क.डों.म.पा. मुख्यालयात तिरंग्याच्या प्रतिकृतीचा कंदील; मनसेकडून गुन्हा दाखल

कल्याण : कल्याण डोंबिवली महापालिकेच्या येवू घातलेल्या निवडणुकीत मतदारांना जागृत करण्या साठी लावण्यात आलेल्या कंदीलच्या प्रतिकृती मध्ये राष्ट्रध्वजाचा वापर करून राष्ट्रध्वजाचा अपमान करण्यात आल्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा गुन्हा मनसेचे कल्याण शहर संघटक रुपेश भोईर यांनी दाखल केला आहे.

       १ नोव्हेंबर २०२१ ते २० नोव्हेंबर २०२१ या कालावधीत राबविल्या जाणाऱ्या मतदार पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत  महानगरपालिका मुख्यालयाच्या प्रांगणात भव्य आकाश कंदिलाचे अनावरण अतिरिक्त आयुक्तांच्या हस्ते  करण्यात आले होते. यात राष्ट्रध्वजाची प्रतिकृती उभारण्यात आली होती. या बाबत कल्याणच्या बाजारपेठ पोलीस स्थानकात राष्ट्र गौरव प्रतिष्ठा अवमान अधिनियम १९७१ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस एफआयआर मध्ये आरोपीचे नाव अज्ञात म्हणून टाकण्यात आलेले आहे. पोलिसांनी सदर झेंड्याची प्रतिकृती ही जप्त केली आहे.

 राष्ट्रध्वज संहिते अनुसार आपला राष्ट्रध्वज ‘तिरंगा’ हा देशाच्या सन्मानाचे आणि गौरवाचे प्रतीक आहे. तिरंग्याचा अवमान होऊन नये याकरिता ‘राष्ट्रध्वज संहिता’ बनविण्यात आली आहे. विविध नियम करण्यात आले आहेत, तर त्याच्या चुकीच्या वापरावर निर्बंध घालण्यात आले आहेत. राष्ट्रध्वजाचा अवमान करणारा हा कायद्याचा गुन्हेगार तर आहेच किंबहुना देशद्रोही आहे. भारताच्या महानतेचे प्रतीक असणाऱ्या या तिंरग्याची आचारसंहिता १९६४ साली सी. व्ही. वारद यांनी लिहिली. ध्वजारोहण, अभिवादन, ध्वजावतरण आणि ध्वजाचा सन्मान कसा करावा, याबाबत एक नियमावली बनविण्यात आली. त्यालाच ‘राष्ट्रध्वज संहिता’ असे म्हणतात. या अनुसार हा अजामीनपात्र गुन्हा आहे.

 याबाबत मनपा सचिव संजय जाधव यांच्याशी संपर्क साधला असता मतदार पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत महानगरपालिका मुख्यालयाच्या प्रांगणात भव्य आकाश कंदिलाचे अनावरण करीत मतदारांना जागृत करण्यासाठी ही थीम साकरली होती. याबाबत मनपाला कोणाची तक्रार प्राप्त नव्हती असे सांगितले गेले.

-कुणाल म्हात्रे

लालचौकी येथील सिग्नलचा खांबाआड लपंडाव; मनसेने चिटकवले खांबाला स्टिकर

कल्याण : लालचौकी येथील सिग्नल वाहनचालकांसाठी त्रासदायक ठरत असून सिग्नल समोर पथदिव्याचा खांब आडवा येत असल्याने वाहन चालकांचे अपघात होत आहेत. याबाबत मनसे शहर संघटक रुपेश भोईर आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी पथदिव्यांवर स्टिकर लावून आंदोलन केले.

केंद्र सरकारच्या स्मार्ट सिटी प्रकल्पातून शहराचा चेहरामोहरा बदलण्याचा दावा करत पालिका प्रशासनाकडून स्मार्ट सिटी योजनेसाठीच्या दिखाव्यावर कोट्यवधींचा खर्च करण्यात आला आहे. स्मार्ट सिटी मधून शहरात सिग्नल यंत्रणा सुरू करण्यासाठी लाखो रुपये मोजून समंत्रकाच्या माध्यमातून शहराचा सर्व्हे करत २० ठिकाणी सिग्नल ची संख्या निश्चित करण्यात  आली. या मधील लालचौकी चौकात काही महिन्यापूर्वी सुरू करण्यात आलेल्या सिग्नल समोर पथदिव्याचा खांब असल्याने  दोन बाजूने येणाऱ्या वाहनचालकांना सिग्नल दिसतच नाही. यामुळे दुचाकीवर मागच्या सीट वर बसलेल्या प्रवाशाला गाडीवरून उतरून सिग्नल चेक करावा लागतो.

