कल्याण पश्चिमेतील गांधारी रोडवर दीरासोबत दुचाकीवरून लस घेण्यासाठी जाताना दुचाकीला खड्ड्यांमुळे अपघात होऊन महिला जखमी झाली होती. उपचारा दरम्यान या महिलेचा मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे. या महिलेचे नाव दिव्या राहुल कटारिया असे आहे.
कल्याण पश्चिम भागातील ऋतू कॉम्प्लेक्स या हायप्रोफाईल सोसायटीत राहणाऱ्या शिक्षिका दिव्या कटारिया या २३ जून रोजी त्यांच्या दीरा सोबत दुचाकीवरून घेण्यासाठी निघाल्या होत्या. त्यांच्या दुचाकीतले पेट्रोल संपल्याने त्या पेट्रोल पंपाच्या दिशेने निघाल्या होत्या. त्यांची दुचाकी त्यांचे दीर चालवत होते. गांधरी रस्त्यावर त्यांच्या दुचाकीने एका वाहनाला ओव्हरटेक केले. मात्र रस्त्यावरील पाण्याने भरलेला खड्डा त्यांच्या लक्षात आला नाही त्यामुळे त्यांची दुचाकी रस्त्यातील खड्ड्यात जोराने आदळली.
यावेळी दिव्या यांना गंभीर दुखापत झाली. त्यांना उपचारासाठी एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. घटनेच्या चार दिवसानंतर उपचार घेत असताना दिव्या यांचा मृत्यू झाला असल्याची माहिती दिव्याचे दीर अर्जुन कटारिया यांनी दिली आहे. खड्यांनी एका महिलेचा बळी गेल्याने कटारिया कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या घटनेमुळे रस्त्यावरील खड्डे आता नागरिकांचा जीव घेउ लागले असल्याची बाब प्रकर्षाने समोर आली आहे.
क.डों.म.पा. चे मा.नगरसेवक महेश गायकवाड हे आता एका नव्या क्षेत्राकडे निघाले आहेत. त्यांच्या संकल्पनेतुन ‘डाव’ हा मराठी चित्रपट उभा राहणार आहे. आणि या चित्रपटाचा महूर्त सोहळा आज कल्याण येथे पार पडला. या सोहळ्याला सिनेमात असणारे कलाकार, संगीतकार, दिग्दर्शक आणि संपूर्ण टीम उपस्थित राहिली होती.
‘नाथ प्रोडक्शन’ च्या माध्यमातून मराठी चित्रपट ‘डाव’ चे चित्रीकरण १३ जुलैपासून सुरू केले जाणार आहे. नावाप्रमाणेच या चित्रपटात पत्त्यांचा डाव आणि त्यातून निर्माण होणारा जुगार आणि जुगाडाचा डावपेच अशी संपुर्ण मनोरंजनाची मेजवानी प्रेक्षकांना पहायला मिळणार आहे. अनेकसे ट्विस्ट, एक्शन, ड्रामा, कॉमेडी अशी सर्व फोडणी या चित्रपटात घालण्यात आली आहे.
‘तुझ्यात जीव रंगला’ फेम राणा दा म्हणजेच हार्दिक जोशी या चित्रपटात नायकाच्या भूमिकेत दिसणार आहे. तर नायिकेची भूमिका कोण करणार ? हे मात्र गुपितच आहे. या चित्रपटात खलनायक आणि इतर महत्वाच्या भूमिका कल्याण मधील काही नवोदित कलाकार साकारणार आहेत. याशिवाय भाऊ कदम आणि आणखीन दिगग्ज कलाकार देखील चित्रपटात दिसणार असल्याचे दिग्दर्शक अमित कोळी यांनी या सोहळ्यात प्रेक्षकांशी बोलताना सांगितले आहे. या चित्रपटाच्या टायटल सॉंग ने प्रेक्षकांना चांगलेच मोहित केले. मिलिंद शिंदे यांचे चिरंजीव मधुर शिंदे यांनी हे गाणे आपल्या शिंदेशाही आवाजाच्या शैलीत गायले आहे. त्याचप्रमाणे प्रसिद्ध गायक शकील अहमद यांचेही संगीत या चित्रपटाला लाभणार आहे. त्याचबरोबर चंद्रकला दासरी व यशश्री दासरी यांच्या आवाजातील गाणी देखील असणार आहेत. करण आणि दर्शन हे स्वतः चित्रपटाचे संगीत दिग्दर्शन करत आहेत.
