खासदार श्रीकांत शिंदे दुसऱ्यांदा कोविड पोजिटिव्ह ; हॉस्पिटलमधून व्हडिओद्वारे साधला संवाद

कल्याणचे खासदार श्रीकांत शिंदे यांना आता दुसऱ्यांदा कोरोनाची लागण झाली आहे. कोरोना काळात काम करताना अनेक लोकांशी संपर्क होत असल्याने कोरोनाने दोन महिन्या नंतर पुन्हा श्रीकांत शिंदेंना ग्रासले आहे. सध्या श्रीकांत शिंदे यांची प्रकृती ठीक असून ते बरे होत असल्याचे त्यांनी रुग्णालयातुन व्हडिओ द्वारे सांगितले आहे.

कोरोनाचा प्रादुर्भाव थांबवण्यासाठी आपण सर्वांनी कोवीड नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. आपल्याला कोरोनाशी लढायचेही आहे आणि जिंकायचेही आहे असा विश्वास खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी व्यक्त केला आहे. दुसऱ्यांदा कोवीड पॉझिटिव्ह झालेल्या खासदार शिंदे यांच्यावर गेल्या आठवड्यापासून ठाण्यातील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. यावेळी त्यांनी सोशल मिडियाद्वारे लोकांशी संवाद साधताना हा विश्वास व्यक्त केला.

व्हडिओ पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा

https://www.facebook.com/watch/?v=313468003465846

नवा नियम ; सकाळी ११ नंतर जीवनावश्यक सेवांची दुकान बंद !

महाराष्ट्र राज्यात सध्या कोरोना रुग्णांची संख्या वाढत असलेली दिसत आहे. यासाठीच राज्य सरकारने कडक निर्बंध लागू केले होते. मात्र या बरोबर हे निर्बंध आता आणखीनच कठोर करावे लागले आहेत. जीवनावश्यक सेवांची दुकाने आता सकाळी ११ पर्यंतच सुरू राहणार राहणार असून त्यानंतर सर्व काही बंद असणार आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या बैठकीत या निकषावर चर्चा करण्यात आली. किराणा खरेदीच्या नावाखाली लोक बिनधास्तपणे बाहेर फिरतात व त्यामुळे कोरोना आटोक्यात येण्यात अडचण होत आहे असे राज्य सरकारचे म्हणणे आहे. ‘ब्रेक द चेन’ या मिशन नुसार राज्य सरकारने आता निर्बंध आणखी कडक केले आहेत.

सकाळी ७ ते रात्री ८ या वेळेत जीवनावश्यक सेवांची दुकाने जसे की किराणा, दूध डेअरी, चिकन-मटण, मासे अशी सर्व दुकाने फक्त चार तास खुली ठेवण्याची परवानगी दिली गेली होती. मात्र आता हीच वेळ सकाळी ७ ते ११ अशी करण्यात आली असून ४ तासांतच खरेदी विक्री करता येणार आहे. तर रात्री ८ वाजेपर्यंत होम डिलिव्हरीला परवानगी असणार आहे.

नुकत्याच झालेल्या मंत्रीमंडळाच्या बैठकीत लॉकडाऊन बाबतही विचार करण्यात आला आहे. यानुसार काही तासांत राज्यभरात कडक लॉकडाऊन होण्याची देखील शक्यता वर्तविण्यात आली आहे.

पालकमंत्री आहेत कुठे ? मनसे आमदार राजू पाटील यांचा सवाल ; क.डों.म.पा. आयुक्तांची घेतली भेट

कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात कोरोना रुग्णांची संख्या एक लाखाच्या वर गेली आहे. मृत्यू दर देखील वाढताहेत. रुग्णांना बेड मिळत नाही. ऑक्सीजन मिळत नाही. व्हेटीलेटर मिलत नाही. या गंभीर परिस्थिती संदर्भात चर्चा करण्यासाठी मनसे आमदार राजू पाटील, डोंबिवली शहराध्यक्ष मनोज घरत यांनी महानगरपालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांची भेट घेतली.

कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील बिकट झालेली परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी काही सूचना राजू पाटील यांनी या भेटीदरम्यान आयुक्तांना केल्या आहेत. मुख्यत: लसीकरणाच्या कामासाठी जी काही मदत लागेल ती करण्याची तयारी राजू पाटील यांनी दर्शविली. लसीकरण काही केंद्रावर सुरु आहे मात्र लसीचे डोस कमी प्राप्त होत आहेत. तेव्हा आधी केंद्रे जास्त उभारा. त्यानंतर डोस प्राप्त झाल्यावर लसीकरण थांबणार नाही.

मुंबई आणि पुण्यात महापौर, पालकमंत्री आणि आयुक्त एकत्रित येऊन बैठका घेतात. मात्र क.डों.म.पा. मध्ये प्रशासक म्हणून आयुक्तच आहेत. महापौर पद अस्तित्वात नाही. अशा परिस्थितीत पालकमंत्री कुठे आहेत ? असा सवाल मनसे आमदार राजू पाटील यांनी उपस्थित केला आहे.