‘या’ निमित्ताने कल्याण पूर्वेत आमदार खासदार दिसले एकत्र

कल्याण : कल्याण पूर्वेत ‘अंतर्राष्ट्रीय अग्रहरि वैश्य’ समाजाच्या वतीने महाराजा ‘श्री अग्रसेन’ यांची ५१४५ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाला कल्याण लोकसभेचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, कल्याण पूर्वचे आमदार गणपत गायकवाड आणि साध्वी सरस्वती प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. विशेष म्हणजे जवळपास दोन वर्षांनी खासदार शिंदे आणि आमदार गायकवाड हे एकाच मंचावर उपस्थित होते.

       यावेळी डॉ. श्रीकांत शिंदे यांनी महाराजा अग्रसेन यांच्याशी संबंधित महत्त्वपूर्ण घटनांचा उल्लेख करत सांगितले कि, जे महाराजा अग्रसेन यांनी ५१४५ वर्षे आधी सांगितले होते त्या गोष्टी आज देखील समाजामध्ये लागू होतात. संस्थेचे राष्ट्रीय वरिष्ठ अध्यक्ष योगेश अग्रहरी (के. एस. गुप्ता) यांनी सांगितले कि, आम्ही अग्रहरी समाजाचे लोकं महाराजा श्री अग्रसेन यांचे वंशज असून आज त्यांच्या जयंती समारोहात त्यांच्या आठवणींना उजाळा देत समाजाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी काय काय करता येईल याबाबत चर्चा करण्यात आली.

यावेळी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे,  आमदार गणपत गायकवाड यांच्यासह कथा वाचक साध्वी सरस्वती, शिवसेना कल्याण पूर्व संपर्क प्रमुख शरद पाटिल, अंतराष्ट्रीय अग्रहरि समाचाचे मुकेश अग्रहरि, दिनेश अग्रहरि आदींसह इतर अनेक मान्यवर उपस्थित होते.

-कुणाल म्हात्रे

खडकपाडा गोदरेज हिल परिसरात युवकाची हत्या; शुल्लक कारणाची बाचाबाची ठरली जीवघेणी

कल्याण :- कल्याण पश्चिम खडकपाडा परिसरातील गोदरेज हिल भागात क्षुल्लक कारणाने एका तरुणाची हत्या झाली आहे. तीक्ष्ण हत्याराने भोकसल्याने खाजगी रुग्णालयात उपचार दरम्यान सदर तरुण मयत झाला. या प्रकरणी एका आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे.

खडक पाडा परिसरातील गोदरेज हिल भागात गुरुवारी रात्री १२ ते १ च्या सुमारास दोंघांची रस्त्यात बाचाबाची झाली. शब्दाला शब्द वाढत गेले आणि या बाचाबाचीचे परिवर्तन हाणामारीत झाले. या दरम्यान शेख खान या आरोपीने तीक्ष्ण हत्याराने वार केले. वार जिव्हारी लागल्याने खाजगी रुग्णालयात मुकेश देसाई या तरुणाचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला. या प्रकरणी शेख खान या इसमावर हत्येचा गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. खडकपाडा पोलिसांनी घटनेची माहिती घेऊन कसोशीने पुढील तपास सुरू केला आहे.

-रोशन उबाळे

ठाकुर्लीतील खंबाळपाड्यात एकाची हत्या तर दुसरा गंभीर जखमी

ठाकुर्ली :- खंबाळपाडा ९० फुटी रस्त्यावर रात्री १ च्या सुमारास रिक्षा अडवून लुटण्याचा बहाण्याने तीक्ष्ण हत्याराने वार करण्यात आले. यात एका इसमाचा मृत्यू झाला असून डोंबिवलीच्या टिळकनगर पोलीस स्थानकात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. ही हत्या कशी घडली याचा सखोल तपास पोलिसांकडून सुरू झाला आहे.