एखाद्या वाहनचालकाला सिग्नलचा अंदाज न आल्याने त्याने सिग्नल तोडल्यास त्याच्यावर दंडात्मक कारवाई होत आहे. तर अनेकांना सिग्नल दिसत नसल्यामुळे दुसऱ्या बाजूने येणाऱ्या वाहनचालकांमुळे मोठ्या प्रमाणात अपघात होत असून सिग्नल योजना योग्य पद्धतीने कार्यान्वित करण्या साठी कल्याण मनसे कार्यकर्त्यांनी लालचौकी परिसरात आंदोलन छेडत सिग्नल समोर असलेल्या पथदिव्यावर सिग्नलच्या रंगाचे स्टिकर चिपकवून नारेबाजी करत निषेध व्यक्त केला.

स्मार्ट सिटीच्या या कामामुळे नागरिकांना त्रास होत असून महानगरपालिकेची पैशाची उधळपट्टी होत असल्याने हे नियोजन शून्य पद्धतीने प्रकल्प राबविणाऱ्या अधिकाऱ्यांच्या पगारातून हा खर्च वसूल केला जावा अशी मागणी मनसे शहर संघटक रुपेश भोईर यांनी केली आहे.

-कुणाल म्हात्रे

कल्याणच्या द्वारली पाड्यातील घरात शिरलं अजगर

कल्याण : जंगल शेती भागातून भक्ष्याच्या शोधात भलामोठा अजगर घरात घुसल्याची घटना समोर आली आहे. अजगर घरात घुसल्याचे पाहून त्या कुटूंबाची एकच पळापळ झाली होती. मात्र, सर्पमित्राच्या मदतीने त्या भल्यामोठ्या अजगराला शिताफीने पकडले. ही घटना कल्याण – मलंगगड रोडवरील द्वारली पाडा परिसरात असलेल्या एका घरात घडली आहे.

बाबासाहेब गोरे यांची कल्याण – मलंग रोडवरील द्वारली पाडा या ठिकाणी वीटभट्टी आहे. त्या लगतच त्यांचे घर आहे. त्यातच दुपारच्या सुमारास या घरामध्ये मोठा अजगर घुसल्याचे त्यांनी पहिले. त्यामुळे त्यांनी तातडीने सर्पमित्र दत्ता बोबे यांना अजगरविषयी माहिती दिली. त्यानंतर सर्पमित्र दत्ता यांनी कल्याण पूर्वेत राहणारे मुंबई पोलीस दलातील कर्मचारी, सर्पमित्र मुरलीधर जाधव यांच्यासह मुंबई हायकोर्टमधील कुलदीप चिकनकर मानद पशु कल्याण अधिकारी, यांना माहिती दिली. माहिती मिळताच दोघेही घटनास्थळी दाखल झाले. त्यावेळी गोरे यांच्या घरामध्ये आठ फूट लांबीचा अजगर घराच्या एका कोपऱयात आडोशाला दडून बसल्याचे त्यांना दिसला होता.

विशेष म्हणजे, हा भलामोठा अजगर भक्ष्य शोधण्यासाठी गेल्या पाच-सहा दिवसांपासून गोरे यांच्या घराच्या आसपास त्यांना दिसत होता. मात्र, घराच्या बाजूलाच असलेल्या वनसदृश क्षेत्रांमध्ये निघून जात होता. पोलीस कर्मचारी, सर्पमित्र जाधव व चिकनकर यांनी त्या अजगराला सुरक्षित पकडून पुढील कार्यवाहीसाठी कल्याण वन विभाग यांच्याकडे सुपूर्त करण्यात आले असून, या भल्यामोठ्या अजगराला वन कर्मचाऱ्यांच्या उपस्थित निर्सगाच्या सानिध्यात सोडून देत जीवदान दिले.

-कुणाल म्हात्रे