कल्याण मध्ये भरली माणुसकीची शाळा

कल्याण :  कल्याण मध्ये माणुसकीची शाळा सुरु झाली असून शाहीर संभाजी भगत यांनी हि माणुसकीची शाळा घेतली. कल्याण पश्चिमेतील उंबर्डे येथील सम्राट अशोक नगर नालंदा बुद्ध विहार येथे राजू काऊतकर यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. माणुसकीची शाळा ही संकल्पना शाहिरी जलसाचे निर्माते लोकशाहीर संभाजी भगत यांची असून त्यांच्या हस्तेच या माणूसकीच्या शाळेचे लोकार्पण करण्यात आले. जिल्ह्यातील अनेक माणुसकिचे दुत यावेळी उपस्थित होते.

लोकशाहीर संभाजी भगत यांनी माणुसकीची शाळा या संकल्पनेवर बोलत असतांना सांगितले कि, प्रत्येक समाजामध्ये माणसातील माणूसपण कमी होत चालले आहे. समाजात वावरताना समाजामध्ये फूट पडलेली जाणवत आहे. जात धर्म पंथ याचे याचे जोडे बाहेर काढून माणसांनी माणसातील माणुसकी जतन केली पाहिजे. या देशात एक मिनिटांत सोळा लोक आत्महत्या करीत आहेत. असे एका तज्ञानी हे मत व्यक केले आहे. कारण माणसावर येणारे वेगवेगळ्या प्रकारच्या ताण तणाव निर्माण होऊन या घटना घडत आहेत. म्हणून प्रत्येक माणसांनी एकमेकांना समजून घेण्यासाठी विचाराची देवाणघेवाण करणे गरजेचे आहे.

या देशातील आर्थिक घडी विस्कळीत झाल्यामुळे माणसांना बारा ते सोळा तास काम करण्याची वेळ आली असून यामुळे माणसं  डिप्रेशनमध्ये जात आहेत. माणुसकीच्या शाळेमध्ये फक्त एका विशिष्ट जातीपूर्ती मर्यादित नसून सर्व जाती धर्माच्या  लोकांपर्यंत ही माणुसकीची शाळा पोहचविण्यासाठी आम्ही प्रयत्न करीत आहोत. यामध्ये नवतरुण महिला आणि आबालवृद्ध यांची देखील शाळा सुरू केली असल्याचे भगत यांनी सांगितले.यावेळी शाहीर संभाजी भगत यांच्यासह सेवानिवृत्त शिक्षक आनंद नागरे, सामाजिक कार्यकर्ते मारुती शेरकर, साक्षी डोळस, अनिता कदम, मीरा वासनिक, वर्षा काळे आदींनी उपस्थित राहून मार्गदर्शन केले. माणुसकी शाळेचा उपक्रम यशस्वी करण्यासाठी पत्रकार राजू काऊतकर, माधुरी सपकाळे, आम्रपाली भालेराव, कविता काऊतकर  आदींनी विशेष परिश्रम घेतले.

-कुणाल म्हात्रे

डोंबिवलीत रात्री अपरात्री लुटपाट करणारे पाच वाटमारे जेरबंद

डोंबिवली :- मध्यरात्री उशिराने रस्त्याने घरी चालत जाणाऱ्या एका इसमास चाकू आणि कोयत्याचाधाक दाखवून पाच जणांनी लुटले होते. मात्र पोलिसांत तक्रार दिल्या नंतर या वाटमारू लुटारूंना डोंबिवली राम नगर पोलिसांनी आता अटक केली आहे.

संतोष कुमार शर्मा हे ठाकुर्ली येथील ९० फुटी रस्त्यावरून रात्री घरी चालत जात असताना अचानक काही लुटारूंनी त्यांची वाट अडवली. यानंतर या वाटमाऱ्यानी त्यांना चाकूचा धाक दाखवून त्यांच्या जवळील लॅपटॉप, मोबाइल, बॅग असा एकूण ४० हजार ४१० रुपयाचा वस्तू काढून घेतल्या. जीवाला घाबरलेल्या संतोष कुमार यांनी सर्व वस्तू त्यांना देऊन टाकल्या. मात्र या नंतर संतोष यांनी या संदर्भात राम नगर पोलीस स्थानकात झाल्या प्रकारची तक्रार दाखल केली.

