घरगुती गणपतीला शैक्षणिक साहित्याची आरास; विसर्जनानंतर दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना वाटप

गणेशोत्सव म्हटलं की सर्वांचा आनंदाचा उत्साहाचा सण. गणपती बाप्पा बुद्धीची देवता आहे. स्वातंत्र्यपूर्व काळात लोकमान्य टिळकांनी समाजप्रबोधन आणि जनजागृतीसाठी गणेशोत्सवाची सुरूवात केली. हा उत्सव आणखी द्वीगुणीत व्हावा यासाठी सामाजिक कार्यकर्ते गजानन जयवंत पाटील यांच्या घरगुती गणपती उत्सवादरम्यान शैक्षणिक साहित्यांची आरास केली जाते. गणेशमूर्ती विसर्जनानंतर मखरातील सजावटीचे शैक्षणिक साहित्य आणि काही गणेश भक्तांकडून प्राप्त झालेले शैक्षणिक साहित्य दुर्गम भागातील गरजू विद्यार्थ्यांना वाटप केले जाते.

दरवर्षी प्रमाणे यंदादेखील अशाच दुर्गम भागातील तुंगारेश्वर पर्वतरांगेतील,तालुका भिवंडी येथील जि.प.शाळा पालिवली येथील आदिवाशी पाड्यातील गरजू शालेय विद्यार्थ्यांना सदरील शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. या उपक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे शैक्षणिक साहित्याची मखर सजावट आणि याच शैक्षणिक साहित्य वाटपाची संकल्पना येथील काही शिक्षकांनाही आवडली असून तेही आपल्या घरगुती गणेशोत्सव काळात राबवत आहेत. यावेळी सर्व पक्षिय युवा संघटनेचे प्रमुख संघटक तथा शिक्षणप्रेमी गणेश पाटील, गजानन पाटील, मधुकर माळी, शिवाजी माळी, मंगेश खुटारकर, युवराज पाटील आदी जण उपस्थित होते.

-कुणाल म्हात्रे

गणपती विसर्जनासाठी केडीएमसीची यंत्रणा सज्ज; पालिका आयुक्तांनी केली गणेश घाटाची पाहणी

गणेशोत्सवात गणपती विसर्जनासाठी केडीएमसीची यंत्रणा सज्ज असून कल्याण पश्चिमेतील दुर्गाडी येथील गणेश घाटाची पालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी पाहणी केली. यावेळी सहाय्यक पोलिस आयुक्त अनिल पोवार, शहर अभियंता सपना कोळी देवनपल्ली, कार्यकारी अभियंता सुभाष पाटील उपस्थित होते.

गणेश भक्तांच्या सोयीसाठी दुर्गाडी गणेश येथे गणेश घाटाची उंची वाढविणे आणि गणेश घाट परिसरात लादया बसविणे ही कामे पूर्ण झाली आहेत. त्याचप्रमाणे या परीसरात 125 KV चे 3 जनरेटर, 11 लाईटिंग टॉवर, 80 हॅलोजन, 4 cctv तसेच दुर्गामाता चौक येथे 8 ccstv देखील विदयुत विभागामार्फत लावण्यात आले आहेत. दुर्गाडी येथे सरंक्षक भिंत बांधणे, गणेश घाटाला स्टिल रेलींग करणे आणि गणेश घाट बगीचा सुशोभिकरण करणे हि कामे प्रस्तावित असून सदर कामे शीघ्र गतीने करणे बाबत आयुक्त डॉ.विजय सूर्यवंशी यांनी संबंधित अधिका-यांना निर्देश दिले आहेत.

गेल्यावर्षी गणेशोत्सवानंतर महापालिका क्षेत्रात कोराना रुग्णांची संख्या मोठया प्रमाणात वाढली होती. त्यामुळे यावर्षी सर्व गणेश भक्तांनी कोरोना नियमांचे पालन करुन उत्सव साजरा करावा असे आवाहन महापालिका आयुक्त डॉ.विजय सूर्यवंशी यांनी यावेळी केले. तसेच विसर्जन आपल्या दारी हा उपक्रमही महापालिका क्षेत्रात राबविला जाणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.

