कल्याण पश्चिम उंबर्डे गावात रिक्षा चालकाची हत्या; अनुचित प्रकारातुन हत्या झाल्याचा संशय

कल्याण :- शहराच्या पश्चिम भागातील उंबर्डे गावात शनिवारी पहाटे अज्ञात व्यक्ती कडून रिक्षा चालकाची हत्या करण्यात आली आहे. त्यामुळे नक्की कोणत्या कारणाने निर्घृणपणे हत्या केली ? हे समजू शकलेले नाही. खडकपाडा पोलिसां समोर या खुनाचा तपास करण्याचे मोठे आव्हान उभे ठाकले आहे. ही हत्या काही अनुचित प्रकारातून झाल्याचा संशय व्यक्त केला जात असून तशी परिसरात चर्चा सुरु असल्याचे समोर येत आहे.

उंबर्डे गावात रिक्षा चालक अभिमान दत्तू भंडारी वय ५३ वर्षे यांची सकाळी उंबर्डे या ठिकाणी हत्या करण्यात आली. शनिवारी पहाटेच्या सुमारास ही घटना घडली आहे. पोलिसांनी अज्ञात व्यक्ती विरोधात हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. पहाटेच्या सुमारास आपल्या कामासाठी घराबाहेर रिक्षा घेऊन जात असावेत. त्यामुळे नक्की काय कारण असेल याचे तर्कविर्तक लढविले जात आहेत. काही अनुचित प्रकारातून ही हत्या झाल्याची चर्चा परिसरात दबक्या आवाजात केली जात आहे.

सर्व प्रकारचा मागोवा आणि या प्रकरणाची अधिक माहिती सूत्रांकडून पोलिस घेत आहेत. लवकरच हत्येतील आरोपी आणि हत्येचे कारण समोर येण्याची शक्यता पोलीस वर्तवत आहेत. दरम्यान खडक पाडा पोलिसांनी भादवि कलम ३०२, ३४ अन्वेय गुन्हा नोंदवला आहे.

-रोशन उबाळे

कल्याण पूर्वेत सलमान खान कार अपघाताची झाली असती पुनरावृत्ती; थोडक्यात बचावल्या फूटपाथवर झोपलेल्या महिला

कल्याण :- पूर्वेतील पुणे लिंक रोड तिसगाव नाक्या जवळ शुक्रवारी रात्री १२ च्या सुमारास विचित्र अपघात झाला. एका वाहन चालकाने आपली लक्झरिअस कार डिव्हायडरला ठोकली. यामुळे ती गाडी तेथील जवळच्याच एका झाडाला अडकून थांबली. याच रस्त्याच्या फूटपाथवर झोपलेल्या नागरिकांचा बळी जाण्यापासून वाचला. सुदैवाने कार ड्रायव्हर आणि त्याचा मुलगा त्याचसोबत फुटपाथवरील दोन महिला बचावल्या.

अपघातग्रस्त कार जर फूटपाथ वर गेली असती तर फुटपाथवर झोपलेले नक्कीच चिरडले गेले असते. मात्र सुदैवाने दैव बलवत्तर असल्याने या विचित्र अपघातात होणारी मोठी दुर्घटना टळली. लक्झरिअस कार जणू काही पार्किंगच्या स्लॉटमध्ये उभी आहे असं भासत आहे. मात्र वास्तवात काय घडलं हे तेथील प्रथम दर्शनीनी सांगितले.

या सर्व घटनेने सलमान खानच्या कार अपघाताची पुनरावृत्ती कल्याणमध्ये शुक्रवारी मध्यरात्री झाली असती असं म्हणायला हरकत नाही. एअर बॅग मुळे गाडीतील प्रवासी बचावले तर गाडी फुटपाथवर जाण्या पूर्वी थांबल्याने गरीब महिलांचे देखील प्राण वाचले. याबद्दल त्या महिलांनी देवाचे आभार मानले.

-संतोष दिवाडकर

कल्याणमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यान वाचविण्यासाठी ८५ वर्षीय महिलेने सुरू केलं आमरण उपोषण

कल्याण :- पश्चिमेतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे स्मारक कल्याण डोंबिवली महापालिका यांच्या कडून स्मारक तोडण्याच्या कारवाई विरोधात एका ८५ वर्षाची आजी लक्ष्मीबाई मारुती ससाणे यांनी उद्यान वाचण्यासाठी आमरण उपोषणाचे हत्यार उपसले आहे. १९ नोव्हेंबर २०२१ पासून उद्यानातच आमरण उपोषणासाठी त्या बसल्या आहेत.

कल्याण डोंबिवली महापालिकेने विकासाच्या नावाने व्यापाऱ्यांचा फायदा आणि बहुजन अस्मिता असणाऱ्या आणि ऐतिहासिक वारसा असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यानाचा काही भाग घेण्याचा घाट घातला असल्याचे आंबेडकर अनुयायी म्हणत आहेत. एका बाजूला स्मार्ट सिटी साठी प्रस्तावित जागा असतांना काही हॉटेल मालकांना इमारती बांधण्याच्या परवानग्या दिल्या जात असल्याचा आरोप होऊ लागला आहे. त्यामुळे आंबेडकर वादी आणि आंबेकरांना मानणारा वर्ग आणि समाज पालिकेच्या निर्णयाच्या विरोधात उभा ठाकला आहे.

उद्यानाची जागा आजपर्यंत दोन वेळा तोडण्याचा प्रयत्न केला होता. आता पुन्हा स्मार्ट सिटी अंतर्गत पुन्हा उद्यानाची जागा घेऊ पाहत आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक वाचवण्यासाठी या ८५ वर्षाच्या आजीच्यामागे आपण खंबीरपणे उभे राहून समर्थन देण्यासाठी विविध पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते आणि सामाजिक संघटना पाठींबा देताना समोर येत आहेत.

आयुक्त बंगल्याची भिंत बाधित होत असल्याने डीपी रस्ता थोडा नागमोडी करण्यात आला. काही वेगळा पर्याय करवून विकास पण झाला पाहिजे आणि उद्यान ही बाधित झाले नाही पाहिजे अशी काही पर्यायी व्यवस्था पालिकेने करण्याची वेळ आली आहे. अन्यथा उद्यानाचे प्रकरण चिघळण्याची शक्यता नाकारता येत नाही. आतापर्यंत बीएम सी ऍक्ट कलम ४८७ नुसार हजारो हरकती घेण्यात आल्या आहेत.

-रोशन उबाळे