बजरंग बादशाह यांची ही कथा असून पटकथा देखील त्यांनीच केलेली आहे. चित्रपटातील संवाद संकेत हेगाणा व राकेश शिर्के यांनी लिहले आहेत. कौशल भारती छायाचित्रण तर विकी बिडकर कला दिग्दर्शक म्हणून असणार आहेत. मुहूर्त सोहळ्याला झी टॉकीज निर्माते अन्वय नायकोडी तसेच अरबाज मोघल देखील उपस्थित होते. याशिवाय निर्मिती प्रबंधक चेतन मुरूमकर, गीतकार अजय वाघमारे आणि चित्रपटाचे सहाय्यक दिग्दर्शक युगंधर शिंदे असनार आहेत. तर सर्वात महत्त्वाचा कॅमेरा डिपार्टमेंट श्रीनिवास शिंगे आणि राहुल बर्गे पाहणार आहेत. राधा सागर, भाग्यश्री मोटे, नितीन रूपवते, भरत ठाकूर, टिना सोनी, जॉनी रावत, विश्वजीत सोनी हे कलाकार म्हणून दिसणार आहेत.
‘नाथ’ प्रोडक्शनच्या माध्यमातून ‘डाव’ हा चित्रपट पुढे येणार असून त्यामागे अनेक लोकांचे मोठे योगदान असणार आहे. नगरसेवक महेश गायकवाड यांच्या संकल्पनेतला हा चित्रपट असून प्रसिद्ध उद्योजक संजय गायकवाड यांचे या चित्रपटाला मोलाचे सहकार्य लाभणार आहे. कल्याणचे कॉमेडी किंग आणि गायक बजरंग बादशहा तसेच वैशाली ठाकूर आणि सुजाता पवार हे या चित्रपटाची निर्मिती करणार आहेत. तर दिग्दर्शक अमित कोळी यांच्या नजरेतून या चित्रपटाचे दिग्दर्शन होणार आहे. या चित्रपटाच्या चित्रीकरणाला १३ जुलै पासून सुरुवात होणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले आहे. त्यामुळे तमाम कल्याणकर आणि संपूर्ण महाराष्ट्र लवकरच हा नवा ‘डाव’ पाहण्यासाठी नक्कीच आतुर असतील.
कल्याण कोळसेवाडी भागात काल रात्री एका महिलेला मारहाण झाली होती. या प्रकरणाबाबत कोळसेवाडी पोलिसांनी रीतसर गुन्ह्याची नोंद केली असून व्हडीओ मध्ये असणाऱ्या जणांना अटक केली आहे.
कोळसेवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका महिला प्रवासीची रिक्षाचालकाने छेड काढल्याचे बोलले जाते. यावरून महिलेला व तिच्या मित्रांना जमावकडून मारहाण झाली होती. या संदर्भात कोळसेवाडी पोलिसांनी रीतसर तक्रार नोंदवून नऊ जणांना आता ताब्यात घेतले आहे. संपूर्ण प्रकरणाचा खोलवर तपास करून कारवाई करणार असल्याचेही यावेळी पोलिसांकडून सांगण्यात आले. त्यामुळे पोलिसांच्या चौकशीत संपूर्ण प्रकरणातील दोन्ही बाजू व्यवस्थितपणे उजेडात येतील.
कल्याण कोळसेवाडी येथे काल रात्रीच्या सुमारास एका महिलेला व तिच्या दोन मित्रांना रिक्षाचालक व त्याच्या संबंधित जमावाने मारहाण केली होती. या घटनेनंतर महाराष्ट्रभरात संताप व्यक्त केला जात आहे. मात्र स्थानिक पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद होण्यास उशीर होत असल्यावरून स्थानिक आमदारांनी पोलीस ठाण्याला धारेवर धरले आहे.
