आता प्रभाग कार्यालयात होणार जनता दरबार; क.डों.म.पा. चा नवा उपक्रम

कल्याण : नागरिकांना  त्यांच्या विविध कामासाठी  महापालिका मुख्यालयात वारंवार यावे लागू नये म्हणून नागरिकांच्या  सोयीसाठी,  त्यांच्या तक्रारींचे निवारण त्वरित करण्यासाठी तसेच त्यांच्या निवेदनांवर कार्यवाही करण्यासाठी  आता आठवडयातील एक दिवस नागरिकांच्या भेटीसाठी निश्चित करण्यात आला असून विभागीय उपआयुक्तांनी या दिवशी  त्यांच्या अखत्यारीतील प्रभाग कार्यालयात थांबुन नागरिकांच्या तक्रारींचे निवारण करण्याचे निर्देश कल्याण डोंबिवली महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी दिले आहेत.

 या जनता दरबाराची  रुपरेषा खालीलप्रमाणे आहे :-

 1/अ प्रभाग–बुधवार–दुपारी 3.00 ते 4. 00 – 1/अ प्रभाग कार्यालय

2/ब प्रभाग– गुरुवार–दुपारी 4.00 ते 5.00  –  2/ब प्रभाग कार्यालय

 3/क प्रभाग– मंगळवार दुपारी 3.00 ते 4.00 – 3/क प्रभाग कार्यालय

 4/जे प्रभाग- बुधवार–दुपारी 4.00 ते  5.00 – 4/जे प्रभाग कार्यालय

 5/ड प्रभाग– बुधवार–दुपारी  3.00 ते 4.00 – 5/ड प्रभाग कार्यालय

6/फ प्रभाग–बुधवार –दुपारी  3.00 ते 4.00 – 6/फ प्रभाग कार्यालय

7/ह प्रभाग- गुरुवार-दुपारी  3.00 ते 4.00 – 7/ह प्रभाग कार्यालय

8/ग प्रभाग– गुरुवार – दुपारी  4.00 ते 5. 00 – 8/ग प्रभाग कार्यालय

9/आय प्रभाग–गुरुवार –दुपारी 4.00 ते 5. 00 – 9/आय प्रभाग कार्यालय

10/ई प्रभाग– शुक्रवार – दुपारी 4.00 ते 5. 00 –10/ई प्रभाग कार्यालय

या जनता दरबाराचा प्रारंभ पुढील आठवडयापासून होणार आहे.

-कुणाल म्हात्रे

कल्याण डोंबिवलीकरांनो पाणी उकळून प्या; उल्हासनदीत मोठ्या प्रमाणावर प्रदूषण

कल्याण :- कल्याण मुरबाड रोड उल्हास नदीत रायते पुल ते मोहना धरणापर्यंत नदीत फेसयुक्त केमिकल दोन दिवसांपूर्वी दिसून आला होता. याकडे संबंधित विभागाने लक्ष द्यावे यासाठी उल्हास नदी बचाव कृती समितीने प्रदूषण नियंत्रण मंडळाला कारवाईची विनंती केली होती. यानंतर एमपीसीबीच्या अधिकाऱ्यांनी नदीतील पाण्याचे नमुने घेतले आहेत.

पिण्याच्या पाण्याचे शुद्धीकरण होत असलं तरी अति प्रदूषित पाणी व केमिकल्स थेट उल्हास नदीत सोडल्याने नागरिकांना पोटाचे विकार व इतर परिणाम होताना दिसत आहेत. त्यामुळे सध्यातरी पाणी गाळून आणि उकळून पिण्यापेक्षा दुसरा पर्यायच दिसत नाही. मंडळाने नदीतील तीन ठिकाणचे नमुने घेतले असून पंचनामा केला आहे. परंतु प्रदूषण मंडळाने कारखान्यांवर धाडी टाकून पाहणी करण्याचे आवाहन समितीकडून करण्यात येत आहे.

उल्हासनदीचं पाणी कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्राच्या बाहेर देखील पोहोचवले जाते. जवळपास करोडो लोकांची तहान ही नदी भागवत असल्याचे सांगितले जाते. या नदीपात्रात कधी जलपर्णीचे साम्राज्य वाढते तर कधी केमिकल्सचा थर जमा होतो. विविध सामाजिक राजकीय संघटना वारंवार आंदोलनाचा पवित्रा घेतात मात्र प्रदूषणाला आळा घालण्यासाठी कारवाई का केली जात नाही ? असा सवाल आता पडू लागला आहे.

-संतोष दिवाडकर