चहा प्यायला गाडीतून उतरले आणि गाडीवर दरड कोसळली ; माळशेज घाटातील थक्क करणारी दुर्घटना

माळशेज घाट म्हणजे पर्यटकांना पावसाळ्यात पर्वणीच. मात्र निसर्ससौंदर्य असलेला हा घाट दरड कोसळण्याच्या घटनांसाठी जास्त ओळखला जातो. आज सायंकाळी चहा पिण्यासाठी थांबलेल्या एका चार चाकी वाहनावर दरड कोसळली. सुदैवाने आत कुणी नसल्याने जीवितहानी टळली पण कारचे मात्र नुकसान झाले.

आज शुक्रवार दि.११ जुन रोजी सायंकाळच्या सुमारास एक कार अहमदनगरहुन कल्याणच्या दिशेने जात होती. घाट क्षेत्रात देखील आज जोरदार पाऊस झाला. त्यामुळे या भागात दाट धुके पसरले होते. बोगद्याच्या अलीकडे कारमधील प्रवासी मित्रांना चहा पिण्याची तलप आली आणि त्यांनी गाडी रस्त्याच्या कडेला उभी केली. दोघेही चहाच्या हॉटेलजवळ पोहोचताच त्यांच्या गाडीवर दरड कोसळली. काही सेकंद मागे पुढे झाले असते तर दोघांच्या जीवावर बेतले असते. आणि जर चहासाठी थांबले नसते तर कार देखील बचावली असती असे म्हणे वावगे ठरणार नाही. चहामुळे कार गेली असे म्हणण्यापेक्षा चहामुळे जीव बचावला असे म्हणून मनाचे समाधान मानावे लागेल. ‘मुरबाड लाईव्ह महाराष्ट्र न्यूज’ने दिलेल्या माहिती नुसार ही कार अहमदनगर येथील रत्नाकर माचवे यांच्या मालकीची होती. दुर्घटनेनंतर घटनास्थळी पोहोचून महामार्ग व टोकावडे पोलिसांनी मदतकार्य करीत रस्ता तत्काळ खुला केला.

माळशेज घाटात दरवर्षी पावसाळ्यात अश्या घटना होत असतात. धुक्यामुळे होणारे अपघात आणि दरडीच्या दुर्घटनेमुळे आतापर्यंत अनेक लोकांचा जीव गेला आहे. अनेक वर्षांपूर्वी लाल परी म्हणजेच एसटी देखील माळशेज घाटाच्या खोल दरीत सामावली होती. यात अनेक प्रवाशांचा मृत्यू झाला असल्याची कहाणी येथील काही व्यावसायिक सांगतात. त्यामुळे अश्या ठिकाणी पर्यटन करावं पण जीव मुठीत धरून असं म्हणायला हरकत नाही.

-संतोष दिवाडकर

‘…तर केंद्र सरकार विरोधात रस्त्यावर उतरून ओबीसींचा निर्णय घ्यायला भाग पाडू ; कॉंग्रेस ओबीसी विभाग प्रदेशाध्यक्ष भानुदास माळी यांचा ईशारा

ओबीसी आरक्षणाचा निर्णय पुन्हा न घेतल्यास केंद्र सरकारच्या धोरणाविरुद्ध महाराष्ट्रातील ओबीसी समाज रस्त्यावर येऊन केंद्राला निर्णय घ्यायला भाग पाडू असा इशारा कॉंग्रेसच्या ओबीसी विभागाचे प्रदेश अध्यक्ष भानुदास माळी यांनी दिला आहे.

      महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी ओबीसी विभागाचे नवनियुक्त अध्यक्ष भानुदास माळी यांचा संपूर्ण महाराष्ट्रात दौऱ्याचे आयोजन करण्यात आले आहे. त्याचाच एक भाग म्हणून कल्याण शहरातील ओबीसी कार्यकर्त्यांशी संवाद साधण्यासाठी व कल्याण शहर (जि.) प्रदेश स्तरावरील नवीन पदाधिकारी निवडी संदर्भात चर्चा करण्यासाठी भानुदास माळी गुरुवारी कल्याण मधील मुथा कॉलेज येथे आले होते. त्यावेळी ते बोलत होते. कल्याण शहर ओबीसी अध्यक्ष जयदीप सानप यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. सानप यांनी माळी यांचा शाल पुष्पगुच्छ श्रीफळ देऊन स्वागत करत आपला कार्यअहवाल सादर केला.

यावेळी माळी यांनी बोलतांना सांगितले कि, ओबीसी समाज हा कॉंग्रेसमधून इतरत्र विखुरला आहे, मुस्लिमांची संख्या देखील देशात मोठी आहे. ते देखील विवीध राजकीय पक्षात दाखल झाल्याने कॉंग्रेच्या हक्काची मते बाजूला गेली आहेत. त्याचप्रमाणे दलित समाज देखील कॉंग्रेसपासून दूर गेला आहे. या सर्वाना पुन्हा पक्षात आणण्याचं काम प्रदेशअध्यक्ष नाना पटोले यांनी सोपवले असून या कामात यशस्वी होणार असून महाराष्ट्रात दलित, बीसी, ओबीसी, एससी, एनटी समजातील लोकांची आवक कॉंग्रेसमध्ये करण्यासाठी महाराष्ट्र दौरा सुरु केला आहे. त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे. यातून कॉंग्रेस पक्ष महाराष्ट्रात पुन्हा एकदा प्रबळ होईल.