दुर्गाडी येथील गणेश घाट परिसरात “पर्यटन विकासासाठी मूलभूत सुविधा पुरविण्याकरीता अनुदान” या योजने अंतर्गत केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांनी सुचविलेल्या महापालिका क्षेत्रातील गणेश घाट परिसरातील कामांसाठी एक कोटी दहा लाख इतक्या रकमेचे अनुदान मंजूर झाले असून त्यापैकी 55 लाख रुपयांचा निधी  महापालिकेस प्राप्त झाला आहे. उर्वरित अनुदान सर्व काम पुर्ण झाल्यावर प्राप्त होणार आहे.

-कुणाल म्हात्रे

दावडीतील इमारत वाचवण्यासाठी पालिका अधिकाऱ्यांना दिले होते २५ लाख; बिल्डरच्या आरोपाने उडाली खळबळ

केडीएमसी आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी उपायुक्त आणि प्रभाग क्षेत्र अधिकारी यांना अनधिकृत बांधकामे तोडण्याचे आदेश दिले आहेत. त्यानंतर पालिका क्षेत्रात काही इमारतींवर तोडक कारवाई होत आहे. त्यामुळे अनधिकृत पणे इमारती उभ्या करणाऱ्या बिल्डरांचे, बांधकाम ठेकेदारांचे तसेच त्यांना मिळालेल्या काही लोकांचे धाबे दणाणले आहेत. त्यानंतर तथाकथित सीसीटीव्ही फुटेज आणि लाच घेतल्यांचे आरोप आता होऊ लागले आहेत. धडक कारवाई नंतर आरोपांच्या फेऱ्या झडू लागल्या आहेत.

कल्याण डोंबिवली मध्ये पालिका प्रशासनाने धडक कारवाई अनाधिकृत इमारतीवर सुरू केल्या आहेत. मागील काही दिवसांपूर्वी दावडी येथील एका इमारतीवर कारवाई केली गेली होती. त्यावरून आता तथाकथित आरोपाच्या फेऱ्या झडू लागल्या आहेत. काही दिवसांपूर्वी कारवाई केलेल्या इमारती बाबत पैसे दिले असल्याचे आरोप होत आहे. दावडी गावातील ६ मजली बेकायदा इमारत वाचवण्यासाठी केडीएमसीच्या दोन अधिकाऱ्यांनी लाखो रुपयांची लाच घेतल्याचा आरोप एका बिल्डराने केला आहे. बिल्डर आणि अधिकारी यांच्यातील मिटिंग हॉटेलच्या तथा कथित
सीसी टीव्ही कॅमेऱ्यात दाखवले जात असल्याचे एक चित्रीकरण समोर आले आहे. यानंतर कल्याण महापालिका मुख्यालयात खळबळ उडाली आहे.

सध्या काही प्रसार माध्यमांवर सीसीटीव्ही दाखवला गेला आहे. तो खरा आहे की खोटा याची सत्यता तपासल्या नंतर काय गौडबंगाल आहे हे समोर येणार आहे. दरम्यान याबाबत पालिका आयुक्तांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिल्या आहेत की तथाकथित सीसीटीव्ही चित्रीकरणाची सत्यता तपासून आणि चौकशी नंतर कारवाई करण्यात येईल असे ते स्पष्टपणे म्हटले आहेत.

-रोशन उबाळे

कल्याणच्या गांधारी येथे महिलेच्या हत्येने खळबळ; पोलिसांचा जवळच्या माणसावर संशय

कल्याणच्या हाय प्रोफाईल गांधारी परिसरात घर काम करणाऱ्या एका महिलेच्या हत्येने आज सकाळी खळबळ उडाली होती. दगडाने ठेच्चून निर्घृणपणे या महिलेची हत्या करण्यात आली आहे. एखाद्या वैमनस्यातुन जसे एखाद्याची हत्या केली जाते त्याच प्रमाणात प्रचंड संतापातून ही हत्या केल्याचे दिसत आहे. पोलिसांनी घटनेचा पंचनामा केला असून हत्येचा संशय महिलेच्या पतीवर आहे. सध्या खडकपाडा पोलिस या हत्येचा तपास करीत आहेत.

