मांडा-टिटवाळ्यातील ३१ वीज चोरांविरुद्ध गुन्हा दाखल

कल्याण :  महावितरणच्या कल्याण ग्रामीण विभागात मांडा-टिटवाळा येथील ३१ जणांविरुद्ध ८ लाख ४ हजार ४८० रुपयांची ५९ हजार ८५५ युनिट वीज चोरल्याप्रकरणी मुरबाड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष पथकांच्या तपासणी मोहिमेत ८ ऑक्टोबरला ही वीजचोरी उघडकीस आली होती.

दिनेश धर्मा घायवत, शितल विश्वनाथ गांगुर्डे, मोहम्मद याकूब वायलाल, भारती ज्ञानू वरपे, तरुना गौतम प्रधान, विजयदत्त किसन गवळे, नरेश नंदकुमार अमुकर, पदमावती दशरथ पगारे, बळीराम वामन चौधरी, खातुन शहाजान खान, परशुराम यशवंत कुचीकुरे, लक्ष्मण हरी पारधी, आयशा खातून मोहम्मद, के के भोईर, संदिप संभाजी मालेकर, छोटेलाल पी गुप्ता, गणेश अनिल काशिवले, विकास अनिल काशिवले, कोंडु भिल्या काशिवले, स्वप्निल नटूराम मेंढे, विष्णु मोहन धिंडके, प्रकाश जाधव, शितल शांताराम दळवी, निशिगंधा  निलेश ताम्हणकर, महिपालभाई पी गांधी, रोहिणी सचिन पगारे, सुमित्रा लक्ष्मीराम, अन्सारी झरीना, बाळु गोविंद गायकर, एम .एस. ओमकार, मयुर विनोद तिवारी (सर्व राहणार मांडा व टिटवाळा परिसर) अशी या प्रकरणी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत.

संबंधितांकडून मीटरमध्ये फेरफार, मीटर बायपास आणि वीजपुरवठा खंडित केलेल्या ठिकाणी परस्पर केबल जोडून वीजचोरी होत असल्याचे विशेष पथकाच्या तपासणीत आढळून आले होते. सहायक अभियंता निलेश महाजन यांच्या फिर्यादीवरून मुरबाड पोलीस ठाण्यात संबंधित ३१ जणांविरुद्ध वीज कायदा २००३ च्या कलम १३५  नुसार वीजचोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

-कुणाल म्हात्रे

२७ गावातील नागरिकांना डिसेंबर पर्यंत अमृत योजनेमार्फत मिळणार मुबलक पाणी; पालिका आयुक्तांचे आश्वासन

कल्याण : २७ गावातील नागरिकांना डिसेंबर पर्यंत अमृत योजनेमार्फत मुबलक पाणी मिळणार असल्याचे आश्वसन पालिका आयुक्तांनी भूमिपुत्र पार्टीच्या शिष्टमंडळाला दिले आहे. तसेच २७ गावातील सन २००२ पर्यंतच्या घरांचा मालमत्ता कर देखील कमी करण्यासाठी आयुक्तांनी सकारात्मकता दर्शवली आहे. कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील २७ गावांमध्ये पिण्याची समस्या गंभीर झाली असून या बाबत भूमिपुत्र पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष चंद्रकांत मोटे यांनी आज मोर्चा काढण्याचा इशारा  निवेदनाद्वारे पालिका आयुक्तांना दिला होता. त्यानुसार आज भूमिपुत्र पार्टीच्या शिष्टमंडळाला आयुक्तांनी बोलावत त्यांचे म्हणणे ऐकून घेतले. यावेळी चंद्रकांत मोटे यांच्यासह मोहन काळन, रवींद्र भंडारी, प्रकाश पाटील आणि गुरुनाथ पाटील आदी पदाधिकारी उपस्थित होते.  