डोंबिवली राम नगर पोलिसांनी गुन्ह्याची नोंद करीत तपास सुरू केला. विशेष म्हणजे ही लूटपाट करताना कोणताही पुरावा मागे ठेवला नसल्याने गुन्हेगारांना शोधणे कठीण गेले. मात्र संपूर्ण कसोशीने तपास करून पोलिसांनी त्या पाच जणांचा सुगावा लावला. यात २० ते २५ च्या वयोगटात असलेले आशु दुमडा, कुणाल बोध, विशाल जेठा, सलमान पुहाल, गणेश लोट या तरुणांना ताब्यात घेण्यात आले. हे तरुण डोंबिवली पूर्व येथील त्रिमूर्ती झोपडपट्टी परीसरात राहणारे आहेत. सहाय्यक पोलीस आयुक्त जे. डी.मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन सांडभोर, समशेर तडवी आणि इतर सहकाऱ्यांनी या गुन्ह्याची उकल केली.

-रोशन उबाळे

कल्याणच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं एन.डी.ए. परिक्षेत मिळवलं यश

कल्याण : वयाच्या १२व्या वर्षापासून देश सेवेची इछा मनाशी बाळगून भारतीय संरक्षण दलातील अधिकारी होण्यासाठी घेण्यात येणाऱ्या एन.डी.ए. च्या अत्यंत कठीण समजल्या जाणाऱ्या परीक्षेत कल्याण पूर्वेतील माजी नगरसेविका माधुरी प्रशांत काळे यांचे सुपुत्र राज काळे याने यश मिळविले असून मुंबईसह संपूर्ण कोकण विभागातून उत्तीर्ण होणारा राज हा एकमेव विद्यार्थी आहे.

‘स्वर्गिय धर्मवीर आनंद दिघे’ संस्थापित आणि ‘शिवनिकेतन ट्रस्ट’ संचलित भारतीय सैनिकी विद्यालय तसेच कनिष्ठ महाविद्यालय, कल्याण तालुक्यातील खडवली, जि. ठाणे येथे शैक्षणीक वर्ष २०२१-२२ मध्ये इयत्ता १२ वी विज्ञान शाखेमध्ये शिकणाऱ्या राज याने वयाच्या १२ व्या वर्षापासून अभ्यासाला सुरवात केली होती. त्याच्या या यशासाठी पुणे येथील ‘अनीस डिफेन्स कॅरिअर अकॅडमी’ चे संचालक तथा गणितज्ञ अनीस कुट्टी सर व त्यांचे सर्व सहकारी यांचे मोलाचे असे मार्गदर्शन लाभले. अखेर त्याच्या या अथक प्रत्नाला अखेर यश आल्याचे राज च्या वडिलांनी सांगितले.

राजचे वडील प्रशांत काळे यांनी स्वतः वकिलीची पदवी घेतली असून कल्याण पूर्व येथे ‘जगन्नाथ शिंदे शिक्षण प्रसारक मंडळा’तर्फे मराठी आणि इंग्रजी माध्यमातील विद्यार्थ्यांसाठी अत्यंत अल्प दरात स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र चालवतात. राजची आई माधुरी प्रशांत काळे ही पेशाने शिक्षिका असल्यामुळे घरचे वातावरण अभ्यासासाठी अनुकूल आहे. युपीएससी द्वारे घेण्यात येणाऱ्या एन.डी.ए. ची ही परिक्षा ‘राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी’ खडकवासला, पुणे मार्फत देशसेवेत-भारतीय संरक्षण दलातील अधिकारी म्हणुन दाखल होण्यासाठी घेण्यात येतात.

