उंबर्डे घनकचरा प्रकल्प बंद न झाल्यास तीव्र आंदोलनाचा भाजपाचा इशारा

कल्याण पश्चिमेतील उंबर्डे येथील घनकचरा प्रक्रिया केंद्र त्वरित बंद न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा भारतीय जनता पार्टीच्या वतीने देण्यात आला आहे. याबाबत भाजपा जिल्हा सरचिटणीस चिंतामण लोखंडे यांनी केडीएमसीचे उपायुक्त, घनकचरा व्यवस्थापक  रामदास कोकरे यांची भेट घेत निवेदन दिले आहे.

      आधारवाडी डम्पिंग ग्राउंड महापालिकेने बंद केल्यानंतर याठिकाणी टाकण्यात येणारा कचरा हा उंबर्डे येथील घनकचरा प्रकिया केंद्रावर टाकण्यात येत होता. याठिकाणी प्रमाणापेक्षा जास्त कचरा टाकण्यात येत असल्याने याठिकाणी मोठ्या प्रमाणात दुर्गंधी आणि माशांचे प्रमाण वाढले होते. या त्रासाला कंटाळून येथील ग्रामस्थांनी चिंतामण लोखंडे यांच्या नेत्तृत्वाखाली या घनकचरा प्रकल्पाबाहेर कचरागाड्या रोखून धरत आंदोलन केले होते.

उंबर्डे येथील ‘ब’ आणि ‘क’ प्रभाग क्षेत्र वगळता इतर अनेक ठिकाणाचा कचरा येत असून तो त्वरित बंद करावा. येथे खूप मोठया प्रमाणात कचरा डम्प करत असून रोगराईची समस्या निर्माण झाली आहे. महानगरपालिकेच्या अंतर्गत असलेल्या उंबर्डे गाव येथे मोठया प्रमाणाने दुर्गधीची मोठी समस्या झाली असून याकडे कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेने गांभीर्याने लक्ष द्यावे. त्यामुळे मोठया प्रमाणात आरोग्याला धोका निर्माण झाला असून सदर परिसरातील लहान मुले तसेच वरिष्ठ लोकांना व नागरिकांना कचऱ्याचा दुर्गधीचा, मच्छरांचा व माशांचा मोठया प्रमाणात त्रास होत आहे.

कल्याणात सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव असून उंबर्डे गावच्या लोकांना अशा त्रासाला सामोरे जावे लागत असून लोक मोठया प्रमाणात आजारी पडत आहेत. याबाबत भाजपा जिल्हा सरचिटणीस चिंतामण लोखंडे यांच्या शिष्टमंडळाने घनकचरा विभागाचे उपायुक्त रामदास कोकरे यांची भेट घेत हा घनकचरा प्रकल्प त्वरित बंद करण्याची मागणी केली आहे. येत्या चार दिवसात याची अमलबजावणी न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे. यावेळी अनिल भंडारी, नरेश पाटील,  नवनाथ म्हात्रे, अनिल म्हात्रे आदी ग्रामस्थ उपस्थित होते.

दरम्यान पालिका उपायुक्त रामदास कोकरे यांना विचारले असता, उंबर्डे घनकचरा प्रकल्पाची क्षमता ३५० मेट्रिक टन असून या ठिकाणी टाकण्यात येणाऱ्या कचऱ्याचे प्रमाण कमी केले आहे. सध्या याठिकाणी २५० मेट्रिक टनच्या आसपास कचरा टाकला जात आहे. डोंबिवली आणि टिटवाळा येथील कचरा प्रकल्प कार्यान्वित झाल्यानंतर भविष्यात या प्रकल्पावर टाकण्यात येणाऱ्या कचऱ्याचे प्रमाण आणखी कमी होणार असल्याची प्रतिक्रिया कोकरे यांनी दिली.

-कुणाल म्हात्रे

धक्कादायक ! प्रेम प्रकरणात अडथळा ठरणाऱ्या अल्पवयीन मुलीच्या आईची गळा दाबून हत्या

अल्पवयीन मुलीच्या प्रेमात पडलेल्या प्रियकराने लग्नास विरोध दर्शविणाऱ्या मुलीच्या आईचा   गळा दाबून जीवे ठार मारून तिचा मृतदेह गुरवली येथील जंगलात टाकून देणाऱ्या प्रियकरास टिटवाळा पोलिसांनी अटक केली आहे.

