कल्याणमधील भटाळे तलावाच्या अतिक्रमणा विरोधात आमरण उपोषण

कल्याण हे ऐतिहासिक शहर असून यामध्ये अनेक ऐतिहासिक तलाव नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. यापैकीच एक असलेला तलाव म्हणजे भटाळे तलाव. ऐतिहासिक दुर्गाडी किल्ल्याच्या समोर असलेल्या या तलावात देखील भूमाफियांनी अतिक्रमण केले असून याविरोधात निर्भय सामाजिक सेवाभावी संस्थेच्या वतीने आमरण उपोषण सुरु करण्यात आले आहे. या संस्थेचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष जयपाल कांबळे आणि ठाणे जिल्हा अध्यक्षा आसीया रिझवी हे छत्रपती शिवाजी महाराज चौकात उपोषणाला बसले आहेत.

      कल्याण पश्चिमेतील दुर्गाडी किल्ल्या समोर ऐतिहासिक शिवकालीन भटाळे तलाव होता. केडीएमसीच्या काही भ्रष्ट अधिकाऱ्यांनी भूमाफियांशी संगनमत करून तो तलाव अतिक्रमणाच्या रूपाने भूमाफियांच्या घशात घातला असल्याचा आरोप निर्भय सामाजिक सेवाभावी संस्थेने केला आहे. अशा भ्रष्ट अधिकारी आणि भूमाफियांवर गुन्हा नोंद करून भटाळे तलाव पूर्ववत बांधून त्याचे सुशोभिकरण करण्याच्या मागणीसाठी आमरण उपोषण सुरु करण्यात आले आहे.

-कुणाल म्हात्रे

कल्याणच्या बिर्ला महाविद्यालयात सुवर्ण जयंती महोत्सवास सुरवात

देशाच्या प्रतिष्ठित महाविद्यालयांमध्ये समाविष्ट असलेले कल्याण मधील बी. के. बिर्ला महाविद्यालय हे आपल्या स्थापनेच्या ५० व्या वर्षात प्रवेश करत आहे. महाविद्यालयाच्या व्यवस्थापन समितीने हे वर्ष सुवर्ण जयंती वर्षाच्या रूपात साजरे करण्याचा निर्णय घेतला आहे. ज्याचे उद्घाटन आज महाविद्यालयाच्या मुख्य संरक्षक पद्मभूषण राजश्री बिर्ला यांच्याहस्ते ऑनलाईन झाले.

याप्रसंगी त्यांनी सर्वांचे अभिनंदन केले व महाविद्यालयाच्या भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. महाविद्यालयाचे संस्थापक बसंत कुमार बिर्ला यांचे हे जन्मशताब्दी वर्ष देखील आहे. या सोहळ्यात महाविद्यालयातर्फे या शैक्षणिक वर्षात विविध शैक्षणिक, सांस्कृतिक कार्यक्रम व क्रीडा स्पर्धा आयोजित केल्या जातील.

या आयोजनामध्ये शिक्षण, संस्कृती आणि खेळ जगतातील गणमान्य व्यक्तींना निमंत्रित करण्याची योजना केली गेली आहे. महाविद्यालयाच्या सुवर्ण वर्ष जयंती निमित्त शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांमध्ये विशेष उत्साह आहे.

-कुणाल म्हात्रे