खंबाळपाडा मधील ९० फुटी रस्त्यावर काल मध्यरात्रीच्या सुमारास ही धक्कादायक घटना घडली आहे. अज्ञातांनी रिक्षामधून खाली उतरवून दोन प्रवाशांना बेदम मारहाण केली. लुटीच्या इराद्याने मारहाण केली असल्याचं बबलू चव्हाण या जखमी इसमाने पोलिसांना सांगितले आहे. याचं घटनेत बेचलप्रसाद चव्हाण यांचा गळा कापून त्यांना रेल्वे ट्रॅक वर फेकले. तर जखमी बबलू चव्हाण यांनी झाडीमध्ये लपून स्वतःचा जीव वाचवला अशी माहिती त्याने दिली आहे. या हल्ल्यात तो ही गंभीर जखमी झाला आहे. दरम्यान लुटीच्या इराद्याने एकाची हत्या झाल्याच्या माहितीने परिसरात खळबळ माजली आहे .

पंचनामा आणि मिळालेल्या माहितीच्या आधारे डोंबिवली रेल्वे पोलीस व टिळक नगर पोलिसांनी तपास सुरू केला आहे. यात आणखी कोणत्या बाजू असू शकतात का ? याचा कसोशीने शोध सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.

-रोशन उबाळे

सामाजिक क्षेत्रातील हसरा चेहरा निखळला; अरुण दिघेंच्या निधनानं कल्याण पूर्वेवर शोककळा

कल्याण :– कल्याण पूर्वेतील सामाजिक कार्यकर्ते व भाजपाचे सरचिटणीस अरुण दिघे यांचे आज हृदय विकाराच्या तीव्र झटक्याने आकस्मिक निधन झाले आहे. त्यांच्या अचानकपणे जाण्याने त्यांच्या कुटुंबियांसह संपूर्ण कल्याण पूर्वेतील सामाजिक तसेच राजकीय वर्तुळात हळहळ व्यक्त केली जात आहे.

मिळालेल्या प्राथमिक माहिती नुसार अरुण दिघे हे कारने आपल्या गावी जाण्यासाठी निघाले होते. मात्र त्यांना प्रवासा दरम्यानच हृदय विकाराचा तीव्र झटका आला होता. यानंतर त्यांना खासगी इस्पितळात दाखल करण्यात आलं. मात्र इस्पितळात त्यांना मृत घोषित करण्यात आले. घटनेची माहिती मिळताच सामाजिक तसेच राजकिय क्षेत्रातील नेत्यांनी,पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी इस्पितळाकडे धाव घेतली. त्यांच्या निधनाच्या बातमी नंतर कल्याण पूर्वेत शोककळा पसरली आहे.

अरुण दिघे हे पूर्वापार सामाजिक क्षेत्रात कार्यरत होते. याचबरोबर ते राजकीय पक्षाचे देखील पदाधिकारी म्हणून जबाबदारी पार पाडत होते. सामाजिक क्षेत्रात काम करत असताना त्यांनी असंख्य गरजूंना मदत केली आहे. यासाठी अनेकदा त्यांनी पक्ष बाजूला ठेवून समाजकार्य केल्याचे देखील बोलले जाते. काही मंडळ,संस्था यांच्याशी देखील ते संलग्न होते. तर क्रीडा क्षेत्रासाठी देखील त्यांचे अत्यंत मोलाचे योगदान लाभले आहे.

राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी ते भारतीय जनता पार्टी असा एक त्यांचा राजकिय प्रवास. मात्र असे असतानाही पक्ष बाजूला ठेवून त्यांनी हितसंबंध जोपासले होते. कल्याण पूर्व आमदार गणपत गायकवाड आणि माजी नगरसेवक अभिमन्यू गायकवाड यांचे ते खंदे समर्थक म्हणून ओळखले जात होते. सर्वांना एकत्रित बांधून सलोख्याचे संबंध त्यांनी निर्माण केले होते. म्हणूनच इतर राजकीय पक्षांत देखील त्यांचे मैत्रीपूर्ण संबंध आहेत. पक्षाची कोणतीही आंदोलने, मेळावे, कार्यक्रम यात ते हिरहिरीने पुढाकार घेत. याचबरोबर सार्वजनिक जयंती, उत्सव, शिबिरे आणि विविध उपक्रमात त्यांचा पुढाकार असे.

