पोलीस उपायुक्तांच्या हस्ते अलका सावली प्रतिष्ठानच्या गरजूंना छत्री वाटप उपक्रमाचा शुभारंभ

बेघर आणि गरजू लोकांचे पावसापासून रक्षण व्हावे यासाठी कल्याण पश्चिमेतील ‘अलका सावली’ प्रतिष्ठान या संस्थेमार्फत दरवर्षी गरजू लोकांना छत्री वाटप करण्यात येते. यावर्षी देखील संस्था हा उपक्रम राबवत असून कल्याणचे पोलीस उपायुक्त विवेक पानसरे यांच्याहस्ते काही लोकांना छत्री देऊन आज या उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी संस्थेचे संस्थापक सुधीर वायले यांच्यासह संस्थेचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

अलका सावली प्रतिष्ठान या सामाजिक संस्थेचे मार्फत वर्षभर असे विविध सामाजिक उपक्रम राबविले जातात. त्यात आरोग्य शिबिर, आदिवासी पाड्यावरील लोकांना कपडे, गरजूंना अन्नधान्य  वाटप व करोना काळातही ज्या वस्तूंची गरज ती म्हणजे मास्क, सॅनीटायझर, विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य,  गरजू विद्यार्थ्यांना सायकली, लहान मुलांसाठी विविध स्पर्धा, खेळणी वाटप, गरजू महिलांसाठी अनेक उपक्रम ही संस्था नेहमी राबवत असते.

विद्यार्थ्यांसाठीही विविध उपक्रम त्यात चित्रकला, निबंध, रांगोळी, वक्तृत्व स्पर्धा असे उपक्रम घेतले जातात. अलका सावली प्रतिष्ठान हि संस्था सतत पाच वर्षापासून अखंड कार्यरत असल्याची माहिती संस्थेचे संस्थापक सुधीर वायले यांनी दिली. आज या छत्री वाटप उपक्रमाचा शुभारंभ पोलीस उपायुक्त विवेक पानसरे यांच्याहस्ते करण्यात आला. यावेळी पोलीस उपायुक्तांनी देखील या संस्थेच्या कार्याचे कौतुक करत इतर संस्थांनी देखील असा आदर्श घेण्याचे आवाहन केले.

 संस्थेने राबवलेल्या विविध समाज उपयोगी उपक्रमांचे नागरिकांकडून नेहमी कौतुक होत असते. यावेळी संस्थेचे संस्थापक सुधीर वायले यांच्यासह, कला शिक्षक यश महाजन, सागर वाघ, आकाश वायले, बंड्या कराळे, शरद शेलार, अनिकेत वायले, दीपक सिन्हा यांच्यासह संस्थेचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

गुड न्यूज ! कल्याण डोंबिवलीत आज आढळले फक्त ३२ रुग्ण

कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने अक्षरशः थैमान घातला होता. आता ही लाट पूर्णपणे ओसरून गेली असल्याचे स्पष्ट संकेत मिळाले आहेत. आज दि.१९ जून रोजी या दोन्ही शहरात एकूण ३२ रुग्ण आढळले आहेत.

क.डों.म.पा. क्षेत्रातून कोरोना कमी होत असल्याने सध्या येथील शहरवासीय मास्क हटवून मोकळा श्वास घेऊ इच्छित आहेत. कारण दुसऱ्या लाटेने सर्वांचाच जीव भांड्यात पडला होता. दिवसागणिक २० हुन अधिक लोकांचे जीव जात होते तर दिवसाला २४०० रुग्ण सापडल्याचा ही रेकॉर्ड बनला होता. मात्र आता हे आकडे पूर्णतः वधारले आहेत. मागील दोन दिवसात कोणत्याही कोरोना रुग्णाचा मृत्यू झाल्याची नोंद देखील झालेली नाही. तर आज १२५ रुग्णांना डिस्चार्ज दिला गेला आहे. शिवाय आज फक्त ३२ रुग्ण आढळले आहेत. यातील निम्मे रुग्ण कल्याण तर निम्मे रुग्ण डोंबिवलीचे आहेत. महापालिकेने केलेल्या विभागवारी नुसार कल्याण पूर्वेत ६, पश्चिमेत १० तर डोंबिवली पूर्वेत १० आणि पश्चिमेत ६ रुग्ण आढळले आहेत.

