कल्याणमध्ये युवासेना पदाधिकाऱ्यांनी मनगटावरील शिवबंधून सोडून घातले घड्याळ ; क.डों.म.पा. निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीची पक्षबांधणी

राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असले तरी कल्याण डोंबिवलीमध्ये या महाविकास आघाडीत केडीएमसी निवडणुकीच्या आधी फुट पडण्याची चिन्हे दिसत आहेत. याचे कारण हि तसेच असून  शिवसेनेचा भाग असलेल्या युवा सेनेतील पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केल्याने निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर फोडाफोडीच्या राजकारणाला जोर आला आहे.   

कल्याण पश्चिममधील शिवसेना युवा सेना कार्यकर्त्यांनी नुकताच राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात प्रवेश केला आहे.  राज्यमंत्री तथा रायगड जिल्हा पालकमंत्री अदिती तटकरे, चिपळूणचे आमदार शेखर निकम व कल्याण कृषी उत्पन्न बाजार समिती माजी सभापती व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कल्याण डोंबिवली जिल्हा कार्याध्यक्ष डॉ.वंडारशेठ पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस राष्ट्रीय सरचिटणीस व महाराष्ट्र प्रदेश कोकण विभाग अध्यक्ष किरण शिखरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना (युवा सेना) कल्याण पश्चिम येथील युवासेना विभाग अधिकारी निखिल कदम,  युवासेना उपविभाग अधिकारी रिकी चक्रवर्ती, युवासेना उपशाखा अधिकारी रोहन सोनवणे, समाजसेवक ब्रिजेश कांबळे यांच्यासह युवासेनेच्या गट अध्यक्ष पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे.

झालेल्या या प्रवेशामुळे आगामी काळात होणाऱ्या कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या रणधुमाळीला एकप्रकारे सुरवात झाली असून निवडणुकीत शिवसेना, कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस एकत्र लढणार कि स्वतंत्र याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. दरम्यान शिवसेना युवासेनेतील स्थानिक राजकारणाला कंटाळून या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला असून त्यांना राष्ट्रवादी कॉंग्रेसची विचारसरणी पटली आहे. येणाऱ्या काळात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ताकद कल्याण मध्ये अधिक प्रमाणात वाढेल यात तिळमात्र शंका नाही अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस राष्ट्रीय सरचिटणीस व महाराष्ट्र प्रदेश कोकण विभाग अध्यक्ष किरण शिखरे यांनी यावेळी दिली.

-कुणाल म्हात्रे

क.डों.म.पा.च्या वतीने डॉक्टर दिवस साजरा

डॉक्टर्स आर्मी, फॅमिली डॉक्टर्स कोविड फायटर या संकल्पनांची सर्व देशभरात वाहवा झाली, असे उद्गार महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यंवशी यांनी आज काढले. आजच्या डॉक्टर्स डे  चे औचित्य साधून वसंत व्हॅली येथील महापालिकेच्या प्रसुतीगृहात आयोजिलेल्या डॉक्टरांच्या गौरवपर कार्यक्रमात ते बोलत होते.

 मी रुजू झाल्यावर कोविड सुरु झाला, परंतू डॉक्टर्स संघटनांनी ऊत्साह वाढविला, आशा दिल्या त्यामुळे ‘डॉक्टर्स आर्मी’ ही संकल्पना कल्याण डोंबिवलीत रुजली, रुळली.  डॉक्टर्स आर्मी, फॅमिली डॉक्टर्स कोविड फायटर  ही संकल्पना आता सर्व देशभर वाखाणली गेली आहे. अत्यंत अल्प कालावधीत जॅंम्‍बो फॅसिलीटी उभारणारी महाराष्ट्रातील ही एकमेव महापालिका आहे. अशी माहिती त्यांनी यावेळी दिली. व्हॅलेंटाईन दिनाला रुजू झालो कारण काम हेच माझे व्हॅलेंटाईन आहे. अशी‍ मिश्किल पुस्ती देखील त्यांनी यावेळी जोडली.

