फळेगाव सेवा सहकारी सोसायटीच्या अध्यक्षपदी भुषण जाधव बिनविरोध

कल्याण तालुक्यातील प्रसिद्ध असलेली फळेगाव सेवा सहकारी सोसायटीच्या अध्यक्षपदी बाजार समितीचे संचालक भूषण जाधव यांची बिनविरोध निवड झाली आहे. त्यांच्या निवडीने फळेगाव पंचक्रोशीतील गावात आनंदाचे वातावरण पसरले आहे.

      शुक्रवारी फळेगाव सेवा सोसायटीच्या चेअरमन पदाची निवडणूक घेण्यात आली. निवडणूक अधिकारी म्हणून स. रा. भांगे तसेच सेवा सोसायटीचे सचिव भानुदास कोंडे होते. चेअरमन पदासाठी भूषण जाधव यांचा एकमेव अर्ज आल्याने अर्जाची छाननी करून चेअरमनपदी भूषण जाधव यांची बिनविरोध निवड करण्यात आली. फळेगाव सेवा सोसायटीचे सदस्य सुदाम पाटील, राजाराम चौधरी, दिनेश जाधव, आनंता जाधव, आत्माराम तारमळे, सुनील जाधव, दर्शना जाधव, सुनंदा देसेकर हे आहेत.

 फळेगाव सेवा सोसायटीचे नवनिर्वाचित चेअरमन भूषण जाधव यांना शुभेच्छा देण्यासाठी शिवसेना तालुका प्रमुख वसंत लोणे, कल्याण पंचायत समितीचे सदस्य रमेश बांगर, फळेगाव गाव कमिटीचे अध्यक्ष गोपाळ जाधव, पोलिस पाटील प्रकाश जाधव, बंचू बांगर, चिमा भोईर, जगन जाधव, उपतालुका प्रमुख बंधू जाधव, माजी सभापती मिनाक्षी जाधव, चंद्रकांत भोईर यांच्यासह सेवा सोसायटीचे सदस्य उपस्थित होते.

-कुणाल म्हात्रे

शिक्षक परिषद पाच जुलै रोजी करणार राज्यव्यापी आंदोलन

शिक्षण क्षेत्रातील प्रलंबित मागण्यांसंदर्भात पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारचे लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या वतीने सोमवार दिनांक पाच जुलै रोजी एक दिवशीय राज्यव्यापी आंदोलन करण्याचा निर्णय परिषदेचे राज्य अध्यक्ष वेणूनाथ कडू यांच्या अध्यक्षतेखाली सभेत घेण्यात आला.

पाच जुलैला सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी  काळ्या फिती लावून काम करणार आहेत. तर प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालय, शिक्षण विभाग व तहसील कार्यालयात निवेदन देण्यात येणार आहे. या आंदोलनात जिल्ह्यातील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी सहभागी होण्याचे आवाहन शिक्षक परिषदेचे पदाधिकारी गुलाबराव पाटील यांनी केले आहे.

शिक्षण क्षेत्रातील प्रलंबित मागण्या पूर्ण करण्यासाठी लोकप्रतिनिधी व संघटनेमार्फत पाठपुरावा करून त्याची दखल घेण्यात आलेली नाही. म्हणून पाच जुलै रोजी राज्यस्तरीय आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या आंदोलनाचे पत्र शिक्षक परिषदेच्या वतीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, शालेय शिक्षणमंत्री वर्षाताई गायकवाड व शिक्षण सचिवांना पाठविण्यात आले आहे. राज्य सरकार शिक्षक-शिक्षकेतर यांच्या प्रश्नांबाबत गंभीर नाही अनेक ज्वलंत प्रश्न प्रलंबित आहेत. अनेक वेळा पाठपुरावा करून त्याची दखल घेण्यात आलेली नाही. सदर प्रश्न सोडविण्यासाठी शिक्षक परिषद प्रयत्नशील आहे या राज्यव्यापी आंदोलनात शिक्षक-शिक्षकेतर यांनी  सहभाग नोंदवून राज्य सरकारकडे आपला असंतोष व्यक्त करावा असे राज्य अध्यक्ष वेणूनाथ कडू यांनी सांगितले. 

 1 नोव्हेंबर 2005 पूर्वी सेवेत रुजू झालेल्या कर्मचाऱ्यांना विनाविलंब पूर्वलक्ष्यी प्रभावाने जुनी पेन्शन योजना लागू करणे. मुख्याध्यापक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना दहा, वीस, तीस वर्षे सेवेनंतर आश्वासित प्रगती योजना लागू करणे, कोरोनाग्रस्त शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना विशेष गरजा व प्राधान्य अनुकंपा योजना लागू करणे, शिक्षकांना शाळाबाह्य कामे देऊ नये, भ्रष्टाचार प्रकरणी दोषी ठरलेल्या 59 शिक्षणाधिकारी  यांच्याविरुद्ध कठोर स्वरूपाची कारवाई करणे. शिक्षण विभागात रिक्त पदे तात्काळ भरणे.   शिक्षकेतर यांची पदे पूर्ववत ठेवून याबाबतचा शासन निर्णय रद्द करणे. अशा विविध एकतीस मागण्यांचा समावेश असलेले निवेदन देऊन राज्यस्तरीय आंदोलन केले जाणार आहे.

