तीन आठवड्यात ४२ हजार थकाबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित; आणखी २ लाख ग्राहक महावितरणच्या रडारवर

कल्याण परिमंडळात गेल्या तीन आठवड्यात वीजबिल थकबाकीपोटी जवळपास ४२  हजार ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे. थकबाकीदारांकडून विजबिलाची वसुली अथवा त्यांच्या वीजपुरवठा खंडित करणे, हे दोनच पर्याय वीज कर्मचाऱ्यांसमोर आहेत. घरगुती, व्यावसायिक व औद्योगिक वर्गवारीतील ५०० रुपयांपेक्षा अधिकची थकबाकी असणारे २ लाख १  हजार ३२  वीज ग्राहक रडारवर असून त्यांचा वीजपुरवठा कधीही खंडित केला जाऊ शकतो. चालू वीजबिलासह थकबाकीचा भरणा करून कठीण आर्थिक परिस्थितीत असलेल्या महावितरणला सहकार्य करावे व अखंडित वीज सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन मुख्य अभियंता धनंजय औंढेकर यांनी केले आहे.

गेल्या तीन आठवड्यात कल्याण मंडल एक (कल्याण व डोंबिवली) अंतर्गत ५ हजार ४६५, कल्याण दोन मंडल दोन (उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर, शहापूर, ठाणे जिल्ह्याचा ग्रामीण भाग) अंतर्गत ७  हजार ९७२, वसई मंडल (वसई व विरार) अंतर्गत १३ हजार २१४  आणि पालघर मंडल (वसई व विरार वगळून उर्वरित पालघर जिल्हा) अंतर्गत १५  हजार २५०  ग्राहकांचा तसेच २५ पाणीपुरवठा योजना व १४९  पथदिवे जोडणीचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला होता. यातील २० हजार २११ ग्राहकांनी चालू वीजबिलासह थकबाकी आणि पुनरजोडणी शुल्काचा भरणा करून वीजपुरवठा सुरळीत करून घेतला आहे. तर सप्टेंबर महिन्यापूर्वी १ लाख ६५ हजार थकाबाकीदारांचा शिवाय ३११ पाणीपुरवठा योजना व ७८६ पथदिवे जोडण्यांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे.

कल्याण परिमंडलात सर्व वर्गवारीतील ६ लाख ७२ हजार ग्राहकांकडे ६६९ कोटी रुपयांचे वीजबिल थकीत आहे. या थकबाकीदार ग्राहकांनी तातडीने वीजबिल भरून महावितरणला संकटाच्या काळात सहकार्य करण्याचे आवाहन मुख्य अभियंता औंढेकर यांनी केले आहे. वीजपुरवठा खंडित केल्यानंतर चालू वीजबिल व थकबाकी तसेच पुनरजोडणी शुल्क भरल्याशिवाय वीजपुरवठा पूर्ववत केला जाणार नाही. थकबाकीपोटी वीजपुरवठा खंडित केलेल्या ग्राहकांवर विशेष लक्ष ठेवण्यात येत आहे. या ग्राहकांनी शेजारून अथवा परस्पर जोडणी किंवा अन्य माध्यमातून विजेचा अनधिकृत वापर केल्याचे आढळल्यास थेट कारवाई करण्यात येणार आहे. याची परिमंडलातील सर्व वीज ग्राहकांनी नोंद घेऊन सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

-कुणाल म्हात्रे

‘ड’ प्रभाग कार्यालयाने केली ६५ अतिक्रमणावर धडक कारवाई; नव्या प्रभाग क्षेत्र अधिकाऱ्यांचे निर्देश

‘ड’ प्रभाग कार्यालयाच्या हद्दीत दुकान मालक आणि फेरीवाल्यांनी पथ रस्ते अडविल्याने नागरिक वाटसरू यांना वाट काढताना तारेवरची कसरत करावी लागते. त्यामुळे प्रभाग क्षेत्र अधिकारी सविता हिले यांनी पदभार स्वीकारून काही दिवस झाले असतांना कुठल्याही दबावाला न जुमानता पूना लिंक रोड श्रीराम टॉकीज ते चक्की नाका मलंगगड रोड परिसरातील फेरीवाले आणि ६५ अतिक्रमणे हटवले आहेत.

जेसीबी आणि इतर साहित्य तसेच पालिका कर्मचारी यांचा लवाजमा घेऊन ही कारवाई करण्यात आली. त्यामुळे कल्याण पूर्वेच्या मुख्य रस्त्याने तात्पुरता मोकळा श्वास घेतला आहे. अशी कारवाई नेहमी करण्यात यावी अशी स्थानिक नागरिक व वाहन धारक, प्रवासी यांनी मागणी केली आहे.

कल्याण पूर्वीतील पूना रोड परिसरातील श्रीराम टॉकीज ते चक्की नाका, चेतना शाळा, मलंगगड रोड भागात मुख्य रस्त्यावर दुकान मालक व फेरीवाले यांनी पथ रस्ते वर शेड कोणी वाढीव बांधकाम केल्याने वाटसरू आणि नागरिक याना रस्त्याने चालताना तारेवरची कसरत करावी लागत होती. त्यामुळे आता ‘ड’ प्रभाग कार्यालयाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी लवाजमा घेऊन धडक कारवाई केली आहे.

नवनियुक्त प्रभाग क्षेत्र अधिकारी सविता हिले व पथक विभागातील जयेश काळण, उमेश जाधव, संजय पवार, सुमित गायकर, समीर ठाकूर, हरेश बुचाडे व इतर कर्मचाऱ्यांनी श्रीराम टॉकीज, खडेगोळवली, अपर्णा डेरी पूनालिंक रोड ते चक्कीनाका, व पुढे चेतना शाळा, मलंगगड रोड वरील ६५ अतिक्रमणे,वाढीव बांधकामे जेसीबी आणि मनुष्यबळाच्या साहाय्याने निष्कासित करण्यात आली आहेत. या धडक कारवाई ने कल्याण पूर्वेतील मुख्य रस्त्यांनी मोकळा श्वास घेतला आहे.

-रोशन उबाळे