रात्रीच्या सुमारास एक तरुणी रिक्षा प्रवास करीत होती. दरम्यान रिक्षा चालकाने तिची छेड काढल्याचे बोलले जात आहे. त्या तरुणीने तिच्या दोन मित्रांना बोलावून घेतले. हे तरुण रिक्षाचालकाला जाब विचारत होते. मात्र यादरम्यान रिक्षाचालक व त्याच्या संबंधित जमावाने त्या महिलेला व तिच्या दोन्ही मित्रांना अमानुषपणे मारहाण केली. शिवाय एका व्यक्तीने पट्टा काढून त्याने मारहाण केली. घटनेचा व्हिडीओ व्हायरल देखील झाला. शिवसेना नेत्या नीलम गोऱ्हे आणि भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी गुन्हा दाखल करण्यासाठी विलंब होत असल्याने नाराजी व्यक्त केली. त्याचप्रमाणे स्थानीक आमदार गणपत गायकवाड यांनी देखील गुन्हा दाखल करण्यास विलंब होत असल्याने कोळसेवाडी पोलीस स्थानकाच्या कारभारावर गंभीर सवाल उपस्थित केले आहेत.
“झालेली घटना अत्यंत दुर्दैवी आहे. कोळसेवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करायला गेलेल्या माणसावरच तक्रार दाखल करतात. मागील दोन वर्षांचा रेकॉर्ड काढला तर लक्षात येईल की या पोलीस ठाण्यात क्रॉस कंप्लॅन्ट अधिक प्रमाणात आहेत. दोघांच्याही विरोधात गुन्हे दाखल करून दोघांना अटक करायची व नंतर तोडपाणी करून त्यांना सोडून द्यायचे. पोलिसांच्या या धोरणामुळे या भागात गुन्हेगारीला खतपाणी मिळत आहे.”
– गणपत गायकवाड (स्थानिक आमदार)
गणपत गायकवाड हे कल्याण पूर्व विधानसभा क्षेत्राचे आमदार आहेत. त्यांच्या विधानसभा क्षेत्रा अंतर्गत कोळसेवाडी पोलीस स्थानक हद्दीत हा प्रकार घडला असून त्यांनी या बाबत पोलिसांच्या भूमिकेवर सवाल उपस्थित केला आहे. झालेली घटना गंभीर स्वरूपाची असल्याने पोलिसांनी गंभीर दखल घेण्याची मागणी आमदारांनी केली आहे.
कल्याण कोळसेवाडी येथे काल रात्रीच्या सुमारास एका तरुणीला व तिच्या दोन मित्रांना मारहाण झाली होती. एक रिक्षाचालक आणि त्याने जमवलेल्या तरुणांनी या तिघांना मारहाण केली होती. यासंदर्भात गुन्हा का दाखल झाला नाही ? असा सवाल करत भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी कोळसेवाडी पोलिसांवर नाराजी व्यक्त केली आहे.
काल रात्रीच्या सुमारास एक तरुणी रिक्षाने प्रवास करीत होती. याच रिक्षाच्या चालकाने तिची छेड काढली असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे या तरुणीने तिच्या दोन मित्रांना बोलावून घेतले. हे दोन्ही मित्र रिक्षाचालकाला जाब विचारण्यासाठी आले होते. मात्र असे असताना रिक्षाचालकाच्या संबंधित जमावाने राहुल गडेकर आणि बंटी प्रधान या दोघांना मारहाण केली. त्यांच्या समवेत त्या तरुणीला देखील अमानुष मारहाण करण्यात आली. व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये एक इसम पट्ट्याने मारहाण करताना देखील दिसत आहे.
तरुणीला मारहाण केल्याची घटना संपूर्ण महाराष्ट्रात पसरली. मात्र तरीही दुपार पर्यंत मारेकऱ्यांवर गुन्हा दाखल झाला नाही. यामुळे भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी ठाणे पोलीस आणि कोळसेवाडी पोलीस स्थानक यांच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त केली आहे. झालेली घटना निंदनीय असून पोलीस कशाची वाट पाहत आहेत असा सूर उमटवला गेला आहे.
“कल्याण कोळसेवाडीतील संतापजनक घटना व त्यावर ठाणे शहर पोलिसांची अजब कार्यपद्धती. बचावाला येणार्यांनाचं पोलिसांनी पोलिस स्टेशनला बसवून ठेवलयं व मारेकरी अद्याप मोकाट आहेत. अशाने संकटात सापडलेल्यांना मदत करायला लोक पुढे धजावतील का ? नियम कायदे ढिगाने बनवलेत हो. पण त्याची अंमलबजावणी कधी होणार ??”