समर्थक आणि विरोधक या दोघांनाही हसऱ्या चेहऱ्याने उत्तर देण्याची त्यांची एक कला होती ज्यातून त्यांनी असंख्य मनांवर अधिराज्य केले होते. मात्र कल्याण पूर्वेचा हाच उमदा आणि हसरा चेहरा निखळल्याने कधीही न भरून येणारी पोकळी निर्माण झाली आहे असे त्यांचे निकटवर्तीय आता म्हणू लागले आहेत. अश्या या व्यक्तीमत्वास ‘एम एच मराठी’ कडून ‘भावपूर्ण श्रद्धांजली’.

-संतोष दिवाडकर

कल्याणमध्ये अंमली पदार्थ सेवन आणि वाढत्या गुन्हेगारीने माजवले स्तोम; आमदार गणपत गायकवाड यांची आक्रमक पवित्रा

छाया – कुणाल म्हात्रे

कल्याण : कल्याण मधील वाढत्या अमली पदार्थांच्या विक्री व सेवना पाठोपाठ वाढणाऱ्या गुन्हेगारी बाबत शासन तसेच पोलीस प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देण्यासाठी आमदार गणपत गायकवाड यांच्या नेतृत्वात भारतीय जनता पार्टी कार्यकर्त्यांनी कल्याण पूर्वेतील काटेमानिवली येथे आंदोलन केले.

कल्याण शहरातील पूर्व भागात वारंवार होणारी गुन्हेगारी व दहशतीचे वातावरण नुकत्याच वयात आलेल्या मुलांना व्यसनाच्या आधीन लावणारे व त्या अनुषंगाने होणारी अंमली पदार्थाची विक्री व सेवन ही चिंताजनक बाब बनली आहे. या सर्वांना वाचा फोडण्यासाठी भारतीय जनता पार्टी आमदार गणपत गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टी कल्याण मंडळ अध्यक्ष संजय मोरे यांच्या नियोजनात आंदोलन छेडून सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला.

मागील काही काळापासून कल्याण पूर्वेत अश्या अनेक घटना समोर येत आहेत. रातोरात लोकांच्या गाड्या फोडणे, चोऱ्या माऱ्या, लुटमार, मारहाण, टोळके करून रस्त्यांवर धिंगाणा घालणे अशा घटना वारंवार पुढे येत आहेत. या घटनेत प्रामुख्याने घरच्यांनी मोकाट सोडलेली ऐन विशीतील नुकतेच मिसरुट फुटलेल्या नवतरुणांचा सर्वाधिक समावेश असल्याची धक्कादायक बाब समोर आलेली आहे. कल्याण पूर्वेतील कोळसेवाडी पोलीस स्थानकात अश्या अनेक तक्रारी देखील प्राप्त होऊ लागल्या आहेत. आणि आणखीन धक्कादायक बाब म्हणजे याच गुन्हेगारांच्या पाठीमागे काही राजकीय नेतेमंडळी देखील हस्तक्षेप करीत असतात. त्यामुळे कुणाच्याही दबावाला न जुमानता गुन्हेगारी रोखण्यासाठी पोलिसांनी शक्य तितकी कठोर पावलं उचलावी आणि संबंधित गुन्हेगारांना अद्दल घडवावी अशी अपेक्षा भाजपा कल्याण पूर्व कडून केली जात आहे. तर पालकांनी देखील आपला पाल्य घराबाहेर काय करतो ? कुठे जातो ? याचाही सुगावा आताच लावलेला बरा. अन्यथा भविष्यात पश्चाताप करायची वेळ येऊ नये म्हणजे मिळवलं.