टिटवाळा पोलीस स्टेशनच्या हद्दीत येत असणाऱ्या व बल्याणी येथे सोनी देवराज शेरवे (३९) आपल्या अल्पवयीन मुलीसोबत राहात होत्या. केडीएमसीच्या वडवली कार्यालयात हंगामी सफाई कर्मचारी म्हणून सोनी या काम करत होत्या. अल्पवयीन मुलीच्या वाढदिवसाच्या दिवशी गुरवली येथे राहत असणारा समीर बबन दळवी (२४) हा शुभेच्छा देण्यासाठी आल्याने मुलीच्या आईने या प्रेम संबंधाला विरोध दर्शविला होता. प्रेमसंबंधाला व लग्नाला विरोध केल्याने समीर व मुलीच्या आईची बाचाबाची झाली होती. राग अनावर झाल्याने मुलीच्या आईचा गळा दाबून तिचा मृतदेह गुरवली जंगलातील झाडाझुडपात समीरने टाकला होता.

सडलेल्या अवस्थेत एका महिलेचा मृतदेह आढळल्याने टिटवाळा पोलिसांनी ११ जुलै रोजी आकस्मिक गुन्ह्याची नोंद करून शवविच्छेदनासाठी मृतदेह गोवेली ग्रामीण रुग्णालयात नेला असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सदर महिलेचा गळा दाबून खून झाल्याची माहिती पोलिसांना दिली. शवविच्छेदनाच्या अहवालाने पोलीसही चक्रावले यासंदर्भात अल्पवयीन मुलीची कसून चौकशी केली असता आपला प्रियकर समीर बबन दळवी याला माझ्या आईने तुझी माझ्या मुली सोबत लग्न करण्याची लायकी नाही असे बोलल्याने वाद निर्माण झाल्याची माहिती पोलिसांना दिली.

टिटवाळा पोलीस स्टेशनचे गुन्हे प्रकटीकरण विभागाचे पोलीस उपनिरीक्षक विजय सुर्वे यांनी तपासाची चक्रे फिरवीत गुरवली येथे राहात असलेल्या मुलीचा प्रियकर समीर बबन दळवी याला चौकशी साठी ताब्यात घेताच आपण गळा आवळून खून केल्याची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी आज न्यायालयात त्याला हजर केले असता १७ जुलैपर्यंत त्याला पोलीस कोठडीत ठेवण्यात आल्याची माहिती पोलीस उपनिरीक्षक विजय सुर्वे यांनी दिली.

-कुणाल म्हात्रे

कल्याण पूर्वेत बेवारस वाहनांवर पालिकेची जप्तीची कारवाई

कल्याण पूर्वेत रस्तावर उभ्या असणाऱ्या बेवारस, भंगार वाहनांवर जप्तीच्या कारवाईचा बडगा “ड” प्रभागक्षेत्र आधिकारी सुधीर मोकल यांच्या पथकाने उगारत १० बेवारस, भंगार वाहने जप्त केली आहेत.

 महापालिका क्षेत्रातील रस्त्यावरील वाहतूकीची कोंडी कमी व्हावी आणि लोकांना प्रवास करणे सुलभ व्हावे या दृष्टीकोनातून महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी यापूर्वीच दिलेल्या निर्देशानुसार “ड” प्रभाग क्षेत्रातील  बेवारस, भंगार वाहने उचलण्याची कारवाई “ड” प्रभागक्षेत्र अधिकारी सुधिर मोकल यांनी केली.

या कारवाईमध्ये “ड” प्रभागक्षेत्र आधिकारी सुधीर मोकल यांनी महापालिका अतिक्रमण निर्मुलन विभागाचे कर्मचारी व महापालिका पोलीस यांच्या मदतीने २ चारचाकी, १ तीन चाकी व ७ दुचाकी अशी एकुण १० बेवारस, भंगार वाहने उचलून खंबाळपाडा येथील वाहन तळावर जमा केली. तसेच ६ वाहनांवर दंडात्मक कारवाई करुन १७ हजार ५०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.

