कल्याणात भाजपचा महाविकासआघाडी सरकार विरोधात निषेध मोर्चा

कल्याण :  महाविकास आघाडी सरकारच्या काळात वाढलेली राजकीय गुन्हेगारी, महिला अत्याचार, शेतकऱ्यांवर, कामगारांवर होणारा अन्याय, भ्रष्टाचार, अमरावती  दंगलीचा निषेध करण्यासाठी आज भाजपा तर्फे कल्याण तहसील कार्यालयावर निषेध मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चात भाजप आमदार रवींद्र चव्हाण, माजी आमदार नरेंद्र पवार, भाजप जिल्हाध्यक्ष शशिकांत कांबळे, शहराध्यक्ष प्रेमनाथ म्हात्रे, माजी उपमहापौर मोरेश्वर भोईर, नगरसेवक मनोज राय, कल्याण पूर्व मंडल अध्यक्ष संजय मोरे यांच्यासह विविध पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. या मोर्चा दरम्यान भाजप कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांनी तहसील कार्यलयाबाहेर महाविकास आघाडी सरकार विरोधात घोषणाबाजी करत तहसीलदार विजय पाटील यांना निवेदन सादर केले.

महाविकास आघाडी सरकार हे वसुली सरकार आहे. सरकारने  नेहमीच मायबापच्या भूमिकेत असले पाहिजे. मात्र हे सरकार विचित्र पध्दतीने वागत असल्याची टिका भाजप नेते आमदार रविंद्र चव्हाण यांनी यावेळी केली. तसेच अमरावती दंगल ही स्पॉन्सर्ड दंगल असल्यासारखे चित्र समोर यायला सुरुवात झाली असून लोकांना त्रास देणे, सर्वसामान्य माणसाना वेठीस धरणे, हे सातत्याने सरकारच्या माध्यमातून होत असल्याचा आरोपही यावेळीं त्यांनी केला.

तर राज्यात वेगवेगळ्या ठिकाणी महिला अत्याचार मोठ्या प्रमाणात होत आहेत. ते कसे थांबवावे ? काय उपाययोजना करावी यासह एसटी कर्मचारी आंदोलनाचा प्रश्न सोडवण्यासाठी राज्य सरकार कोणतीही ठोस भूमिका घेताना राज्य सरकार दिसत नाही. म्हणून संपूर्ण महाराष्ट्रात भाजप कार्यकर्ते आणि नागरिकांकडून सरकारचा निषेध करण्यासाठी हे ‘जन आक्रोश’ आंदोलन करण्यात आल्याचे आमदार रविंद्र चव्हाण यांनी सांगितले.

-कुणाल म्हात्रे

कल्याण डोंबिवलीत भाजपच्या तीन माजी नगरसेवकांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश; निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय हादरे

डोंबिवली :- कल्याण डोंबिवली महानगरपालिकेची निवडणूक काही महिन्यांवर येऊन ठेपली आहे. याच पार्श्वभूमीवर राजकिय उलथापालथ मागील वर्षभरापासूनच होताना दिसू लागली आहे. डोंबिवलीतुन भाजपाचे तीन माजी नगरसेवकांनी आता शिवसेनेत जाहीर प्रवेश केलेला आहे. महेश पाटील, सुनीता पाटील आणि सायली विचारे अशी त्या तिघांची नावे असून पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते शिवबंधन बांधून त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे.

कल्याण डोंबिवली या दोन मोठ्या शहरांची मिळून महानगरपालिका तयार होते. यातील कल्याण शहर म्हणजे शिवसेना तर डोंबिवली हा भाजपचा गड मानला जातो. २०१५ साली झालेल्या निवडणुकित शिवसेनेचे ५२ तर भाजपचे ४२ नगरसेवक निवडून आले होते. ही निवडणूक शिवसेना विरुद्ध भाजप अशी रंगली होती. यानंतर २०२० साली कार्यकाळ उलटून गेल्याने सर्व नगरसेवक आता माजी झाले असून महानगरपालिकेत प्रशासकीय राजवट सुरू आहे.

नव्या वर्षात २०२२ मध्ये कल्याण डोंबिवली सह राज्यातील अनेक महानगरपालिका निवडणुका रंगणार आहेत. २०१९ मध्ये राज्यातील शिवसेना-भाजप युती तुटल्यानंतर शिवसेना-कोंग्रेस-राष्ट्रवादी महाविकास आघाडी सुरू झाली. राज्यातील बदलले समीकरण पाहता महानगरपालिका निवडणुकांवर देखील त्याचे परिणाम दिसणार याचा अंदाज आता नगरसेवकांना लागलेला आहे. म्हणूनच आता राजकीय उलथापालथ होताना दिसत आहेत.