-संतोष दिवाडकर

‘केडीएमसी’च्या ताफ्यात ‘सीएनजी’वर धावणाऱ्या नवीन घंटागाड्या

कल्याण :- कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात घनकचरा व्यवस्थापन अंतर्गत कचरा संकलनासाठी वापरत असणाऱ्या घंटागाडीच्या ताफ्यात आता सीएनजीवर धावणाऱ्या घंटागाड्या येणार आहेत. कल्याण डोंबिवली मनपाच्या ताफ्यात डिझेलवर धावणाऱ्या मनपाच्या ११३, खाजगी ५७ घंटागाड्या असुन १२२ प्रभागातील ओला, सुका कचरा सकंलनासाठी त्यांचा वापर होत आहे. सोमवारी नवीन सीएनजी वर धावणाऱी पहिली घंटागाडी मनपाच्या ताफ्यात दाखल झाली आहे. 

मनपाच्या ताफ्यात सीएनजीवर धावणाऱ्या नवीन २५ घंटागाड्या येणार असल्याने कचरा संकलनाचे काम आणखी जलद गतीने करता येईल तसेच दोन गँस् सिलेडर क्षमता असलेल्या एका सीएनजी सिलेंडर मध्ये २००किमी. चालणार असुन इंधनाची बचत होणार आहे. अगामी काळात प्रत्येक आठवड्याला ६ सीएनजीवर चालणाऱ्या घंटागाड्या अशा एकुण २५ घंटागाड्या पालिकेच्या ताफ्यात दाखल होणार आहे. पर्यावरण पूरक असल्याने  प्रदूषण कमी होण्यास मदत होईल तसेच भारतात पहिल्यांदा सीएनजीवर धावणाऱ्या घंटागाड्या कल्याण डोंबिवली मनपात येत असल्याचे उप आयुक्त रामदास कोकरे यांनी सांगितले.

-कुणाल म्हात्रे

डॉ.आनंद कासवेकर यांना आंतरराष्ट्रीय महात्मा गांधी शांति पुरस्कार; ऑल इंडिया काँग्रेस सोशल ऑर्गनायझेशन तर्फे सन्मान

ऑल इंडिया काँग्रेस सोशल ऑर्गनायझेशन ने या वर्षी आंतरराष्ट्रीय पीस अवार्ड चे आयोजन राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंती निमित्त दिल्ली येथील संविधान सभा (कॉन्स्टिट्युशन क्लब ऑफ इंडिया ) येथे २ ऑक्टोबर रोजी केले होते. देशाची राजधानी असलेल्या दिल्ली येथील एका विशेष कार्यक्रमात टिटवाळयातील युवा उद्योजक डॉ.आनंद कासवेकर यांना मान्यवरांच्या हस्ते “महात्मा गांधी शांती पुरस्कार २०२१” देऊन गौरविण्यात आले.

टिटवाळा येथील जय भवानी इंटरप्राइजेस व जे बी ग्रुप कंपनीचे डायरेक्टर डॉ. आनंद कासवेकर यांनी ‘रियल इस्टेट डेव्हलपर्स’ क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल त्यांना या पुरस्काराने सन्मानित केले. युवकांना त्यांनी रोजगार प्राप्त करून देऊन त्यांना रिअल इस्टेट बद्दल मार्गदर्शन करून स्वयंसिद्ध केले. कोरोना काळात बरेच लोकउपयोगी कार्य त्यांनी केले.

हा पुरस्कार संपूर्ण भारतातील सामान्य जीवन ते त्यांच्या क्षेत्रातील उल्लेखनीय प्रवास करणाऱ्या मान्य वरांना दिला जातो. अशा मान्यवरांना ऑल इंडिया काँग्रेस सोशल ऑर्गनायझेशन हि संस्था त्यांना पुढिल उंतुग प्रवासा साठि कौतुकाची थाप म्हणुन पुरस्कार देऊन सन्मानित करतात. हि संस्था २००८ पासुन विविध क्षेत्रातील मान्यवरांचे पुरस्कार देऊन दर वर्षी २आॉक्टबर रोजी कार्यक्रम आयोजित करण्यात येतो.

