सात वर्षे स्वतःच अस्तित्व बदलून राहणारा आरोपी सापडला महात्मा फुले पोलिसांच्या सापळ्यात

कल्याणच्या महात्मा फुले पोलीस स्थानकात एका आरोपी विरोधात २०१४ साली विविध कलामांतर्गत गुन्हा दाखल झाला होता. मात्र हा आरोपी मागील सात वर्षे पोलिसांना चकवा देऊन स्वतःचे अस्तित्व बदलून लपून छपून आपले जीवन जगत होता. आता आपल्याला कोणी ओळखणार नाही या भ्रमात असतानाच पोलिसांनी आज त्याला यशस्वीपणे आपल्या सापळ्यात पकडले आहे.

कल्याणच्या महात्मा फुले पोलीस स्थानकात २१ नोव्हेंबर २०१४ साली माजिद अली उर्फ गुड्डू मन्सूर अली शेख याच्या विरोधात फसवणूकीच्या प्रकरणात फसवणूक केल्या प्रकरणी तसेच विविध कलमा नुसार गुन्हा नोंदवला गेला. मात्र अटक होण्याच्या भीतीने तो फरार झाला. न्यायालयाने जाहीरनामा काढून त्याची लखनऊ येथील पाऊने दोन कोटींची प्रॉपर्टी लिलावास काढली. मात्र तरीही माजिद अली हा काही समोर आला नाही. आणि पोलीस पुढील सात वर्षे त्याचा शोध घेत राहिली. पण माजिद अली स्वतःच अस्तित्व बदलून राहत असल्याने पोलिसांना सापडत नव्हता.

पोलिसांना चकवा देऊन राहत असलेल्या मन्सूर अलीला पकडण्यासाठी पोलिसांनी गुप्त बातमीदाराची मदत घेतली. यानंतर त्याचा सध्याचा मोबाईल नंबर पोलिसांच्या हाती लागला. त्या नंबरच्या मदतीने पोलिसांनी तांत्रिक शोध घेतला. यानुसार तो आता नवी मुंबईत कामोठे येथे राहत असल्याचा पत्ता त्यांना प्राप्त झाला. व अधिक शोध घेऊन त्याचा सध्याचा फोटो देखील पोलिसांनी मिळवला. आणि सापळा रचून सात वर्षे लपंडाव खेळणाऱ्या माजिद अलीचा गॅम ओव्हर केला आणि त्याला महात्मा फुले पोलीस ठाण्यात हजर केले.

माजिद अली सध्या पोलिसांच्या कैदेत असून त्याच्यावर या पोलीस ठाण्यात फसवणुकीचे दोन गुन्हे दाखल आहेत. तसेच उत्तरप्रदेश येथेही त्याच्यावर गंभीर गुन्ह्यांची नोंद असल्याचे चौकशीत निष्पन्न झाले आहे. या यशस्वी कामगिरीत वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा घटक ३ कल्याणचे पोलीस निरीक्षक विलास पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक भूषण दायमा, पोलीस उप निरीक्षक मोहन कळमकर, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक साळुंखे, विलास मालशेटे, दत्ताराम भोसले, सचिन साळवी, राजेंद्र खिलारे, मंगेश शिर्के, सुरेश निकुळे, प्रकाश पाटील, हरिश्चंद्र बांगरा, पोलीस शिपाई अजितसिंग राजपूत, सचिन वानखेडे, मिथुन राठोड, गुरुनाथ जरग, गोरक्ष शेकडे, राहुल ईशी आदींचे महत्त्वाचे योगदान आहे.

-संतोष दिवाडकर

जन आशीर्वाद यात्रा काढणाऱ्या भाजपच्या पदधिकाऱ्यांवर कल्याण डोंबिवलीत गुन्हे दाखल

कोरोना नियम असताना मोठ्या प्रमाणात गर्दी जमवणे भाजप पदाधिकाऱ्यांना महागात पडले आहे. सर्वसामान्य जनतेला नियम आणि राजकीय नेते आणि पक्षांना वेगळा न्याय याबाबत जनतेत वेगळी भावना पसरली होती. याचे गांभीर्य ओळखत पोलीस प्रशासनाने “जन आशिर्वाद  यात्रा” आयोजकांवर गुन्हे दाखल केले आहेत.

डोंबिवलीच्या मानपाडा पोलिसांनी भारतीय जनता पक्षाच्या काही पदाधिकाऱ्यांवर कोविड १९ नियमाचे उल्लंघन केल्याप्रकरणी विविध कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे.  हे नेते केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांच्या जन आशीर्वाद यात्रेचे आयोजक होते. भाजप खासदार आणि केंद्रीय मंत्री कपिल पाटील ठाणे जिल्ह्यात जन आशीर्वाद यात्रा आयोजित करत आहेत.  मंगळवारी त्यांच्या भेटीचे आयोजन डोंबिवली पूर्व मध्ये डोंबिवली नागरिक सहकारी बँक चौक, सोनार पाडा कल्याण शील रोड वर देखील करण्यात आले होते. या घटनेत पोलिसांच्या मनाई आदेश आणि कोविड -१९  प्रतिबंधित नियमांचे उल्लंघन करण्यात आले. प्रचंड गर्दी पाहाता आणि कोरोनाची गांभीर्य विसरलेल्या भाजपा पदाधिकारी  व नेते यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे.

