कापूराचं झाडं अर्धा किलोमीटर पर्यंत खरच हवा शुद्ध करते का????
पावसाळा जवळ आला आहे, त्यातच कोरोना सारख्या आजाराने प्राणवायू आणि झाडांचं महत्व काय आहे ह्याची जाणीव कित्तेक लोकांना झाली आहे आणि येत्या पावसाळ्यात कित्तेक लोक वृक्षारोपण करण्याचा चंग बांधून आहेत. परंतु त्याच वेळी काही संधीसाधू लोकं आपल्या नर्सरी मधली कापुराची झाडं खपवण्यासाठी अशास्त्रीय दावे करत सुटली आहेत. ज्या मुळे भविष्यात भारतीय वनांची वाट लागणार आहे ह्याच भान त्यांना नाही. 
   सर्वच झाडं हवा शुद्ध करत असतात आणि त्यांची हवा शुद्ध करण्याची प्रक्रिया त्यांनी केलेल्या प्रकाश संस्लेशन प्रक्रियेवर अवलंबून असते. जी त्या झाडामध्ये किती प्रमाणात क्लोरोफिल पिगमेंट आहे ह्यावर अवलंबून असते. सर्वसामान्य माणसाच्या भाषेत सांगायचं झाल्यास जे झाड जेवढे अधिक गडद हिरवे तेवढे त्यात क्लोरोफिल पिगमेंट अधिक. आणि तेवढं त्याच प्राणवायू बनवण्याच प्रमाण अधिक.
    
     सोप्या भाषेत सांगायचं झालं तर वड पिंपळ ही झाडे सर्वाधिक हवा शुद्ध करतात. पण आपण त्याची लागवड करतच नाही. त्यांची लागवड करणे अत्यंत सोपे, आणि स्वस्त असते. पावसाळ्याच्या वेळी वडाच्या झाडाची चार एक फूट लांब फांदी. पारई ने नुसती जमिनीत खोवली तरी पुढल्या पावसाळ्यात वड मोठा झालेला असतो. 
     
    आता मूळ मुद्यावर येऊया कपूरचे झाड हे मूळचे जपान आणि चीन मधले. भारतीय आयुर्वेदात गेली कित्तेक वर्ष कापूर आपण वापरत असलो तरी कापुरची झाडं भारतात कधीच आयात केली गेली नव्हती. त्या ऐवजी कापूर आयात केला जात होता. कदाचित परदेशी वृक्ष लावू नयेत ह्याच पुरेपूर ज्ञान आपल्या ऋषीमुनींना असाव म्हणून त्यांनी कधी कापराची लागवड केली नव्हती. त्याऐवजी थेट कापूरच आयात केला जात असे.
    
    आता थोडं कापुराच्या झाडा बद्दल जणून घेऊयात. कापुराचे झाड मूळचे जपान चीन आणि इंडोनेशिया मधले तेथील वनांमध्ये ही झाडे सापडतात काही दशकांपूर्वी कापुराची झाडे फ्लोरिडा राज्यात लावली गेली होती अगदी पाच दहा वर्षात त्यांची संख्या हाताबाहेर गेली आहे ज्या मुळे फ्लोरिडा मधील कीटक आणि परदेशी उपद्रवी वृक्ष निवारण मंडळाने कपुराच्या झाडाला क्रमांक एक चे आक्रमक झाड म्हणून घोषित केलं आहे.
    