कल्याण डोंबिवती महानगर पालिकेतील ग्रामीण भागातीत २७  गावे शासन निर्णयामुळे समाविष्ट करण्यात आली आहेत. परंतु सदर २७ गावांमधील दावडी, सोनारपाडा आदी गावातील नागरिक पिण्याचे पाणी, दिवाबत्ती, रस्ते  आदी सुविधांपासून वंचित आहेत. पिण्याच्या पाण्याची सोय उपलब्ध नसल्याने येथील नागरिक दररोज खाजगी टॅकरने पाणी खरेदी करतात. यामुळे कोरोना महामारीमुळे देशोधडीला लागलेल्या ग्रामीण  भागातील नागरिकांना मोठा आर्थिक भुर्दंड सोसावा लागतो. महाराष्ट्र शासनातर्फे देण्यात आलेल्या कूपनलिका नादुरुस्त असल्याने तसेच काही ठिकाणी या कुपनलिकेतून येणाऱ्या  पाण्यामध्ये अळ्या येत असल्याने नागरिकांना मोठ्या समस्येला सामोरे जावे लागत आहे.

२७ गावांतील नागरिकांना पुरेशा सोयी सुविधा मिळत नसतांना देखील पालिकेच्या वतीने अवास्तव मालमत्ता कराची वसुली केली जात असून हा मालमत्ता कर कमी करावा आणि पाण्याची समस्या त्वरित न सोडविल्यास बुधवारी तीव्र आंदोलन करून महापालिकेवर मोर्चा काढत आमरण उपोषण करण्याचा इशारा भूमिपुत्र पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष चंद्रकांत मोटे यांनी दिला होता. त्यानुसार आज मोर्चाची तयारी देखील करण्यात आली होती. मात्र पोलिसांनी मध्यस्थी करत त्यांच्या शिष्टमंडळाची आयुक्तांशी भेट घडवून आणली. यावेळी आयुक्तांनी २७ गावातील नागरिकांना अमृत योजनेच्या माध्य्मानातून डिसेंबर पर्यंत मुबलक पाणी मिळणार असून ज्यांची घरे सन २००२ पर्यंतची आहेत त्यांनी आपल्या मालमत्ता कारच्या पावतीसह अर्ज केल्यास त्यांचा मालमत्ता कर कमी केला जाईल असे आश्वासन पालिका आयुक्तांनी दिले असल्याची माहिती चंद्रकांत मोटे यांनी दिली.

-कुणाल म्हात्रे

लेखी आश्वासनानंतरही रस्ता न बनविल्याने म्हारळ येथील स्थानिकांनी पुकारले आमरण उपोषण

कल्याण : लेखी आश्वासनानंतरही सार्वजनिक बांधकाम विभागाने रस्ता न बनविल्याने स्थानिकांनी आमरण उपोषण सुरु केले आहे.कल्याण माळशेज महामार्गावरील म्हारळगाव येथे गेल्या अनेक महिन्यांपासून म्हारळगाव थारवाणी बिल्डिंग ते ताबोर आश्रम कांबा पावशे पाडा पर्यंत मोठ्या प्रमाणात खड्ड्यांचे साम्राज्य झाले आहे. त्यामुळे येथील रस्ता बनविण्याच्या मागणीसाठी येथील स्थानिकांनी २९ सप्टेंबर रोजी एकदिवसीय उपोषण करत आंदोलन केले होते. यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी हा रस्ता २० ऑक्टोंबर पर्यंत बनविण्याचे लेखी आश्वासन दिले होते. मात्र लेखी आश्वासन देऊन देखील रस्त्याचे काम सुरु न झाल्याने येथील स्थानिकांनी आमरण उपोषणाचे हत्यार उगारले आहे.   

कल्याण माळशेज महामार्गावरील म्हारळ ते ताबोर आश्रम पर्यंतच्या रस्त्याची दुरवस्था झाली असून या ठिकाणी रोज अपघात होत असतात, स्थानिकानी सतत सार्वजनिक बांधकाम विभागाशी संपर्क केला तरीही कोणती ही कारवाई होत नाही. यामुळे स्थानिक सामाजिक कार्यकर्ते रमेश हिंदूराव, महेश देशमुख, अश्विन भोईर, विवेक गंभीरराव, विशाल मोहपे, योगेश देशमुख, लक्ष्मण सुरोशी, निकेश पावशे, अशफ़ाक शेख, प्रवीण नागरे, दत्तू सांगळे, दिलीप भोईर, जगन्नाथ शेट्टी, रमेश गायकवाड आदी सामाजिक कार्यकर्त्यांनी एक महिन्यापूर्वी आंदोलन केले होते. तेव्हा सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंता तृप्ती नाग यांनी २० ऑक्टोंबर पर्यंत या रस्त्याचे डांबरीकरण करण्याचे लेखी आश्वसन दिले होते.  

