सह्याद्री ते हिमालय पायी प्रवास करणाऱ्या सिद्धार्थ गणाईचे कल्याण मध्ये आगमन

सह्याद्री ते हिमालय पायी प्रवास “एक झाड माणुसकीचं, एक पाऊल परिवर्तनाचं” ही मोहीम घेऊन निघालेल्या सिद्धार्थ गणाईचे आज कल्याणामध्ये आगमन झाले असून त्याच्याहस्ते वृक्षारोपण करण्यात आले. कल्याणनजीक असलेल्या बापगावच्या  सरपंचांच्या हस्ते या मोगली सफर चा सत्कार करण्यात आला.

या धाडसी प्रवासच कौतुक करत ह्या तरुण वयात ही जाणीव घेऊन एक पाऊल उचलण खूप मोठी गोष्ट असून सिद्धार्थ ने जे काम हाती घेतले आहे त्या कामाला आमचा पाठींबा असल्याचे सरपंचांनी सांगितले. तसेच याठिकाणी गणाई परिवारातील ज्योती निकाळजे व तमाम सदस्य आणी विद्यार्थी भारती संघटनेच्या राष्ट्रीय अध्यक्षा मंजिरी धुरी यादेखील उपस्थित होत्या.

     एक 22 वर्षीय पछाडलेला तरुण त्याच्या स्वप्नांना साकार करत एक सामाजिक जाणिव घेऊन रायगडच्या पायथ्यापासून छत्रपती शिवाजी महाराजांना नमन करून हिमालयाच्या दिशेने चालत निघाला आहे. निसर्गाची होत चाललेली कत्तल आणि निसर्गाचा कोप ही परिस्थिती मानवी जीवनावर येण्याचं मूळ कारण आपणच आहोत. आणि ही परिस्थिती बदलण्यासाठी प्रयत्न करणारे पण आपणच आहोत. यासाठी मी एक हा छोटा प्रयत्न करत आहे. आपण सगळे माझ्या सोबत आहात हीच माझी ताकद आहे. असे सिद्धार्थ गणाई यांनी सांगितले.

-कुणाल म्हात्रे

कल्याण गांधारी पुलाचे झाले PWD कडून परीक्षण; पुलाला कसलेही तडे नाहीत

कल्याण येथील गांधारी पुल काल रात्रीच्या सुमारास अचानकपणे बंद करण्यात आला होता. मात्र आज सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी या पुलाचे परीक्षण केले. तपासणीअंती पुलाला कसलेही तडे नसल्याचे त्यांच्या निदर्शनास आल्याचे त्यांनी सांगितले आहे.

गांधारी पुलाला तडे गेल्याची माहिती मिळताच हा पूल सोमवारी रात्री खबरदारी म्हणून तात्काळ बंद करण्यात आला. कल्याण शहरातून हा पूल पडघा भागाला जोडतो. शिवाय नाशिकला जाण्यासाठी हा एक सोयीस्कर असा मार्ग आहे. याच मार्गावरील गांधारी येथे उल्हास आणि काळू नदीच्या संगमी पात्रावर हा पूल उभा आहे. या पुलाची पुरामुळे दुरवस्था झाली असून पिलरला तडे गेले आहेत असा संशय प्रशासनाला आल्याने काल तात्काळ वाहतूक रोखली होती.

आज मंगळवारी दुपारच्या दरम्यान सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी,स्थानिक रहिवासी आणि पत्रकारांसमवेत बोटीच्या माध्यमातून या पुलाची पाहणी करण्यात आली. ज्या पिलरला तडे गेले आहेत त्या पिलरवर चढून अधिकारी तथापि इंजिनिअर यांनी पिलरची तपासणी केली. पुर परिस्थितीत पिलरला लपेटलेल्या काळ्या कपड्यामुळे सिमेंट उधडल्याचा आभास निर्माण होत होता. मात्र जवळून पाहणी केल्या नंतर पिलरला वेढलेले कापड आणि गवत बाजूला सारून व्यवस्थित परीक्षण करण्यात आले. यानंतर पूल सुस्थितीत असल्याची प्राथमिक दिलासादायक माहिती अधिकाऱ्यांनी लोकशाही न्यूजशी बोलताना दिली.

