दि.बा.पाटील यांचे नाव नवी मुंबई विमानतळाला देण्याची मानवी साखळीद्वारे कल्याणमध्ये मागणी

नवी मुंबई विमानतळाला लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव देण्याच्या मागणीसाठी मानवी साखळी आंदोलनाची हाक देण्यात आली होती. या हाकेला प्रतिसाद देत कल्याणमध्ये ठिकठिकाणी मानवी साखळी करण्यात आली.

कल्याण पश्चिमेत सर्वपक्षीय नेते एकवटले

दि. बा. पाटील हे शेतकरी, वंचित, गोर गरीब, भूमिपुत्र, बहुजनांच्या न्याय हक्कासाठी लढले. त्यासाठी आज पूर्ण बहुजन समाज रस्त्यावर उतरला आहे. आगरी कोळी समाजाची जी मागणी आहे त्या मागणीला बहुजन समाज आणि भटके विमुक्त समाजाने देखील पाठींबा दिला आहे. खासदार दि. बा. पाटील यांचे नाव देण्यासाठी कोणतेही राजकारण व्हायला नको होते, कोणताही विरोध व्हायला नको होता. पण दुर्दैवाने महाविकास आघाडीचे सरकार हे बिघाडीचे सरकार असून त्यांनी जाणीवपूर्वक यामध्ये राजकारण केले असून त्याचा निषेध करण्यासाठी हे आंदोलन केले असल्याची प्रतिक्रिया माजी आमदार नरेंद्र पवार यांनी दिली.

दरम्यान या आंदोलनात माजी आमदार नरेंद्र पवार, माजी आमदार प्रकाश भोईर यांच्यासह प्रेमनाथ म्हात्रे, अर्जुन भोईर, संजय कारभारी, रवी गायकर, अर्जुन म्हात्रे, उल्हास भोईर,  गणेश चौधरी, विनोद केणे, दिपक दोरलेकर, राहुल भोईर,  शुभा पाध्ये, रेखा तरे, प्रिया शर्मा आदी सर्व पक्षीय पदाधिकारी तसेच कार्यकर्ते सहभागी झाले होते. 

कल्याण पूर्व आमदार गणपत गायकवाड यांचा सहभाग

विमानतळाला नाव देण्याच्या मागणीसाठी कल्याण पूर्व आमदार गणपत गायकवाड हे देखील पुढे सरसावले आहेत. त्यांनी देखील या मानवी साखळीत सहभाग घेतला होता. हातात पोस्टर घेऊन ते स्वतः मानवी साखळीत जोडले गेले होते. मा.नगरसेवक अभिमन्यू गायकवाड हे देखील त्यांच्या समवेत उपस्थित होते.

मा.नगरसेवक कुणाल पाटील आंदोलनात सहभागी

कल्याण ग्रामीण भागात चक्की नाका ते नेवाळी नाका पर्यंत मानवी साखळी करण्यात आली. या आंदोलनाला मा. नगरसेवक कुणाल पाटील यांनी पाठींबा देत चक्कीनाका ते नेवाळी नाका पर्यंतच्या मानवी साखळीत सहभागी होत नवि मुंबई विमानतळाला दि.बा.पाटील यांचे नाव दयावे अशी मागणी त्यांनी केली. या आंदोलनात तिसगाव, नांदिवली,द्वारली, भाल, वसार आदी गावातील ग्रामस्त मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

कल्याण डोंबिवली भागात ८३.५ मीमी पावसाची नोंद ; पालिका आयुक्तांची दिवसभर कंट्रोल रूममध्ये निगराणी

परवा रात्रीपासून कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात मुसळधार पावसाने हजेरी लावली होती. काल दुपारी १२ वाजेपर्यंत कल्याण डोंबिवली परिसरात ८३.५ मीमी पावसाची नोंद झाली आहे. कालपासून होणा-या अतिवृष्टीमुळे महापालिका क्षेत्रातील अनेक सखल भागात पावसाचे पाणी शिरुन पाणी साचल्याचे निदर्शनास आले होते.

महापालिका आयुक्त डॉ विजय सूर्यवंशी, अतिरिक्त आयुक्त तसेच आपत्ती व्यवस्थापन प्रमुख सुनील पवार यांच्या निर्देशानुसार महापालिकेच्या सर्वच प्रभागक्षेत्र अधिका-यांनी सदर परिस्थितीवर लक्ष ठेवुन आपापल्या मनुष्य बळाच्या सहायाने साचलेल्या पाण्याचा निचरा केला. यामध्ये कल्याण (प) छ. शिवाजी महाराज चौक, कल्याण पूर्व मधील दामोदर नगर, डोंबिवली पूर्व स्थानक परिसर येथील सखल भागात साचलेले पाणी मनुष्यबळ लावून, मॅनहोल चेंबर साफ करून त्याचप्रमाणे जेसीबी चा वापर करुन पाण्याचा निचरा करण्यात आला. धोकादायक इमारती कोसळून दूर्घटना होवू नये म्हणून सदर इमारती रहिवास मुक्त करण्यात आल्या. यामध्ये प्रामुख्याने ‘ड’ प्रभागातील २ अतिधोकादायक इमारतीमधील २८ नागरिक स्थलांतरीत करण्यात आले. ‘ह’ प्रभागातील २० अतिधोकादायक इमारतीपैंकी १५ इमारती रहिवासमुक्त करण्यात आल्या. त्यापैकी ५ इमारती रहिवासमुक्त करण्याचे काम सुरु होते. ‘ग’ प्रभागातील २० अतिधोकादायक इमारतीपैकी १२ इमारती रहिवासमुक्त केल्या व ८ इमारतीचे रहिवासमुक्त करण्याचे काम सुरु होते. ‘अ’ प्रभागात १ अतिधोकादायक इमारत असून सदर इमारत रहिवास मुक्त करण्यात आली आहे.

महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यंवशी आणि शहर अभियंता सपना कोळी यांनी महापालिका मुख्यालयातील स्मार्ट सिटी कंट्रोल रुममध्ये दिवसभर प्रत्यक्ष उपस्थित राहून एकंदर परिस्थितीचा आढावा घेतला. महापालिका क्षेत्रातील २०१ प्रमुख ठिकाणी कार्यान्वित असलेल्या ५५१ सीसीटीव्‍ही कॅमे-याचा माध्यमातून पाणी साचण्याच्या जागा अवलोकून महापालिका आयुक्तांनी तेथील समस्यांचे निराकारण करणेबाबत संबंधित अधिका-यांना सुचना दिल्या.

-संतोष दिवाडकर