-कुणाल म्हात्रे

नाटकांच्या प्रयोगांना परवानगी देण्याची नाट्यकलावंताची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

कोरोनामुळे लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे अनेक व्यवहार ठप्प असून यामुळे अनेक उद्योग धंद्यांना याचा फटका बसला आहे. लॉकडाऊनमुळे नाट्यगृह देखील बंद असल्याने नाटकामध्ये काम करणारे कलावंत आणि इतर कलाकार यांच्यावर काम नसल्याने उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे नाटकांच्या प्रयोगांना परवानगी देण्याची मागणी कलावंतानी मुख्यमंत्र्यांकडे केली असून ५० लोकांसाठी छोटे प्रयोग राबविण्याची संकल्पना देखील त्यांनी मांडली आहे. या कलावंतांमध्ये अभिजित झुंजारराव (कल्याण), अतुल पेठे (पुणे),  शंभू पाटील (जळगाव), वामन पंडित (कणकवली), दत्ता पाटील (नाशिक),  अनिल कोष्टी (भुसावळ) आणि इतर अनेक गावांतील रंगकर्मी यांचा समावेश आहे.

सारे जग गेले दीड वर्ष अतिशय संकटातून जात आहे. विविध क्षेत्रांसमोर जीवघेणे प्रश्न कोविडने उभे केले आहेत. कोविडची स्थिती नक्की आणि पक्की कोणालाच वर्तवता येत नसल्याने सरकार आपल्या परीने जबाबदार पावले टाकत आहे. शिक्षण या अतिशय महत्वाच्या गोष्टीला अजून कुलूप आहे. हे सर्व सुरळीत सुरू झाल्यावर मग करमणूक या नावाखाली जे काही क्षेत्र येते ते सुरू होणार याबाबत कलावंत  सहमत आहेत. आधीपेक्षा आता परीस्थितीमध्ये थोडीफार सुधारणा होत असून लसीकरण त्यात मोलाची भर घालत आहे.

कोविडच्या संकटाने आर्थिक प्रश्न जसे निर्माण केले तसे मानसिक प्रश्न गंभीर केलेले आहेत. त्याकरता समुपदेशन आणि मार्गदर्शन काही डॉक्टर्स करत आहेत. आपल्यावरील हे असह्य ताण दूर होण्याचा एक मार्ग नाटक ही जिवंत कला पाहाणे हाही आहे. पहिली लाट ओसरल्यावर मराठी रंगभूमीवर काही लोकांनी सर्व काळजी घेऊन नाट्यप्रयोग केले. प्रायोगिक रंगभूमीवर केवळ २५/३० लोकांसमोर काही कलावंतानी अतिशय सुरक्षित आणि यशस्वीरीत्या प्रयोग केले. सभा, समारंभ, मंडई, हॉटेल अशा जागांपेक्षा ‘थिएटर’ ही अधिक सुरक्षित जागा आहे. याचा कलावंतानी अनुभव घेतला आहे.

त्यामुळे निदान ५० लोकांकरता छोट्या स्वरूपातील प्रयोग करायला सरकारने परवानगी देण्यात यावी जेणे करून यामुळे समाजात मनस्वास्थ्य टिकायला मदत होईल अशी मागणी नाटक कलावंतांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे. करोनाविरुद्धच्या या संकटात कलावंतांची साथ होतीच आणि पुढेही असेल अशी हमी देखील या कलावंतानी मुख्यमंत्र्यांना दिली आहे.

-कुणाल म्हात्रे

कल्याणमधील आकाशपरी संजल गावंडेची अमेरिकेतील न्यू शेपर्ड यानासाठी निवड

कल्याण पूर्व कोळसेवाडीतील संजल अशोक गावंडे या तरुणीची अमेरिकेतून लाँच होणाऱ्या यानातील टीममध्ये निवड झाली आहे.  संजल गावंडे हिने कोळसेवाडी, कल्याण-पूर्व ते सातासमुद्रापलिकडे अमेरिकेत मिशिगन, शिकागो, कॕलिफोर्निया आणि आता सियाटेल असा प्रवास करणारी ही तरुणी आकाशपरी नावाने ओळखू लागली आहे.

अमेरिकेत सियाटेल येथील ब्ल्यु ओरिजीन जी एक एरो स्पेस नामंकित कंपनी म्हणून ओळखली जाते. या कंपनीतर्फे २० जुलै २०२१ ला न्यू शेपर्ड हे यान लाँच होत आहे. या मिशनसाठीच्या टीम मध्ये संजलची निवड झाली आहे. लहानपणापासून तिचे जे स्वप्न होते गगनाला गवसणी घालण्याचे, जे ध्येय होते, ते स्वप्न ते ध्येय आता खऱ्या अर्थाने पूर्ण होत असल्याची भावना तिच्या आईने व्यक्त केली आहे.