गांधारी पूल सुस्थितीत असला तरीही उद्या बुधवारी पुन्हा एक एक्सपर्ट टीम या पुलाचे बारकाईने परीक्षण करणार आहे. यानंतर पुलाला हिरवा सिग्नल देऊन पुलावरील वाहतूक सुरू केली जाणार आहे. जर या पुलाचे नुकसान झाले असते तर डागडुजी होई पर्यंत वाहनचालक,स्थानिक रहिवासी आणि परिणामी प्रशासनाला मोठ्या जाचाला सामोरे जावे लागले असते. यात वाहतूक व्यवस्थेवर मोठ्या प्रमाणात ताण निर्माण झाला असता. सुदैवाने पूल सुस्थितीत असल्याची प्राथमिक माहिती देण्यात आली असून उद्याच्या पाहणी नंतर पूल वाहतुकीसाठी खुला होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

-संतोष दिवाडकर

बहिणीच्या प्रियकराला चालत्या ट्रेनमधून दिलं ढकलून; महिन्याभरानंतर डोंबिवली जीआरपीने हत्येतील आरोपींना केली अटक

डोंबिवली जीआरपी पोलिसांनी खळबळजनक अशा हत्येची घटना उघडकीस आणली आहे. प्रेमाच्या विरोधात प्रेयसीच्या भावांनी तिच्या प्रियकराला महिन्याभरापूर्वी चालत्या ट्रेनमधून खाली फेकले होते. रेल्वे रुळावर जखमी अवस्थेत सापडलेला प्रेमी साहिल हाश्मी याला पोलिसांनी रुग्णालयात दाखल केले .परंतु त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. या प्रकरणात चौकशीनंतर जीआरपी पोलिसांनी साहिलच्या हत्येप्रकरणी मुलीचे वडील शब्बीर हाश्मी, कासिम हाश्मी, गुलाम हाश्मी यांच्यासह १० जणांना अटक केली.

डोंबिवली जीआरपीकडून मिळालेल्या माहितीनुसार उत्तर प्रदेशमधील भदोही जिल्ह्यातील रहिवासी साहिल हाश्मी हा एका अल्पवयीन मुलीवर प्रेम करत होता. गेल्या महिन्यात १५ जून रोजी साहिलने आपल्या प्रेयसीला पळवून नेले होते. १८ जून रोजी दोघेही रत्नागिरी एक्स्प्रेसने मुंबईकडे निघाले होते. त्यावेळी मुलीच्या वडिलांना समजले की आपली मुलगी साहिलसोबत पळून गेली आहे. आणि तिच्या वडिलांना राहवले गेले नाही.

मुलीच्या वडिलांनी आपल्या भावाला यूपीहून अंबरनाथ येथे फोनद्वारे माहिती दिली. त्यानंतर रत्नागिरी एक्सप्रेस १९ जून रोजी रात्री अकरा वाजता कल्याणला पोचणार होती. यापूर्वीच मुलीचा चुलत भाऊ आपल्या मित्रांसह कल्याण स्टेशनला पोहोचला. ट्रेन कल्याण येथे पोहोचल्यावर मुलीचा भाऊ आणि त्याचे मित्र ट्रेनमध्ये चढले आणि दोघांना शोधून काढले. साहिलला वाईट मारहाण केल्यानंतर आरोपींनी त्याला कोपर ते दिवा रेल्वे स्थानक दरम्यान चालत्या ट्रेनमधून बाहेर फेकले.

सुरुवातीला पोलिसांना हा अपघात आहे असे वाटले होते, परंतु जेव्हा जीआरपी पोलिसांनी साहिलच्या नातेवाईकांशी बोलून सर्व बाबींचा बारकाईने शोध घेतला, तेव्हा सर्व तथ्य उघडकीस आले. साहिलच्या हत्येतील 10 आरोपींना डोंबिवली जीआरपीने अटक केली. एक आरोपी हा अल्पवयीन असल्याने त्याला भिवंडी येथील बाल सुधारगृहात पाठविण्यात आले आहे.

-संतोष दिवाडकर