भाजपच्या जनआशीर्वाद यात्रेमुळे कोरोना आणखी वाढण्याची भीती; राष्ट्रवादी काँग्रेसने लगावला टोला

केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांनी दिल्ली वरून येतांना राज्यासाठी, ठाणे जिल्ह्यासाठी केंद्राकडून किती लस आणल्या असा सवाल राष्ट्रवादी विद्यार्थी कॉंग्रेस कोकण विभाग अध्यक्ष किरण शिखरे यांनी केला असून भाजपाच्या या जनआशीर्वाद यात्रेमुळे नियंत्रणात आलेली कोरोना रुग्णांची संख्या आणखी वाढण्याची भीती त्यांनी व्यक्त केली आहे. तसेच सीबीएससी शाळांना १५ टक्के फी कपात करण्यास राज्य सरकारने भाग पाडले असतांना केंद्राने या सीबीएससी शाळांवर कोणतीच कारवाई केली नसल्याचे देखील त्यांनी सांगितले.

भिवंडी लोकसभा क्षेत्राचे खासदार कपिल पाटील यांची केंद्रीय राज्य मंत्री म्हणून निवड झाल्यानंतर पहिल्यांदाच ते महाराष्ट्रात आले आहेत. त्यांच्या स्वागतासाठी कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती. भाजपातर्फे काढण्यात आलेल्या जनआशीर्वाद यात्रेत देखील भाजपा कार्यकर्त्यांची मोठी गर्दी दिसून येत आहे. केंद्राकडून लसींचा साठा कमी येत असल्याने लसीकरणासाठी नागरिकांची मोठी गर्दी होत असून, अनेक लसीकरण केंद्रांवर नागरिकांच्या हाणामारी देखील होत आहेत. असे असतांना केंद्रीय राज्यमंत्री म्हणून कपिल पाटील यांनी केंद्राकडून महराष्ट्रासाठी, ठाणे जिल्ह्यासाठी किती लसी आणल्या असा सवाल किरण शिखरे यांनी केला आहे.

एकीकडे लसींची कमतरता असतांना जनआशीर्वाद यात्रेतून कोरोनाचा प्रसार आणखी होण्याची भीती असून कपिल पाटील यांनी याची काळजी घेण्याची विनंती शिखरे यांनी केली आहे. तसेच कोरोना लॉकडाऊनमुळे सर्वांचीच आर्थिक परिस्थिती कोलमडलेली असतांना सीबीएससी बोर्डाच्या शाळांची सक्तीने फी वसुली सुरु आहे. यावर राज्यात महाविकास आघाडी सरकारने १५ टक्के फी कमी करण्याच्या सूचना या शाळांना दिल्या आहेत. मात्र केंद्र सरकारच्या अखत्यारीत येणाऱ्या या शाळांवर केंद्र सरकारचा कोणताही अंकुश नसल्याची टीका देखील त्यांनी केली आहे. त्यामुळे केंद्रीय राज्य मंत्री कपिल पाटील यांनी या विषयात लक्ष घालून विद्यार्थी आणि पालकांना न्याय देण्याची मागणी त्यांनी केली आहे.

सुरू असलेल्या जन आशीर्वाद यात्रेतून कोरोनाचा धोका वाढेल असा टोला विरोधकांनी लगावला आहे. मात्र कोरोना प्रसाराची खबरदारी घेऊन कपिल पाटील या यात्रेत स्वतः मास्क वापरत असल्याचे दिसत आहे. तर दुसरीकडे सभांना उपस्थित राहणाऱ्या पदाधिकारी,कार्यकर्ते तसेच नागरिकांना देखील मास्क तोंडावर ठेवण्याचे आवाहन केले जात आहे.

-कुणाल म्हात्रे

कल्याण डोंबिवली कोरोना मुक्त होण्याच्या वाटेवर; पहा काय म्हणताहेत आकडे

कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात दुसरी लाट ओसरल्यानंतर दिवसेंदिवस कोरोनाचा प्रादुर्भाव देखील कमी होत असल्याचे दिसत आहे. सध्या महानगरपालिका क्षेत्रात कोरोनाचे रुग्ण सापडण्याचे प्रमाण कमी झाले असून एक्टिव्ह रुग्णसंख्या देखील लोकसंख्येच्या तुलनेत जेमतेम राहिलेली आहे.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत महानगरपालिका क्षेत्रात एकाच दिवसाला २४०० हुन अधिक रुग्णांची नोंद केली गेली होती. एक्टिव्ह रुग्णांचा आकडा वाढल्याने हॉस्पिटलमध्ये बेड मिळणे कठीण होऊन बसले. व्हेंटिलेटर, ऑक्सिजन, इंजेक्शन मिळवण्यासाठी लोकांना खूप कसरत करावी लागली. अशा परिस्थितीत दिवसाला २० पेक्षा जास्त लोकांना प्राण गमवावे लागत होते. म्हणून महानगरपालिका क्षेत्रात कडक निर्बंध लागू केले गेले. नागरिक आणि व्यापारी दुसऱ्या लॉकडाऊनला सामोरे गेले. मात्र आता लाट ओसरल्यानंतर निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत. पुढे पालिका आयुक्तांनी एकेकाळी गच्च भरलेले टाटा आमंत्रा रुग्णालयाला देखील टाळा लावला.