कल्याण पश्चिमेतील हाय प्रोफाईल गांधारी परिसरात रिंग रोडचे काम सुरु आहे. आज सकाळी १० च्या सुमारास या रस्त्यावर एका महिलेचा मृतदेह आढळून आला. याची माहिती कल्याणच्या खडकपाडा पोलिसांना देण्यात आली. खडकपाडा पोलिस पथकासमवमवेत घटनास्थळी दाखल झाले. मयत महिलेचे नाव लक्ष्मी मोहिते असे आहे. ही महिला त्याच परिसरात घर काम करणारी आहे. लक्ष्मी ही भिवंडीतील सावद गाव परिसरात राहत होती. लक्ष्मीची हत्या तिचा पती जर्नादन मोहिते याने केली असल्याचा संशय पोलिसांना आहे. कारण सध्या तो बेपत्ता आहे.

लक्ष्मीची हत्या मोठ्या निर्दयीपणे दगडाने ठेचून करण्यात आली आहे. ही घटना मुख्य उच्चभ्रू वस्तीत घडल्याने परिसरात या महिलेच्या हत्येने सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक पवार यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. आणि पंचनामा केला असून आरोपीला तात्काळ अटक करण्यात येणार असल्याचे सांगण्यात येते. यासाठी पोलीस पथक तपास करीत असल्याची माहिती देखील देण्यात आली आहे.

-रोशन उबाळे

कल्याण ग्रामीण भागात चोरट्यांनी फोडलं एटीएम; लाखो रुपयांची चोरी सीसीटीव्हीत रेकॉर्ड

कल्याण मुरबाड महामार्गावरील म्हारळ येथे आय सी आय सी आय चे ए टी एम चोरटयांनी शनिवारी रात्रीच्या सुमारास  फोडले असून त्यातील लाखोंची रक्कम लंपास केली आहे. विठ्ठल नगर येथे चोरट्याने गॅस कटर च्या साहाय्याने बँकेच्या ए टीएम वर डल्ला मारला आहे. त्यामुळे परिसरात खळबळ माजली असून कोरोना काळात चोरांची हिम्मत वाढल्याचे दिसून येत आहे.

काही दिवसांपूर्वीही रायते गावात याच महामार्गावर आठ दुकाने फोडण्यात आली होती. संबंधित घटनेचे कृत्य सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून लवकरच दरोडे खोरांच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश मिळणार आहे असे समजते. दरम्यान कल्याण तालुका ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून पोलिसांनी  घटना स्थळी दाखल होऊन पंचनामा केला आहे. शोधकार्यासाठी इमारतील कॅमेऱ्याचे फुटेज देखील ताब्यात घेतले आहेत. या गुन्ह्याचा तपास  साहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक भोई आणि साहय्यक पोलीस निरीक्षक आर पी पवार यांचे पथक  करीत आहे.

-रोशन उबाळे

विठ्ठलवाडी रेल्वे स्थानकाचा होतोय कायापालट; खासदार श्रीकांत शिंदेंनी घेतला कामाचा आढावा

कल्याण लोकसभा मतदार संघात विविध ठिकाणी सुरु असलेल्या रेल्वे विषयक कामांचा पाहणी आढावा घेण्याकरिता आयोजित दौऱ्यामध्ये अतिरिक्त विभागीय रेल्वे व्यवस्थापक आशुतोष गुप्ता, मुंबई रेल्वे विकास महामंडळाचे प्रकल्प व्यवस्थापक बी.के. झा यांच्यासोबत विठ्ठलवाडी स्थानकात जाऊन तेथे सुरु असलेल्या विविध कामांची पाहणी केली. सदर कामे आता पूर्णत्वास आली असून या सर्व कामांची पाहणी करुन नागरिकांच्या सोयीच्या दृष्टीने यासंदर्भात महत्वपूर्ण सूचना खासदारांनी अधिकाऱ्यांना केल्या. याप्रसंगी शहरप्रमुख राजेंद्र चौधरी आणि उ.म.पा.चे नगरसेवक धनंजय बोराडे उपस्थित होते.