डॉ. आनंद कासवेकर हे गेली २००८ पासुन रिअल इस्टेट & डेव्हलपर या क्षेत्रात काम करत आहे.
२००८ मध्ये एक रिअल इस्टेट एजंट म्हणुन मुंबई मध्ये काम चालू केले ते २०१४ पर्यंत ते पुर्ण महाराष्ट्रभर काम करु लागले. महाराष्ट्रात कुठे ही एखाद्या ग्राहकाला जमीन /घर खरेदी करायचे असेल तर त्याची आपण उपलब्धता करुन देतो. तसेच घर,बंगला,फार्म हाऊस यांचे ही बांधकाम त्यांची कंपनी करते. २०१४ नंतर त्यांनी महाराष्ट्र बाहेर ही कामे करायला सुरुवात केली. आता संपूर्ण भारतात मी माझ्या सर्व सामान्य ग्राहक ते श्रीमंत यांना सेवा देण्याचे काम करत आहे. विशेष म्हणजे मी सर्व सामान्य ग्राहकांना त्यांच्या बजेट नुसार घरांची उपलब्धता करुन देतो. असे त्यांनी या वेळी सांगितले. घनःश्याम कोळंबे (एम्पॉवर ट्रेनर प्रा. लि.), सुरट माटे (ट्रेडिंग सर्विसेस), डॉ राज काले (इंटरनेशनल ट्रेनर), राजेश वारणकर यांची विशेष साथ त्यांना मिळाली.

-जैनेन्द्र सैतवाल

दीड वर्षांची धूळ उडाली; कल्याण डोंबिवलीमध्ये शाळा-कॉलेजच्या बाकांवर विद्यार्थी पुन्हा विराजमान

आज पासून राज्यात शाळा आणि महाविद्यालये सुरु करण्यास सरकारने परवानगी दिल्या नंतर बहुतांश शाळा आणि महाविद्यालये सुरु झाले आहेत. आज कोरोना काळानंतर पहिल्यांदा विद्यार्थी शाळेत अथवा महाविद्यालयात आल्याने या सर्वांमध्ये उस्त्साहाचे वातावरण होते. अशाचप्रकारचा उत्साह डोंबिवलीतील मॉडेल कॉलेजच्या विद्यार्थ्यामध्ये पाहायला मिळाला.

कोविड १९ च्या प्रादुर्भाव काळात बंद असलेल्या शाळा व महाविद्यालये सुरु  करण्याबाबत शिक्षण विभागाकडून मिळालेल्या सुचनेनुसार शाळा कॉलेज उघडण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. कोरोनाचा धोका लक्षात घेता कोरोना नियम पाळण्याचे आवाहन करणारे फलक महाविद्यालयात लावण्यात आले आहेत. विद्यार्थ्यांना प्रवेश देतांना कोविड १९ च्या सर्व नियमांचे पालन करून महाविद्यालयाच्या प्रवेश द्वारावरच विद्यार्थ्यांचे थर्मल स्क्रीनिंग करण्यात आले. यानंतर सॅनिटायजरद्वारे हात निर्जंतुकीकरण करत विद्यार्थ्यांना आत प्रवेश देण्यात आला.

वर्गामध्ये देखील प्रत्येक बाकावर एका विद्यार्थ्याला बसविण्यात आले.विशेष म्हणजे शाळा कॉलेजचा आज पहिला दिवस असल्याने शिक्षकांनी या विद्यार्थ्यांचे गुलाबपुष्प आणि चॉकलेट देत स्वागत केले. यावेळी विद्यार्थ्यांमध्ये देखील आनंद पाहायला मिळाला. डोंबिवलीच्या मॉडेल कॉलेजमध्ये एक हजारच्या आसपास विद्यार्थी असून प्रत्येक तुकडीचे दोन गट करण्यात आले आहेत. यामुळे प्रत्येक बाकावर एका विद्यार्थांला बसविले जाणार असून सुरक्षेच्या दृष्टीने विद्यार्थ्यांची पूर्ण काळजी घेतली जाणार असल्याचे प्राचार्य डॉ. रवींद्र बांबार्डेकर यांनी सांगितले.

