जन आशीर्वाद यात्रेमुळे भाजप पदाधिकार्यांवर गुन्हे दाखल मग राष्ट्रवादीच्या नेत्यांवर का नाही? उठवला जातोय सवाल

केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांनी काढलेल्या जन आशीर्वाद यात्रे संदर्भात कोरोना काळात गर्दी जमावल्या प्रकरणी कल्याण डोंबिवली च्या विविध पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल झाले आहेत. यातील मानपाडा पोलीस ठाण्यात देखील काही पदाधिकार्यांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. मात्र सर्वपक्षीय संघर्ष समितीच्या असलेल्या राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाच्या पदाधिकार्यांवर गुन्हे का दाखल झाले नाहीत असा सवाल सध्या विचारला जात आहे.

केंद्रीय राज्य मंत्री कपिल पाटील यांच्या स्वागतचा कार्यक्रम मानपाडेश्वर मंदिर येथे घेऊन कोरोना काळात गर्दी जमवील्या प्रकरणी गुन्हे का दाखल नाहीत ? असा प्रश्न विचारला जाऊ लागला आहे. आगरी समाजातुन असलेल्या कपिल पाटील यांचा सत्कार सर्वपक्षीय संघर्ष समितीच्या आगरी समाजाच्या नेत्यांनी मानपाडेश्वर मंदिर येथे घेऊन गर्दी जमवून देखील या बाबत गुन्हे का नोंद झाले नाहीत? हा वादाचा विषय ठरला आहे. सर्वपक्षीय संघर्ष समिती व राष्ट्रवादीचे नेते असलेल्या गुलाब वझे व दत्ता वझे यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमाची पोलिसांना माहिती नव्हती का? की डोळेझाक केली जात आहे? अशाप्रकारे दुजाभाव केला जात असल्याने नागरिकांत पोलिसांच्या भूमिकेबद्दल संताप व्यक्त केला जात आहे. एकाला एक न्याय आणि त्याच प्रकरणात दुसऱ्याला दुसरा न्याय हे खरंच खेदजनक आणि निषेधार्थ आहे. असा सूर उमटला जात आहे.

कोरोना महामारीची दुसरी लाट पूर्णपणे ओसरली नसून शासनाने सर्वाना नियमाचे पालन करणे बंधनकारक असल्याचे जाहीर केले आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या राजकीय पक्षांच्या नेतेमंडळी आणि कार्यकर्त्यांवर कारवाई केली जात आहे. भाजपने डोंबिवलीत जनआशीर्वाद यात्रा काढून नियम पायदळी तुडवल्याने मानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहे. महाराष्ट्र शासनाने जाहीर केलेल्या आदेशाचे पालन बंधनकारक असताना यात्रेत मनाई आदेशाचे उल्लंघन करत लोकांना एकत्र जमा करणे, मास्क चा वापर न केल्याने ४३६/२०२१ भा.द.वी.कलम १८८,२६९,२७० सह साथीचा रोग कायदा १८९७ चे कलम २,३,४ सह आपत्ती व्यवस्थापन कायदा कलम ५१ ( ब ) महा. पो.अधि.सन १९५१ चे कलम ३७ ( १ ) १३५ प्रमाणे आयोजकांवर मानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल झाले आहेत.

१८ ऑगस्ट रोजी सायंकाळी साडे सात वाजण्याच्या सुमारास  जन आशीर्वाद कार्यक्रमा वेळी डोंबिवली नागरीक सहकारी बँक चौक, सोनारपाडा कल्याण शिळ रोड येथे जन आशीर्वाद यात्रा काढून नियमांचे पालन न केल्याप्रकरणी  भाजप पदाधिकारी मोरेश्वर भोईर, नंदू परब, शशिकांत कांबळे, संजय उर्फ बबलू तिवारी, दत्ता माळेकर व इतर पदाधिकारी  व कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल झाले आहेत. मग बाकीच्यांना वेगळा न्याय का ? अशा चर्चा सध्या नागरिकांमध्ये तसेच राजकिय वर्तुळात सुरू आहेत.