विठ्ठलवाडी स्थानकात पूर्व दिशेला नागरिकांना जाणे सोयीचे जावे यासाठी तिकिट घर बांधण्यात आले असून येत्या महिन्याभरात ते नागरिकांकरिता खुले करण्यात येणार आहे. विठ्ठलवाडी येथील पूर्व दिशेकडील रस्त्यावरुन स्थानकात जाण्यासाठी थेट पर्याय उपलब्ध करुन तेथे प्रवाशांकरिता २ सरकते जिने (एस्कलेटर्स) बसविण्याचे काम सुरु आहे. येत्या १५ दिवसांमध्ये हे एस्कलेटर्स नागरिकांच्या सेवेत रुजू होतील. तसेच अंबरनाथ दिशेकडील पूर्व आणि पश्चिम या दोन्ही बाजूस प्रवाशांना प्लॅटफॉर्मवर जाणे-येणे सोयीचे व्हावे याकरिता उद्वाहक (लिफ्ट) बसविण्यात आले असून येत्या २० दिवसांत ही सुविधा सुरु होणार आहे.

विठ्ठलवाडी स्थानकातील पादचारी पूल पश्चिमेला उतरण्यात यावा या नागरिकांच्या मागणीची दखल घेत यासाठी प्रयत्नशील राहून रेल्वे प्रशासनाकडे पाठपुरावा सुरु आहे. विठ्ठलवाडी स्थानकात तिसऱ्या आणि चौथ्या रेल्वे मार्गिकेचे काम लवकरच सुरु होणार आहे. या मार्गिकांच्या संरेखनाचे काम पूर्ण झाल्यावर लगेचच या पुलासाठीचे काम सुरु करण्यात येणार असल्याचे खासदार श्रीकांत शिंदे यांनी सांगितले आहे.

-संतोष दिवाडकर

कल्याणच्या खासदारांचा लॉकल मोटरमन केबिनमधून प्रवास; फोटो पाहून वाटेल खासदार चालवताहेत रेल्वेगाडी

शनिवारी कल्याणच्या खासदारांनी आपल्या लोकसभा मतदार संघातील रेल्वेचे कामकाज कसे सुरू आहे याबाबत एक पाहणी दौरा केला होता. याचदरम्यान त्यांनी लॉकल मधून प्रवास देखील केला. लॉकलच्या शेवटच्या डब्याच्या केबिनमधून त्यांनी हा प्रवास केला आणि प्रस्तावित कामाची पाहणी केली.

कोविड काळात मध्य रेल्वेने ठाणे जिल्ह्यातील काही स्थानकांची शिल्लक कामे पूर्णत्वास नेली आहेत. ह्याच काळात डोंबिवली स्थानका जवळील कोपर स्थानकात पूर्ण झालेल्या होम प्लॅटफॉर्मची कल्याण खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांनी पाहणी केली. हा होम प्लॅटफॉर्म सुरू झाल्या नंतर या प्लॅटफॉर्मवरून मुंबईकडे तसेच खोपोली, कसारा मार्गाकडे गाड्या सुटतील. या नव्या प्लॅटफॉर्म नंतर लांब पल्ल्याच्या एक्स्प्रेस गाड्यांसाठी स्वतंत्र पाचव्या आणि सहाव्या लाइन चे काम येत्या फेब्रुवारी २०२२ पर्यंत पूर्णत्वास येणार आहे. त्यामुळे एक्स्प्रेस चा वेग वाढणार आहे आणि लोकल लाइनचा होणारा खोळंबा होणार नाही अस मत खासदार श्रीकांत शिंदे यांनी व्यक्त केले.