      मात्र अद्यापही या रस्त्याचे काम सुरु न झाल्याने नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे असून धुळीचे देखील साम्राज्य पसरले आहे. त्याचप्रमाणे रस्त्याच्या दोन्ही बाजूला गवत देखील वाढले आहे. त्यामुळे आता रस्त्याचे काम सुरु होईपर्यंत हे आमरण उपोषण सुरु ठेवणार असून लेखी आश्वसनाची पूर्तता न करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी असल्याचे सामाजिक कार्यकर्ते रमेश हिंदुराव यांनी सांगितले.

     तर याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंता तृप्ती नाग यांच्याशी संपर्क साधला असता, या रस्त्याच्या कामाची वर्क ऑर्डर निघाली असून कामासाठी ठेकेदार देखील नेमण्यात आला आहे. काही तांत्रिक अडचणीमुळे काम सुरु झाले नसून येत्या दोन दिवसांत कामाला सुरवात होईल असे त्यांनी सांगितले.

-कुणाल म्हात्रे

दिवाळी तोंडावर आणि KDMT कामगारांना पगार नाही; मनसेचा प्रशासनाला दोन दिवसांचा अलटीमेटम

कल्याण : कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या परिवहन विभागात कंत्राटी पद्धतीने काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना गेल्या ३ महिन्यांपासून पगार मिळालेला नाही. एकीकडे दिवाळीचा सण समोर असताना, कामगारांना पगार मिळत नसल्याने कामगार त्रस्त झाले आहेत. याविषयी मनसेने केडीएमसी परिवहन विभागाचे व्यवस्थापक दीपक सावंत यांची भेट घेतली. येत्या  दोन दिवसात कामगारांना त्यांच्या हक्काचा पगार मिळाला नाही, तर मनसेच्यावतीने आंदोलन करण्यात येईल, असा इशारा देत मनसेच्या वतीने निवेदन देण्यात आले.

       कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या परिवहन विभागात बसेसची देखभाल दुरुस्ती करण्यासाठी कंत्राटी पद्धतीने ५० कामगार नियुक्त केले आहेत. गेल्या ८ महिन्यांपासून हे कंत्राट ‘जय भवानी’ या संस्थेला देण्यात आले आहे. या कंत्राटी कामगारांना परिवहन आगारामध्ये सोयी सुविधा देखील मिळत नाही अशी ओरड आहे. त्यांना चेंजिंग रूम नसून काम करतांना काही लागल्यास अथवा एखादा अपघात झाल्यास त्वरित उपचार करण्यासाठी प्रथमोपचार सुविधा देखील नाही. यामुळे जीव मुठीत धरून हे कामगार काम करत आहेत. असे असतांना देखील या कामगारांच्या ठेकेदाराने या कामगारांचे तीन महिन्यांपासून वेतन दिलेले नाही. यामुळे ऐन दिवाळीच्या सणावर त्यांच्यावर संक्रात कोसळली आहे.

हि बाब मनसे शहर संघटक भोईर यांना समजताच त्यांनी परिवहनचे मुख्य कार्यालय गाठत परिवहन व्यवस्थापक दीपक सावंत यांना याबाबत जाब विचारला. यामध्ये ठेकेदाराला कामगारांचा थकीत पगार त्वरित देत एक महिन्याचा पगार अग्रिम देण्याची मागणी केली. तसेच कामगारांना वेठीस धरणाऱ्या या कंपनीवर कारवाई करण्याची मागणी केली.   

याप्रकरणी परिवहन व्यवस्थापक दीपक सावंत म्हणाले की, कामगारांना त्यांचे पगार देण्याची जवाबदारी ठेकेदाराची आहे. ठेकेदाराचे बिल पालिका अदा करणार असून कामगारांना दिवाळीपूर्वी त्यांचे पगार दिले जातील असे आश्वासन दीपक सावंत यांनी दिले आहे.

