कल्याण डोंबिवलीत दिवसभर पावसाचा हाहाकार; सखल भागात साठलं पाणी

सकाळपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने मुंबई, ठाण्यासह कल्याण डोंबिवली शहरांना देखील झोडपून काढले आहे. जिल्हयासह संपूर्ण कल्याण आणि अंबरनाथ तालुक्यात पावसाने कहर केला आहे. यात अनेक सखल भागात पाणी साचल्याचे पहायला मिळाले.

रविवार पासून मुंबई,ठाणे,रायगड या जिल्ह्यात पावसाचा नुसता धुमाकूळ सुरू आहे. सोमवारी सकाळी सुरू झालेल्या पावसाने कल्याण डोंबिवलीकरांची देखील भांबेरी उडवली आहे. कल्याण शीळफाटा मार्गावर पाणी साचल्याने नदी सदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. डोंबिवलीतील मानपाडा पोलीस ठाण्यात देखील प्रथमच पाणी शिरले होते. सुरू असलेले रस्त्याचे बांधकाम आणि नालेसफाई पूर्णपणे न झाल्याने पावसाचे सर्व पाणी पोलीस ठाण्यात शिरले. साधारण एक फूट पाणी पोलीस ठाण्यातील पोलीस अधिकाऱ्यांच्या केबिन पर्यंत शिरले होते.

कल्याण पश्चिमेला देखील पावसाचा कहर पाहायला मिळाला. येथीलही सखल भागात पाण्याने कब्जा केला होता. विठ्ठलवाडी येथील नाला देखील संध्याकाळी धोक्याची पातळी ओलांडून वाहत होता. यामुळे कल्याण – उल्हासनगर मार्गावरिल या पुलावरील वाहतूक पूर्णतः बंद केली गेली. शिवाय महानगरपालिका प्रशासनाचा फौजफाटा देखील त्या ठिकाणी तैनात केला गेला होता. पुलाच्या दोन्ही बाजूस पोलीस बंदोबस्त केला गेला होता. कल्याण रेल्वे स्थानकात रेल्वे रुळावर साधारण एक फुटा पर्यंत पाणी साठले होते.

कल्याण तालुक्यातील खडवली नदी,उल्हास नदी,वालधुनी नदी आणि लहान सहान ओढे दुथडी भरून वाहत होते. तर बदलापुरच्या बारवी धरणात देखील पाणी साठा वाढला आहे. अंबरनाथ शहरात तसेच शिव मंदिर भागात पाणी साठले होते. अंबरनाथ तालुक्यातील मलंगगड भागात देखील एका शेतकऱ्याच्या तीन म्हशी नदीच्या प्रवाहात वाहून गेल्या आहेत. अतिवृष्टीमुळे शेतीचेही मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

-संतोष दिवाडकर

‘विठाई’ एसटी बसवरील विठ्ठलाच्या चित्राची होत असलेली विटंबना थांबवा; हिंदु जनजागृती समितीची परिवहन मंत्र्यांकडे मागणी

शिवसेना-भाजप युती शासनाच्या काळात आरंभ करण्यात आलेली ‘महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन मंडळा’ची ‘विठाई’ बससेवा लोकप्रिय झाली आणि तिचा राज्यभरात विस्तार करण्यात आला. विठुमाऊलीच्या नावे आरंभ करण्यात आलेली ही बससेवा स्तुत्यच असून या माध्यमातून शासनाने वारकर्‍यांच्या श्रद्धांचा सन्मान केला आहे. मात्र काही दिवसांनी आम्हाला या बसच्या बाहेरील भागात असलेल्या विठ्ठलाच्या चित्रावरील धूळ, थुंकल्याचे डाग, चिखलाचे डाग दिसू लागले, ही एकप्रकारे श्री विठ्ठलाच्या चित्राची विटंबनाच आहे. असे हिंदू जनजागृती समितीने आता म्हटले आहे.

अनावधानाने का होईना, श्री विठ्ठलाची प्रतिमा मलिन होत आहे. हा श्री विठ्ठलाचा अनादर असून ही होत असलेली विटंबना रोखण्यासाठी ‘विठाई’ बसच्या बाहेर असलेले श्रीविठ्ठलाचे चित्र त्वरित काढावे, अशी आग्रही मागणी हिंदु जनजागृती समितीने केली आहे. यावर उपाय म्हणून श्री विठ्ठलाचे चित्र प्रत्येक बसच्या आतील बाजूस लावून प्रतिदिन त्या चित्राचे पूजन करून त्याचे पावित्र्य राखावे, अशी विनंतीवजा सूचनाही समितीने केली आहे.

     या संदर्भातील निवेदन राज्याचे परिवहन मंत्री श्री. अनिल परब, परिवहन सचिव, सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री आणि सोलापूरचे जिल्हाधिकारी यांना देण्यात आले आहे. या निवेदनात पुढे म्हटले आहे, बसमधील प्रवासी हे मुद्दाम ही विटंबना करत नाहीत. अनावधानाने का होईना, खिडकीतून बाहेर थुंकणे, चूळ भरणे, तोंड धुणे, उलटी करणे आदी कृत्ये करतांना ती विठुरायाच्या चित्रावर त्याचे शिंतोडे उडतात. तसेच सध्या पावसाळा असल्याने अनेकदा रस्त्यावरील चिखल चित्रावर उडतो. प्रतिदिन ज्या विठ्ठलाला पुजतो, त्याच्या चित्राला घाणीने माखलेला पहाणे, हे अतिशय वेदनादायी आहे. त्यामुळे श्री विठ्ठलाच्या प्रतिमेची विटंबना तत्काळ थांबवायला हवी, असे विनंतीपूर्वक आवाहन समितीने केले आहे. यावर तुम्हाला काय वाटत ते आम्हाला खाली कमेंटमध्ये कळवा.

-कुणाल म्हात्रे