कल्याण शहरात पाईपलाईनद्वारे घरघुती गॅसचा पुरवठा करण्याची मागणी

कल्याण शहर हे गर्दिचे व धकाधकीचे शहर बनले असून शहर वासियांची गरज व मागणी लक्षात घेता गॅस सिलिंडर बंद करून पाईप द्वारे घरगुती गॅसचा पुरवठा करण्याची मागणी भारतीय जनता पार्टीच्या कल्याण जिल्हा महिला सरचिटणीस पुष्पा रत्नपारखी यांनी पालिका आयुक्तांकडे केली आहे.

     बऱ्याचशा वस्त्या व मोठमोठय़ा बिल्डिंगमध्ये लोक दाटीवाटीने राहतात तसेच  सिलिंडर स्फोट होऊन पुन्हा लालबाग मधील साराभाई बिल्डिंग गॅस सिलेंडर स्फोटाची पुनरावृत्ती होऊन दुर्घटना घडू  नये, हा संभाव्य धोका लक्षात घेऊन, तसेच सिलेंडर पेक्षा गॅस पाईप स्वस्त सुद्धा आहे.

     तसेच हल्ली  दामपत्य नोकरी धंद्यानिमित्त घराबाहेर पडत असल्याने गॅस सिलिंडर डिलिव्हरी घेण्याचा सुध्दा मोठा प्रश्न उद्भवतो. लोकांच्या ह्या समस्या लक्षात घेता कल्याण पश्चिम भागात पाईपद्वारे घरापर्यंत गॅस पोहचवणे खुपच गरजेचे आहे. त्यामुळे या अतिआवश्यक  व लोकांच्या सुरक्षिततेचा जाणीवपूर्वक विचार करून निर्णय घेत कल्याण शहरात घरगुती गॅस पाईपलाईनद्वारे गॅस पुरवठा करण्याची मागणी पुष्पा रत्नपारखी यांनी आयुक्तांकडे केली आहे.

-कुणाल म्हात्रे

व्हिडीओ : कल्याण रेल्वे स्थानकात इमर्जन्सी ब्रेकमुळे थोडक्यात बचावली वृद्ध व्यक्ती

कल्याण रेल्वे स्थानकात आज मोटरमनच्या सतर्कतेमुळे रेल्वे रूळ ओलांडणार्या एका वृद्ध इसमाला जीवनदान मिळाले आहे. एक वृद्ध व्यक्ती रेल्वे रूळ ओलांडून पलीकडल्या बाजूस जाण्याचा प्रयत्न करीत होती. याच दरम्यान हा अपघात झाला. मात्र वृद्धाचा जीव थोडक्यात बचावला.

कल्याणच्या प्लॅटफॉर्म क्रमांक ४ वरून मुंबई वाराणसी एक्सप्रेस निघाली होती. इंजिनमधून लोको पायलट एस के प्रधान आणि त्यांचा सोबत असलेले असिस्टंट रवी शंकर हे वेग वाढविण्याच्या तयारीतच होते. मात्र त्यांना समोर काहीतरी हरकत झाल्याची माहिती मिळाली. आणि त्यांनी क्षणाचा ही विलंब न लावता इमर्जन्सी ब्रेक सीसिस्टिमचा वापर केला. आणि काही सेकंदातच एक्स्प्रेस त्या वृद्ध व्यक्तीच्या जवळ जाऊन जागेवर उभी राहिली. मात्र ही वृद्ध व्यक्ती अगदी मधोमध असल्याने इंजिनच्या खाली सापडली. यानंतर मोटरमन आणि फलाटावरील काही लोक खाली उतरले आणि त्यांनी या वृध्द इसमाला सुखरूपपणे इंजिन खालून बाहेर काढले. आज दुपारी १ च्या दरम्यान ही घटना घडली.

प्लॅटफॉर्मवरून उतरून रूळ ओलांडून दुसऱ्या प्लॅटफॉर्मवर जाणे हे नियमबाह्य आहे व त्याशिवाय जीवघेणे देखील आहे. अश्या पद्धतीने रूळ न ओलांडण्याचे आवाहन रेल्वे प्रशासनाने पुन्हा एकदा प्रवाशांना केले आहे. उपलब्ध असलेल्या ब्रिजचा वापर करा असे सांगण्यात येते. त्याचबरोबर थोडक्यात बचावलेल्या वृद्ध इसमाला देखील याबाबत उपस्थित अधिकाऱ्यांकडून समज देण्यात आला. नशीब बलवत्तर म्हणून लोको पायलट ने वेळेवर अर्जंट ब्रेक दाबल्याने पुढील अनर्थ टळला.

