डोंबिवली सामुहिक बलात्कार प्रकरणी आरोपीं विरोधात आरोप पत्र दाखल; ३३ पैकी चौघांना जामीन मंजूर

डोंबिवली :- मानपाड़ा पोलिस स्टेशन मध्ये २२ सप्टेंबर रोजी अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्काराचा गुन्हा दाखल झाल्याने संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची लाट पसरली होती. यात तब्बल ३३आरोपींना अटक करण्यात आली होती. आरोपींनी १५ वर्षीय मुलीवर ९ महिने लैगिक अत्याचार केला होता .यात राजकीय पक्षांचे पदाधिकारी आणि कार्यकत्ये यांचा समावेश असल्याने पोलीस प्रशासनावर ही मोठा दबाव होता. प्रकरण संवेदनशील असल्याने मानपाडा पोलिसांनी कल्याण जिल्हा सत्र न्यायालय मध्ये ८८५ पानांचे चार्जसीट (दोषारोपपत्रक) दाखल केले असून १२२ साक्षीदार जाब जबाब नोंदविण्यात आले आहे.

या घटनेत तरुणीच्या प्रियकराने तिच्यावर बलात्कार करून तिचा अश्लील व्हिडीओ बनवला आणि तो व्हायरल करण्याचा धाक दाखवून एकूण ३३ जणांनी अल्पवयीन मुलीवर बलात्कार केला. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन या घटनेचा तपास महिला सहायक पोलिस आयुक्त सोनाली ढोले यांच्याकडे सोपविण्यात आला. या घटनेचा तात्काळ निर्णय घेण्यासाठी विरोधी पक्षाच्या नेत्यांकडून सरकारवर मोठा दबाव होता.  साधारणत: पोलीस कोणतीही घटना घडल्यानंतर ९० दिवसांच्या आत दोषारोपपत्र न्यायालयात सादर करतात. मात्र या प्रकरणात दीड महिन्यात दोषारोपपत्र न्यायालयात सादर करण्यात आले आहे. अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक मानपाडा शेखर बागडे यांनी दिली.

 एकूण ३३ आरोपींपैकी ४ आरोपी अल्पवयीन असून त्यांना जामीन मंजूर झाला आहे. उर्वरित २९ आरोपी अद्याप न्यायालयीन कोठडीत आहेत. पीडितेवर डोंबिवली, नवी मुंबई, रबाळे, मुरबाड या ठिकाणी बलात्कार आणि नशेचे पदार्थ ही देण्यात आले असल्याचे सांगण्यात आले असल्याचे आरोपपत्रात नमूद करण्यात आले आहे.

-रोशन उबाळे

परदेशातून कल्याण डोंबिवलीत आलेल्यांनी त्यांची माहिती पालिकेला द्यावी; क.डों.म.पा. ने केले आवाहन

कल्याण :  गेल्या १० दिवसात परदेशातून आलेल्या नागरिकांनी त्यांची माहिती महापालिकेच्या आरोग्य  विभागाला कळविण्याचे आवाहन कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.

ओमायक्रॉन विषाणूचा परदेशात झपाट्याने होणारा प्रादुर्भाव लक्षात घेता शासनाने दिलेल्या मार्गदर्शक सुचनांच्या अनुषंगाने महापालिका क्षेत्रात जोखमीच्या देशातून म्हणजेच युके, दक्षिण आफ्रिका, ब्राझील, बांगलादेश, बोटस्‍वाना, चीन, मॉरिशस, न्यूझीलंड,‍ झिम्‍बॉबे, सिंगापूर, हाँगकाँग, इस्त्रायल या व शासनाने वेळोवेळी  निर्धारित केलेल्या इतर अति जोखमीच्या देशातून आलेल्या सर्व नागरिकांनी भारतात परतल्यानंतर आरटी पीसीआर चाचणी करणे अनिवार्य आहे. आरटी पीसीआर चाचणीचा अहवाल निगेटिव्ह आला तर अशा लोकांना ७ दिवस घरी विलगीकरणात राहायचे आहे. व ८ दिवसांनी पुन्हा तपासणी करायची आहे आणि त्यानंतर अहवाल निगेटिव्ह आला तर पुढील ७ दिवस आपल्या तब्येतीवर लक्ष ठेवायचे आहे.

परंतू जर अहवाल पॉझिटिव्ह आला तर त्यांना महानगरपालिकेच्या विलगीकरण केंद्रामध्ये दाखल व्हावे लागणार आहे. त्यांचे सॅम्पल जिनोम सिक्वेसिंगसाठी पाठविण्यात येईल व त्यातुन प्राप्त होणाऱ्या अहवालानुसार पुढील उपचाराची रुपरेषा निश्चीत केली जाईल. यामधून ५ वर्षाखालील मुलांना वगळण्यात येत आहे, परंतू जर त्यांना कोविड सदृश्य लक्षणे असतील तर मात्र त्यांची आरटी पीसीआर चाचणी करणे अनिवार्य राहील.

परदेशातील काही देशात ओमायक्रॉन या नविन व्हेरिएंटचा वाढता प्रादुर्भाव पाहता कल्याण डोंबिवली महानगरपालिकेने खबरदारीच्या उपाययोजना करण्यास सुरुवात केली आहे. नायजेरीया या देशातून काही दिवसापूर्वी भारतात आलेल्या नागरिकांची माहिती मिळताच महापालिकेने त्यांची आरटी पीसीआर चाचणी केली असता ती निगेटिव्ह आढळून आली, ही अत्यंत दिलासादायक बाब आहे.