  कोविडच्या दुस-या लाटेनंतर आता महापालिकेच्या दोन्ही रुग्णालयात मॉडयुलर ओटी सुरु होणार असून सर्व शस्त्रक्रिया तिथे करण्याचा आमचा प्रयत्न आहे. वसंतव्हॅली, शक्तिधाम, विठ्ठलवाडी आणि रुक्मिणी प्लाझा या  ४  ठिकाणी आता कायम स्वरुपी रुग्णालये सुरु केली जाणार आहेत. त्याचप्रमाणे महापालिकेची १६  नागरी आरोग्य केंद्रे असून आता नागरिकांच्या सेवेसाठी सध्या एकुण २५  आणि भविष्यात ३६  नागरी आरोग्य केंद्रे सुरु करण्यात येणार आहेत. महापालिकेमार्फत डायलेसिस सेंटरही सुरु केली जाणार असल्याची माहिती महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यंवंशी यांनी यावेळी दिली.

     या कार्यक्रमात महापालिकेचे डॉक्टर्स,  आयएमए, कॅम्पा,   निमा,   होमिओपॅथिक इ. वैदयकीय संघटनांच्या पदाधिका-यांचा व कोविड काळात इन्फ्रास्ट्रक्चर उभारण्यासाठी मदत करणाऱ्या इंजिनिअर्सचा प्रातिनिधिक स्वरूपात महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यंवशी यांच्याहस्ते तुळशीचे रोप व भेटवस्तू देवून गौरव करण्यात आला. डॉक्टर्स दिनाचे औचित्य साधून ऑपरेशन थिएटर, ओपिडी इ. सुविधांयुक्त प्रसुतिगृह वसंत व्हॅली येथे आज सुरु करण्यात आले आणि एक बाळंतपणही सुखरुपरित्या पार पडले.

क.डों.म.पा. क्षेत्रात चार दिवसांपासून लसीकरण बंद ; १० दिवस सुरू आहे लसींचा तुटवडा

कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात मागील १० दिवसांपासून लसीकरणाचा वेग मंदावला असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. महापालिका क्षेत्रात शेवटचे लसीकरण २८ जून रोजी झाले होते. व त्यानंतर चार दिवसांपासून लस उपलब्ध न झाल्याने लसीकरण ठप्प झाले आहे.

केंद्र सरकार आणि राज्य सरकार नागरीकांना वारंवार लसीकरण करून घेण्यासाठी आवाहन करीत आहे. मात्र प्रत्यक्षात लस उपलब्ध होत नसल्याने कल्याण डोंबिवलीकर वैतागले आहेत. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर लसीकरणाला वेग आला होता. तिसरी लाट येण्यापूर्वी लसीकरणाचा वेग वाढविण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे प्रशासनाने म्हटले होते. अस असले तरी प्रत्यक्षात मात्र लसीकरण केंद्र चार दिवसापासून बंद पडली आहेत.

क.डों.म.पा. क्षेत्रात २३ जून पासून लसींचा तुटवडा निर्माण झाला आहे. २३ जून ते २६ जून या चार दिवसांत आचार्य अत्रे रंगमंदिर कल्याण व सावित्रीबाई फुले नाट्यगृह डोंबिवली या दोनच ठिकाणी लसीकरण सुरू होते. त्यानंतर २७ जूनला लसीकरण पूर्णपणे बंद झाले. २८ जून रोजी महापालिकेला लस उपलब्ध झाल्याने या दिवशी २५ लसीकरण केंद्रांवर लोकांना लस देण्यात आली. त्यांनंतर २८ जून पासून २ जुलैपर्यंत महापालिकेला शासनाकडून कोणताही लसींचा पुरवठा झाला नाही. परिणामी चार दिवस लसीकरण बंद ठेवावे लागले आहे.