-रोशन उबाळे

घरफोडी करणारा टिटवाळ्यातील १९ वर्षीय सराईत आरोपी पोलिसांच्या हिरासतीत; कल्याण क्राईम ब्रांचने फेकलं जाळं

टिटवाळा येथे राहणाऱ्या एका १९ वर्षीय युवा आरोपीला कल्याण क्राईम ब्रांचने बुधवारी जाळं पसरून अटक केली. अत्यंत शिताफीने केलेल्या या शोधात हा आरोपी पोलिसांच्या हाताला लागला असून त्याच्या कडून काही ऐवज हस्तगत करण्यात आलेला आहे.

तमन उर्फ नरेंद्र बाबू भंडारी हा १९ वर्षीय युवक सराईत आरोपी असून तो घरफोडी आणि चोऱ्या माऱ्या करीत होता. गुन्हे शाखा ३ कल्याणचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी गुप्त बातमीदाराच्या मदतीने संशयित आरोपीची माहिती काढली. त्यानंतर गोपनीयपणे ओळख पटवून त्याचा शोध घेतला आणि त्याला ताब्यात घेतले. आरोपीची सखोल चौकशी केली असता त्याच्याकडे ३८ हजार रुपये किंमतीचे ६ मोबाईल फोन सापडले. त्याचप्रमाणे विविध ठिकाणी घरफोडी केली असल्याचे त्याने चौकशीत मान्य केले. यासाठी त्याला डोंबिवलीच्या मानपाडा पोलीस ठाण्यात हजर करण्यात आले.

या कारवाईत वरिष्ठ पोलिसांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा घटक ३, कल्याणचे पोलीस निरीक्षक विलास पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक भूषण दायमा, पोलीस उपनिरीक्षक, मोहन कळमकर, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक साळुंखे, विलास मालशेटे, दत्ताराम भोसले, सचिन साळवी, राजेंद्र खिलारे, मंगेश शिर्के, सुरेश निकुळे, प्रकाश पाटील, हरिश्चंद्र बांगरा, पोलीस शिपाई अजितसिंग राजपूत, सचिन वानखेडे, मिथुन राठोड, गुरुनाथ जरग, गोरक्ष शेकडे, राहुल ईशी आदींचे महत्त्वाचे योगदान आहे.

-संतोष दिवाडकर

कोरोना नियमात कोणतीही विशेष कॅटेगोरी नाही; राजकारणी असोत किंवा सर्वसामान्य नियम सर्वांना सारखेच -खा. श्रीकांत शिंदे

राजकारणी व्यक्ती असो की सर्वसामान्य कोरोनाचे नियम हे सर्वांना सारखेच आहेत. आणि ते नियम पाळून सर्व गोष्टी करणे आवश्यक असल्याचे मत खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी व्यक्त केले आहे. अप्रत्यक्ष नियमाचे चाललेले उल्लंघन समाज मनावर सावत्र वागणूक असल्याची प्रतिक्रिया उमटत आहे. सध्या ठाणे जिल्ह्यात ठिकठिकाणी निघणाऱ्या भाजपच्या जन आशिर्वाद यात्रेचे आयोजन करण्यात आले असून त्याबाबत बोलताना त्यांनी हे मत व्यक्त केले.

कोरोनाचे नियम सर्वांना सारखे आहेत. कुठेही आपल्याकडून कोरोना पसरवला जाणार नाही याची दक्षता प्रत्येकाने घेतली पाहिजे. कोरोना नियमांमध्ये कोणतीही विशेष कॅटेगरी नाहीये. मग त्यात लोकप्रतिनिधी असोत की राजकीय नेते किंवा मग आम्ही असू दे. कोरोना नियम मोडले तर आमच्यावरही कारवाई झाली पाहीजे अशी अपेक्षा खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी यावेळी व्यक्त केली.

तसेच पुढे बोलतांना आपल्या मतदारसंघात मोठ्या गतीने रस्त्यांची कामे सुरू आहेत. त्याशिवाय ३८० कोटी रुपये कल्याण डोंबिवली, एमआयडीसीतील रस्त्यांसाठी मिळालेले आहेत. त्याचबरोबर कल्याण – शिळ रोडचे काम प्रगतीपथावर असून पलावा उड्डाणपूल, काटई उड्डाणपूल यांची कामेही मंजूर झाली आहेत. विकासकामे संथगतीने सुरू असतील तर त्यांना गती प्राप्त करून देणे हे लोकप्रतिनिधीची जबाबदारी असून केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील हे त्यांच्या स्वतःच्या मतदारसंघाबाबत बोलता आहेत की आपल्या मतदारसंघातील रस्त्याबाबत बोलत आहेत हे माहिती नसल्याची कोपरखळी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी यावेळी लगावली.

