धक्कादायक ! प्रेम प्रकरणात अडथळा ठरणाऱ्या अल्पवयीन मुलीच्या आईची गळा दाबून हत्या

अल्पवयीन मुलीच्या प्रेमात पडलेल्या प्रियकराने लग्नास विरोध दर्शविणाऱ्या मुलीच्या आईचा   गळा दाबून जीवे ठार मारून तिचा मृतदेह गुरवली येथील जंगलात टाकून देणाऱ्या प्रियकरास टिटवाळा पोलिसांनी अटक केली आहे.

टिटवाळा पोलीस स्टेशनच्या हद्दीत येत असणाऱ्या व बल्याणी येथे सोनी देवराज शेरवे (३९) आपल्या अल्पवयीन मुलीसोबत राहात होत्या. केडीएमसीच्या वडवली कार्यालयात हंगामी सफाई कर्मचारी म्हणून सोनी या काम करत होत्या. अल्पवयीन मुलीच्या वाढदिवसाच्या दिवशी गुरवली येथे राहत असणारा समीर बबन दळवी (२४) हा शुभेच्छा देण्यासाठी आल्याने मुलीच्या आईने या प्रेम संबंधाला विरोध दर्शविला होता. प्रेमसंबंधाला व लग्नाला विरोध केल्याने समीर व मुलीच्या आईची बाचाबाची झाली होती. राग अनावर झाल्याने मुलीच्या आईचा गळा दाबून तिचा मृतदेह गुरवली जंगलातील झाडाझुडपात समीरने टाकला होता.

सडलेल्या अवस्थेत एका महिलेचा मृतदेह आढळल्याने टिटवाळा पोलिसांनी ११ जुलै रोजी आकस्मिक गुन्ह्याची नोंद करून शवविच्छेदनासाठी मृतदेह गोवेली ग्रामीण रुग्णालयात नेला असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सदर महिलेचा गळा दाबून खून झाल्याची माहिती पोलिसांना दिली. शवविच्छेदनाच्या अहवालाने पोलीसही चक्रावले यासंदर्भात अल्पवयीन मुलीची कसून चौकशी केली असता आपला प्रियकर समीर बबन दळवी याला माझ्या आईने तुझी माझ्या मुली सोबत लग्न करण्याची लायकी नाही असे बोलल्याने वाद निर्माण झाल्याची माहिती पोलिसांना दिली.

टिटवाळा पोलीस स्टेशनचे गुन्हे प्रकटीकरण विभागाचे पोलीस उपनिरीक्षक विजय सुर्वे यांनी तपासाची चक्रे फिरवीत गुरवली येथे राहात असलेल्या मुलीचा प्रियकर समीर बबन दळवी याला चौकशी साठी ताब्यात घेताच आपण गळा आवळून खून केल्याची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी आज न्यायालयात त्याला हजर केले असता १७ जुलैपर्यंत त्याला पोलीस कोठडीत ठेवण्यात आल्याची माहिती पोलीस उपनिरीक्षक विजय सुर्वे यांनी दिली.

-कुणाल म्हात्रे

कल्याण पूर्वेत बेवारस वाहनांवर पालिकेची जप्तीची कारवाई

कल्याण पूर्वेत रस्तावर उभ्या असणाऱ्या बेवारस, भंगार वाहनांवर जप्तीच्या कारवाईचा बडगा “ड” प्रभागक्षेत्र आधिकारी सुधीर मोकल यांच्या पथकाने उगारत १० बेवारस, भंगार वाहने जप्त केली आहेत.

 महापालिका क्षेत्रातील रस्त्यावरील वाहतूकीची कोंडी कमी व्हावी आणि लोकांना प्रवास करणे सुलभ व्हावे या दृष्टीकोनातून महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी यापूर्वीच दिलेल्या निर्देशानुसार “ड” प्रभाग क्षेत्रातील  बेवारस, भंगार वाहने उचलण्याची कारवाई “ड” प्रभागक्षेत्र अधिकारी सुधिर मोकल यांनी केली.