त्या मागची कारणे देखील तशीच आहेत. हे झाड अगदी चटकन वाढते आणि स्थानिक हळु हळू वाढत असलेल्या झाडांशी स्पर्धा करते. उंच होते आणि जवळपास ५०% सूर्यप्रकाश अडवणारी सावली निर्माण करते. ज्या मुळे स्थानिक हळू हळू वाढत असलेली झाडं मरून जातात किव्वा त्यांची वाढ खुंटते. आता हे झाड मोठे झाल्या नंतर त्याला काळ्या रंगाची खूप सारी फळे येतात. जी पक्षांना आवडतात. ज्या मुळे पक्षी ही फळे खाऊन त्यांच्या बिया इतरत्र पसरवतात. आणि काही बिया जर वनांमध्ये जाऊन पडल्या तर तिथल्या सर्व वृक्षांसोबत स्पर्धा करतात. ज्या मुळे स्थानिक वाढ कमी असलेली वृक्ष स्पर्धेतून बाद होऊन त्यांच्यावर अवलंबून असलेले कित्तेक प्राणी नष्ट होतात. शिवाय कापुरच्या झाडांखाली तयार झालेल्या दाट सावली मुळे लहान मोठी झुडपे देखील वाढत नाही. ज्या मुळे पावसाळ्यात मातीची धूप होते. शिवाय कापुरचे झाड कमकुवत असल्याने सोसाट्याच्या वारा पावसात उन्मळून पडते आणि खाली वाढत असलेली कित्तेक स्थानिक वृक्षांची रोप मारून टाकते. जिथे कापुराची झाडं अधिक असतात तिथे भुसख्खलन होण्याचा संभव वाढतो. कारण त्यांच्या मुळे लहान सहान माती धरून ठेवणारी झुडुपे उगवत नाहीत.
    
   तरी जर प्राणवायू हवा असेल तर वड, पिंपळ, अवदुंबर, कडुलिंब , फणस , आंबा, अशी मोठी वाढणारी कोणतीही स्थानिक जैवविविधता टिकवून ठेवणारी झाडे लावा. एवढी मोठी झाड लावणे शक्य नसल्यास स्थानिक बांबूचे बेट तयार केलं तरी चालेल. पण आणखी विदेशी वृक्ष नकोत. आधीच गलिरिसिडिया- गिरिपुष्प, विदेशी निलगिरी, घाणेरी, सारख्या झाडांनी भारतीय वनांची वाट लावली आहे त्यात आणखीन भर नको. 


प्रा. भूषण वि. भोईर,
सह. प्रा. प्राणीशास्त्र विभाग,
सोनोपंत दांडेकर महाविद्यालय,
पालघर.
८२३७१५०५२३.

रस्त्यावर बेफिकीरपणे मोकाट फिरणाऱ्यांवर कडक कारवाया सुरू करा ; क.डों.म.पा. आयुक्तांचे निर्देश

कल्याण-डोंबिवली महापालिका परीक्षेत्रात येत्या १५ दिवसात लॉकडाउनची कडक अंमलबजावणी करणेबाबत आज सकाळी पोलीस अधिकारी, महापालिका अधिकारी यांच्यात व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे आढावा बैठक पार पडली. रस्त्यावर सबळ कारणाशिवाय फिरणाऱ्या नागरीकाना आता अँन्टीजन टेस्ट केंद्रावर नेऊन टेस्ट करण्यात यावी. असे निर्देश महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी दिले. तसेच अशा बेफिकीर लोकांवर कारवाया देखील सुरू करा असे निर्देश आता महापालिका आयुक्तांनी दिले आहेत.

कल्याण व डोंबिवली येथे असलेल्या नाकाबंदी पॉईंटवर गर्दी नियंत्रित केली पाहिजे. नागरिक पूर्वेकडून पश्चिमेकडे फिरतात. विनाकारण गर्दी करतात. तेथे पोलिसांनी सक्त भूमिका घ्यावी. असे डॉ.विजय सूर्यवंशी यांनी सांगितले. ते पहिल्या लॉकडाऊन सारखेच क़डक काम करावे लागेल अशा सूचना पोलीस उपायुक्त विवेक पानसरे यांनी या बैठकित दिल्या. त्यामुळे सबळ कारणाशिवाय रस्त्यावर फिरणाऱ्या लोकांची यापुढे कल्याण मध्ये जुने महात्मा फुले पोलिस स्टेशन तहसील कार्यालयाजवळ व डोंबिवलीत रामनगर पोलीस स्टेशन या ठिकाणी अँन्टीजन टेस्ट केली जावी व त्यासाठी ॲम्बुलन्स ची सुविधा उपलब्ध करावी. अशा सूचना आयुक्त डॉक्टर विजय सूर्यवंशी यांनी वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉक्टर अश्विनी पाटील व सर्व प्रभाग क्षेत्र अधिकारी यांना दिल्या.

