मांडा-टिटवाळ्यातील ३१ वीज चोरांविरुद्ध गुन्हा दाखल

कल्याण :  महावितरणच्या कल्याण ग्रामीण विभागात मांडा-टिटवाळा येथील ३१ जणांविरुद्ध ८ लाख ४ हजार ४८० रुपयांची ५९ हजार ८५५ युनिट वीज चोरल्याप्रकरणी मुरबाड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष पथकांच्या तपासणी मोहिमेत ८ ऑक्टोबरला ही वीजचोरी उघडकीस आली होती.

दिनेश धर्मा घायवत, शितल विश्वनाथ गांगुर्डे, मोहम्मद याकूब वायलाल, भारती ज्ञानू वरपे, तरुना गौतम प्रधान, विजयदत्त किसन गवळे, नरेश नंदकुमार अमुकर, पदमावती दशरथ पगारे, बळीराम वामन चौधरी, खातुन शहाजान खान, परशुराम यशवंत कुचीकुरे, लक्ष्मण हरी पारधी, आयशा खातून मोहम्मद, के के भोईर, संदिप संभाजी मालेकर, छोटेलाल पी गुप्ता, गणेश अनिल काशिवले, विकास अनिल काशिवले, कोंडु भिल्या काशिवले, स्वप्निल नटूराम मेंढे, विष्णु मोहन धिंडके, प्रकाश जाधव, शितल शांताराम दळवी, निशिगंधा  निलेश ताम्हणकर, महिपालभाई पी गांधी, रोहिणी सचिन पगारे, सुमित्रा लक्ष्मीराम, अन्सारी झरीना, बाळु गोविंद गायकर, एम .एस. ओमकार, मयुर विनोद तिवारी (सर्व राहणार मांडा व टिटवाळा परिसर) अशी या प्रकरणी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत.

संबंधितांकडून मीटरमध्ये फेरफार, मीटर बायपास आणि वीजपुरवठा खंडित केलेल्या ठिकाणी परस्पर केबल जोडून वीजचोरी होत असल्याचे विशेष पथकाच्या तपासणीत आढळून आले होते. सहायक अभियंता निलेश महाजन यांच्या फिर्यादीवरून मुरबाड पोलीस ठाण्यात संबंधित ३१ जणांविरुद्ध वीज कायदा २००३ च्या कलम १३५  नुसार वीजचोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

-कुणाल म्हात्रे

२७ गावातील नागरिकांना डिसेंबर पर्यंत अमृत योजनेमार्फत मिळणार मुबलक पाणी; पालिका आयुक्तांचे आश्वासन

कल्याण : २७ गावातील नागरिकांना डिसेंबर पर्यंत अमृत योजनेमार्फत मुबलक पाणी मिळणार असल्याचे आश्वसन पालिका आयुक्तांनी भूमिपुत्र पार्टीच्या शिष्टमंडळाला दिले आहे. तसेच २७ गावातील सन २००२ पर्यंतच्या घरांचा मालमत्ता कर देखील कमी करण्यासाठी आयुक्तांनी सकारात्मकता दर्शवली आहे. कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील २७ गावांमध्ये पिण्याची समस्या गंभीर झाली असून या बाबत भूमिपुत्र पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष चंद्रकांत मोटे यांनी आज मोर्चा काढण्याचा इशारा  निवेदनाद्वारे पालिका आयुक्तांना दिला होता. त्यानुसार आज भूमिपुत्र पार्टीच्या शिष्टमंडळाला आयुक्तांनी बोलावत त्यांचे म्हणणे ऐकून घेतले. यावेळी चंद्रकांत मोटे यांच्यासह मोहन काळन, रवींद्र भंडारी, प्रकाश पाटील आणि गुरुनाथ पाटील आदी पदाधिकारी उपस्थित होते.  

कल्याण डोंबिवती महानगर पालिकेतील ग्रामीण भागातीत २७  गावे शासन निर्णयामुळे समाविष्ट करण्यात आली आहेत. परंतु सदर २७ गावांमधील दावडी, सोनारपाडा आदी गावातील नागरिक पिण्याचे पाणी, दिवाबत्ती, रस्ते  आदी सुविधांपासून वंचित आहेत. पिण्याच्या पाण्याची सोय उपलब्ध नसल्याने येथील नागरिक दररोज खाजगी टॅकरने पाणी खरेदी करतात. यामुळे कोरोना महामारीमुळे देशोधडीला लागलेल्या ग्रामीण  भागातील नागरिकांना मोठा आर्थिक भुर्दंड सोसावा लागतो. महाराष्ट्र शासनातर्फे देण्यात आलेल्या कूपनलिका नादुरुस्त असल्याने तसेच काही ठिकाणी या कुपनलिकेतून येणाऱ्या  पाण्यामध्ये अळ्या येत असल्याने नागरिकांना मोठ्या समस्येला सामोरे जावे लागत आहे.