यासंदर्भात मानपाडा पोलिसांनी माजी उपमहापौर मोरेश्वर भोईर, भाजप डोंबिवली ग्रामीण मंडळाचे अध्यक्ष नंदकिशोर परब, भाजप कल्याण जिल्हा अध्यक्ष शशिकांत कांबळे, भाजप उत्तर भारतीय मोर्चा डोंबिवली ग्रामीण मंडळ अधिकारी संजय तिवारी, दत्ता मळेकर आणि इतर पदाधिकारी आणि कार्यकत्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. त्याचबरोबर खडकपाडा, महात्मा फुले व कोळसेवाडी पोलीस ठाण्यातही विविध पदाधिकार्यांवर गुन्हा नोंदवण्यात आलेला आहे.

-रोशन उबाळे

तरुणांच्या लसीकरणला प्राधान्य देण्याची राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसची आयुक्तांकडे मागणी

कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात तरुणांचे प्राधान्याने लसीकरण करण्याची मागणी राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसने केली आहे. याबाबत राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे कल्याण पश्चिम शहर अध्यक्षांनी पालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांची भेट घेत निवेदन दिले आहे.

कल्याण डोंबिवलीत तरुणांची लोकसंख्या जास्त आहे. त्यातील ७०% ते ८०% घरातील एकमेव कमावते असल्याकारणाने त्यांचा रोज प्रवास किवा रोजगार निमित्त जास्त लोकांसोबत संपर्क येतो. त्यामूळे त्यानां कोरोनाचा संसर्ग होण्याची दाट शक्यता आहे. तसेच राज्य सरकारने जाहिर केलेल्या नविन नियमावली नुसार फक्त २ डोस घेतलेल्या नागरिकांनाच रेल्वे व इतर सार्वजनिक ठिकाणी प्रवेशाची मुभा आहे.

 या सर्व बाबी लक्षात घेवुन तरुणांना प्राधान्याने लसीकरण उपलब्ध करून द्यावे असे निवेदन कल्याण पश्चिम विधानसभा अध्यक्ष आणि विधानसभा कार्याध्यक्ष यांनी राष्ट्रवादी युवक काँग्रेस तर्फे आयुक डॉ. विजय सुर्यवंशी यांना दिले. याबाबत आयुक्तांनी लवकरच लसीकरणासाठी एक मोबाइल वॅन उपलबध करुन देण्याचे आश्वासन दिले आहे.

-कुणाल म्हात्रे

हायटेन्शन वायरमुळे होणारी संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी केंद्रीय राज्य मंत्र्यांना साकडे

कल्याण पश्चिमेतील योगीधाम परिसारत हायटेन्शन वायर असून यामुळे भविष्यात मोठी  दुर्घटना घडण्याची दाट शक्यता आहे. याबाबत भाजपाच्या एका महिला पदाधिकारीने केंद्रीय राज्य मंत्री कपिल पाटील यांनाच निवेदन देत येथील नागरिकांच्या समस्येकडे लक्ष वेधले आहे.

योगीधाम परिसरातून काही इमारतीपासून  खूप कमी अंतराने लागूनच मध्य रेल्वेची ३५ केवीए हायटेन्शन वायर गेली असून वायर खालून लोकांचा वापर असलेले रस्ते सुद्धा आहेत. उन्हाळ्यात या तारा प्रसरण पावतात व खाली लोंबकळतात व पावसाळ्यात सुद्धा खालून  चालताना किंवा वाहन चालवताना नागरिकांना भीती वाटते. तसेच अमृतधाम प्रोजेक्टचे क्लब हाऊस व योगीधाम क्लब हाऊस चे अंतर सुद्धा या वायरिंग पासून खूप कमी आहे.

ब्रेकडाऊनसाठी वायरी पासून ५० मिटर जमिनीचे क्षेत्र मोकळे सोडण्यात यावे, असा नियम आहे. परंतु याठिकाणी केडीएमसी पालिका प्रशासनाकडून सगळे नियम धाब्यावर बसवून बांधकामांना परवानगी देण्यात आली  व  प्रोजेक्टना बांधकाम  पूर्णत्वाचा दाखला  सुद्धा देण्यात आला. यामुळे हजारो लोकांचे जीव धोक्यात घालण्यात आले आहेत. सध्या याच परिसरात योगीधाम फेज ५ अजमेरा ब्लीस  नावाच्या प्रोजेक्टचे काम सुरू असून वरच्या वायरला हातातील लोखंडाच्या रोडचा स्पर्श होऊन काम करणारा तरुण दगावला. अशाप्रकारे लोकांचे जीव टांगणीला लागले असून, या प्रकरणात लक्ष देण्याची मागणी एका महिला भाजपा पदाधिकारीने केंद्रीय राज्य मंत्री कपिल पाटील यांच्याकडे केली आहे.

-कुणाल म्हात्रे