-कुणाल म्हात्रे

२७ गावातील पाणीप्रश्न न सुटल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा ‘भूमिपुत्र पार्टी’चा इशारा

कल्याण : कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील २७ गावांमध्ये पिण्याची समस्या गंभीर झाली असून या बाबत भूमिपुत्र पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष चंद्रकांत मोटे यांनी निवेदनाद्वारे पालिका आयुक्तांचे लक्ष वेधले आहे. त्याचप्रमाणे २७ गावांमध्ये इतर सोयी सुविधा पुरविण्यास पालिका असमर्थ ठरत असल्याने अवास्तव मालमत्ता कर कमी करण्याची मागणी देखील आयुक्तांकडे करण्यात आल्या असून या मागण्या मान्य न झाल्यास बुधवारी याबाबत तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देखील देण्यात आला आहे.  

कल्याण डोंबिवती महानगर पालिकेतील ग्रामीण भागातीत २७  गावे शासन निर्णयामुळे समाविष्ट करण्यात आली आहेत. परंतु सदर २७ गावांमधील दावडी, सोनारपाडा आदी गावातील नागरिक पिण्याचे पाणी, दिवाबत्ती, रस्ते  आदी सुविधांपासून वंचित आहेत. पिण्याच्या पाण्याची सोय उपलब्ध नसल्याने येथील नागरिक दररोज खाजगी टॅकरने पाणी खरेदी करतात. यामुळे कोरोना महामारीमुळे देशोधडीला लागलेल्या ग्रामीण  भागातील नागरिकांना मोठा आर्थिक भुर्दंड सोसावा लागतो. महाराष्ट्र शासनातर्फे देण्यात आलेल्या कूपनलिका नादुरुस्त असल्याने तसेच काही ठिकाणी या कुपनलिकेतून येणाऱ्या  पाण्यामध्ये अळ्या येत असल्याने नागरिकांना मोठ्या समस्येला सामोरे जावे लागत आहे.

२७ गावांतील नागरिकांना पुरेशा सोयी सुविधा मिळत नसतांना देखील पालिकेच्या वतीने अवास्तव मालमत्ता कराची वसुली केली जात असून हा मालमत्ता कर कमी करावा आणि पाण्याची समस्या त्वरित न सोडविल्यास बुधवारी तीव्र आंदोलन करून महापालिकेवर मोर्चा काढत आमरण उपोषण करण्याचा इशारा भूमिपुत्र पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष चंद्रकांत मोटे यांनी दिला आहे.

-कुणाल म्हात्रे

डोंबिवलीत पूर्ववैमनस्यातून एकाची तलवारीने गळा चिरून हत्या

डोंबिवली :- ठाकुर्ली जवळील खंबाळपाडा मच्छी विक्रेत्या महिलेला तिच्या व्यवसायात मदत करणाऱ्या सहकाऱ्या सोबत तिच्या दिराने वाद घातला. आणि रागाच्या भरात त्यास जीवे मारण्याची धमकी दिली. मात्र या वादात स्व:ताचाच जीव गमावल्याची घटना समोर आली आहे. ही हत्या पूर्ववैमनस्यातून झाल्याचा संशय ही वर्तविण्यात येत आहे.

भानुदास चौधरी हे मासळी विकन्याचा व्यवसाय करतात. तसेच त्यांची वहिनी ही मासळी विकण्याचा व्यवसाय करीत असे. मात्र हितेश उर्फ काळ्या नकवाल हा फक्त भानुदास चौधरी यांच्या वाहिनीस व्यवसायात मदत करीत असे. आणि हा राग मनात ठेवून अनेक वेळा दोघांमध्ये भांडणही व्हायची. यानंतर पुन्हा एकदा असाच प्रकार झाला. दोघामध्ये कडाक्याचे भांडण झाले. भानुदास ने हितेश यास शेतावर बोलावले. भानुदास ने माझ्याकडे तलवार आहे असे त्यांना धमकावले. मात्र हितेश काल्याने तीच तलवार घेऊन भानुदास यांचा गळा चिरला. त्यात ते जखमी होऊन मरण पावले. सदर तक्रार त्यांच्या पुतण्याने टिळक नगर पोलिसात केली आहे.

दरम्यान वरिष्ठ पोलीस निरीक्षक, अजय अफाले यांनी आरोपीला तात्काळ अटक केली असून हत्येतील आरोपी गुन्हेगार पार्श्वभूमीचा आहे. यावर अधिक तपास केला जात असून विविध बाजूने हत्येच्या कारणांचा शोध सुरू असल्याचे पोलीसां कडून सांगण्यात आले आहे.

