नाका बंदी दरम्यान दुचाकीस्वाराच्या डोक्याला गंभीर दुखापत; विनाकारण मारहाण करणाऱ्या पोलिसांवर कारवाईची मागणी

कल्याण पूर्व तिसगाव नाका परिसरात नाका-बंदी दरम्यान दुचाकीवर जाणाऱ्या एका तरुणाच्या डोक्यावर वाव पोलीस कर्मचाऱ्याने काठी घातल्याचा आरोप केला जात आहे. बाईकस्वराच्या डोक्यावर काठी लागल्याने या तरुणाच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून तरुणावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहे. विनाकारण मारहाण केल्याचा आरोप तरुणाने केला असून संबंधित पोलीस कर्मचाऱ्यावर कारवाईची मागणी केली जात आहे.

कल्याण पूर्व चक्की नाका परिसरात राहणारे
निलेश कदम, भुपेंद्र झुगरे हे दोघे सोमवारी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास दुचाकीने कल्याण पूर्व येथून उल्हासनगर च्या दिशेने जात होते. याच दरम्यान तिसगाव नाका येथे कोळशेवाडी पोलिसांची चेकिंग सुरू होती. निलेश व भुपेंद्र जात असताना एका पोलीस कर्मचाऱ्याने काठीने निलेश याच्या डोक्यात मारले असल्याचे तरुणाकडून सांगण्यात आले. दरम्यान निलेश च्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून त्याला दहा टाके पडले आहेत. या प्रकरणी कोळसेवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यास गेलेल्या तरुणांचा पोलिसांनी गुन्हा नोंद केला नसल्याचे सोमवारी रात्री माध्यमांशी बोलताना त्याने सांगितले आहे.

-रोशन उबाळे

गणेश मंडपात शॉक लागून तरुणाचा मृत्यू; कल्याण बेतूरकरपाडा परिसरातील दुर्घटना

विसर्जनासाठी गणेशमूर्ती मंडपाबाहेर काढत असताना विजेचा जोरदार झटका लागल्याने गणेश मंडळाच्या कार्यकर्त्याचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना कल्याण पश्चिमेतील बेतूरकर पाडा येथील एव्हरेस्ट नगर येथे घडली. प्रशांत चव्हाण (28) असे या दुर्घटनेत मृत्यू झालेल्या युवकाचे नाव आहे.

कल्याण पश्चिमेच्या बेतूरकर पाडा, एव्हरेस्ट नगर परिसरात गेल्या ३८  वर्षांपासून गणेशोत्सव साजरा केला जातो. यंदाही या मंडळाकडून भक्तीभावपूर्ण वातावरणात गणेशोत्सव साजरा करण्यात आला. रविवारी संध्याकाळी या मंडळात विसर्जनाची तयारी सुरू होती. त्याचवेळी जोरदार आलेल्या पावसामुळे मंडपातील लाईट चालू बंद होऊ लागले. ते पाहण्यासाठी मंडळाचा कार्यकर्ता प्रशांत चव्हाण पुन्हा मंडपात गेला आणि तिकडे तपासणी सुरू असताना त्याला विजेचा जोरदार शॉक लागला. त्याचा ओरडण्याचा आवाज ऐकून इतर कार्यकर्त्यांनी त्याठिकाणी धाव घेतली असता प्रशांत खाली पडल्याचे त्यांना दिसून आले. क्षणाचाही विलंब न दवडता कार्यकर्त्यांनी त्याला  रुग्णालयात नेले. मात्र उपचारादरम्यान प्रशांत मृत्यू झाला. या घटनेमुळे एव्हरेस्ट नगर परिसरात शोककळा पसरली आहे.

-कुणाल म्हात्रे

घरगुती गणपतीला शैक्षणिक साहित्याची आरास; विसर्जनानंतर दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना वाटप

गणेशोत्सव म्हटलं की सर्वांचा आनंदाचा उत्साहाचा सण. गणपती बाप्पा बुद्धीची देवता आहे. स्वातंत्र्यपूर्व काळात लोकमान्य टिळकांनी समाजप्रबोधन आणि जनजागृतीसाठी गणेशोत्सवाची सुरूवात केली. हा उत्सव आणखी द्वीगुणीत व्हावा यासाठी सामाजिक कार्यकर्ते गजानन जयवंत पाटील यांच्या घरगुती गणपती उत्सवादरम्यान शैक्षणिक साहित्यांची आरास केली जाते. गणेशमूर्ती विसर्जनानंतर मखरातील सजावटीचे शैक्षणिक साहित्य आणि काही गणेश भक्तांकडून प्राप्त झालेले शैक्षणिक साहित्य दुर्गम भागातील गरजू विद्यार्थ्यांना वाटप केले जाते.

दरवर्षी प्रमाणे यंदादेखील अशाच दुर्गम भागातील तुंगारेश्वर पर्वतरांगेतील,तालुका भिवंडी येथील जि.प.शाळा पालिवली येथील आदिवाशी पाड्यातील गरजू शालेय विद्यार्थ्यांना सदरील शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. या उपक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे शैक्षणिक साहित्याची मखर सजावट आणि याच शैक्षणिक साहित्य वाटपाची संकल्पना येथील काही शिक्षकांनाही आवडली असून तेही आपल्या घरगुती गणेशोत्सव काळात राबवत आहेत. यावेळी सर्व पक्षिय युवा संघटनेचे प्रमुख संघटक तथा शिक्षणप्रेमी गणेश पाटील, गजानन पाटील, मधुकर माळी, शिवाजी माळी, मंगेश खुटारकर, युवराज पाटील आदी जण उपस्थित होते.

-कुणाल म्हात्रे