या परीक्षेसाठी संपूर्ण देशातून लाखो विद्यार्थी प्रयत्न करीत असतात परंतु वयाची अट असल्यामुळे विद्यार्थ्यांना फक्त १ किंवा २ वेळा ही परीक्षा बसण्याची संधी मिळते. राज यांनी या संधीचे सोने करीत प्रथम प्रयत्नात ही परीक्षा उत्तीर्ण करून मुंबईसह कोकण विभागाची मान उंचावली आहे. परीक्षा उत्तीर्ण करून राज ने ‘जगन्नाथ शिंदे शिक्षण प्रसारक मंडळा’चे संचालक जगन्नाथ (आप्पा) शिंदे यांचे आशीर्वाद घेतले आणि त्यांनी देखील राजला पुढील वाटचालीसाठी शुभेचा दिल्या.

-कुणाल म्हात्रे

मागवला लॅपटॉप आणि आलं भलतंच; ऑनलाइन शॉपिंग पडली महागात

कल्याण :- पूर्वेतील चिकणीपाडा परिसरात राहणारे अनिल शिंदे यांनी काही दिवसांपूर्वी फेसबुकवर जाहिरात पाहून एका लिंकवर क्लिक करून एक नॉटपॅड लॅपटॉप ऑर्डर केला. पुढील काही दिवसांनी कुरियरद्वारे त्यांना पार्सल मिळाले आणि त्यांनी अडीच हजार रुपये कुरियर वाल्याला दिले. मात्र पार्सल उघडून पाहिले असता त्यात लॅपटॉप ऐवजी बंद पडलेला पॉवर बँक देण्यात आला होता.

अलिकडल्या काळात डिजिटल ऑनलाइन व्यवहार आणि शॉपिंग मोठ्या प्रमाणावर केली जाते. यामुळे तंत्रज्ञानाची माहिती घेऊन काही स्मार्ट लुटेरे ऑनलाइन स्केम करीत आहेत. अनिल शिंदे यांना फेसबुकवर अडीच हजारात लॅपटॉप मिळण्याची एक जाहिरात दिसली होती. घरातील मुलांना वापरण्यासाठी म्हणून त्यांनी ती वस्तू मागवली देखील. मात्र वस्तू घरी आल्यानंतर त्यांच्या घरातील एका लहानग्याला कमी पैशातल्या लॅपटॉपबाबत शंका आली. वजनाने बॉक्स हलका लागल्याने त्याने व्हिडीओ केमेरा सुरू करून पार्सल उघडले. पार्सल उघडल्या नंतर त्यातून भरपूर पुठ्ठे आणि कागद बाहेर निघाले. व त्यानंतर एका कागदात त्याला जुना बंद असलेला पॉवर बँक आढळून आला. हा व्हडीओ त्यांनी फेसबुकवर अपलोड केला आहे.

‘शॉपिफाय’ नामक एका वेबसाईटवर आपले ऑनलाइन दुकान बनवून आपण त्यावर आपले प्रोडक्ट विकू शकतो. मात्र याच नावाचा वापर करून एका ऑनलाइन स्केमरने ‘माय शॉपिफाय’ नावाची बनावट वेबसाईट बनवली. या वेबसाईटवर एक सबडोमेन दिसून आले. ज्यात कमी पैशात लॅपटॉप विक्रीसाठी आहेत. याच ठिकाणाहुन दाखवलेल्या आमिषाला भुलून शिंदे यांनी वस्तू मागवली होती. मात्र अज्ञात स्केमरने त्यांची फसवणूक केली.

ऑनलाइन व्यवहार करताना कसे सतर्क रहावे याबाबत वारंवार बँके कडून जनजागृती केली जाते. त्यामुळे आता ऑनलाइन शॉपिंगच्या मार्फत घोटाळे करण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढले आहे. दररोज समाज माध्यमांवर गिफ्ट, वस्तू अथवा पैशांचे अमिश दाखवून लिंक व्हायरल केल्या जातात. याच व्हायरल झालेल्या लिंकद्वारे अनेक लोकांची फसगत होते. ज्यात अनेकदा फ्लिपकार्ट, अमेझॉनचा लोगो वापरण्यात येतो. मात्र त्या साईटचा वेब अड्रेस (स्पेलिंग सहित) नक्की बरोबर आहे का ? ती वेबसाईट खरी आहे का ? याची अगोदर खात्री करून घ्यायला हवी. जर संपूर्ण खात्री असेल तरच ऑनलाइन व्यवहार अथवा शॉपिंग करावी.

