रेल्वे कामगारांनी लावलेल्या नायलॉन सदृश रश्शीमुळे दोघांचा गळा चिरून मृत्यू – कल्याण रेल्वे स्थानक हद्दीतील घटना

कल्याण रेल्वे स्थानक हद्दीत गुरुवार ११ फेब्रुवारी रोजी एक गंभीर दुर्घटना घडली. फलाट क्रमांक ७ नजीक काम सुरू असल्याने कर्मचाऱ्यांनी प्रवेश निषिद्ध करण्यासाठी नायलॉन रश्शी लावली. मात्र ही रश्शी न दिसल्याने दोघांचा गळा चिरून मृत्यू झाल्याची गंभीर घटना घडली आहे.

काम सुरू असताना ‘काम सुरू आहे’ फलकासह बेरिकेट लावणे गरजेचे होते मात्र असे न करता नायलॉन सदृश रश्शी लावली. ही रश्शी डोळ्यांना न दिसल्याने दोन तरुणांचा गळा चिरून दुर्दैवी मृत्यू झाला. योगेश सांगळे व मुकेश राय अशी दोन्ही मृत युवकांची नावे आहेत. या घटनेत रेल्वे प्रशासनाचा निष्काळजीपणा दिसून येतो.

आज शनिवारी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे कल्याण डोंबिवली शहर युवक कार्याध्यक्ष भारत सोनवणे यांनी रेल्वे प्रशासनाला निवेदन दिले आहे. मृत्युमुखी पडलेल्या तरुणांच्या कुटुंबियांना मोबदला मिळणे व रस्त्यावर रश्शी बांधणाऱ्याना निलंबित करण्यात यावे अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे. कल्याण रेल्वे स्थानक प्रबंधक, एरिया मॅनेजर, आरपीएक इंचार्ज, वरीष्ठ पोलीस निरीक्षक जीआरपी यांना ही निवेदने देण्यात आलेली आहेत. शिवाय न्याय न मिळाल्यास आंदोलनाचा इशारा देखील रिपाईच्या वतीने देण्यात आलेला आहे. यावेळी मोठ्या संख्येने रिपाईचे युवक कार्यकर्ते उपस्थित होते. तसेच मृतांना न्याय मिळावा याकरिता समाजसेवक सुमेध हुमने व शेखर केदारे देखील उपस्थित होते.

“… तर मग कल्याणात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी रस्त्यावर उतरणार” – जगन्नाथ शिंदे

उल्हासनदी प्रदूषण मुक्त करण्यासाठी ‘मी कल्याणकर’ ही सामाजिक संस्था गेल्या तीन दिवसांपासून धरणे आंदोलन करण्यासाठी नदीपात्रात बसलेली आहे. क.डों.म.पा.चे माजी नगरसेवक नितीन निकम आणि त्यांच्या समवेत काही समाजसेवक देखील या आंदोलनासाठी बसलेले आहेत.

नितीन निकम हे गेल्या पाच वर्षांपासून सातत्याने उल्हासनदी प्रश्नावर आंदोलने करीत आहेत. उल्हासनदी पत्रातील परिस्थिती पुन्हा एकदा दयनीय झाली आहे. नागरिकांच्या हिताचा प्रश्न असल्याने त्यांना राजकीय पक्ष व संघटनांचा पाठिंबा दरवेळेस मिळतो. जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे तसेच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी स्वतः निकम यांच्या आंदोलनाला मागील वेळेस भेट दिली होती.

उल्हास नदी प्रश्नावर सुरू असलेल्या धरणे आंदोलना संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष जगन्नाथ शिंदे यांनी स्वतः आंदोलनकर्त्यांची आंदोलन स्थळी जाऊन भेट घेतली आणि समस्या जाणून घेतली. आंदोलनाचा गंभीर विषय अद्यापही प्रशासन मनावर घेत नसल्याचे दिसून येत आहे. हा प्रश्न सोडवण्यासाठी ते सबंधित यंत्रणांच्या भेटीगाठी घेणार आहेत. जर प्रशासनाने हा तिढा सोडवला नाही तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी रस्त्यावर उतरून आंदोलन करेल असा इशारा जगन्नाथ शिंदे यांनी दिला आहे.

क.डों.म.पा. क्षेत्रात निवडणूक जवळ आलेली असताना शिवसेना,भाजपा,मनसे आदी पक्षांनी याच महिन्यात विविध विषयावर आंदोलने पुकारली होती. आणि याच आंदोलनातुन राजकीय पक्षांनी आपले शक्तिप्रदर्शन केले. आता राष्ट्रवादी काँग्रेस देखील उल्हास नदी प्रश्नावर आंदोलन करण्याचा तयारीत आहे. त्यामुळे उल्हास नदी प्रश्न प्रशासनाने सोडवला नाही तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी काही दिवसांत रस्त्यावर उतरताना दिसू शकेल. आणि असा इशाराही जिल्हाध्यक्ष जगन्नाथ शिंदे यांनी आता दिला आहे.