एक लाख रुपयांसाठी सहा महिन्यांच्या बाळाचे अपहरण ; दोनच दिवसांत पाच जणांना ठोकल्या बेड्या

एक लाख रुपयांसाठी ६ महिन्याच्या बाळाचे अपहरण केलेल्या ५ आरोपींना शिताफीने अटक करुन अपहरण केलेले बाळ ४८ तासांच्या आत परत मिळविण्यात कल्याणच्या महात्मा फुले चौक पोलिसांना यश आले असल्याची माहिती कल्याण परिमंडळ ३ चे पोलीस उपायुक्त विवेक पानसरे यांनी दिली.  

कल्याण पश्चिमेतील महात्मा फुले चौक पो.स्टे. हद्दीत फिर्यादी सुनिता राजकुमार नाथ वय ३० वर्षे राहणार कल्याण मुळ रा. हाजीपुर, पटना, बिहार राज्य ह्या ५ जून रोजी रात्री १० वाजण्याच्या सुमारास महंमद अली चौक, शिवमंदिराच्या बाजुस एका दुकानाच्या बाहेर त्याच्या ६ महिन्यांच्या मुलांसह झोपल्या असतांना रात्री १० ते १ च्या दरम्यान अज्ञात आरोपींनी सुनिता यांच्याजवळ झोपलेले त्यांचे ६ महिन्यांचे लहान बाळ जिवा याचे अपहरण केले होते. याबाबत ६ जून रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता.

महात्मा फुले चौक पोलीस स्टेशनचे सपोनि सरोदे, सपोनि पाटील व स्टाफ यांनी घटनास्थळ परीसरातील सी.सी.टि.व्ही फुटेजच्या मदतीने तांत्रीक तपास करुन या गुन्हयातील आरोपी निष्पन्न केले. त्याप्रमाणे आरोपींचा कसोशिने व चिकाटीने शोध घेवुन आरोपी विशाल चंद्रकांत त्र्यंबके वय २० वर्षे आटाळी आंबिवली,  कुणाल विष्णु कोट वय २३ वर्षे रा.साई राणा चाळ,दिवा पुर्व, आरती कुणाल कोट वय २२ वर्षे,  हिना फरहान माजीद वय २६ वर्षे रा. कोटर मशिद जवळ, भिवंडी,  फरहान अब्दुल रझाक माजीद वय ३८ वर्षे यांना ताब्यात घेवुन त्यांच्याकडुन अपहरण केलेले ६ महिन्याचे बाळ ४८ तासाच्या  आत सुखरुपपणे परत मिळविले आहे.

आरोपी विशाल त्र्यंबके व कुणाल कोट हे काही कामधंदा करीत नाहीत. आरोपींनी आपसात संगनमत करुन आरोपी  हिना माजीद आणि फरहान माजीद यांना लहान बाळ  एक लाख रुपयांना विकण्यासाठी आरोपी विशाल त्र्यंबके व कुणाल कोट यांनी फिर्यादी जवळ झोपलेले लहान बाळ अलगद उचलुन त्याचे अपहरण करुन ते आरोपी आरती कोट हिच्या ताब्यात दिले. आरतीने हे बाळ आरोपी हिना माजीद व फरहान माजीद यांच्या ताब्यात देवुन ते तिघेही रिक्षातुन बाळाला घेवुन जात असतांना त्यांना शिताफीने अटक करुन त्यांच्या ताब्यातुन बाळ सुखरुपपणे परत मिळविले आहे.

आरोपी हिना व फरहान माजीद हे गुन्हयात निष्पन्न झालेल्या पाहीजे असलेल्या आरोपी महीलेला हे बाळ विक्री करणार असल्याचे निष्पन्न झाले असून या पाहीजे असलेल्या महिलेचा शोध सुरु आहे. तर या पाचही आरोपींना अटक केली असुन त्यांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांची १४ जून पर्यंत पोलीस कोठडीमध्य रवानगी केली आहे.

सदरची कारवाई महात्मा फुले चौक पोलीस ठाण्यातील गुन्हे प्रकटीकरण पथकातील अधिकारी सपोनि दिपक सरोदे, प्रकाश पाटील, पोउनि संजय जगताप, सपोउनि जे.के.शिंदे, पोहवा निकाळे, भालेराव,पोना ठिकेकर, भालेराव,  भोईर, हासे, मधाळे, पोशि जाधव, निसार पिंजारी यांनी केली असून या गुन्हयाचा पुढील तपास सपोनि ढोले हे करीत आहेत.