-संतोष दिवाडकर

टिटवाळ्यात आढळला मांडूळ जातीचा दुर्मिळ साप

टिटवाळा :  मांडा टिटवाळ्याच्या पश्चिम भागांत असणाऱ्या माऊली कृपा सोसायटीत मांडूळ जातीचा दुर्मिळ साप आढळून आल्याने त्याला पाहण्यासाठी परिसरात एकच गर्दी उसळली होती. या  सापाला देश विदेशात प्रचंड मागणी आहे. या सापाची कोट्यवधी रुपयांना बेकायदेशीरपणे तस्करी केली जाते. या सापामुळे अनेक दुर्धर आजार बरे होतात असा समाज आहे. तसेच मंत्र तंत्राचा वापर करून पैशांचा पाऊस या सापाच्या आधारे पाडता येतो अशी देखील  अंधश्रद्धा समाजात आहे.

अनेकदा अंधश्रद्धेतून या मुक्या प्राण्याचा हकनाक बळी दिला जातो. मात्र, याच दुर्मिळ मांडूळ जातीच्या सापाचे वॉर या प्राणी मित्र संस्थेचे सदस्य  सर्पमित्र निखील कांबळे यांनी प्राण वाचवत त्याला जीवनदान दिले आहे. 

मांडा टिटवाळ्याच्या पश्चिम भागांतील माऊली कृपा सोसायटीत स्थानिक नागरिकांकडून साप आढळून आल्याची माहिती मिळताच सर्पमित्र यांनी तातडीने या ठिकाणी धाव घेतली आणि सापाला सुरक्षितपणे हाताळून ताब्यात घेतले. त्याचबरोबर त्या ठिकाणी जमलेल्या नागरिकांना या सापाविषयी माहिती देत त्या विषयी समाजात चुकीच्या पसरवण्यात आलेल्या अंधश्रद्धा याबाबत माहिती दिली व वनविभागाच्या ताब्यात या सापाला  दिले.

-कुणाल म्हात्रे

कल्याण रामबाग जोशीबाग परिसरात साप आणि घोरपडीचा सुळसुळाट

कल्याण :- मागील काही दिवसांपासून कल्याण पश्चिमेतील रामबाग व जोशीबाग परिसरात मोठ्या प्रमाणात साप व घोरपड आढळून येत आहेत. याच भागात मच्छी मार्केट आणि पोलीस वसाहतीच्या पडीक खोल्या असल्याने यांचा वावर असावा असा तर्क लावला जात आहे. नेहमीच साप आणि घोरपड दृष्टी क्षेपात येते असल्याने परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

मागील आठवड्यात या परिसरात राहणाऱ्या सर्पमित्र सतीश बोबडे यांनी घोरपड पकडल्या असून एक घोरपड चार फुटाची दुसरी घोरपड दीड फुटाची आहे. परिसरात राहणाऱ्या महिलेच्या घरात घोरपड शिरल्याची माहिती सतीश बोबडे यांना मिळताच त्यांनी दोन्ही घोरपडी पकडून वन विभाग अधिकारी यांच्या स्वाधीन केले आहे.

सर्पमित्र सतीश बोबडे यांच्या माहितीनुसार स्टेशन परिसरात असलेल्या पोलीस लाईन मध्ये लोकवस्ती नसल्याने या ठिकाणी मोठ्या प्रमाणात झाडे वाढली असून यामध्ये सरपटणाऱ्या वन्यजीव प्राण्यांची वाढ झाली आहे. तेथूनच हे घोरपड व साप लोकवस्तीमध्ये येत आहे. त्यामुळे पालिका प्रशासनाने नेहमीच या भागात स्वच्छता आणि औषध फवारणी केल्यास वन्यजीव प्राण्यांचे प्रमाण काही प्रमाणात कमी होईल.

-रोशन उबाळे

‘वाहतूककोंडी टाळण्यासाठी मोठ्या गृहप्रकल्पांच्या ठिकाणी अंडरपास अथवा उड्डाणपूल पुल उभारा’; मनसे आमदार राजू पाटील यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

कल्याण : मेगा टाऊनशिपला परवानगी देताना भविष्यात वाढणाऱ्या वाहतुकीच्या दृष्टीकोनातून संबंधित विकासकाला प्रकल्प ठिकाणी अंडरपास अथवा उड्डाणपूल करणे बंधनकारक करावे अशी मागणी मनसे आमदार राजू पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.