           कल्याण मध्ये जन्मलेली संजल कोळसेवाडीतील माॕडेल इंग्लिश हायस्कूल मध्ये दहावी पर्यत शिकली. त्या नंतर तिचे बारावी पर्यंतचे शिक्षण बिर्ला कॉलेज तर १२ वी नंतर वाशी येथील फादर अॕग्नेल काॕलेज येथे शिक्षण घेत २०११ ला संजलने मुंबई युनिव्हरसिटी मधून प्रथम श्रेणीत पास होवून मॕकेनिकल इंजिनियरची पदवी प्राप्त केली. हा अभ्यासक्रम पार पाडतानाच तिने जीआरई, टोफेलसारख्या कठीण परिक्षा दिल्या त्यातही ती चांगल्या मार्काने उत्तीर्ण झाली. या सर्व परिक्षांच्या गुणांवर तिने अमेरिकेतील मिशिगन टेक युनिव्हरसिटी येथे एमएस साठी अर्ज केला.

         मिशिगन टेक युनिव्हरसिटी येथे संजलचे पुढील शिक्षण सुरू झाले. २०१३ ला प्रथम श्रेणीत पास होवून संजलने मॕकेनिकल मध्ये मास्टर आॕफ सायन्सचा पदवी प्राप्त केली. २०१३ ला संजलला विस्काॕनसिन मधील फॉन्ड्युलेक येथीलमर्क्युरी मरीन या नामंकित कंपनीत जाॕब लागला. तिच्या मनासारखा तिला जॉब मिळाला पंरतु तिचे लक्ष मात्र अवकाशाकडे होते तेव्हा ती जमिनीवर शांत बसणारी मुलगी नव्हती. जॉब करता-करता शनिवार-रविवार सुट्टी मध्ये आराम न करता तिने विमान चालवण्याचे प्रशिक्षण चालू केले. विमान शिकण्यासाठी तिला तिचा मॕकेनिकल अभ्यासक्रम कामी आला. अखेर तिची मेहनत कामी आली. १८ जून २०१६ ला तिला वैमानिक म्हणून लायसन मिळाले आणि ती विमानाने उंच भरारी मारु लागली.

तिचे कॕलिफोर्नियाला जाण्याचे स्वप्न होते. तशी संधी ही चालून आली. कॕलिफोर्निया मधील आँरेज सिटी येथील टोयोटा रेसिंग डेव्हलपमेंट या नामंकित कंपनीतून तिला कॉल आला. याठिकाणी मॕकेनिकल डिझाईन इंजिनियर म्हणून कामाला सुरूवात झाली. रेसिंगच्या गाड्यांचे इंजिन ती डिझाईन करत होती. अत्यंत कठोर मेहनतीने अखेर संजलला २०१८ ला कमर्शिअल पायलट चे लायसन्स मिळाले. इतकेच नव्हे तर नायंटी नायंटी इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन ऑफ वूमन्स पायलट या संस्थेची ती चेअरमन झाली.

       सॉफ्टवेअर हार्डवेअर कौशल्यामध्ये पारंगत असलेल्या संजलला ब्ल्यू ओरिजिन या कंपनीने न्यू शेपर्ड या मिशनसाठी तिला सिलेक्ट केले असून २० जुलै २०२१ या दिवशी लाँच होत असलेल्या न्यू शेपर्ड या यानातील टीममध्ये निवड झाल्याने संजलचे तिचे लहानपणापासूनचे जे स्वप्न होते ते खऱ्या अर्थाने पूर्ण झाले असल्याची प्रतिक्रिया तिची आई सुरेखा गावंडे यांनी दिली आहे. कल्याणच्या या आकाशपरीला २० जुलैच्या गगणभरारीसाठी MH मराठी कडून खूप साऱ्या शुभेच्छा.

-कुणाल म्हात्रे

कल्याण डोंबिवलीच्या रिक्षा चालकांना लसीकरणासाठी नाव नोंदवण्याचे आवाहन

रिक्षा टॅक्सी चालक मालक असोसिएशन व आरोग्य विभाग कल्याण डोंबिवली महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने रिक्षा चालकांचे मोफत लसीकरण करण्यात येणार असून यासाठी संघटनेच्या कार्यालयात नाव नोंदविण्याचे आवाहन संघटनेच्या वतीने करण्यात आले आहे.