या कारवाईमध्ये “ड” प्रभागक्षेत्र आधिकारी सुधीर मोकल यांनी महापालिका अतिक्रमण निर्मुलन विभागाचे कर्मचारी व महापालिका पोलीस यांच्या मदतीने २ चारचाकी, १ तीन चाकी व ७ दुचाकी अशी एकुण १० बेवारस, भंगार वाहने उचलून खंबाळपाडा येथील वाहन तळावर जमा केली. तसेच ६ वाहनांवर दंडात्मक कारवाई करुन १७ हजार ५०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.

-कुणाल म्हात्रे

नाटकांच्या प्रयोगांना परवानगी देण्याची नाट्यकलावंताची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

कोरोनामुळे लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे अनेक व्यवहार ठप्प असून यामुळे अनेक उद्योग धंद्यांना याचा फटका बसला आहे. लॉकडाऊनमुळे नाट्यगृह देखील बंद असल्याने नाटकामध्ये काम करणारे कलावंत आणि इतर कलाकार यांच्यावर काम नसल्याने उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे नाटकांच्या प्रयोगांना परवानगी देण्याची मागणी कलावंतानी मुख्यमंत्र्यांकडे केली असून ५० लोकांसाठी छोटे प्रयोग राबविण्याची संकल्पना देखील त्यांनी मांडली आहे. या कलावंतांमध्ये अभिजित झुंजारराव (कल्याण), अतुल पेठे (पुणे),  शंभू पाटील (जळगाव), वामन पंडित (कणकवली), दत्ता पाटील (नाशिक),  अनिल कोष्टी (भुसावळ) आणि इतर अनेक गावांतील रंगकर्मी यांचा समावेश आहे.

सारे जग गेले दीड वर्ष अतिशय संकटातून जात आहे. विविध क्षेत्रांसमोर जीवघेणे प्रश्न कोविडने उभे केले आहेत. कोविडची स्थिती नक्की आणि पक्की कोणालाच वर्तवता येत नसल्याने सरकार आपल्या परीने जबाबदार पावले टाकत आहे. शिक्षण या अतिशय महत्वाच्या गोष्टीला अजून कुलूप आहे. हे सर्व सुरळीत सुरू झाल्यावर मग करमणूक या नावाखाली जे काही क्षेत्र येते ते सुरू होणार याबाबत कलावंत  सहमत आहेत. आधीपेक्षा आता परीस्थितीमध्ये थोडीफार सुधारणा होत असून लसीकरण त्यात मोलाची भर घालत आहे.

कोविडच्या संकटाने आर्थिक प्रश्न जसे निर्माण केले तसे मानसिक प्रश्न गंभीर केलेले आहेत. त्याकरता समुपदेशन आणि मार्गदर्शन काही डॉक्टर्स करत आहेत. आपल्यावरील हे असह्य ताण दूर होण्याचा एक मार्ग नाटक ही जिवंत कला पाहाणे हाही आहे. पहिली लाट ओसरल्यावर मराठी रंगभूमीवर काही लोकांनी सर्व काळजी घेऊन नाट्यप्रयोग केले. प्रायोगिक रंगभूमीवर केवळ २५/३० लोकांसमोर काही कलावंतानी अतिशय सुरक्षित आणि यशस्वीरीत्या प्रयोग केले. सभा, समारंभ, मंडई, हॉटेल अशा जागांपेक्षा ‘थिएटर’ ही अधिक सुरक्षित जागा आहे. याचा कलावंतानी अनुभव घेतला आहे.

त्यामुळे निदान ५० लोकांकरता छोट्या स्वरूपातील प्रयोग करायला सरकारने परवानगी देण्यात यावी जेणे करून यामुळे समाजात मनस्वास्थ्य टिकायला मदत होईल अशी मागणी नाटक कलावंतांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे. करोनाविरुद्धच्या या संकटात कलावंतांची साथ होतीच आणि पुढेही असेल अशी हमी देखील या कलावंतानी मुख्यमंत्र्यांना दिली आहे.

-कुणाल म्हात्रे