  राज्यातील विविध मुख्य शहरांमध्ये मेगा टाऊनशिप प्रकल्प सुरु असून कल्याण ग्रामीण मतदारसंघातही लोढा पलावा, रुणवाल मायसिटी, रुणवाल गार्डन, अनंतम् रिजन्सी सारखे मेगा टाऊनशिप प्रकल्प सुरु आहेत. त्यातील काही प्रकल्प कार्यरत झाले आहेत. त्यामुळे कल्याण ग्रामीण भागातील लोकवस्ती भरमसाठ वाढली आहे.तसेच हे सर्व प्रकल्प रेल्वे लोकल सेवेपासून लांब असल्यामुळे यामध्ये राहणारे बहुतांश रहिवासी नोकरी-व्यवसायानिमित्त रस्ते वाहतुकीवर अवलंबून आहेत. त्यामुळे या प्रकल्पांना जोडणाऱ्या कल्याण-शिळ व काटई-बदलापूर-तळोजा रस्त्यावर नेहमीच वाहतुक कोंडी असते त्यामुळे वाहतूक कोंडी फोडण्यासाठी उड्डाणपूल अथवा अंडरपास अशी मागणी मनसे आमदार राजू पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली असून तसे पत्रही दिले आहे.

सध्या लोढा पलावा, कासा रिओ, रुणवाल गार्डन, रुणवाल मायसिटी, अनंतम् रिजन्सी हे सर्व मेगा टाऊनशिप प्रकल्प कल्याण-शिळ रस्त्याला जोडण्यात आले आहेत. तर लोढा लेकशोर प्रकल्प काटई-बदलापूर रस्त्याला जोडण्यात आला आहे. ज्या प्रकल्पांमध्ये प्रवेश करण्यासाठी बायपासही उपलब्ध नाही. आधीच कल्याण-डोंबिवली, भिवंडी, बदलापूर, अबरनाथ, उल्हासनगर मध्ये राहणाऱ्या नागरिकांना कल्याण-शिळ रस्त्याशिवाय पर्याय नसून या रस्त्यावर वाहतूक कोंडीचा प्रश्न नेहमीचा आहे, त्यातच आता अधिक भर पडत आहे.

अशा मेगा टाऊनशिपला परवानगी देताना परिसरात वाढणारी लोकवस्ती गृहीत धरुन प्रकल्पाच्या ठिकाणी उड्डाणपूल अथवा अंडरपास करणेबाबत धोरण आखणे आवश्यक आहे. तसे न केल्याने आज मुख्य रस्त्यावर वाहतुककोंडी होताना दिसते. प्रकल्प कार्यरत होऊन १०-१० वर्षे झाली तरी उड्डाणपूल किंवा अंडरपास मंजूर होत नाही व मंजूर झाल्यास निधी अभावी पूर्ण होण्यास पुढील १० वर्षाचा काळ लागतो. अशावेळी सर्वसामान्य नागरिकांना सततच्या वाहतुककोंडीचा सामना करावा लागतो आहे, तोपर्यंत विकासक प्रकल्प पूर्ण करुन निघून गेलेले असतात. तरी या महत्त्वाच्या विषयावाबत धोरणात्मक निर्णय घ्यावा कारण हा प्रश्न केवळ कल्याण ग्रामीण मतदार संघापुरता मर्यादित नाही.

ठाणे, मुंबई, नवी मुंबई, पुणेसह राज्यातील विविध शहरांमध्ये असे प्रकल्प सुरु आहेत आणि सगळीकडे अशा अडचणी निर्माण झाल्या आहेत व भविष्यात होणार आहेत. त्यामुळे या प्रकल्पामध्ये राहणाऱ्या नागरिकांसह स्थानिक प्रवाशांना त्रास सहन करावा लागतो. तरी याबाबत तातडीने निर्णय घेतला पाहिजे व मेगा टाऊनशिपसाठी परवानगी देताना वाहतुक कोंडीच्या दृष्टीकोनातून विकासकाला प्रकल्प ठिकाणी उड्डाणपूल अथवा अंडरपास बंधनकारक करावा व त्याचा अतिरिक्त फायदा संबंधित विकासकांना सदर प्रकल्पामध्ये द्यावा असे आमदार यांचे म्हणणे असून याबाबत त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे याच्याशी पत्रव्यवहार केला आहे.