रिक्षाचालक राञं दिवस शहरात व इतर ठिकाणी प्रवासी वाहतुक सेवा बजावत असतात अनेक प्रकारे विविध प्रवाशी नागंरीकाशी नित्य रोज संर्पक येतो. कोरोना काळात खबरदारी सुरक्षितता याकरीता प्राधन्याने रिक्षा चालकांचे लसिकरण करावे अशी मागणी संघटनेच्या वतीने केडीएमसी आयुक्त डाँ. विजय सुर्यवंशी यांच्याकडे करण्यात आली होती. याबाबत रिक्षा चालकांच्या लसीकरणासाठी महापालिकेने सकारात्मकता दर्शवली आहे. संघटनेच्या वतीने प्रणव पेणकर, संतोष नवले, जितेंद्र पवार, हेमंत सांगळे आदींनी यावेळी आरोग्य आधिकारी डाँ. अश्विनी पाटील यांची भेट घेत लसीकरणाच्या नियोजनाबाबत चर्चा केली.

ज्या रिक्षा चालकांचे लसिकरण बाकी असेल व ज्यांचे आधारकार्ड पत्ता नोदं कल्याण शहराचा असेल त्यांनीच फक्त संघटनेच्या जनसंर्पक कार्यालय व विभागवार नियुक्त पदाधिकारी यांच्याकडे नावं  नोंदविण्याचे आवाहन संघटनेने केले असून लसिकरणाचे ठिकाण, वेळ, तारीख लवकरच जाहीर करण्यात येणार आहे.

-कुणाल म्हात्रे

अनेक दिवस दडी मारलेल्या पावसाने हजेरी लावल्याने कल्याण तालुक्यातील भातलावणीला वेग

गेल्या दहा दिवसापासून दडी मारलेल्या पावसाने काही प्रमाणात हजेरी लावल्याने बळीराजा मात्र खूप सुखावला आहे. यामुळे भातशेती लावणीच्या कामाची लगबग सुरू झाली  आहे. कल्याण तालुक्याच्या ग्रामीण भागात भातलावणीच्या म्हणजे आवणीच्या कामाला जोरात सुरुवात झाली आहे.

कल्याण तालुक्यातील मुख्य पीक म्हणजे भाताचे होय. परंतु पेरणी नंतर दहा दिवस पावसाने दडी मारल्याने बळीराजा चिंतातूर झाला होता. पावसाने घेतलेल्या उघडीपिमुळे शेतकरी राजा कमालीचा हवालदिल झाला होता. मात्र दोन दिवसांपासून काही प्रमाणात पडत असणारा पाऊस हा शेतीच्या लागवडीसाठी पूरक असल्यामुळे बळीराजा मात्र सुखावला आहे.  यामुळे शेतीची भात लागवडीचे काम करण्यासाठी शेतकरी राजा शेतात उतरला आहे. 

जागोजागी भातलागवडीची कामे करत असणारा शेतकरी वर्ग दिसून येत आहे. पावसाने चांगली हजेरी लावल्यामुळे बळीराजा चांगलाच सुखावला आहे. परंतु अजून जास्त पावसाची गरज असून जोराचा  पाऊस शेतीला मिळाला तर भाताचे पीक चांगले येत असल्याची प्रतिक्रिया शेतकरी वर्गातून व्यक्त होत आहेत.

-कुणाल म्हात्रे

मावळ : वाघेश्वर शिवमंदिर परिसरातील धरणात बुडून युवकाचा मृत्यू

मावळ तालुक्यातील वाघेश्वर येथील प्राचीन शिवमंदिर प्रसिद्धीच्या झोतात आल्या नंतर येथे पर्यटकांची सध्या मोठी रीघ लागली आहे. मात्र त्याचबरोबर या मंदिरात भेट देण्यासाठी आलेल्या एका युवकाचा परिसरातील धरणाच्या पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची पहिली घटना समोर आली आहे.

पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यात वाघेश्वर येथे एक प्राचीन शिवमंदिर आहे. स्थानिक तरुणांनी समाज माध्यमांवर प्रचंड व्हायरल केल्याने आता बाहेरील लोक देखील मंदिराला भेट देण्यासाठी गर्दी करीत आहेत. यासंबंधीत लेख MH मराठीने मागील महिन्यात प्रसिद्ध केला होता. शनिवार,रविवार आणि सोमवार हे तीन दिवस या मंदिरात प्रचंड गर्दी होत असते. मुळातच हे मंदिर पवना धरण क्षेत्रात असल्याने वर्षातून निम्मा काळ हे मंदिर पाण्याखाली असते. आणि जवळच असलेल्या पवना धरणाच्या जलाशयात बुडून एका पर्यटकाचा मृत्यू झाल्याची पहिली घटना समोर आली आहे.

रविवारी पुण्यातील खडकी येथील राहणारा शुभम दुधाळ हा २१ वर्षीय तरुण आपल्या सहा मित्रांसोबत या मंदिराला भेट देण्यासाठी आला होता. मंदिर पाहून त्याने दर्शन केले आणि या मित्रांनी आपल्या मोबाईलमध्ये काही फोटो देखील घेतले. मात्र मंदिरा जवळ असलेल्या पवना धरणाच्या विहंगम दृश्याने त्यांना मोहित केले. आणि येथूनच पाण्यात पोहण्याची इच्छा झाली. दुपारच्या सुमारास शुभम पाण्यात उतरला. मंदिरा जवळील धरण क्षेत्रात ओढ्यातून वाहून आलेला गाळ अधिक प्रमाणात असतो हे स्थानिकांना माहीत आहे. शिवाय येथील पाण्याचा अंदाज न आल्याने शुभम पाण्यात बुडाला आणि त्यातच त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. मंदिरा समोरून वाहणाऱ्या ओढ्याच्या पलीकडल्या बाजूस साधारणपणे एक किमी पासून दूरवर असलेल्या भागात ही घटना घडली असल्याची माहिती स्थानिक व्यापाऱ्याकडून देण्यात आली.

तरुण पाण्यात बुडाल्याची माहिती समजताच स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेतली. त्याचप्रमाणे पोलिसांना पाचारण करण्यात आले. स्थानिक तरुणांनी बोटीच्या सहाय्याने पाण्यात उतरून शोध घेत मृतदेह शोधून काढला. घटनेचा पुढील तपास आता पोलीस करीत आहेत. दर्शनासाठी आलेल्या एखाद्या युवकाचा बुडून मृत्यू होण्याची ही पहिली घटना आहे. मात्र असे असले तरी भविष्यात आणखी घटना घडतील याची शक्यता नाकारता येत नाही.

पर्यटनाला गेल्या नंतर निष्काळजीपणामुळे जीव गेल्याच्या अनेक घटना अनेक ठिकाणी घडत असतात. मग पाण्यात बुडुन मृत्यू असो की पाय घसरून खोल दरीत झालेला अपघात. या घटना वारंवार घडत असतात तरीही पर्यटक जीव धोक्यात घालणे काही कमी करीत नाहीत. वाघेश्वर शीव मंदिराला भेट दिल्यानंतर पवनेचा जलाशय जवळपासच असल्याने पाण्यात उतरण्याचा मोह जीवावर बेतू नये यासाठी पुढील वर्षी (मंदिर पाण्यातून बाहेर पडल्यानंतर) स्थानिकांच्या मदतीने ठोस उपाययोजना राबवणे प्रशासनाला जास्त गरजेचे असणार आहे हे या घटनेतून स्पष्ट झाले आहे.

-संतोष दिवाडकर

कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या ७ मोठ्या बीओटी प्रकल्पांच्या नुकसानीची तातडीने चौकशी करावी -विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर यांची मागणी

कल्याण डोबिंवली महापालिकेत सन २००५ ते २००८  दरम्यानच्या काळात  सात मोठे बीओटी प्रकल्प मंजूर करण्यात आले,  पण यामधील एकही प्रकल्प अद्यापही पूर्णत्वास गेलेला नाही. या प्रकल्पांची चौकशी झाली व यामध्ये मोठे नुकसान झाल्याचा निष्कर्ष विभागीय आयुक्तांनी काढला होता. तसेच या प्रकरणात २४ अधिका-यांवर ठपका ठेवण्यात आला होता. परंतु सत्ताधा-यांनी ही चौकशीची फाईल लाल फितीत अडकून ठेवली आहे. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाची तातडीने चौकशी करुन संबंधितांवर कारवाई करण्याची  मागणी विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर यांनी आज केली. डोंबिवली येथे आयोजित पत्रकार परिषदेत दरेकर यांच्यासह भाजपा जिल्हाध्यक्ष शशीकांत कांबळे, माजी नगरसेवक शैलेश धात्रक आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते.