दरम्यान ठाणे जिल्ह्यातील अनेक तालुक्यात महापालिका आणि नगरपालिका निवडणूका जवळ आल्याने राजकीय वातावरण पावसाळा असून सुद्धा गरम होऊ लागले आहे.

-रोशन उबाळे

पेढ्यात गुंगीचे औषध टाकून रिक्षा चालकाची लूट

कल्याण पश्चिमेकडील गोविंदवाडी परिसरातल्या रेती बंदर रोडला भद्रनिसा चाळीत राहणारे अमीर बुडान शेख (५७) यांनी मंगळवारी लुटमारी संदर्भात महात्मा फुले चौक पोलिस ठाण्यात जाऊन तक्रार दाखल केली आहे. एका भाड्यावर गेले असताना भुरळ घालून त्यांना प्रवाशांनी पेढा खायला दिला. आणि गुंगी येताच लुटारूनी आपला दावा साधला.

अमीर शेख हे शनिवारी संध्याकाळी ६ वाजण्याच्या सुमारास एम एच ०५/डी झेड/ २६१८ क्रमांकाची त्यांची रिक्षा घेऊन कल्याण रेल्वे स्टेशन समोर असलेल्या एसटी डेपो समोर प्रवासी भाडे घेण्यासाठी थांबले होते. इतक्यात दोन अनोळखी इसमांनी रिक्षास हात दाखवून त्यांना वालधुनी येथिल रेल्वे हॉस्पीटल येथे जायाचे असल्याचे सांगितले. त्याप्रमाणे अमीर शेख यांनी ७० रूपये भाडे होईल असे सांगितले. हे दोघेजण रिक्षात बसले. वालधुनी दिशेकडे जात असताना त्या इसमांनीअमीर यांना उल्हासनगर येथे जाण्याचे सांगितले. त्याप्रमाणे अमीर यांनी उल्हासनगरच्या सेंटल हॉस्पीटल येथे नेले. त्यातील एका प्रवाश्याने अमीर यांना पत्नीस भेटून येतो असे, असे सांगून रिक्षातून उतरून तो इसम निघून गेला. पुन्हा काहीवेळात पुन्हा रिक्षाजवळ आला असता त्याच्या हातात असलेला पेढ्यांचा बॉक्स पुढे करून मला मुलगा झाला आहे असे बोलून अमीर यांना पेढा खाण्यास दिला. आनंदाच्या भरात अमीर यांनी त्यातला पेढा खाल्ला.

त्यानंतर त्या अनोळखी इसमांनी मावशीला भेटण्याकरीता उल्हासनगरच्या खेमाणी येथे घेऊन जाण्यास सांगितले. त्याप्रमाणे अमीर यांनी त्यांची रिक्षा खेमाणी येथे नेली. त्यातील एक इसम उतरून काहीवेळाने परत रिक्षात आला आणि अमीर यांना कल्याण रेल्वे स्टेशन येथे सोडण्यास सांगितले. रिक्षा चालवत असताना अमीर शेख यांना थोडे अंधुक दिसू लागले. चालकाला गुंगी आल्याचे रिक्षातील लुटारू प्रवाश्यांना हेरले. त्यांनी अमीर यांना वालधुनी जकात नाक्यावर रिक्षा थांबविण्यास सांगितले आणि घात केला.

लुटारूंनी आपल्याकडील मोबाईल, घड्याळ आणि काही रोकड हिसकावण्याचा प्रयत्न केला. मात्र विरोध केल्यानंतर ठोसा-बुक्क्याने मारहाण करून रिक्षासह बिर्ला कॉलेजसमोर सोडून पळ काढल्याचे या वयोवृद्ध रिक्षावाल्याने त्याच्या फिर्यादीत म्हटले आहे. दरम्यान कोरोना काळात लुटीच्या सर्रास घटना वाढू लागल्या आहेत .या प्रकरणी  महात्मा फुले चौक पोलीस ठाण्यातील फरार लुटारूंनी हुडकून काढण्याची जबाबदारी सपोनि देविदास ढोले यांच्यावर सोपविण्यात आली आहे.

-रोशन उबाळे