कल्याण पूर्वेतील सम्राट अशोक विद्यालयात विद्यार्थ्यांचे जंगी स्वागत

तब्बल दीड वर्षानंतर कल्याण पूर्वेतील सम्राट अशोक विद्यालयातही शाळेची घंटा वाजल्यानंतर विद्यार्थ्याचे शाळेच्या प्रवेशद्वाराजवळ शाळा व्यवस्थापनाच्या विद्यमाने या शाळेच्या शिक्षकांनी ढोल ताशांच्या गजरात  विद्यार्थ्यांवर पुष्प उधळून व औक्षण करून जंगी स्वागत केले. इयत्ता आठवी ते दहावी या वर्गातील विद्यार्थ्यांना प्रत्येक दिवशी फक्त घड्याळी तीन तासाचे  वर्ग भरविले जाणार असून विद्यार्थ्यांचे काही दिवस समोपदेशन केले जाणार असल्याचे मुख्याध्यापक गुलाबराव पाटील यांनी सांगितले. शासन परिपत्रकाप्रमाणे  सर्व अटी शर्तीचे पालन करण्यात येईल असे संस्थेचे अध्यक्ष म्हणाले. विद्यार्थी आणि शिक्षक समोरासमोर आल्यावर काही विद्यार्थी भावूक होऊन त्यांचे डोळे आनंद अश्रूने ओले झाल्याचे दिसून आले.

-कुणाल म्हात्रे

      

‘आयपीएल’ सामन्यांवर सट्टेबाजी; उल्हासनगरात तीन बुकींना अटक

उल्हासनगर मध्ये आयपीएल सामन्यावर बेटिंग केल्याप्रकरणी तीन बुकींना अटक करण्यात आली आहे. ठाणे पोलीस आणि उल्हासनगर मधील मध्यवर्ती पोलीस ठाणे यांनी संयुक्तपणे ही कारवाई केली. २ ऑक्टोबर रोजी मुंबई इंडियन्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल या सामन्यावर जुगार खेळला जात असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी सदरच्या ठिकाणी छापा टाकून पोलिसांनी तिघांना अटक केली आहे.

उल्हासनगर कॅम्प क्रमांक तीन येथील थारासिंग दरबार शेजारी असलेल्या ‘माँ बजाज व्हिला’ या बंगल्यात ठाणे पोलिसांच्या सेंट्रल युनिटने शनिवारी संध्याकाळी धाड टाकली. यावेळी या बंगल्यात ‘आयपीएल’च्या सुरू असलेल्या मुंबई इंडियन्स विरुध्द दिल्ली कॅपिटल्स या खेळल्या जाणा-या क्रिकेट सामन्यावर बेटिंग नावाचा जुगार खेळला जात असताना तीन बुकींना पोलिसांनी अटक केली. धर्मेंद्र बजाज, राहुल बजाज आणि चिरंजीव अनिल आहुजा असे या ताब्यात घेतलेल्या बुकींची नावे आहेत.

पोलिसांना घटनास्थळी लॅपटॉप, मोबाईल फोन, ट्रान्समिशन मशिन, इंटरनेट राउटर आदी साहित्याचा वापर करून मोबाईलवर लाईव्ह चालू असलेल्या लाईव्ह क्रिकेट मॅचवर खेळणा-या आणि खेळविणा-या इसमांशी संपर्क साधून हवाला व्दारे व गुगल पे व्दारे क्रिकेट बेटिंग घेवून लॅपटॉप वर जे.एम. डी. खेल खेल खेल या नावाच्या लेजर सॉफ्टवेअर नोंद केली जात असल्याचे पोलीस तपासात समोर आले.

पोलिसांनी बुकींकडून एकूण २५ लाख रुपये रोख, एक लॅपटॉप आणि मोबाईल जप्त केले. हि कारवाई दुसऱ्या दिवशी सकाळी चार वाजेपर्यंत सदरच्या बंगल्यात सुरू होती. या प्रकरणी उल्हासनगर च्या मध्यवर्ती पोलीस ठाण्यात फसवणूक कायदा, आय टी ऍक्ट आणि जुगार कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

-संतोष दिवाडकर

टिम वर्क हेच कोविड कालावधीतील यशाचं गमक; -आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी

टिम वर्क हेच कोविड कालावधीतील यशाचं गमक आहे, असे उद्गार महापालिकेच्या ३७ व्या वर्धापन दिनानिमित्त डोंबिवलीतील सावित्रीबाई फुले कला मंदिरात‍ कोविड नियमांचे पालन करुन संपन्न झालेल्या महापालिकेच्या वर्धापन दिन समारोहात महापालिका सचिव संजय जाधव यांनी घेतलेल्या मुलाखतीत बोलतांना महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी हे उद्गार काढले. या मुलाखतीत बोलतांना महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी आपल्या कारर्किदीतील वेगवेगळया घडामोडींची माहिती दिलखुलासपणे प्रेक्षकांसमोर मांडली. कोविडच्या लढाईने एक वेगळीच उर्जा सगळयांना दिली, ती वापरुन नागरिकांचे प्रश्न सोडवू या, नागरिकांच्या सेवेसाठी पुन्हा एकदा वचनबध्द होऊ या असे आवाहन त्यांनी यावेळी उपस्थित सर्व अधिकारी वर्गाला केले.

महापालिकेच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजिलेल्या या छोटेखानी समारंभात कोविड कालावधीत महापालिकेला मदत केलेल्या /करणा-या डॉक्टर्स आर्मीतील डॉक्टरांचा, आयएमए, निमा, धारपा, केम्पसवा या वैदयकीय संघटनांतील अध्यक्षांचा, बाज आर आर रुग्णालयाचे डॉ. अमिर कुरेशी, निऑन रुग्णालयातील मिलींद शिंदे हॉलिक्रॉस हॉस्पिटलच्या सिस्टर शिबा यांचा सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला. त्याचप्रमाणे महापालिकेला कोविड कालावधीत मदत करणा-या विविध एनजीओ, कोविडच्या पहिल्या लाटेत अन्नधान्य पुरवठा करणा-या दानशुर व्यक्ती, गुरुद्वारा, कल्याण पश्चिम, संत गजानन सेवा ट्रस्ट या सारख्या सेवाभावी संस्था यांनादेखील या समयी सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले.

कोविड कालावधीत महापालिकेस सातत्याने सहकार्य करणा-या पोलिस अधिकारी कर्मचारी वर्गाचा, महापालिका क्षेत्रातील स्मशानभूमीमध्ये सेवा देणा-या व्यक्तींचाही महापालिका आयुक्त यांचा हस्ते सन्मान करण्यात आला. तसेच कोविड कालावधीत उत्कृष्ठ काम केलेल्या अधिकारी/कर्मचारी वर्गाचा तसेच विविध पत्रकार संघटनांचा देखील प्रतिकात्मक स्वरुपात यावेळी सत्कार करण्यात आला. या समारोहास महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी सपत्नीक उपस्थित होते. आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांचे आई-वडील देखील हा सोहळा पाहण्यासाठी समक्ष उपस्थित होते. तसेच महापालिका क्षेत्रातील डॉक्टर्स आर्मीतील डॉक्टर्स, एनजीओज, अप्पर पोलिस आयुक्त दत्‍तात्रय कराळे, पोलिस उपायुक्त गुंजाळ, महापालिकेचा अधिकारी वर्ग या कार्यक्रमास उपस्थित होता.

महापालिकेच्या कर्मचारी वर्गाने विशेषत: आरोग्य विभागातील कर्मचारी वर्गाने बहारदार सांस्कृतिक कार्यक्रमाचे सादरीकरण यावेळी केले. महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुनिल पवार, उपआयुक्त विनय कुलकर्णी आणि कार्यकारी अभियंता प्रमोद मोरे यांनी स्वत:च्या आवाजात सुमधुर आवाजात गाणी गाऊन तसेच कार्यकारी अभियंता सुनिल जोशी यांनी आपल्या एकपात्री अभिनयाने कार्यक्रमात रंगत आणली. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन महापालिका सचिव तथा विभागप्रमुख, माहिती व जनसंपर्क -संजय जाधव , दत्तात्रय लदवा, महेश देशपांडे यांनी केले.

-कुणाल म्हात्रे