-कुणाल म्हात्रे

कल्याण शिळरोडलगत एमआयडीसीचे खोदकाम ; पाईपलाईनच्या खोदकामामुळे नागरिकांची गैरसोय

डोंबिवली वरून पेंढारकर कॉलेज, ऊस्मा पेट्रोल पंप मार्गे कल्याण शीळ रोडकडे जाणारा मार्ग हा कल्याण शीळ रोड लगत एमआयडीसीच्या पाण्याच्या पाईपलाईन खोदाईमुळे गेल्या दहा दिवसांपासून वाहतूक आणि लोकांचा रहदारीसाठी बंद असल्याने नागरिकांना मोठी गैरसोय होत आहे.

या  कामामुळे येथून जाणारी येणारी सार्वजनिक बस वाहतूक, लोकांचा जाण्या येण्याचा  मार्ग बंद झाल्याने त्या सर्वांना मोठा वळसा घालुन जावे लागत आहे. हे काम पावसाळ्यात करायचे होते तर लवकर पूर्ण करणे गरजेचे होते. कारण हा मार्ग वाहतुकीचा दृष्टीने अतिशय महत्त्वाचा आहे. सर्वसामान्य जनतेसाठी लोकल ट्रेन बंद असल्याने रस्ते वाहतुकीचे महत्त्व लक्षात घेऊन याचे नियोजन करणे गरजेचे होते.

जर अचानकपणे मोठ्या प्रमाणात पाऊस पडला तर येथे दरवर्षी पावसाळी पाणी तुंबण्याचे प्रकार होत असल्याने त्याचा फटका अधिक तीव्रतेने येथे होईल. हे काम व्यवस्थित आखणी करून केले असते तर ते चार दिवसात पुरे करता आले असते. आतातरी हे काम लोकांसाठी एमआयडीसीने तातडीने लवकर पूर्ण करणे गरजेचे असल्याची प्रतिक्रिया सामजिक कार्यकर्ते राजु नलावडे यांनी दिली आहे.

-कुणाल म्हात्रे

कल्याणमध्ये आता मिळणार ऑनलाइन रिक्षा ; ‘ऑटो कॅब’ अँप रिक्षा चालक नोदंणीला सुरवात

ओला उबर च्या धर्तीवर रिक्षा चालक मालक असोसिएशन संचलित आँटो कॅब अँप रिक्षा चालक नोदंणीला सुरवात झाली आहे. यामुळे आता कल्याणकर नागरिकांचा प्रवास जास्त सुरक्षित होणार आहे.

शासनाने मुक्त केलेले रिक्षा परवाने यामुळे वाढलेली रिक्षांची अफाट संख्या त्याच प्रमाणात वाढलेली विना लायसन्स बॅच रिक्षाचालंकाची संख्या व कोरोनाचे संकट यामुळे रेल्वे लोकल व वाहतुकीवर असलेले निर्बधं विविध कारणास्तव रिक्षा व्यवसायावर विपरीत परीणाम झालेला आहे.

विना लायसन्स अनाधिकुत रिक्षाचालकांमुळे निर्माण होणार्या समस्या प्रवाशी नागरीकांच्या तक्रारी निराकरण व प्रवाशी नागरीकांना दर्जेदार सुरक्षित रिक्षा प्रवास सोयीसुविधा उपलब्ध व्हावी व अधिकुत रिक्षाचालकांना शाश्वत रिक्षा व्यवसाय उपल्बधता या करीता रिक्षा संघटनेने ओला उबरच्या धर्तीवर आँटो कँब मोबाईल अँप विकासित केले आहे. कल्याण पश्चिमेतील मोरया हाँल, बैलबाजार येथे प्रातनिधिक स्वरुपात मोबाईल अँप रिक्षा प्रवास सुविधा समाविष्टता या करीता रिक्षा चालक नोदंणी अभियान शुभारंभ करण्यात .

याप्रसंगी उपस्थितीत रिक्षाचालकांना मोबाईल अँप रिक्षा प्रवास सुविधा भविष्यातील उपयुक्ता व माहीती जितेद्रं पवार व बिनाँय बाबु यांनी दिली. संतोष नवले व प्रतिक पेणकर यांनी जास्तीत जास्त रिक्षाचालकांनी व प्रवाशी नागरिकांनी मोबाईल अँप रजिस्टर्ड व डाऊनलोड करावे असे आवाहन केले. याप्रसंगी विलास वैद्य, अजगर कुरेशी, विजय डफळ, प्रंशात धनावडे, संजय बागवे,  बंडु वाडेकर, बापु चतुर, महीला रिक्षाचालक कल्पना वाघमारे  व अन्य रिक्षाचालक उपस्थितीत होते.

दरम्यान कल्याण रेल्वे स्टेशन येथील संघटनेच्या जनसंपर्क कार्यालयात सकाळी 11 ते 1  आणि सायंकाळी 6 ते 8 वाजेपंर्यंत 15 दिवस रिक्षाचालक नोदंणी सुरु राहणार आहे.

-कुणाल म्हात्रे