-कुणाल म्हात्रे

लसीकरणासाठी ग्रामीण भागातील जनतेला आणखी दिलासा ; मा.नगरसेवक कुणाल पाटील यांच्या प्रयत्नांना यश

कल्याण पूर्वेतील आडीवली आरोग्य उपकेंद्रावर लसीकरण केंद्र सुरु झाले असून स्थानिक नगरसेवक कुणाल पाटील यांच्या प्रयत्नांना यश मिळाले आहे. हे लसीकरण केंद्र सुरु झाल्याने ग्रामीण भागातील नागरिकांना आणखी दिलासा मिळणार आहे.

कोरोनापासून बचाव करण्यासाठी लसीकरण महत्त्वाचे असून ग्रामीण भागातील नागरिकांना भेडसावणारी समस्या लक्षात घेऊन आडीवली आरोग्य उपकेंद्रावर लसीकरण केंद्र सुरू करण्यासाठी नगरसेवक कुणाल पाटील यांनी शासनाकडे पाठवपुरावा केला होता. त्यांच्या या पाठपुराव्याला यश आले असून आजपासून याठिकाणी नागरिकांसाठी लसीकरण केंद्र सुरू करण्यात आले आहे. या केंद्राचे उद्घाटन नगरसेवक कुणाल पाटील यांच्याहस्ते करण्यात आले. या केंद्रामुळे ग्रामीण भागातील जनतेला लसीकरणासाठी लांब जावे लागणार नाही. तसेच नागरिकांचा वेळ आणि त्रास देखील वाचणार आहे.  

नागरिकांनी या लसीकरणाचा लाभ घेण्याचे आवाहन त्यांनी केले असून आडीवली गावात लसीकरण केंद्र सुरू केल्या बद्दल नागरिकांनी नगरसेवक कुणाल पाटील यांचे आभार मानले आहेत. यावेळी उद्योगपती विजय भाने, माजी नगरसेवक गणेश भाने, माजी सरपंच बळीराम भाने, समाजसेवक अनिल पाटील,   माजी उपसरपंच वासुदेव गायकर, केशव भाने, पंढरीनाथ पाटील आदि मान्यवर आणि ग्रामस्थ उपस्थित होते.

नागरिकांच्या लसीकरणासाठी मेहनत घेण्याऱ्या सर्व डॉक्टर आणि आरोग्य कर्मचाऱ्यांचे पाटील यांनी आभार मानले आहेत. दरम्यान काही दिवसांपूर्वी याच भागातील द्वारली आरोग्य उपकेंद्र याठिकाणी देखील लसीकरण केंद्र सुरु झाले असून आता आडीवली येथे देखील लसीकरण सुरु झाल्याने ग्रामीण भागातील नागरिकांना यामुळे मोठा दिलासा मिळाला आहे.

-कुणाल म्हात्रे

कल्याणात ६ सापांना सर्पमित्रांनी दिले जीवदान

रविवारी कल्याण मध्ये सर्पमित्रांनी ६ सापांना जीवनदान दिले आहे. यामध्ये डुरक्या घोणस, २ धामण, धूळ नागीण आणि दिवड  या सापांचा समावेश आहे. सर्पमित्र दत्ता बोंबे आणि हितेश करंजावकर या दोघांनी हि कामगिरी केली आहे.

 कल्याण पश्चिमेतील आधारवाडी परिसरातील बितुल सोसयटी परिसरात भक्ष्य गिळंकुत करण्याच्या तयारीत असलेल्या साडेचार फुटी लांब सापाला पाहुन पाहणाऱ्याची भांबेरी उडली. रविवारी सकाळी साडेआठच्या सुमारास डुरक्या साप आपले भक्ष्य उंदीर गिळंकृत करण्याच्या स्थितीत आढळल्याने बाघ्याची भितीने धादंल उडली स्थानिक रहिवाशी वाजपेयी यांनी सर्पमित्र दत्ता बोंबे यांना काँल केला. घटनास्थळी सर्पमित्र दत्ता बोंबे यांनी पोहचत डुरक्या या साडे चार फुटी घोणस सापास पकडले.

  डुरक्या सापाचे वैशिष्ट्य असे की  उंदीर, घुशी, सरडे यांना पकडल्या नंतर आवळुन त्यांचा श्वास बंद झाल्यानंतर भक्ष्य गिळंकृत करतो हा घोणस प्रकारात मोडत असून बिनविषारी साप आहे. या  डुरक्या सापाबाबत सर्पमित्र दत्ता बोंबे यांनी उपस्थितीता मध्ये जन जागृती करीत जीवनदान दिलेल्या डुरक्या सापास वनपाल एम्. डी.जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली नैसर्गिक अधिवासात सोडले.

       तर खडकपाडा प्रफुल सोसायटीमध्ये दिवड साप, उंबर्डे गावांमध्ये आठ-नऊ फुटाची धामण तर सापर्डे गावामध्ये धूळ नागीन मिळाली असल्याची माहिती सर्प मित्र दत्ता बोंबे यांनी दिली.

-कुणाल म्हात्रे