डीपी रस्त्यात सुरू असलेल्या इमारतीच्या बांधकामावर क.डों.म.पा.ने चढवला बुलडोझर

कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकामे सुरु असून आता तर चक्क या अनधिकृत बांधकाम करणाऱ्यांनी पालिकेच्या डीपी रस्त्याच्या जागेत देखील इमारती उभारल्या आहेत. अशाचप्रकारे आय प्रभागात दावडी गावातील तुकाराम चौक परिसरात डीपी रस्त्यामध्ये अनधिकृतपणे बांधकाम सुरु असलेल्या तीन मजली इमारतीवर निष्कासनाची कारवाई करण्यात आली आहे. पालिका आयुक्तांच्या निर्देशानुसार विभागीय उपायुक्त अनंत कदम यांच्या मार्गदर्शनाखाली आय प्रभाग अधिकारी दीपक शिंदे यांनी हि कारवाई ड प्रभाग अधिकारी सुधीर मोकल, इ प्रभाग अधिकारी भारत पवार, किशोर खुताडे यांच्या पथकांसह संयुक्तपणे केली आहे.

कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचा स्मार्ट सिटी अंतर्गत विकास केला जात आहे. अनेक ठिकाणी डीपी रस्त्यांमध्ये अनधिकृत बांधकामे केलेली असून स्मार्ट सिटी बनविताना या बांधकामांचा अडथळा निर्माण होत आहे. अशाच प्रकारे दावडी येथील तुकराम चौक याठिकाणी विकासक राम लखन यादव यांनी येथील डीपी रस्त्यामध्ये तळ अधिक तीन मजल्यांच्या इमारतीचे बांधकाम केले होते. याआधी देखील या इमारतीवर दोन वेळा कारवाई करण्यात आली होती. तरी देखील पुन्हा हे बांधकाम केल्याने वास्तूविशारद संदीप पाटील यांनी याची तक्रार पालिकेकडे केली होती. या तक्रारीनुसार हि कारवाई करण्यात आली आहे. अशा प्रकारच्या अनधिकृत बांधकामांमध्ये घर घेणारे नागरिक देखील यामुळे देशोधडीला लागत आहेत. त्यामुळे अनधिकृत बांधकामांवर हे बांधकाम सुरु असतांनाच कारवाई होणे आवश्यक असल्याचे वास्तुविशारद संदीप पाटील यांनी सांगितले.

या अगोदर एमआरटीपी प्रमाणे गुन्हा देखील दाखल करण्यात आला होता. आज आय, इ आणि ड प्रभागाचे अधिकारी, कर्मचारी आणि मानपाडा पोलीस स्टेशनचे कर्मचारी असे एकूण सुमारे ४० कर्मचारी, एक पोकलेन, एक गॅस कटर च्या सहाय्याने हि कारवाई केली असल्याची माहिती प्रभाग अधिकारी दीपक शिंदे यांनी दिली.

-कुणाल म्हात्रे

कल्याण पूर्वेत मालवाहतूक ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू; पूनालिंक तिसगाव रोडवरील दुर्घटना

कल्याण पूर्व तिसगाव पूना लिंकरोडवर आज दुपारी ४ च्या दरम्यान एका दुचाकीस्वाराचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची दुर्घटना घडली आहे. मालवाहतूक ट्रकच्या धडकेत हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.

मंधाता मिश्रा हा तीस वर्षीय तरुण आपल्या दुचाकीवरून प्रवास करीत होता. पूना लिंकरोडहुन जात असताना एका मालवाहतूक करणाऱ्या ट्रकने त्याला धडक दिली आणि या धडकेत ट्रकखाली चिरडून त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. स्थानिकांनी ट्रक चालकाला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. कोळसेवाडी पोलिसांनी घटनास्थळी पोहोचत तात्काळ पंचनामा केला व मृतदेह रुक्मिणीबाई रुग्णालयात पाठवून दिला.

अपघातात मृत्युमुखी पडलेला तरुण मंधाता मिश्रा हा डोंबिवलीत राहणारा असल्याचे माहिती मिळाली. शिवाय त्याच्याजवळ सापडलेल्या ओळ्खपत्रा नुसार तो रिलायन्स कंपनीचा कर्मचारी असल्याचेही समजत आहे. या अपघाताचा पुढील तपास कोळसेवाडी पोलीस करीत आहेत.

-शरद शिंदे

केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांची १६ ऑगस्ट पासून जन आशिर्वाद यात्रा

केंद्र सरकारमधील नवनियुक्त केंद्रीयमंत्री १६ ते २० ऑगस्ट दरम्यान जन आशिर्वाद यात्रा देशभरात काढणार असून केंद्रीय राज्यमंत्री  कपिल पाटील यांची जन आशीर्वाद यात्रा १६ ऑगस्ट ते २० ऑगस्ट पर्यंत सुरू असणार आहे. कल्याण, उल्हासनगर, अंबरनाथ व बदलापूर शहरात ते १८ तारखेला यात्रेतुन फिरणार आहेत.

या जन आशीर्वाद यात्रेच्या नियोजनाबाबत कल्याणमधील आचिवर्स कॉलेजमध्ये भाजपा पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित केली होती. या बैठकीला आमदार संजय केळकर, किसन कथोरे, यात्रा प्रमुख आमदार निरंजन डावखरे, सहप्रमुख माजी आमदार नरेंद्र पवार, माजी मंत्री जगन्नाथ पाटील, आमदार महेश चौगुले तसेच सर्व मंडळ अध्यक्ष, विविध आघाड्या, मोर्चाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. या बैठकीत जन आशिर्वाद यात्रेचा मार्ग तसेच इतर नियोजनाबाबत सुक्ष्म नियोजन करून पक्ष कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्यात आले.

ही जन आशिर्वाद यात्रा कल्याण पश्चिम, उल्हासनगर, अंबरनाथ व बदलापूर मधील विविध भागातून जाणार असून मोदी सरकारने केलेले काम जनतेपर्यंत पोहचविण्यासोबतच जनतेचे आशिर्वाद घेतले जाणार आहे. या यात्रेत आत्मनिर्भर भारत रोजगार योजना, पंतप्रधान जनधन योजना, प्रधानमंत्री उज्वला योजना, कौशल्य विकास, पीक योजना, कृषि सिंचन योजना, पंतप्रधान युवा योजना यासह केंद्र सरकारने अन्य गरीब कल्याणकारी योजना सुरू केल्या या योजना लाभार्थ्यांपर्यंत पोहचविण्याचे काम या जन आशिर्वाद यात्रेतून केले जाणार आहे.

केंद्र सरकारमधील ३९ नवनियुक्त  केंद्रीयमंत्री जन आशिर्वाद यात्रा काढणार असून २१२ लोकसभा क्षेत्रातून १९ हजार ५६७ किलोमीटर चा प्रवास करून केंद्राच्या योजना लोकांपर्यंत पोहचविण्याचे व जनतेचा आशिर्वाद घेण्याचे काम करणार आहे.

-कुणाल म्हात्रे