-संतोष दिवाडकर

पार्सल उघडतानाचा व्हडीओ
पुन्हा ‘याच’ वस्तीतून पकडला गेला आणखी एक सराईत गुन्हेगार; कोळसेवाडी पोलिसांनी केला लाखोंचा मुद्देमाल हस्तगत

कल्याण :- कल्याण कोळसेवाडी पोलीसांनी एका सराईत चोरट्याला सापळा रचत अटक केली आहे. अलि हसन जाफरी अस या चोरट्याचं नाव आहे. २२ वर्षीय अलि हसन हा सराईत गुन्हेगार आहे. चैन स्नेचिंग व दुचाकी चोरी मध्ये त्याचा हातखंडा आहे. चैन स्नेचिंग करण्यासाठी तो आधी महागड्या दुचाक्या चोरायचा त्यानंतर या चोरलेल्या दुचाकीवरून चैन स्नेचिंग करायचा व ही दुचाकी रस्त्यात उभी करून तेथून पळ काढायचा.

कल्याण कोळसेवाडी परिसरात गर्दीच्या आणि रहदारीच्या ठिकाणी चैन स्नेचिंग, दुचाकी चोरीच्या घटना वाढल्या होत्या. या पार्श्वभूमीवर कोळसेवाडी पोलिसांनी चार पथके नेमली व या चोरट्यांचा शोध सुरु केला. गुप्तहेरां मार्फत त्यांना अलीहसन हा आंबिवली इराणी वस्तीत राहत असल्याची माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांच्या पथकाने आंबिवली इराणी वस्तीत सापळा लावून अली हसनला अटक केली. त्याच्याकडून पाच मोटरसायकल, तीन साखळ्या, ४लाख ५३ हजारांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.

आतापर्यंत कल्याण-डोंबिवली, भिवंडी, ठाणे, मुंबई या ठिकाणी देखील चोऱ्या केल्याचे तपासात समोर आले असून पोलीस या प्रकरणी पुढील तपास करत आहेत. दरम्यान कल्याण नजीकच्या आंबिवली येथील इराणी वस्तीतून या आधी देखील अनेक सोनसाखळी चोरट्यांना अटक करण्यात आली आहे. अली हसनच्या अटकेनंतर ही वस्ती पुन्हा एकदा पोलिसांच्या रडारवर आली आहे. दरम्यान उमेश माने पाटील (कल्याण एसीपी) यांनी माहिती देत सहकाऱ्यांचे कामगिरी बाबत कौतुक केले. मात्र या इराणी वस्तीत वाढलेली गुन्हेगारी आणि गुन्हेगार हे संपूर्ण शहरासाठी डोकेदुखी ठरत आहे. मागील वेळेस गुन्हेगाराला पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसांच्या ताफ्यावर देखील हल्ला झाला होता. त्यामुळे यावर कायमचा तोडगा काढणे सर्वांच्या हिताचे ठरणार आहे.

-रोशन उबाळे

रेल्वे हद्दीतील रिक्षा स्टॅण्ड बंद करण्याच्या निर्णयाविरोधात रिक्षाचालक आक्रमक

कल्याण : रेल्वे हद्दीतील गेली चाळीस वर्षे जुने रिक्षा स्टॅण्ड बंद करण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. रेल्वे प्रशासनाचा हा निर्णय अन्यायकारक असून याविरोधात चक्काजाम करुन रिक्षाचालकांसह तीव्र आंदोलन करण्याचा इशारा रिक्षा टॅक्सी चालक मालक असोसिएशनने मध्य रेल्वेच्या कल्याण स्टेशन डायरेक्टर आणि केडीएमसी आयुक्तांना दिला आहे.