कल्याण- डोंबिवली महापालिकेतील कल्याण स्पोर्ट्स क्लब, सावळाराम महाराज क्रीडा व व्यापारी संकुल, आधारवाडी व्यापारी संकुल, लाल चौकी समाजमंदिर व व्यापारी संकुल, रुक्मिणीबाई पुनर्विकास व्यापारी संकुल, विठ्ठलवाडी मंडई व पार्किंग मॉल, दुर्गाडी पार्किंग संकुल असे सात मोठे प्रकल्प असुन या सर्व प्रकल्पांची चौकशी करण्यात यावी अशी मागणी प्रविण दरकेर यांनी केली.

   या प्रकल्पांमधील एकही प्रकल्प गेल्या १५ वर्षात पूर्ण झालेला नाही. कल्याण- डोंबिवलीच्या विकासाच्या दृष्टीने हे प्रकल्प महत्त्वाचे आहेत. ये प्रकल्प गेली काही वर्षे रखडल्यामुळे कल्याणकरांना विकासासाठी वाट पाहवी लागत आहे. त्यामुळे हे  रखडलेले प्रकल्प तातडीने मार्गी लावावेत अशी मागणी राज्यसरकारकडे केली असल्याचे दरेकर यांनी स्पष्ट केले.

   राज्यात शिवसेनेची सत्ता आहे, नगरविकास मंत्री ठाण्यातील आहे, ठाण्यात शिवसेनेचे मंत्री व पालकमंत्री आहेत, कल्याणमध्ये शिवसेनेचा खासदार व आमदार आहेत, महापालिकेमध्येही शिवसेनेची सत्ता आहे, पण एवढे सगळे असूनही केवळ राजकीय इच्छाशक्ती आणि समन्वया अभावी कल्याण डोंबिवलीची परिस्थिती सुधारलेली नाही. या भागाचा विकास अद्यापही झालेला नाही, अनेक प्रकल्प अर्धवट अवस्थेत आहेत, अशी टिका दरेकर यांनी केली.

   कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रातील घरे व आस्थापनांच्या माध्यमातून कचरा संकलन करण्यासाठी आकारण्यात येणारे दर अथवा उपयोगकर्ता शुल्क तात्काळ दर रद्द करावेत अशी मागणी दरेकर यांनी यावेळी राज्य सरकारकडे  केली. कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रात कचरा संकलनासाठी  नव्याने रहिवाश्यांना वार्षिक रु.६०० प्रति घर तर व्यापारी वर्गाला वार्षिक रु.१८००० अवाजवी कर भरावा लागत आहे. कोरोना संकट काळात नागरिकांची आर्थिक परिस्थिती बिकट झाली असुन यातच अवाजवी कर आकरण्यात येत असून हा कर रद्द करावा किंवा कमी करण्याची मागणी दरेकर यांनी केली.

   अन्य महापालिकेच्या तुलनेत येथील लसीकरण धीम्या गतीने सुरु आहे. गेले दोन आठवडे महापालिकेची लसीकरण केंद्र बंद आहेत. फक्त खासगी लसीकरण केंद्र सुरू आहेत. मग त्यांना लस कुठुन उपलब्ध होत आहे. फक्त केडीएमसीतच लस तुटवडा आहे का?  असा सवाल करतानाच केडीएमसीमध्ये कोरोना संसर्ग रोखायचा असेल लसीकरण सूरू होणं मत्त्त्वाचे आहे. लवकरात लवकर हे लसीकरण सुरु करण्याची मागणी दरेकर यांनी केली.

     ज्या नागरिकांच्या लसीचे दोन डोस झाले आहेत अश्या नागरिकांना कर्जत ते ठाणे असा रेल्वे प्रवासाची परवानगी देणे गरजेचे होते. कल्याण परिसरातून आपल्या उपजिविकेसाठी  मुंबईला दरदिवशी प्रवास करणारे लाखो नागरिक आहेत. उपनगरीय लोकल सेवा बंद अत्यावश्यक सेवेतील कर्मचा-यांच्या व्यतिरिक्त अन्य लोकांसाठी बंद असल्यामुळे त्या नागरिकांना  रस्ते मार्गाने कामावर जाण्या येण्यास एकूण ४ ते ५ तास प्रवास करावा लागत आहे, त्यामुळे कल्याणकर हैराण झाले आहेत. केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी राज्य सरकारची अनुकुलता असेल तर  मुंबईची रेल्वे सेवा लवकरात लवकर सूरू करण्याची तयारी दर्शविली आहे. यापार्श्वभूमीवर रेल्वे सेवा सुरु करण्याची मागणी मुख्यमंत्र्याकडे करणार असल्याचेही दरेकर यांनी स्पष्ट केले.

