्र तरीही पर्यटन बंदीचे उल्लंघन करून लोक येतात. मात्र यातील काही पर्यटक हलगर्जीपणा करतात आणि परिणामी प्राणाला मुकावे लागते. मागील दीड महिन्यांत चार घटना घडल्या असून सहा जणांचा समावेश आहे.
१५ जुलै रोजी नेवाळी जवळील तलावात बुडुन दोन अल्पवयीन मुलांनी जीव गमावला होता. शुभम भोईर आणि चांद पाटील अशी त्यांची नावे. यानंतर पुढच्याच आठवड्यात २२ जुलै रोजी मलंगगड जवळील नदीत अतिवृष्टी होत असतानाही पाण्यात उतरलेल्या दोन तरुण मित्रांचा करुण अंत झाला. या घटनेत कल्याणच्या विजयनगर भागातील इशांत मोहडकर आणि विनायक परब या दोघांचा बळी गेला. या दोन घटनेनंतर शनिवारी २८ ऑगस्ट रोजी कुशिवली येथे विवेक मेहरा हा तरुण बुडाला. तर दुसऱ्याच दिवशी रविवारी २९ ऑगस्ट रोजी अश्रफ मोहम्मद आरिफ शेख याचाही बुडुन मृत्यू झाला. या घटना वारंवार सुरू असून ही मालिका थांबणार आहे की पावसाळा संपेपर्यंत आणखीन सुरू राहणार आहे हे आता येणाऱ्या काळातच स्पष्ट होईल.
-संतोष दिवाडकर