 या नविन व्हेरिएंटचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी गेल्या १० दिवसात परदेशातून भारतात आलेल्या नागरिकांनी त्यांची माहिती महापालिकेस कळवावी त्याचप्रमाणे स्वत:ची आरटीपीसीआर टेस्ट महानगरपालिकेच्या चाचणी केंद्रातून करुन घ्यावी. तसेच महापालिका क्षेत्रातील गृहनिर्माण सोसायटयांनी देखील आपल्या गृहसंकुलात गेल्या १० दिवसात परदेशातून आलेल्या नागरिकांची माहिती महानगरपालिकेच्या आरोग्य विभागास किंवा नजिकच्या नागरी आरोग्य केंद्रास कळवावी, असे आवाहन महानगरपालिकेच्या आरोग्य विभागामार्फत करण्यात आले आहे.

-कुणाल म्हात्रे

कल्याण उल्हासनगरच्या काही भागांत भटक्या कुत्र्यांची नागरिकांत दहशत

कल्याण :- पूर्वेतील आडीवली तसेच उल्हासनगर मधील काही भागांमध्ये कुत्र्यांचा धुमाकूळ सुरू आहे. लहान मुलांचे लचके तोडण्याचा प्रकार सुरू असल्याचे सांगण्यात येते. त्यामुळे प्रशासनाने यावर तात्काळ उपाययोजना करावी असं स्थानिकांचे म्हणणे आहे.

कल्याण पूर्व आडीवली ढोकळी तलावाजवळील कचराकुंडीच्या शेजारी असलेल्या कृष्ण नगरीच्या परिसरात भटक्या कुत्र्यांचा धुमाकूळ सुरू असून लहान मुलांना कुत्र्या कडून चावे घेण्याचे प्रकार घडत असून स्थानिक नागरिक भयभीत झाले आहेत. लहान मुलांना कुत्र्याकडून चावे घेण्याच्या प्रकारात वाढ होत असून पालिका प्रशासनाने या परिसरातील भटक्या कुत्र्यांवर आळा घालून त्यांचं निर्बीजीकरण करणं गरजेच मानलं जातं आहे.

उल्हासनगरमध्ये रात्रंदिवस झुंडीने भटक्या कुत्र्यांचा वावर असून रात्री बाहेर फिरणं देखील नागरिकांना कठीण झालेय आहे. महानगरपालिकेने नियुक्त केलेला ठेकेदार नक्की शहरात कार्यरत आहे काय? असा प्रश्न निर्माण होतोय. एखाद्या बालकाचा जीव जाण्यापूर्वीच प्रशासन जागे झालं तर अनुचित प्रकार टाळता येईल एवढ मात्र नक्कीच.

-संतोष दिवाडकर

शेअर रिक्षांचे अंतिम दरपत्रक सादर करण्याची रिक्षा संघटनेची RTO कडे मागणी

कल्याण : शेअर रिक्षा सर्वेक्षण, निश्चित भाडेदर, आक्षेप हरकत,  त्रुटी दुरूस्ती, काही रूट वर पुर्नसर्वेक्षण तसेच सन २०१५ पूर्वी प्रमाणे निश्चित भाडेदर, महत्वाचे प्रवासी टप्पे या प्रमाणे अंतिम दरपत्रक सादर करण्याची मागणी रिक्षा टॅक्सी चालक मालक असोसिएशनने आर.टी.ओ.कडे निवेदनाद्वारे केली आहे.

       शेअर ऐ रिक्षा भाडे दर निश्चिती पहीला टप्पा सर्वेक्षणात ९ रूपये ३१ पैसे होत असतांना ९ रूपये प्रतिप्रवासी निश्चित केलेली आहे. प्रवाशांना शेअर रूटवर सहजरित्या रिक्षा उपलब्धता व सुट्टे पैसे चणचण व देवाण घेवाण या वरून वादविाद टाळणे याकरीता पहिला टप्पा प्रतिप्रवासी १० रूपये अशी निश्चित करावी असे व्यवहारीकदृष्टया रिक्षा चालकांचे म्हणणे आहे. शेअर ऐ रिक्षा भाडेदर अंतिम भाडेदर सुची जाहीर करतांना प्रत्येक रूटवर जास्त प्रवाशांचे संख्या असलेले टप्पे यादीत घ्यावे. सन २०१५ पुर्वीची शेअर रिक्षा दरपत्रक सुची वाचन व आकलन करावे.

गेली ६ वर्ष रिक्षा चालकांना भाडेवाढ मिळाली नव्हती. नवीन भाडेवाढ जाहीर होवून एक वर्षानंतर सर्वेक्षण करण्यात आलेले आहे. रिक्षा दुरूस्ती खर्च टायर टयुब पंक्चर व सि. एन. जी. दरात प्रचंड दरवाढ झालेली आहे. कल्याण आर.टी.ओ. कार्यक्षेत्रात रिक्षा व्यवसाय संपुर्ण रेल्वे प्रवाशांवर व सकाळी स्टेशनकडे व सायंकाळी स्टेशनकडुन इच्छित स्थळी असा वनसाईड आहे. त्यामुळे पत्राची योग्य दखल घेवुन अंतिम रिक्षा भाडेदर पत्रक जाहिर करण्यापुर्वी रिक्षा चालक प्रतिनिधी रिक्षा संघटना यांच्याशी चर्चा विनीमय करून जुने सन २०१५ पुर्वीचे दरपत्रक आकलन करून अंतिम दरवाढ जाहीर करण्याची मागणी रिक्षा टॅक्सी चालक मालक असोसिएशनने आर.टी.ओ.कडे केली आहे.

-कुणाल म्हात्रे