रेल्वे स्टेशन परिसरात स्मार्ट सिटी अंतर्गत सॅटीसचे काम सुरु आहे. सँटीस काम सुरू असताना प्रशासनाकडुन वाहतूक व्यवस्था संदर्भात नियोजन व उपाययोजना केलेल्या नाहीत यामुळे वाहतुक व्यवस्थेचा बोजवारा उडाला आहे. महापालिका, रेल्वे, स्मार्ट सिटी, आरटीओ, वाहतुक पोलिस प्रशासनाचे समन्वय नाही. रेल्वे प्रशासनाने होम प्लॅटफॉर्म क्रमांक १ समोरील जुना रिक्षा स्टॅण्ड पर्यायी व्यवस्था न करता अनेक दिवसापासुन कायमस्वरूपी बंद केलेला आहे. नियोजना अभावी स्टेशन परीसरात नित्यरोज वाहतुक खोळबुंन वाहतुक विस्कळीत होत आहे. त्याचे खापर नाहक रिक्षा चालकांवर फोडले जात आहे.

नित्यरोज वाहतुक पोलिसांकडुन होणारा हजारो रुपये दंड नाहक रिक्षा चालकांना भरावा लागत आहे. महापालिका हद्दीत पुर्वी पासुन प्रशस्त रिक्षा स्टँड उपलब्ध नाही. रेल्वे हद्दीतील गेली चाळीस वर्षे जूने उर्वरित दोन स्टँड पर्यायी व्यवस्था न करता कायम स्वरूपी बंद करुन फक्त दोन छोट्या लाईन मिटर प्रमाणे रिक्षा वाहतुक करण्यासाठी उपलब्ध करून देण्याचे रेल्वे प्रशासनाने नियोजन केले आहे. मिटर प्रमाणे रिक्षा वाहतुक करण्यास रिक्षा चालकांची हरकत नाही पंरतु १०० %मिटर प्रमाणे रिक्षा वाहतुकीला प्रवाशांचा प्रतिसाद नाही शेअर पध्दतीने रिक्षा वाहतुक व रिक्षा स्टॅण्ड आवश्यकता आहे.

नियोजित सॅटीस स्टेशन परीसर वाहतुक सुधारणा प्रकल्प आराखड्यात प्रशस्त रिक्षा स्टॅण्ड व वाहतुक व्यवस्था काही एक विचार केलेला नाही. रिक्षा वाहतुक सार्वजनिक प्रवासी व्यवस्था प्रमुख घटक आहे. महापालिका, रेल्वे, स्मार्ट सिटी, आरटीओ, वाहतुक पोलिस, पोलिस प्रशासन यांची एक समन्वय समिती नेमून स्टेशन परिसरातील वाहतुक व्यवस्था व रिक्षा स्टॅण्ड बाबत तातडीने निर्णय घ्यावेत अशी मागणी रिक्षा टॅक्सी चालक मालक असोसिएशन अध्यक्ष प्रणव पेणकर यांनी महापालिका आयुक्त  व स्टेशन डायरेक्टर यांना दिलेल्या निवेदनात केलेली आहे.

पर्यायी व्यवस्था न करता रेल्वे स्टेशन हद्दीतील जुने रिक्षा स्टॅण्ड जोर जबरदस्ती बंद केल्यास कोणतीही पुर्व सुचना न देता रेल्वे स्टेशन परिसरात संपुर्ण रिक्षा लॉक करून चक्काजाम करुन तीव्र आदोलंन छेडले जाईल. उद्रेक व कायदा सुव्यवस्था गंभीर प्रश्न निर्माण झाल्यास संपुर्ण जबाबदारी रेल्वे प्रशासन व संबधित यंञणा यांची राहील असा इशारा रिक्षा टॅक्सी चालक मालक असोसिएशनने दिला आहे.

-कुणाल म्हात्रे

महावितरण विभागाची मोठी कारवाई; १ कोटी २९ लाखाची वीज चोरी उघड

कल्याण :- महावितरणच्या कल्याण परिमंडलात गेल्या आठवड्यात विशेष पथकांनी वीजचोरी शोध मोहिमेत ३ हजार ७१८ वीज जोडण्यांची तपासणी केली. यात विशेष पथकांनी तब्बल ५०३ वीज चोरट्यांना कारवाईचा दणका देत एक कोटी २९ लाख रुपयांची ९ लाख १० हजार युनिट विजेची चोरी उघडकीस आणली. तर पथकांच्या तपासणीत १७० ठिकाणी २६ लाख रुपयांच्या (७५ हजार ७३२ युनिट) विजेचा अनधिकृत वापर आढळून आला. संबंधितांवर फौजदारी व दंडात्मक कारवाईची प्रक्रिया सुरू असून आतापर्यंत १८ लाख रुपये वसूल करण्यात आले आहेत.व्यापारी आणि वीज ग्राहक मधील चोरट्यांची चोरी पकडण्यात वीज विभागाला यश आले आहे .