  महावितरणची अवाजवी बिले कल्याण-डोंबिवलीच्या नागरिकांना येत आहे. सध्या कोरोनामुळे नागरिकांची आर्थिक स्थिती डबघाईला आलेली आहे. जे ग्राहक वीज बिल भरु शकत नाही, त्यांचीही वीज जोडणी सरसकट कापली जात आहे, त्यामुळे वीज ग्राहकांची वीज न कापता त्यांना महावितरणने सवलत अथवा टप्प्या टप्यात वीज बिल भरण्याकरीता मुभा द्यावी अशी मागणी दरेकरांनी केली.

-कुणाल म्हात्रे

वेहळे व रायते येथील कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश

शिवसेनेचे ठाणे जिल्हा ग्रामीण प्रमुख व हातमाग महामंडळ अध्यक्ष प्रकाश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली व शिवसेनेचे कल्याण तालुका ग्रामीण प्रमुख वसंत लोणे यांच्या नेतृत्वाखाली कल्याण ग्रामीण भागातील वेहळे व रायते गावातील कार्यकर्त्यांनी शिवबंधन हातात बांधून, शिवसेनेचा भगवा झेंडा घेऊन शिवसेनेत प्रवेश केला आहे.                                      

यावेळी कार्यक्रमाला जिल्हा परिषद माजी अध्यक्षा सुषमा लोणे, सदस्य जयश्री सासे, शिवसेना महीला तालुका अध्यक्ष मिनाक्षी जाधव, जिल्हा सचिव अँड अल्पेश भोईर, तालुका संपर्क प्रमुख रमेश बांगर, बाजार समितीचे संचालक भूषण जाधव, पंचायत समितीच्या सभापती अनिता वाघचौरे, सुनील जाधव, तालुका ग्रामीण सचिव नामदेव बुटेरे, नरेश सुरोशी, बाळू गोरे, अशोक श्रीवास्तव, समीर शेलार, नितीन देसळे, प्रकाश चौधरी, सतीश चौधरी, शाखा प्रमुख भास्कर टेंभे, आश्विन वाघेरे, प्रविण भोईर, योगिता चौधरी,युंगधरा चौधरी, लक्ष्मण भोईर आदि उपस्थित होते.     

     वेहळे गावातील कार्यकर्ते लहू देसळे, आंनता देसळे, बाळा देसळे यांच्या प्रयत्नामुळे सुधीर देसळे, बाळाराम देसळे, संतोष आव्हाड, सुनील देसळे, विष्णू देसळे, रंगनाथ देसळे, सोमनाथ देसळे, देवेंद्र पागार आदि कार्यकर्ते तसेच रायते गावातील संतोष सुरोशी, महेंद्र जाधव, सुभाष जाधव यांच्या प्रयत्नामुळे रायते गावातील कार्यकर्ते प्रशांत घाडगे, राज पवार, धिरेद रावत, प्रतिक पाळ, राजीव सिंग, विश्वास सिंग, अरविंद पाल, सलमान शेख, दिपक मिस्त्री, उल्हास धगे, शंकर जेडीया, दिलीप शेलार, महेश पवार, तेजस पवार, शैलैश कोर, दिपक झा आदि कार्यकर्त्यांनी शिवबंधन बांधले आहे.

            यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख वसंत लोणे यांनी सांगितले की रायते व वेहळे गावातील कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. यामुळे ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद निवडणुकीत शिवसेनेला फायदा होईल, कोरोना कालावधीत प्रवेश प्रक्रिया थाबविणयात आली होती, परंतु आता पुन्हा प्रवेश प्रक्रिया सुरू केली आहे, शिवसेनेची कल्याण ग्रामीण नवीन कार्यकारणी लवकरच निवडली जाईल असे सांगितले.

-कुणाल म्हात्रे