आज दि.१९ जून रोजीच्या नव्या आकडेवारी नुसार आता महानगरपालिका क्षेत्रात कोरोनाचे एकूण १३०६ रुग्ण विविध ठिकाणी उपचार घेत आहेत. तर दुसरीकडे महापालिका प्रशासन लसीकरण मोहीम वाढविण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. कोरोनाची लाट ओसरली असली तरी नागरिकांनी स्वतःची काळजी घेण्याचे आवाहन महानगरपालिका प्रशासन करीत आहे.

-संतोष दिवाडकर

वीज बिल भरून सहकार्य करण्याचं महावितरण कडून आवाहन

महावितरणच्या कल्याण परिमंडळात पथदिवे आणि पाणीपुरवठा योजनांच्या वीजजोडणीची थकबाकी १३५ कोटी रुपयांच्या घरात पोहचली आहे. तर सर्वच वर्गवारीतील सुमारे दहा लाख ग्राहकांकडे ५५२ कोटी रुपयांचे वीजबिल थकीत आहे. वीजबिल भरून कठीण आर्थिक परिस्थितीत सहकार्य करण्याचे आवाहन महावितरणकडून करण्यात येत आहे.

कल्याण परिमंडळ अंतर्गत ठाणे व पालघर जिल्ह्यातील ग्रामीण भागातील पथदिव्यांच्या १७३१ वीजजोडण्यांचे १२४ कोटी २० लाख रुपयांचे वीजबिल थकले आहे. तर परिमंडलात शहरी भागातील पथदिव्यांच्या २०१७ वीजजोडण्यांचे ५१ कोटी रुपये वीजबिल येणे बाकी आहे. पाणीपुरवठा योजनांच्या १०३१ वीजजोडण्यांची थकबाकी ४ कोटी ४० लाखांवर गेली आहे. दोन्ही सार्वजनिक सेवांचे थकीत वीजबिल भरून अखंडित वीज सेवेचा लाभ घ्यावा. अन्यथा या सेवांचा वीजपुरवठा खंडित करण्यात येणार असल्याचे महावितरणने सूचित केले आहे.

परिमंडलातील घरगुती, व्यावसायिक आणि औद्योगिक ९ लाख ९९ हजार ग्राहकांकडे ४४१ कोटी रुपयांचे वीजबिल थकीत आहे. थकीत वीजबिलाच्या वसुलीसाठी वीजपुरवठा खंडित करण्यात येत आहे. गैरसोय टाळण्यासाठी महावितरणकडून उपलब्ध सुविधांचा लाभ घेऊन चालू व थकीत वीजबिल भरून सहकार्य करण्याचे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.

-कुणाल म्हात्रे

कल्याणमध्ये दहावीच्या निकालाचे काम करणाऱ्या शिक्षकांवर ‘बीएलओ’च्या कामाचा भार

एकीकडे दहावीच्या निकालाची शाळेत कामे सुरू असून दुसरीकडे शिक्षकांना बीएलओच्या कामाला जुंपण्यात आले असून शिक्षकांना या कामातून वगळण्याची मागणी भाजपा शिक्षक आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष अनिल बोरनारे यांनी केली आहे.

कल्याण पूर्व विधानसभा मतदार संघातील शाळांमधील अनेक शिक्षकांना मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) च्या कामाचे आदेश काढण्यात आले असून यामध्ये शिक्षकांना मतदार यादीचा अभ्यास करणे, यादीतील दुरुस्ती करणे,  दुबार, मयत, स्थलांतरीत व मतदान छायाचित्र चिटकविणे, मतदारांना आपल्या ताब्यातील नोटिसा बजावणे इत्यादी कामे करावी लागणार आहेत.

यंदा दहावीची परीक्षा रद्द झाल्यामुळे अंतर्गत गुणांवर आधारित निकालाची कामे शिक्षण मंडळाने शिक्षकांवर सोपविली आहेत. दिलेल्या मुदतीत ही सर्व कामे करायची असल्याने सर्व शाळांमध्ये शिक्षकांची निकालाची धावपळ सुरू आहे त्यातच बीएलओची कामे शिक्षकांच्या माथी मारल्यामुळे निकालाची कामे करायची की बीएलओची ? असा संतप्त सवालही अनिल बोरनारे यांनी प्रशासनाला विचारला असून तातडीने अशैक्षणिक कामे बंद करण्याची मागणी केली आहे.

-संतोष दिवाडकर