कल्याण परिमंडलाचे मुख्य अभियंता धनंजय औंढेकर यांच्या मार्गदर्शनाखाली व अधीक्षक अभियंते दीपक पाटील, दिलीप भोळे, राजेशसिंग चव्हाण, किरण नागावकर यांच्या नेतृत्वाखाली महिला कर्मचारी, पोलिस, सुरक्षारक्षक, जनमित्र, कर्मचारी यांचा समावेश असलेल्या विशेष पथकांकडून ही धडक मोहीम राबवण्यात आली. तपासणी करण्यात आलेल्या एकूण वीज जोडण्यांपैकी १३.४७ टक्के जोडण्यांमध्ये मीटरशी छेडछाड अथवा थेट मीटर बायपास करून वीजचोरी झाल्याचे निदर्शनास आले. संबंधित ५०१ ग्राहकांवर वीज कायदा २००३ च्या कलम १३५ नुसार कारवाई सुरू आहे. तर अनधिकृत वीजवापर आढळलेल्या १७० जणांवर कलम १२६ अन्वये कारवाई करण्यात येत आहे.

कल्याण पूर्व आणि पश्चिम विभागातील पारनाका, वाडेघर, उंबर्डे, नेतीवली, हाजीमलंग, नांदिवली, शीळ, सोनारपाडा भागात १८२ ठिकाणी ४३ लाख २४ हजार रुपयांची (२ लाख ४३ हजार युनिट) वीजचोरी आढळून आली. उल्हासनगर व कल्याण ग्रामीण विभागातील अंबरनाथ पश्चिम, लालचक्की, तानाजी नगर, इंदिरा नगर, बुवापाडा, खुंटवली, व्हिनस चौक, सेक्शन-२५, कुला कँप, गोवेली, कोन, मांजर्ली, फर्डेपाडा, धसई, शहापूरच्या ग्रामीण परिसरात ८५ जणांकडे २४ लाख ९४ हजार रुपयांची (१ लाख ७१ हजार युनिट) वीजचोरी सापडली.

वसई विभागात वलिव, कोल्ही, गोखिवरे, नायगाव, उमेलमन तर विरार विभागात बाजार वार्ड, फुलपाडा, मानवेलपाडा, चंदनसार, बरफपाडा भागात ४१ लाख २० हजार रुपयांची (२ लाख ५९ हजार युनिट) वीजचोरी उघड झाली. तर पालघर विभागात बोईसर शहराचा काही भाग, नांदगाव, चिंचणी, वानगाव, सरावली, देलवाडी, दांडी परिसरात १९ लाख ५२ हजार रुपयांच्या (२ लाख ३० हजार युनिट) वीजचोरीचा पर्दाफाश करण्यात विशेष पथकाना यश आले.

वीजचोरी हा गंभीर स्वरुपाचा सामाजिक गुन्हा असून या गुन्ह्यात कडक शिक्षा व दंडात्मक कारवाई सुरू आहे. कल्याण परिमंडलात वीज चोरी शोध व कारवाईच्या मोहिमा नियमितपणे सुरू राहणार आहेत. तसेच ही मोहिम अधिक तीव्र करण्यात येईल, अशी माहिती मुख्य अभियंता धनंजय औंढेकर यांनी दिली आहे.

-रोशन उबाळे

कल्याणमधील अवैध जीन्स पॅन्टच्या कारखान्यांवर केडीएमसीने चढवले बुलडोझर

कल्याण : कल्याण मधील अवैध जीन्स पॅन्टच्या कारखान्यांवर केडीएमसीने धडक कारवाई केली आहे. ‘क’ प्रभाग क्षेत्र सहाय्यक आयुक्त सुधीर मोकल यांच्या पथकाने हि कारवाई केली आहे.