सध्या रुग्णसंख्या कमी झाल्यामुळे सर्वत्र शिथीलता दिसून येत आहे त्यामुळे १५ दिवस सर्वांनी कडक लॉकडाउनचे पालन करावे असे आवाहन महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी यावेळी केले. सकाळी ११ नंतर प्रभाग क्षेत्र अधिकाऱ्यांनी आपापल्या प्रभागात पाहणी करावी आणि पाहणी करताना जनजागृतीसाठी मेगा फोनद्वारे अनाउन्समेंट चालू ठेवावी असेही ते म्हणाले. वाईन्स च्या दुकानात गर्दी दिसून येत असल्याबाबत तसेच रात्री उशिरा आईस्क्रीम पार्लर चालू असल्याबाबत तक्रारी प्राप्त होत आहेत. याचीही पाहणी करून तेथे नियंत्रण ठेवावे अशा सूचना आयुक्तांनी प्रभाग क्षेत्र अधिकाऱ्यांना दिल्या.

सर्व विभागीय उपायुक्तांनी आपापल्या विभागात दिवसातून किमान दोन ते तीन वेळा पाहणी करावी. अंतर्गत भागात गर्दीची पाहणी करण्यासाठी आवश्यक भासल्यास ड्रोन चा वापर करावा असेही निर्देश पालिका आयुक्तांनी सर्व विभागीय उपायुक्तांना दिले आहेत.

लक्ष्मी मार्केट, एपीएमसी मार्केट या ठिकाणी सकाळी खूप गर्दी होते. अशा सूचना पोलिसांकडून प्राप्त होताच एपीएमसी मार्केट मधील गर्दी कमी करण्यासाठी पोलीस आणि प्रभाग क्षेत्र अधिकारी यांनी नियोजन करावे त्याच प्रमाणे लक्ष्मी मार्केटमध्ये जास्त गर्दी दिसून येत असेल तर ते मार्केट बंद करून पूर्वीप्रमाणे सदर भाजी मार्केट चे नियोजन अन्यत्र विविध ठिकाणी करण्याबाबत विचार केला जाईल अशीही माहिती आयुक्तांनी यावेळी दिली.

कल्याण रेल्वे स्थानकाबाहेर रेस्टॉरंट मध्ये लोक उभे राहून खातांना दिसून येतात. तसेच स्टेशनबाहेर सकाळी ११ नंतर देखील फेरीवाले दिसून येतात अशी माहिती सहा.आयुक्त अनिल पोवार यांनी दिली असता रेस्टॉरंट मध्ये केवळ पार्सल सुविधा चालू ठेवाव्यात, गर्दी दिसली तर सदर रेस्टॉरंट सील करण्याची कारवाई करण्याचे निर्देश आयुक्तांनी प्रभाग क्षेत्र अधिकाऱ्यांना दिले . ११ एप्रिलला रुग्ण संख्या २४०० झाली होती. आता आठवड्याभरात दिवसाला ५०० पर्यंत खाली आली. पण पुन्हा रुग्णसंख्या वाढली तर परिस्थिती गंभीर होईल. त्यामुळे येत्या १५ दिवसात रुग्ण संख्या कमी करण्याच्या अनुषंगाने सर्वत्र लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी करावी. सकाळी ११ नंतर भाजीवाले, हातगाडीवाले, फेरीवाले फिरताना दिसले तर त्यांच्यावर कठोर कारवाई करावी अशा सूचना आयुक्तांनी या बैठकीत दिल्या आहेत.

सदर बैठकीत महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुनिल पवार, कल्याण परिमंडळ – ३ चे पोलिस उपायुक्त विवेक पानसरे, महापालिकेचे सर्व विभागीय उप आयुक्त, महापालिका वैद्यकीय आरोग्य अधिकारी, कल्याण व डोंबिवली येथील सहाय्यक पोलीस आयुक्त, महापालिकेचे सर्व प्रभाग क्षेत्र अधिकारी, परिमंडळ – ३ अंतर्गत चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक, सहा. जनसंपर्क अधिकारी उपस्थित होते.