-संतोष दिवाडकर

“कल्याण डोंबिवलीत भाजपची सत्ता येणार”; केंद्रीय मंत्री कपिल पाटलांचा दावा

महाविकास आघाडीने दोन वर्षात कल्याण पश्चिम विधानसभा मतदार संघात विकासासाठी एकही पैसा निधी आणला नसून माजी आमदार नरेंद्र पवार यांच्या निधीतून अजूनही विकासकामे सुरू आहे, हाच देवेंद्र फडणवीस व उद्धव ठाकरे यांच्या काम करण्याच्या पद्धतीत फरक असल्याने आगमी पालिकेच्या निवडणूकांमध्ये भाजपाचीच सत्ता येणार असल्याचे प्रतिपादन केंद्रीय पंचायत राज मंत्री कपिल पाटील यांनी केले.

कल्याणचे माजी आमदार नरेंद्र पवार यांनी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणविस यांच्यामार्फत आणलेल्या विशेष निधीतून मंजूर झालेल्या स्व लक्ष्मीबाई सिताराम कारभारी उद्यानाचा लोकार्पण सोहळा केंद्रीय पंचायतराज मंत्री कपिल पाटील यांच्या हस्ते संपन्न झाला यावेळी ते बोलत होते.

या उद्यानात तरुणांना व्यायामाची आवड निर्माण व्हावी यासाठी ओपन जिम, मॉर्निंग वॉकसाठी जॉगिंग ट्रॅक व जेष्ठ नागरिकांसाठी बैठक व्यवस्था तसेच लहान मुलांना खेळण्यासाठी खेळण्याची साहित्य या उद्यानात उपलब्ध करून देण्यात आले आहे. पर्यावरणाचे संतुलन राखण्यासाठी विकसित केलेली ही उद्याने पूरक असल्याचेही कपिल पाटील यांनी सांगितले.

-कुणाल म्हात्रे

कल्याणच्या चिंचपाडा तलावात सापडलेला मृतदेह कोणाचा? विठ्ठलवाडी पोलिसांनी ऑपन केली मर्डर मिस्ट्री

मंगळवार दि.३१ ऑगस्ट रोजी कल्याण पूर्वेतील चिंचपाडा भागात एका अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळून आला होता. स्थानिकांनी पोलिसांना माहिती देताच पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा सुरू केला. हा मृतदेह कुणाचा आहे ? व त्याचा मृत्यू कसा झाला ? याबाबत पोलिसांकडे माहिती नव्हती. त्यामुळे ही हत्या असण्याची शक्यता वर्तवली जात होती. आणि त्यानंतर मृतदेहाची ओळख पटवण्याचा प्रयत्न सुरू झाला. व आता या प्रकरणाचा यशस्वी शोध करण्यात विठ्ठलवाडी पोलिसांना यश प्राप्त झाले आहे.

विठ्ठलवाडी पोलिसांनी घटनास्थळी केलेल्या पंचनाम्यात त्यांना मृतकाच्या गळ्यावर जखमा दिसल्या. त्याच्या अंगावर टेटू आढळला. टेटू आणि अंगावरील कपड्यांच्या मदतीने पोलिसांनी तपास सुरू केला. याचदरम्यान मृतकाच्या पत्नीने देखील जवळच्या पोलीस स्थानकात मिसिंगची तक्रार दाखल केली होती. या तक्रारीमुळे मृतदेहाची ओळख पटली. आणि मृतकाबाबत अधिक माहिती पोलिसांकडे प्राप्त झाली. विठ्ठलवाडी पोलिसांनी आपली सूत्र हलवली. पोलिसांनी यासाठी तपास टीम तयार केली. मिसिंग दाखल झालेल्या ठिकाणा नुसार विठ्ठलवाडी पोलिसांनी तपास सुरू केला. हा तपास सुरू झाला आणि अनेक गोष्टींचा उलगडा पोलिसांना होऊ लागला. आधी अपहरण व नंतर झालेल्या हत्येचा गुन्हा कसा घडला? याचा शोध सुरू झाला. मारेकरी हे लांबून आलेत याची माहिती पोलिसांच्या हाती मिळाल्यानंतर पोलिसांनी आपल्या टीम मार्फत २४ तासातच हत्या करणाऱ्या दोघांना अटक केली.