महापालिका परिसरात अवैधरित्या कार्यरत असलेल्या जीन्स वॉशिंग उद्योगाकडून मोठ्या प्रमाणात  जलप्रदूषण होत असल्याचे निदर्शनास आल्यामुळे,या अवैधरित्या चालू असलेल्या जीन्स वॉशिंग कारखान्यांवर कारवाई करण्या बाबत पत्र महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या, कल्याण प्रादेशिक कार्यालयाने काल महापालिकेस पाठवले होते. या पत्राची त्वरित दखल घेत महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी अशाप्रकारे अनधिकृतरित्या महापालिका क्षेत्रात सुरू असलेल्या जीन्स कारखान्यांवर वर निष्कासनाची धडक कारवाई करण्याचे निर्देश संबंधित प्रभागाच्या सहाय्यक आयुक्त यांना दिले. 

आज सकाळी सहाय्यक आयुक्त अक्षय गुडधे आणि सुधीर मोकल यांनी विभागीय उपायुक्त सुधाकर जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली गोविंदवाडी परिसरातील दोन ते तीन हजार स्क्वेअर फुटाचे चार कारखाने ३ जेसीबी आणि प्रभागातील अतिक्रमण निर्मूलन पथकाचे कर्मचारी यांच्या मदतीने निष्कासित करण्याची धडक कारवाई केली.

हा परिसर संवेदनशील असल्यामुळे महापालिकेच्या विनंतीनुसार या कारवाईसाठी परिमंडळ ३ चे पोलीस उपायुक्त गुंजाळ यांनी त्वरेने उपलब्ध करून दिलेले सुमारे पंचवीस ते तीस पोलीस कर्मचारी आणि महापालिकेचे १५ पोलीस कर्मचारी यांच्या मदतीने हे अनाधिकृत कारखाने पूर्णपणे नेस्तनाबूत करण्यात आले.

-कुणाल म्हात्रे

मुरबाड नगरपंचायत निवडणूक: “थापेबाजांना निवडून देऊ नका”; शिवसेनेच्या प्रचार सभेत प्रकाश पाटलांचं मतदारांना आवाहन

मुरबाड :- राज्यात मुख्यमंत्री शिवसेनेचा तर नगर विकास मंत्री, पालकमंत्री एकनाथ शिंदे हे देखील शिवसेनेचेच असतानाही प्रत्येक वेळी मीच निधी आणला अशी थाप मारणाऱ्यांना धडा शिकवा असे आवाहन शिवसेना जिल्हा प्रमुख प्रकाश पाटील यांनी मुरबाड नगरपंचायत निवडणुकीत सेनेच्या प्रचार सभेत मतदारांना केले आहे.

मुरबाड नगरपंचायतीच्या १७ पैकी १३ जागांवर निवडणुका होत असुन ही लढत अनेक ठिकाणी भाजप विरुद्ध शिवसेनेत होत आहे. भाजपने सर्व ठिकाणी उमेदवार दिले आहेत, तर सेनेने दहा ठिकाणी भाजपा विरोधात दंड थोपटले आहेत. आणि त्यामुळे ही निवडणूक भाजप सेनेसाठी प्रतिष्ठेची बनली आहे. त्यामुळे केंद्रीय मंत्री कपिल पाटील, आमदार किसन कथोरे, पालक मंत्री एकनाथ शिंदे, प्रमोद हिंदुराव, सुभाष पवार असे सर्व दिग्गज नेते रणांगणात उतरले आहेत.

भाजप हा थापाड्यांचा पक्ष आहे. मुरबाडच्या विकासासाठी एकनाथ शिंदे यांनी सर्वतोपरी निधी पुरवला, मात्र काहीजण हे श्रेय लाटत असुन त्याच्या पाट्या लावत आहेत. अशी टीका यावेळी प्रकाश पाटील, सुभाष पवार आणि पुष्पा पाटील यांनी स्थानिक आमदारांचे नाव न घेता केली. महागाईने गरीबांचे कंबरडे मोडले असुन पंधरा लाख रुपये कुठे आहेत? असा सवालही प्रकाश पाटील यांनी यावेळी शिवसेनेच्या प्रचार सभेत उपस्थित केला.