साल २०१५ ते २०२० च्या काळात भाजपचे माजी नगरसेवक महेश पाटील हे प्र.क्र. ८२, अंबिका नगर चे नगरसेवक होते. तर अनुक्रमे सायली विचारे या प्र.क्र. ८३, गोग्रासवाडीच्या नगरसेविका होत्या. तर सुनीता पाटील यांनी प्र.क्र. १११ सागाव सोनारपाडाचे नगरसेवक पद भूषवले आहे. डोंबिवलीतील भाजपचे हे तिन्ही नगरसेवक आता शिवसेनेत दाखल झाले आहेत. आम्ही कुठे तरी कमी पडलो. नगरसेवक का जात आहेत याचे कारण त्यांचे त्यांनाच माहीत असल्याची खंत डोंबिवलीचे भाजप आमदार रवींद्र चव्हाण यांनी व्यक्त केली. तर मनसेच्या काही पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी देखील यावेळी शिवसेनेत प्रवेश केला आहे.

-संतोष दिवाडकर

दुसऱ्या राज्यातील निवडणूका जिंकण्यासाठी भाजपने महाराष्ट्राला बदनाम करण्याचे काम थांबवावे; कल्याण मधील पदयात्रेतून नाना पटोलेंचं भाजपला आवाहन

कल्याण :  खाद्यतेल, पेट्रोल, डिझेल, गॅस सिलेंडर दरवाढ, वाढलेली महागाई, बेरोजगारीला भाजप सरकार जबाबदार असल्याचा आरोप करीत कॉंग्रेसने रविवारी कल्याणात जनजागरण अभियान अंतर्गत पदयात्रा काढली होती. या पदयात्रेत काँग्रेस प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांच्यासह शेकडो कॉग्रेस  कार्यकर्ते या पदयात्रेत सहभागी झाले होते. भाजप सरकारच्या काळात जनतेची लूट सुरू असून ही जनजागरण मोहीम महाराष्ट्रात नव्हे तर देशात राबवली जाते. भाजपचा खरा चेहरा जनतेसमोर आणण्याचा काँग्रेसचा संकल्प असल्याचे नाना पटोले यांनी सांगत भाजप सरकारवर सडकून टीका केली.

कल्याणच्या सहजनानंद चौकात महागाई विरोधात आकाशात काळे फुगे सोडून केंद्र सरकारचा निषेध करण्यात आला. त्यानंतर जनजागरण यात्रेला सुरुवात होऊन सहजानंद चौक ते बैलबाजार्पयत गेली. काँग्रेसची भूमिका आम्ही वारंवार स्पष्ट केली आहे. कोणाच्याही व्यक्तिगत प्रश्नामध्ये काँग्रेस कधीही हस्तक्षेप करणार नाही. ही भूमिका आधीच स्पष्ट केली आहे. देवेंद्र फडणवीस आणि शरद पवार या दोघांच्या व्यक्तव्यामध्ये आम्हाला काही ही स्वारस्य नाही, असं पटोले म्हणाले.

विधान परिषदेचे उमेदवार जाहीर झाल्यानंतर भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी खदखद व्यक्त केली. त्यावरही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. भाजपमध्ये मोठया प्रमाणात खदखद सुरु आहे. हे तर स्पष्ट आहे. त्याचे परिमाण काय होणार हे पुढच्या काळात समजेल, असं सूचक विधान त्यांनी केलं. रयत क्रांती संघटनेचे नेते सदाभाऊ खोत यांनी परिवहन मंत्री अनिल परब यांना सैतान संबोधलं. त्यावरून पटोले यांनी सदाभाऊंना टोला लगावाल. ते पण मंत्री होते. आपण कोणावर या पद्धतीचे वक्तव्य करण्यापेक्षा आपणही आधी आपल्याला समजून घेतले पाहिजे. ही काही महाराष्ट्राची परंपरा नाही. गुजरातची परंपरा सदाभाऊनीं आणली असेल तर मला माहिती नाही, असा टोला त्यांनी लगावला.

काँग्रेसने क्रूझ पार्टीच्या बाबतजी भूमिका स्पष्ट केली तीच पूढे येत आहे. क्रूझ पार्टीत भाजपच्या लोकांचा  हात आहे. भाजपच्या लोकांनी हे प्रकरण ठरवून केले आहे. जेव्हा उत्तर प्रदेश आणि इतर राज्यात निवडणूका येतात. तेव्हा भाजप महाराष्ट्राला प्रचाराचे साधन बनवून बदनाम करते. हे आपल्याला सुशांतसिंह राजपूतच्या प्रकरणात दिसून आले. बिहारच्या निवडणूकीच्यावेळी सुशांतसिंहचे प्रकरण आणले होते. महाराष्ट्राला बदनाम करण्याचे काम केंद्र सरकारने थांबावे. महाराष्ट्राच्या अस्मितेला धक्का लावण्याचे काम कदापि खपवून घेतले जाणार नाही, असा इशारा त्यांनी दिला.