दोघांना ताब्यात घेतल्या नंतर पुढील प्रकरण उजेडात येऊ लागले. मृतकाच्या पत्नीशी शेजारच्या तरुणासोबत अनैतिक संबंध असल्याच्या संशयातून मृत पतीने त्या तरुणाशी वाद घातला होता. याच वादातून त्या तरुणाने मित्राच्या मदतीने वाद घालणाऱ्या तिच्या पतीचा वचपा काढायचे ठरवले. सुरुवातीला नवी मुंबई परिसरातून त्याचे अपहरण केले गेले. आणि नंतर त्याची कल्याण पूर्वेतील चिंचपाडा परिसरात आणून हत्या केली. क्रूरपणे त्यांनी तो मृतदेह गावदेवी तलावात फेकला आणि तिथून पोबारा केला.

साजन मारुती कांबळे राहणार घणसोली नवी मुंबई आणि डिव्हाईन गोन्साल्विस राहणार वरळी कोळीवाडा, मुंबई अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. तर चंद्रकांत शेलार असे हत्या झालेल्या त्या इसमाचे नाव आहे. २४ तासातच अंगावरील टॅटू आणि कपडे यांच्या सहाय्याने तपास करीत विठ्ठलवाडी पोलिसांनी या मर्डर मिस्ट्रीचा शोध लावला. मात्र या घटनेसह अनेक तलाव आणि खदानी असुरक्षित झाल्यात हे देखील अधोरेखित झाले आहे.

-शरद शिंदे

कल्याण बैलबाजार परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याची मागणी; रात्री चालताना नागरिकांचा जीव भांड्यात

कल्याण पश्चिम भागात स्टेशन परिसरा लगत असलेला  बैलबाजार व पत्री पूल रोड हा संवेशीलशील परिसर म्हणून ओळखला जातो. या भागालगत असलेल्या सांगळेवाडी, रहेजा कॉम्प्लेक्स या आतील भागात नेहमीच समाजकंटकांचा वावर असल्याने येथे मारामाऱ्या, छोटी मोठी लुटमार अश्या घटना घडत असतात. अश्या घटनांवर नजर ठेवण्या साठी या भागात सीसीटीव्ही केमेरे बसविण्यात यावेत अशी मागणी या भागातील समाजसेवक नईम खान यांनी एका निवेदना द्वारे सिस्टम मॅनेजर स्मार्ट सिटी कॉर्पोरेशन कल्याण डोंबिवली महानगर पालिका यांना केली आहे. या निवेदनाची प्रत महापालिकेचे आयुक्त डॉ विजय सूर्यवंशी यांना देखील पाठवण्यात आली आहे.

या दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, बैल बाजार प्रभाग क्रमांक ३६ येथे सीसीटीव्ही केमेरे अनेक ठिकाणी सुरक्षेच्या दृष्टीने लावण्याची गरज निर्माण झाली आहे. काही समाजकंटक प्रवृत्तीचे लोक हा कल्याण रेल्वे स्थानका जवळचा परिसर असल्याने येथे वावरत आसतात. अश्या लोकांवर नजर ठेवण्या साठी सीसीटीव्ही केमेरे लावणे येथे गरजेचे झाले आहे.
बैल बाजार परिसर येथील सांगळे वाडी, रहेजा कॉम्प्लेक्स येथे हे केमेरे लावल्यास येथून येणाऱ्या जाणाऱ्या अश्या समाजकंटक प्रवृत्तीच्या लोकांवर नजर ठेवू शकतात.असे केमेरे या परिसरात लावले गेल्यास नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने ते एक चांगले पाऊल उचलले जाईल.

तरी सदर सीसीटीव्ही केमेरे बैल बाजार प्रभागात लावण्याच्या साठी लवकरात लवकर पाऊले उचलावी. या भागातील नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीकोनातुन ही आवश्यक बाब आहे. तरी सकारत्मक विचार करून हे सीसीटीव्ही केमेरे या भागात लावण्याची कृपा करावी ही नम्र विनंती असे समाजसवेक नईम खान यांनी म्हटले आहे.

-रोशन उबाळे