व्हिडीओ: प्रकाश पाटील यांचे भाजपवर टीकास्त्र

मुरबाड नगरपंचायतीसाठी २१ डिसेंबरला मतदान होणार असून १७ पैकी १३ जागांसाठी निवडणूक होत आहे. तर उर्वरित ४ प्रभागातील निवडणूक ओबीसी आरक्षणामुळे स्थगित झालेली आहे. भारतीय जनता पार्टी १३, शिवसेना १०, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ७, काँग्रेस ७, महाराष्ट्र नवनिर्माण सेना ३ तर इतर घटक पक्ष आणि अपक्ष उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत.

-निलेश अहिरे

अनधिकृत बांधकामांवर पालिका आयुक्तांचा कृती आराखडा; प्रभाग क्षेत्र अधिकाऱ्यांची केली उचलबांगडी

कल्याण :- कल्याण डोंबिवली महानगर पालिका क्षेत्रातील अनधिकृत बांधकामावर कारवाईसाठी पालिका आयुक्तांनी कृती आराखडा तयार केला आहे. या अनव्ये कारवाईसाठी पालिका क्षेत्रातील प्रभाग क्षेत्र अधिकार्याची खांदेपालट करून पालिकेची अनधिकृत बांधकामा प्रकरणी मलीन झालेली प्रतिमा सुधारण्यासाठी ठोस पावले उचलली आहेत. काही प्रभाग क्षेत्र अधिकार्याची अन्य प्रभागात बदली करण्यात आली तर तीन विद्यमान प्रभारी प्रभाग क्षेत्र अधिकार्याची उचलबांगडी केली आहे.

कल्याण डोंबिवली महानगर पालिका हि अनधिकृत बांधकामांची बजबजपुरी म्हणून ओळखली जात असून गेल्या दोन दीड दशकात लाखो अनधिकृत इमारती व चाळी उभारल्या गेल्या आहेत. कल्याण डोंबिवली महानगर पालिका क्षेत्रातील आरक्षित जागेवर रात्री अपरात्री अनधिकृत इमलेच्या इमले अनधिकृत पणे उभारले जात असून त्याला पालिकेच्या काही अधिकार्यानाचा छुपा आशीर्वाद असल्याने अनधिकृत बांधकामे हि प्रभाग क्षेत्र अधिकार्यांना भ्रष्टाचाराची कुरणे बनली आहेत असा सामाजिक कार्यकर्त्यांचा आरोप आहे. प्रभाग क्षेत्रपदी विराजमान होण्यासाठी सर्वच खाबुगीरि करणार्याची धडपड सुरु असते. अनधिकृत बांधकामावर कारवाईसाठी गेलेल्या पालिकेच्या अतिक्रमान विभागाचे कर्मचारी व प्रभाग क्षेत्र अधिकार्यांना वेळे प्रसंगी नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत.

पालिका आयुक्तांनी पालिकेतील अनधिकृत बांधकामांना वेसण घालण्यासाठी तसेच बेकायदेशीरपणे उभारल्या गेलेल्या बांधकामावर कारवाई साठी कृती आराखडा तयार केला असून या बेकायदेशीर बांधकामावर येत्या १५ दिवसात कारवाई करण्यासाठी पालिका प्रशासन सज्ज झाली आहे. पालिका आयुक्तांनी गेल्या अनेक वर्षा पासून प्रभारी प्रभाग क्षेत्र अधिकारी पदावर चिटकून बसलेल्या अधिकार्यांना आता नारळ दिला आहे तर काही प्रभाग क्षेत्र अधिकार्यांची अन्य प्रभागात प्रभागक्षेत्र अधिकारी पदी बदली केली आहे. अनधिकृत बांधकामांना आळा बसत असल्याने आता काळा मलिदा खाणारे पालिका अधिकारी, बांधकाम व्यावसायिक हडबडून गेले आहेत. तर बांधकामांच्या तक्रारी करून ब्लॅकमेलिंग करून पैसा खाणारे स्वयंघोषित समाजसेवक यापुढे कसे गुजारण करावे या विचारात पडलेले आहेत. मात्र अनधिकृत बांधकाम बंद झाली तर शहरांचा विकास हा निश्चितच होऊ शकतो.

-रोशन उबाळे