-कुणाल म्हात्रे

केडीएमसीतर्फे १८ वर्षावरील विदयार्थ्यांचे महाविदयालयात जाऊन लसीकरण

कल्याण : सार्वजनिक आरोग्य व कुटूंब कल्याण, महाराष्ट्र राज्य यांनी निर्देशित केल्या नुसार “युवा स्वास्थ कोविड-१९  च्या लसीकरण मोहिमेचे नियोजन” कल्याण डोंबिवली महानगरपालिके मार्फतही करण्यात येत असून आता महापालिका क्षेत्रातील १८  वर्षावरील महाविदयालयीन विदयार्थी/ विदयार्थींनी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी या सर्वांचेच लसीकरण आता प्रत्यक्ष महाविदयालयात जावून केले जाणार आहे. यासाठी महापालिका क्षेत्रातील महाविदयालयातून तेथील विदयार्थी व इतर कर्मचारी वर्गाची यादी प्राप्त करुन त्यानुसार महापालिकेच्या आरोग्य पथकामार्फत त्यांचे लसीकरण २५ ऑक्टोबर ते २ नोव्हेंबर या कालावधीत केले जाणार आहे.

महापालिका क्षेत्रात आतापर्यंत एकुण ८ लाख ९८ हजार ९० नागरिकांनी कोविड लसीची पहिली मात्रा घेतली असून एकुण ४ लाख ४९ हजार ४६ नागरिकांनी लसीची दुसरी मात्रा घेतली असून आतापर्यंत १३ लाख ४७ हजार १३६ इतके लसीकरण महापालिका क्षेत्रात झाले आहे. लसीकरणास अधिकाधिक चालना देण्यासाठी भारतातील शंभर कोटी लसीकरण टप्पा पूर्णत्वाचे औचित्य साधून महापालिकेच्या महानगरपालिकेच्या विविध नागरी आरोग्य केंद्रात लसीकरणासाठी आलेल्या शंभराव्या लाभार्थ्याचा पुष्पगुच्छ देवून सत्कार करण्यात आला आणि सर्व नागरी आरोग्य केंद्रावर १००  करोड लसीकरण उत्सवाचा टप्पा संपन्न करण्यात आला.

कोविड लसीकरण हे पूर्णपणे सुरक्षित असून त्यापासून कोणत्याही प्रकारचा धोका संभवत नाही. तसेच लसीकरण केल्याने संबंधीत व्यक्तीस संसर्गाचा धोका कमी असतो आणि त्यास कोविड झाल्यास त्याचा प्रादुर्भावही कमी प्रमाणात राहतो. तसेच कोविड लसीकरणामुळे मृत्यूचे प्रमाणही कमी होते. महापालिकेत आता मुबलक प्रमाणात लस साठा शासनाकडून उपलब्ध होत आहे. त्यामुळे नागरिकांनी जास्तीत जास्त प्रमाणात लसीकरणास प्रतिसाद दिल्यास महापालिका क्षेत्रातील कोविडचा संसर्ग कमी होण्यास तसेच येणा-या तिस-या लाटेला थोपविण्यास मदत होऊ शकेल.

 तरी महापालिका क्षेत्रातील जास्तीत जास्त नागरिकांनी आपल्या घरा नजिकच्या लसीकरण केंद्रावर जाऊन आपले कोविड लसीकरण करावे असे आवाहन महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी व वैदयकीय आरोग्य अधिकारी डॉ. अश्विनी पाटील यांनी केले आहे. त्याचप्रमाणे आपल्या घरात किंवा घराशेजारी आजारी, वृध्द नागरिक कोविड लसीकरणापासून वंचित राहिले असल्यास त्याची माहिती नजीकच्या नागरी आरोग्य केंद्राकडे कळवावी म्हणजेच या नागरिकांच्या घरी जावून त्यांचे लसीकरण महापालिकेच्या आरोग्य पथकामार्फत केले जाईल.

-कुणाल म्हात्रे