२७ गावांतील नागरिकांना पुरेशा सोयी सुविधा मिळत नसतांना देखील पालिकेच्या वतीने अवास्तव मालमत्ता कराची वसुली केली जात असून हा मालमत्ता कर कमी करावा आणि पाण्याची समस्या त्वरित न सोडविल्यास बुधवारी तीव्र आंदोलन करून महापालिकेवर मोर्चा काढत आमरण उपोषण करण्याचा इशारा भूमिपुत्र पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष चंद्रकांत मोटे यांनी दिला होता. त्यानुसार आज मोर्चाची तयारी देखील करण्यात आली होती. मात्र पोलिसांनी मध्यस्थी करत त्यांच्या शिष्टमंडळाची आयुक्तांशी भेट घडवून आणली. यावेळी आयुक्तांनी २७ गावातील नागरिकांना अमृत योजनेच्या माध्य्मानातून डिसेंबर पर्यंत मुबलक पाणी मिळणार असून ज्यांची घरे सन २००२ पर्यंतची आहेत त्यांनी आपल्या मालमत्ता कारच्या पावतीसह अर्ज केल्यास त्यांचा मालमत्ता कर कमी केला जाईल असे आश्वासन पालिका आयुक्तांनी दिले असल्याची माहिती चंद्रकांत मोटे यांनी दिली.

-कुणाल म्हात्रे

लेखी आश्वासनानंतरही रस्ता न बनविल्याने म्हारळ येथील स्थानिकांनी पुकारले आमरण उपोषण

कल्याण : लेखी आश्वासनानंतरही सार्वजनिक बांधकाम विभागाने रस्ता न बनविल्याने स्थानिकांनी आमरण उपोषण सुरु केले आहे.कल्याण माळशेज महामार्गावरील म्हारळगाव येथे गेल्या अनेक महिन्यांपासून म्हारळगाव थारवाणी बिल्डिंग ते ताबोर आश्रम कांबा पावशे पाडा पर्यंत मोठ्या प्रमाणात खड्ड्यांचे साम्राज्य झाले आहे. त्यामुळे येथील रस्ता बनविण्याच्या मागणीसाठी येथील स्थानिकांनी २९ सप्टेंबर रोजी एकदिवसीय उपोषण करत आंदोलन केले होते. यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी हा रस्ता २० ऑक्टोंबर पर्यंत बनविण्याचे लेखी आश्वासन दिले होते. मात्र लेखी आश्वासन देऊन देखील रस्त्याचे काम सुरु न झाल्याने येथील स्थानिकांनी आमरण उपोषणाचे हत्यार उगारले आहे.   

कल्याण माळशेज महामार्गावरील म्हारळ ते ताबोर आश्रम पर्यंतच्या रस्त्याची दुरवस्था झाली असून या ठिकाणी रोज अपघात होत असतात, स्थानिकानी सतत सार्वजनिक बांधकाम विभागाशी संपर्क केला तरीही कोणती ही कारवाई होत नाही. यामुळे स्थानिक सामाजिक कार्यकर्ते रमेश हिंदूराव, महेश देशमुख, अश्विन भोईर, विवेक गंभीरराव, विशाल मोहपे, योगेश देशमुख, लक्ष्मण सुरोशी, निकेश पावशे, अशफ़ाक शेख, प्रवीण नागरे, दत्तू सांगळे, दिलीप भोईर, जगन्नाथ शेट्टी, रमेश गायकवाड आदी सामाजिक कार्यकर्त्यांनी एक महिन्यापूर्वी आंदोलन केले होते. तेव्हा सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंता तृप्ती नाग यांनी २० ऑक्टोंबर पर्यंत या रस्त्याचे डांबरीकरण करण्याचे लेखी आश्वसन दिले होते.  

      मात्र अद्यापही या रस्त्याचे काम सुरु न झाल्याने नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे असून धुळीचे देखील साम्राज्य पसरले आहे. त्याचप्रमाणे रस्त्याच्या दोन्ही बाजूला गवत देखील वाढले आहे. त्यामुळे आता रस्त्याचे काम सुरु होईपर्यंत हे आमरण उपोषण सुरु ठेवणार असून लेखी आश्वसनाची पूर्तता न करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी असल्याचे सामाजिक कार्यकर्ते रमेश हिंदुराव यांनी सांगितले.

     तर याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंता तृप्ती नाग यांच्याशी संपर्क साधला असता, या रस्त्याच्या कामाची वर्क ऑर्डर निघाली असून कामासाठी ठेकेदार देखील नेमण्यात आला आहे. काही तांत्रिक अडचणीमुळे काम सुरु झाले नसून येत्या दोन दिवसांत कामाला सुरवात होईल असे त्यांनी सांगितले.

-कुणाल म्हात्रे