व्हडिओत पहा कसे बाहेर काढले आजोबांना:-

-संतोष दिवाडकर

कल्याण परिमंडळात वीजबील थकवलेल्या ‘इतक्या’ लोकांचा वीजपुरवठा तात्पुरता खंडीत

महावितरणच्या कल्याण परिमंडळात थकीत वीजबिलाचा भरणा टाळणाऱ्या ७० हजार ६८६ ग्राहकांचा वीजपुरवठा तात्पुरता खंडित करण्यात आला आहे. या ग्राहकांकडे १०५ कोटी रुपये थकीत असून चालू वीजबिलासह थकबाकी व पुनर्रजोडणी शुल्क भरल्यानंतरच त्यांचा वीजपुरवठा पूर्ववत होऊ शकेल. याव्यतिरिक्त परिमंडलातील ७ लाख ८३ हजार ग्राहकांकडे मार्च-२०२१ पर्यंतची ४०२ कोटी रुपयांची वीजबिल थकबाकी आहे. याशिवाय एप्रिल ते जून २०२१ या तीन महिन्यांची थकबाकी १४२ कोटींवर पोहचली आहे. सध्या महावितरणची आर्थिक परिस्थिती बिकट असून वीज ग्राहकांनी चालू वीजबिलासह थकबाकीचा भरणा करून अखंडित वीजसेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन मुख्य अभियंता दिनेश अग्रवाल यांनी केले आहे.

कल्याण, डोंबिवलीचा समावेश असणाऱ्या कल्याण मंडल कार्यालय एक अंतर्गत ८ हजार ७७१ ग्राहकांचा (७ कोटी ७ लाख थकीत), ठाणे जिल्ह्याचा ग्रामीण भाग व उल्हासनगरचा समावेश असलेल्या कल्याण मंडल कार्यालय दोन अंतर्गत १४ हजार ९२३ ग्राहकांचा (४९ कोटी थकीत), वसई व विरार समाविष्ट असणाऱ्या वसई मंडल कार्यालयांतर्गत सर्वाधिक २७ हजार ५२७ ग्राहकांचा (२८ कोटी ३३ लाख) आणि पालघर जिल्ह्याचा समावेश असलेल्या (वसई व विरार विभाग वगळून) पालघर मंडलात १९ हजार ४६५ ग्राहकांचा (२० कोटी ७४ लाख थकीत) वीजपुरवठा तात्पुरता खंडित करण्यात आला आहे. या घरगुती, व्यावसायिक आणि औद्योगिक लघुदाब ग्राहकांनी नोव्हेंबर २०२० पासून वीजबिलाचा एक रुपयाही भरलेला नाही. त्यामुळे नाईलाजास्तव त्यांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे.

परिमंडलातील घरगुती, व्यावसायिक आणि औद्योगिक तसेच सार्वजनिक सेवेतील थकबाकीदार ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करण्याची मोहीम तीव्र करण्यात आली आहे. गैरसोय टाळण्यासाठी महावितरणकडून उपलब्ध सुविधांचा लाभ घेऊन चालू व थकीत वीजबिल भरून सहकार्य करण्याचे आवाहन मुख्य अभियंता अग्रवाल यांनी केले आहे.

थकीत वीजबिलापोटी वीजपुरवठा खंडित केल्यानंतर थकीत वीजबिल व पुनर्रजोडणी शुल्क भरल्याशिवाय वीजपुरवठा सुरळीत केला जाणार नाही. शेजाऱ्यांकडून अथवा चोरट्या मार्गाने वीजपुरवठा घेणे धोकादायक असून यात वीज देणाऱ्या व घेणाऱ्या दोघांवर कारवाई होऊ शकते. त्यामुळे अधिकृतपणे वीज वापर करण्याचे आवाहन मुख्य अभियंता अग्रवाल यांनी परिमंडलातील वीज ग्राहकांना केले आहे.

-कुणाल म्हात्रे