क.डों.म.पा.ला नुकताच कोव्हीड इन्होव्हेशन पुरस्कार भारत सरकारकडून मिळाला असल्याने आयुक्त डॉ.विजय सूर्यवंशी यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. कोरोना परिस्थिती नियंत्रणात आणल्यानंतर त्यांनी महापालिका क्षेत्रातील टाटा आमंत्रा हे कोव्हीड सेंटर आता बंद केले आहे. त्यामुळे तिसरी लाट येणार नसल्याचा हा शुभ संकेत असू शकतो असेही ते म्हणाले होते. मात्र असे जरी असले तरी कल्याण डोंबिवली करांचे लसीकरण लवकरात लवकर करून देण्याच्या प्रयत्नात जरी ते असले तरी शासनाकडून काही कारणाअभावी लसींचा पुरवठा उपलब्ध होत नाही ही निराशाजनक बाब म्हणावी लागेल.

-संतोष दिवाडकर

मलंगगड भागात प्रसृतीसाठी रुग्णालय बंद असल्याने नवजात बालकाचा मृत्यू ; टेम्पो मध्ये झाली कातकरी महिलेची प्रसृती

अंबरनाथ तालुक्यातील मलंगगड भागात रात्रीच्या सुमारास एका महिलेची चक्क टेम्पो मध्ये प्रसृती झाली. परंतु मुल जन्माला येताच त्याचा दुर्दैवाने मृत्यू झाला. ग्रामीण भागातील राजकीय चंगळीतुन बंद असलेल्या सरकारी रुग्णालयामुळे एका बालकाचा बळी गेला आहे का ? असा सवाल उपस्थित होऊ लागला आहे.

कल्याण शहरा पासून काही किमी च्या अंतरावर असलेला मलंगगड हा ग्रामीण भाग. या भागात मांगरूळ येथे एक सरकारी रुग्णालय आहे. मात्र स्थानिक राजकीय स्वार्थ आणि वादावादीमुळे डागडुजीचे कारण पुढे करत हे रुग्णालय सदा न कदा बंदच असते अशी येथे ओरड आहे. गुरुवारी मध्यरात्रीच्या सुमारास मलंगगड भागातील म्हात्रेपाडा कातकरी वाडीतील वंदना लक्ष्मण वाघे या महिलेला प्रसृतीकळा सुरू झाल्या. रुग्णवाहिका उपलब्ध नसल्याने टेम्पो मधून तिला मांगरूळ येथील सरकारी रुग्णालयात नेण्यात आले. मात्र हे रुग्णालय चक्क बंद अवस्थेत होते. त्यानंतर या महिलेला उल्हासनगर येथील सेंट्रल रुग्णालयात नेण्यात आले. मात्र वाटेतच या महिलेची प्रसृती झाली. आणि या महिलेच्या पोटी जन्म घेताच व्यवस्थित उपाययोजना न झाल्याने ते बाळ दगावले.

वर्षभरात अश्या ३ घटना घडल्या असल्याचे येथील लोक सांगत आहेत. सरकारी कर्मचाऱ्यांनी तपासणीसाठी महिलेला ९ महिन्यातून फक्त एकच इंजेक्शन दिले असल्याचा संतापजनक आरोप देखील नागरिकांनी केला आहे. ग्रामीण भागातील ही आरोग्य केंद्र आणखी किती लोकांचा जीव घेणार आहे असा प्रश्न गावकरी विचारत आहेत.

अंबरनाथ तालुक्यातील मलंगगड ग्रामीण भागात सतत राजकीय पुढाऱ्यांची रेलचेल सुरू असते. पालकमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार श्रीकांत शिंदे यांनी नुकतेच नेवाळी येथे फिरत्या दवाखान्याचे लोकार्पण केले होते. मात्र असे जरी असले तरी या भागात आरोग्याचा प्रश्न काय आहे ? हे या घटनेतून पुढे आले आहे. स्थानिक आमदार गणपत गायकवाड यांनी आरोग्य सोयी सुविधां साठी आणखीन गांभीर्याने विशेष लक्ष देणे देखील तितकेच गरजेचे दिसत आहे. या भागात आपत्कालीन परिस्थिती ओढावली तर एकही रुग्णालय उपलब्ध नाही. विशेष म्हणजे मांगरूळ येथील रुग्णालय हे डागडुजीचे कारण देऊन लोकांच्या आरोग्य आणि जीवाशी हेळसांड करीत आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांच्या आरोग्याचा हा गंभीर प्रश्न सोडवणार तरी कोण ? गरिबांचा वाली आहे तरी कोण ? की नुसताच राजकीय स्वार्थातून असे बळी जात राहणार ? असा सवाल येथील गावकरी आता राज्य सरकार आणि केंद्र सरकारला विचारत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी आता स्वतःच अश्या गोष्टींची गंभीरपणे दखल घेण्याची मागणी जोर धरू लागली आहे.