    आरक्षणाचा मुद्दा महाराष्ट्रात नेहमीच गाजला आहे. नरेंद्र मोदींनी आरक्षणाचे मुद्दे सर्व विकून टाकले आहेत. ज्या ज्या ठिकाणी आरक्षण होतं त्या त्या कंपन्या विकून खाजगीकरण केलं आहे. त्यामुळे आरक्षण पूर्णपणे संपत आलं आहे. जे काही थोडं आरक्षण आहे त्याच्यावर देखील घाला घालून या देशातील दलित, ओबीसी, भटके विमुक्त, मुस्लीम यांना देशोधडीला लावायचा ऐतिहासिक कार्यक्रम बीजेपीने आरएसएसच्या माध्यमातून करायला सुरवात केली आहे. ओबीसी आरक्षणाचा निर्णय पुन्हा न घेतल्यास केंद्र सरकारच्या धोरणाविरुद्ध महाराष्ट्रातील ओबीसी समाज रस्त्यावर येऊन केंद्राला निर्णय घ्यायला भाग पाडू असा इशारा कॉंग्रेसच्या ओबीसी विभागाचे प्रदेश अध्यक्ष भानुदास माळी यांनी दिला आहे.

तसेच २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात कॉंग्रेस कदाचित स्वंतत्रपणे लढून आपला प्रभावी पक्ष स्थान निर्माण करेल यासाठी तीन वर्षाचा कालवधी देखील आहे. कल्याण डोंबिवलीत देखील कार्यकर्त्याचं म्हणणे ऐकून नाना पटोलेयांच्यासोबत बैठक आयोजित करून पक्षाला उभारी द्यायचं काम केलं जाईल.   

काँग्रेस नेते प्रकाश मुथा, अलका आवळस्कर, माजी नगरसेवक इफ्तेकर खान यांनी देखील उपस्थितांना मार्गदर्शन केले. तर कार्यक्रमाचे सूत्र संचालन माजी शिक्षण समिती सदस्य चंदर पांडे यांनी केले. यावेळी प्रदेश उपाध्यक्ष धनराज राठोड, शेरेकर, दिनकर राऊत, राजा जाधव, शिबू शेख, उपअध्यक्ष सलीम शेख, अल्पसंख्यांक अध्यक्ष राजेश शर्मा, विनोद शिंपी, रियाज सय्यद, सुमित जाधव, रॉकी सिंह, संतोष नेटारे, अशपाक शेख आदींसह इतर कार्यकर्ते उपस्थित होते.

-कुणाल म्हात्रे

भर पावसातही NDRF पथकासमवेत महापालिका आयुक्तांनी केली कल्याण डोंबिवलीतील धोकादायक इमारतींची पाहणी

हवामान खात्याने येत्या ३ दिवसांसाठी दिलेल्या संभाव्य अतिवृष्टीच्या इशा-याच्या पार्श्वभूमीवर महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी, अतिरिक्त आयुक्त सुनिल पवार, विभागीय उपायुक्त विनय कुलकर्णी, उपायुक्त पल्लवी भागवत यांनी कल्याण मध्ये दाखल झालेल्या NDRF च्या पथकाबरोबर कल्याण पश्चिम येथील जोशीबाग येथील दाटीवाटीच्या वस्तीतील अतिधोकादायक इमारतींची भर पावसात समक्ष पाहणी केली आणि तेथील रहिवाशांची विचारपूस करुन या ३ दिवसाच्या अतिवृष्टीच्या कालावधीसाठी त्यांना जवळच्या नातेवाईकांकडे किंवा महापालिकेच्या संक्रमण शिबीरात स्थलांतरीत होणेबाबत सूचना दिल्या.

कल्याण मधील कचोरे टेकडीवरील दरडी अतिवृष्टी च्या काळात कोसळून दुर्घटना होण्याच्या संभव असतो. त्यामुळे आयुक्त डॉ. विजय सूर्यंवंशी यांनी स्वत: टेकडीवर पाहणी करुन तेथील रहिवाशांना देखील सुरक्षित स्थळी किंवा महापालिकेच्या संक्रमण शिबीरात स्थलांतरित होण्याबाबत सूचना दिल्या, त्यानंतर आयुक्त डॉ.विजय सूर्यवंशी यांनी डोंबिवली पूर्व येथील संत नामदेव पथ व दत्तनगर येथील धोकादायक इमारतीची देखील पाहणी केली.

११ ते १३ जुन या तीन दिवसासाठी अतिवृष्टीचा इशारा हवामान खात्याने दिल्याने धोकादायक इमारती मधील रहिवाशांना दुसरी कडे स्थलांतरीत करण्यासाठी आज NDRF च्या टिम बरोबर त्यांनी पाहणी केली. त्याच प्रमाणे कचोरे टेकडी वर लॅन्‍डस्लाईड सारखी दुर्घटना घडली तर रेस्क्यु करण्यासाठी काय करावं लागेल ? याची तयारी करण्यासाठी देखील कल्याण आणि डोंबिवली परिसरामध्ये NDRF च्या टिम सोबत पाहणी केली असल्याची माहिती आयुक्त डॉ.विजय सूर्यवंशी यांनी दिली.

-संतोष दिवाडकर