कल्याणमध्ये एअरटेल मोबाईल टॉवरसाठी लाखो रुपयांची वीजचोरी; सुयोग टेलेमॅटिक्स विरोधात गुन्हा दाखल

कल्याण : कल्याण पश्चिमेतील कृषी उत्पन्न बाजार समिती (एपीएमसी मार्केट) इमारतीच्या छतावर असलेल्या एअरटेल मोबाईल टॉवरसाठी फिडर पिलरमधून थेट वीजचोरी होत असल्याची घटना उघडकीस आली आहे. गेल्या सहा महिन्यात टॉवरसाठी ८ लाख १९ हजार रुपये किंमतीची ५६ हजार १५० युनिट वीज चोरून वापरल्याबद्दल मे. सुयोग टेलेमॅटिक्स विरुद्ध महात्मा फुले चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

वीजचोरी शोध मोहिमेत शिवाजी चौक शाखा एकचे सहायक अभियंता मोहम्मद आरिफ शब्बीर खान, कर्मचारी विलास गायकवाड यांच्या पथकाने ८ ऑक्टोबर रोजी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सी टाइप इमारतीच्या छतावरील मोबाईल टॉवरच्या वीज पुरवठ्याची तपासणी केली. याठिकणी अधिकृत वीजजोडणी न घेता विनामीटर थेट वीजवापर होत असल्याचे आढळले. सुयोग टेलेमॅटिक्सने एअरटेल मोबाईल टॉवरसाठी काळ्या रंगाची ४० मीटर केबल वापरून फिडर पिलरमधून थेट व अनधिकृतपणे वीजचोरी केल्याचे तपासणीतून उघड झाले.

१८ मे पासून वीज चोरीचा हा प्रकार सुरू असल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार वीज चोरीचे देयक व दंड भरण्याबाबत सुयोग टेलेमॅटिक्सला नोटीस बजावण्यात आली. परंतु संबंधित रकमेचा भरणा न झाल्याने सुयोग टेलेमॅटिक्स विरुद्ध सहायक अभियंता खान यांनी फिर्याद दिली. या फिर्यादीवरून महात्मा फुले चौक पोलिसांनी वीज कायदा २००३ च्या कलम १३५ नुसार सुयोग टेलेमॅटिक्स विरुद्ध वीजचोरी गुन्हा दाखल केला आहे.

-कुणाल म्हात्रे

सहजानंद चौकात वृद्धाला चिरडलं; अपघात सीसीटीव्हीत कैद

कल्याण :- कल्याण पश्चिमेतील सहजानंद चौंकात कामावर जात असताना एका वृद्धाला भरधाव जाणाऱ्या वाहनाने चिरडले आहे. रविवारी सकाळी वाहनांची रहदारी कमी असल्याने वाहनाने पळ काढला आहे. मात्र चिरडण्याचे चित्रीकरण सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहे. याबाबत लवकरच वाहनधारक महात्मा फुले चौक पोलिसांच्या ताब्यात असणार आहे. या घटने प्रकरणी अज्ञात वाहनधारकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आले आहे.

पश्चिमेतील सहजानंद चौकात रविवारी सकाळी खडक पाडा भागातील सर्वोदय नगर मध्ये राहणारे अनिल महादेव मांडुळकर(६४) हे कामासाठी निघाले असता चौकात भरधाव वाहनाने त्यांना चिरडले. सकाळी रहद्दारी कमी असल्याने याचा फायदा घेत वाहनधारक पळ काढण्यात यशस्वी झाला. मात्र सभोवताली लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात वाहनाचे नंबर फलक आणि किती निर्दयी पणे चिरडले याचे भयावाहक चित्रीकरण झाले आहे. दरम्यान या घटनेचा तपास महात्मा फुले चौक पोलिसांनी सुरू केला असून लवकरच निर्दयीं वाहनचालक ताब्यात असणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या घटनेने सहजानंद चौक परिसर हादरून गेले होते.

-रोशन उबाळे

पत्रकार कुणाल म्हात्रे गोल्डन प्रेस्टीज पुरस्काराने सन्मानित

कल्याण : नवी मुंबई परिसरात सामाजिक कार्यात अग्रेसर असणाऱ्या होप मिरर फाउंडेशनच्या वतीने पत्रकारितेतील कार्याबद्दल युवा पत्रकार कुणाल म्हात्रे यांना गोल्डन प्रेस्टीज अवॉर्ड 2021 या पुरस्काराने अंधेरी येथील दिमाखदार कार्यक्रमात सन्मानित करण्यात आले. यावेळी सिनेअभिनेते अरुण बक्षी, सिनेअभिनेत्री आरती नागपाल, होप मिरर फाउंडेशनचे अध्यक्ष रमजान शेख यांच्याहस्ते सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.

होप मिरर फाउंडेशनने गुरुवारी पहिला गोल्डन ह्यूमैनिटी पुरस्कार आणि पहिला गोल्डन प्रेस्टीज पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. यावेळी भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे प्रदेश अध्यक्ष विक्रांत पाटील, एसीपी सुनील बोंडे आणि चंद्रकांत मते हे पुरस्कार सोहळ्याचे प्रमुख पाहुणे होते. या कार्यक्रमाला एकता मंचने पाठिंबा दिला. वर्सोवा, अंधेरी येथे झालेल्या कार्यक्रमात संपुर्ण भारतातील  पुरस्कार विजेत्यांना सन्मानित करण्यात आले.

 सामाजिक कार्यकर्ते सागर उत्वल, शाहनवाज शेख, डॉ नूरी परी, मनीष गुप्ता, सुमन ऑस्कर, अरुणा नाभ, सदफ शेख, सिंधू नायर, स्वामी अभिनंदगिरी महाराज, स्वप्नील शिरसाठ आणि सुंदरी ठाकूर यांना चांगल्या कार्यासाठी कौतुकाचे प्रतिक म्हणून गोल्डन ह्यूमैनिटी पुरस्कार देण्यात आला.  तर समाजकल्याण क्षेत्र सुप्रसिद्ध कलाकार, गायक आणि विनोदी कलाकारांना त्यांच्या उद्योगातील उत्कृष्टतेसाठी गोल्डन प्रेस्टीज पुरस्कार प्राप्त झाला. मीनाक्षी दीक्षित, केट शर्मा, निकिता रावल, व्हीआयपी, गायक दिलीप सेन, संदिप सोपरकर, आरती नागपाल, पंकज बेरी, शर्लिन चोप्रा, शिव्या पठाणिया, पायल घोष, नायरा बॅनर्जी, वेरोनिका वनीज आणि अरुण बक्षी, पत्रकार कुणाल म्हात्रे, मिलिंद जाधव यांना गोल्डन  प्रेस्टीजियस पुरस्कार २०२१ देऊन सन्मानित करण्यात आले.

होप मिरर फाउंडेशन ही नवी मुंबई स्थित सामाजिक संस्था आहे. जी लॉकडाऊन, मार्च २०२० पासून वंचितांच्या कल्याणासाठी कार्यरत आहे. होप मिरर फाउंडेशनचे संस्थापक आणि संचालक रमजान शेख यांनी कृतज्ञता व्यक्त करताना “सामाजिक कार्यासाठी काम करणाऱ्या लोकांच्या कौतुकास्पद प्रयत्नांचे कौतुक करणे हा हेतू होता. त्यांचे कल्याण करा आणि त्यांचा सन्मान करा या उद्देशाने हा पुरस्कार वितरण सोहळा आयोजित केल्याचे रमजान शेख यांनी सांगितले.

-संतोष दिवाडकर