-कुणाल म्हात्रे

स्मशानभूमीतील गॅस शवदाहिनीचा भडका; डोंबिवलीत एक कामगार होरपळला

डोंबिवली :- शहराच्या पूर्व भागात असणाऱ्या पाथर्ली स्मशानभूमीतील गॅस शवदाहिनीचा अचानक भडका होऊन त्यामध्ये एक कर्मचारी जखमी झाल्याची घटना घडली आहे. गोपाळ अडसुळ वय ५१ वर्षे असे यात जखमी झालेल्या कर्मचाऱ्याचे नाव असून केडीएमसीच्या शास्त्रीनगर रुग्णालयात डॉक्टर उपलब्ध नसल्याने कळव्यातील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. ही घटना पालिका प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे झाल्याचा आरोप होत आहे. त्यामुळे अत्याधुनिक पणे शव जाळणे ही आता जिकरीचे बनले आहे असे या घटने वरून वाटू लागले आहे.

शनिवारी २० नोव्हेंबर रोजी रात्री ११ च्या सुमारास डोंबिवलीच्या पाथर्ली स्मशानभूमीत अंत्यसंस्कारासाठी शव (मृतदेह) आणण्यात आले होते. त्याच्यावर गॅस शवदाहिनीद्वारे अंत्यसंस्कार केले जाणार होते. मात्र गेल्या काही दिवसांपासून या गॅसशवदहिनीचे बटन आणि लायटर तांत्रिक बिघाडामुळे बंद पडल्याने तेथील कर्मचारी कापडाचा पेटता बोळा आतमध्ये टाकून शवदाहीनी चालू करत होते. जे की केवळ त्यांच्याच नव्हे तर अंत्यसंस्कारासाठी आलेल्या व्यक्तींसाठीही अत्यंत धोकादायक बाब होती. मात्र हा धोका पत्करून गोपाळ अडसूळ यांनी स्मशानभूमीत दाखल शवावर अंत्यसंस्कारासाठी कापडाचा पेटता बोळा आत टाकला आणि त्याक्षणी गॅसचा मोठा भडका उडून त्यामध्ये अडसूळ गंभीररित्या भाजले.


दरम्यान या धक्कादायक प्रकारानंतर स्मशानभूमीतील इतर कर्मचारी आणि काही नागरिकांनी अडसूळ यांना केडीएमसीच्या शास्त्रीनगर रुग्णालयात नेले. मात्र डॉक्टर उपलब्ध नसल्याचे कारण तिथल्या उपस्थित स्टाफकडून देण्यात आल्याने त्यांना कळवा रुग्णालयात नेल्याचे प्रत्यक्षदर्शीनी सांगितले. मात्र ह्या कर्मचाऱ्याची खरी होरपळ ही रुग्णालयात झाली. या रुग्णालयात अडसूळ यांना उपचारासाठी नेले असता त्याठिकाणी उपचारासाठी डॉक्टर उपलब्ध नव्हते. दुसऱ्या रुग्णाला देण्यासाठी साधे रुग्णवाहिका देखील रुग्णालयात उपलब्ध नसल्याचा आरोप वंचित आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे. त्यामुळे कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या आरोग्यसेवेचा पुरता बोजवारा उडाल्याचे या घटनेतुन समोर आले आहे.

या धक्कादायक घटनेनंतर स्मशानभूमीतील गॅस शवदाहिन्या आणि त्यांच्या सुरक्षेबाबत अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. सुमारे १० दिवसांपासून या गॅस शवदाहिनीत तांत्रिक बिघाड असूनही तो दुरुस्त का केला गेला नाही? याबाबत केडीएमसीच्या संबंधित विभागाला माहिती देण्यात आली होती का? माहिती देण्यात आली असेल तर मग हा तांत्रिक बिघाड दुरुस्त का केला गेला नाही? यांसारखे अनेक गंभीर प्रश्न या घटनेनंतर निर्माण झाले आहेत. त्यामुळे पालिका आयुक्त डॉ विजय सूर्यवंशी यांनी या गंभीर विषयात दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करावी अन्यथा अशा प्रकरणात स्मशानभूमीत अनेक नागरिकांचा राबता असतो. काही मोठी भीषण दुर्घटना झाली असती तर मनुष्यहानी ही झाली असती यात कुठलेही दुमत नाही.

-रोशन उबाळे