-संदेश दाभणे

कोविड-19 इन्होवेशन पुरस्काराबद्दल केडीएमसी आयुक्तांचा विविध व्यापारी संघटनांनी केला नागरी सत्कार

कल्याण डोंबिवली महानगर पालिकेला मिळालेल्या कोविड-19 इन्होवेशन पुरस्कारासाठी केडीएमसी आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांचा कल्याण मधील विविध व्यापारी संघटना, महाविद्यालयांचे प्राचार्य, राजकीय, सामाजिक संघटनांचे पदाधिकारी यांनी एकत्र येत नागरी सत्कार केला.

      भारत सरकारच्या गृहनिर्माण व शहरी कामकाज मंत्रालयामार्फत घेण्यात आलेल्या स्पर्धेमध्ये कोविड-19 इन्होवेशन पुरस्कारासाठी केलेल्या सादरीकरणाबाबत,  भारत सरकारतर्फे “वाराणसी आणि कल्याण डोंबिवली” या शहरांना संयुक्तपणे विजेते घोषित केले आहे. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेला भारत सरकारचा कोविड-19 इन्होवेशन पुरस्कार मिळाल्याबद्दल केडीएमसी आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्यावर विविध स्तरांतून कौतुकाचा वर्षाव होत आहे.

      आज देखील अशाच प्रकारे कल्याण मधील विविध व्यापारी संघटना, महाविद्यालयांचे प्राचार्य, राजकीय सामाजिक संघटनांनी एकत्र येत आयुक्त डॉ विजय सूर्यवंशी, अतिरिक्त आयुक्त सुनील पवार, शहर अभियंता सपना कोळी यांचा शाल पुष्पगुच्छ देऊन नागरी सत्कार केला व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

 यावेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सेक्रेटरी, मुथा कॉलेज चेअरमन, ज्वेलर्स असो अध्यक्ष प्रकाश मुथा, माजी नगरसेवक तथा अग्रवाल कॉलेज व्हॉईस चेअरमन ओमप्रकाश पांडे, माजी नगरसेवक इफ्तेकार खान, कल्याण शहर काँग्रेस ओबीसी अध्यक्ष तथा खवा व्यापारी संघटना सचिव जयदीप सानप, डॉ गिरीश लटके, कपडा व्यापारी असो. हशुभाई शाह, ज्वेलर्स असो वीरेंद्र मुथा, मुथा कॉलेज मुख्याध्यापिका साधना गाधिया, दिपाली मॅडम, स्याम्युल चार्ल्स, महेन्द्र शंकलेशा, जयंतीला शंककलेशा, जयराज सर, किशोर खराटे, राजा सुदाम जाधव केबल व्यावसायिक उपस्थित होते.     

संपूर्ण देशाची कोरोना परिस्थिती कशी आहे, कल्याण डोंबिवली महानगर पालिकेची कोरोना स्थिती कशी होती हे सर्वाना माहिती असून अशा परिस्थितीत केडीएमसी आयुक्त आणि त्यांच्या संपूर्ण टीमने  अतिशय चांगले काम केलं असून त्याबद्दल भारत सरकारच्या वतीने पुरस्कार देण्यात आला आहे. हि अभिनंदनाची बाब असून त्याबद्दल आम्ही हा नागरी सत्कार केला असल्याची प्रतिक्रिया प्रकाश मुथा यांनी दिली.

-कुणाल म्हात्रे