कल्याण डोंबिवली आता लवकरच कोरोना मुक्त होण्याच्या दिशेने वाटचाल करीत असल्याचे समोर येणाऱ्या आकड्यांवरून वाटत आहे. आज दि.१७ ऑगस्ट रोजी महानगरपालिका क्षेत्रात ३२ नव्या रुग्णांची नोंद करण्यात आलेली आहे. तर या बरोबर एकाचा मृत्यू देखील नोंदवला गेला आहे. मात्र सुखद बाब म्हणजे महानगरपालिका क्षेत्रात आता फक्त ४७४ इतकेच पोजीटिव्ह कोरोना रुग्ण आहेत. पुढे हा आकडा आणखी कमी होत कल्याण डोंबिवली कोरोना मुक्त होण्याची शक्यता देखील नाकारता येत नाही. हत्ती निघून गेलाय फक्त शेपूट राहिलंय असे म्हणायला हरकत नाही.

-संतोष दिवाडकर

केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटलांची जन आशीर्वाद यात्रा; भाजप आमदार गणपत गायकवाड यांच्या जनसंपर्क कार्यालयात केला पहिल्या दिवसाचा समारोप

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या केंदीय मंत्रिमंडळात भिवंडीचे खासदार कपिल पाटील यांची वर्णी लागली होती. त्यामुळे ठाणे जिल्ह्यातील विविध विधानसभा क्षेत्रातून पाच दिवस त्यांची जन आशीर्वाद यात्रा सुरू असणार आहे. कल्याण पूर्व भाजप आमदार गणपत गायकवाड यांच्या जनसंपर्क कार्यालयात पहिल्या दिवसाची सांगता करण्यात आली.

सोमवारी सकाळपासूनच केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांच्या जन आशीर्वाद यात्रेला सुरुवात करण्यात आली. ठाणे, कळवा, मुंब्रा झाल्यानंतर शिळफाटा मार्गे ते कल्याण डोंबिवलीच्या दिशेने निघाले. येथून कल्याण ग्रामीण, डोंबिवली आणि कल्याण पूर्व अश्या तीन विधानसभा मतदारसंघात ते फिरण्यासाठी निघाले होते. कल्याण ग्रामीणचे मनसे आमदार राजू पाटील यांनी त्यांचे स्वागत केले. तिथून पुढे ही यात्रा डोंबिवलीकडे निघाली. त्यानंतर रात्री कल्याण पूर्व आमदार गणपत गायकवाड यांच्या जनसंपर्क कार्यालयावर आल्यानंतर त्यांच्या पहिल्या दिवसाच्या यात्रेचा समारोप करण्यात आला. याठिकाणी स्थानिक आमदार गणपत गायकवाड तसेच केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांनी उपस्थितांना संबोधित केले.

आज पहिल्या दिवसाची जन आशिर्वाद यात्रा ठाणे, कळवा, मुंब्रा, डोंबिवली, कल्याण पू. असा प्रवास करत संपन्न झाली. कल्याण पू. येथील आमदार मा. श्री. गणपत गायकवाडजी यांच्या जनसंपर्क कार्यालय येथे या यात्रेचा समारोप झाला. सर्वच ठिकाणी जनतेचा या यात्रेसाठी उदंड प्रतिसाद लाभला. मा. मोदी साहेबांनी ठाणे जिल्ह्यातील स्थानिक भूमिपुत्राला एवढी मोठी जबाबदारी देऊन ठाणे जिल्ह्याचा सन्मान केला आहे. अशी भूमिका मी यावेळी मांडली. केंद्रीय राज्यमंत्री म्हणून नियुक्त झाल्यानंतर पहिल्यांदाच आपल्या विभागातील जनतेशी संवाद साधण्याची संधी आज मिळाली. आपल्या साऱ्यांचे मिळालेले हे प्रेम, हा आशिर्वाद माझ्यासाठी अमूल्य आहे.

कपिल पाटील (केंद्रीय राज्यमंत्री)

-संतोष दिवाडकर

लसीकरण झालेल्या व्यक्तींना रेल्वे प्रवास करण्याची मुभा; सकाळी लॉकल गाड्यांत प्रचंड गर्दीसह पुन्हा रेल्वे गाड्या फुल

दोन कोरोना लस घेण्याऱ्या व्यक्तींना रेल्वे प्रवासात मुभा मिळाल्या नंतर सोमवारी सकाळ पासून पुन्हा नेहमी सारखी होणारी गर्दी दिसू लागली आहे. सीट मिळण्यासाठी तारेवरची कसरत करताना रेल्वे प्रवाशी दिसत आहेत. सर्वसामान्य नागरिकांना कोविड वैक्सीन च्या दोन डोस घेणाऱ्या व्यक्तींना १४ दिवसांनंतर १५ ऑगस्ट रोजी लोकल ट्रेन मध्ये प्रवास करण्याची मुभा मिळाली आहे. 

सोमवार सकाळ पासून रेल्वे गाड्यात नागरिकांची मोठी गर्दी दिसून येत आहे. मुंबईकडे जाणाऱ्या रेल्वे लॉकल गाड्या त्यात ती जलद असो किंवा सर्व ठिकाणी थांबणाऱ्या गाड्या असो सर्वात मोठ्या प्रमाणात गर्दी दिसून येत आहे. पतेती सरकारी सुट्टी असून ही सोमवारी कल्याण- डोंबिवली, दिवा, बरोबर सर्वच रेल्वे स्टेशनवर प्रवाश्यांची लगबग दिसून आली होती. अन्य प्रवासात होणारा वाढीव खर्च पाहता बचत होत असल्याने प्रवाश्यात आनंदा चे वातावरण पसरले होते . दरम्यान त्यामुळे रेल्वे स्थानक अधिकारी यांच्या कडून मंगळवारी यापेक्षा जास्त गर्दी होणार असल्याचे सांगण्यात आले होते. त्याचप्रमाणे आज देखील तोब्बा गर्दी झाल्याचे पहायला मिळाले.

-रोशन उबाळे