‘आर के बाजार’ मध्ये शेकडो कल्याण डोंबिवलीकरांनी केलं रक्तदान

डोंबिवली :- कल्याण डोंबिवलीकरांच्या पसंतीच ग्रोसरी मार्केट म्हणजे आर के बझार. मागील १६ वर्षांपासून ग्राहकांच्या खिशाला परवडेल असे आणि उत्तम दर्जाचे गृहोपयोगी वस्तू ‘आर के बाजार’ देत आहे. याच आर के बाजार ने सामाजिक सलोखा दर्शवित रक्तदान शिबिराचे आयोजन डोंबिवली येथील त्यांच्या मुख्य कार्यालयात केले होते.

आर के बाजार ने गुरुवार १६ डिसेंबर रोजी डोंबिवली येथील मुख्य कार्यालयात रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. आर के बाजार, टाटा मेमोरियल हॉस्पिटल आणि माजी नगरसेविका प्रमिला मुकेश पाटील यांच्या संयुक्त विध्यमाने या रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात आर के बाजार चे कर्मचारी, आर के बाजार चे ग्राहक तसेच परिसरातील नागरिकांनी उपस्थित राहून रक्तदान केले. संपूर्ण दिवसभरात जवळपास शेकडो लोकांनी रक्तदान केले. व्यवसाया पेक्षा ग्राहकांचा माणुसकीच्या नात्यातून विचार करणे हे आमचे पहिले उद्दिष्ट असल्याचे आर के बाजारचे संचालक मनोज रामकृष्ण डुंबरे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.

कल्याण डोंबिवलीतील उच्च वर्गीय तसेच मध्यम वर्गीय लोकांना मागील १६ वर्षांपासून आर के बझार ने आपली सेवा अविरतपणे दिलेली आहे. यासाठी त्यांच्या १६ शाखा कार्यरत आहेत. दिवाळी चा सण असो अथवा गुढीपाडव्याचा क्षण. प्रत्येक सण घराघरात साजरा व्हवा या मानसिकतेतुन अत्यंत माफक दरात आपल्या वस्तू जसे की धान्य, तेल, मसाले, खाद्यपदार्थ, शीतपेये, सौंदर्य प्रसाधने अशा विविध गृहोपयोगी वस्तू आर के बाजार कडून विक्रीस उतरतात.

अगदी महागाई असली तरी सर्व दुकानांपेक्षा स्वस्त आणि उत्तम दर्जा असलेल्या वस्तू मिळण्याचे आर के बाजार हे एकमेव ठिकाण मानले जाते. आणि म्हणूनच गेल्या १६ वर्षांपासून लोकांची पसंती आर के बाजारला असून कल्याण डोंबिवलीत इतर शॉपिंग मार्ट पेक्षा सर्वाधिक पसंती आर के बाजारला मिळते. असे आर के बाजारचे रिजनल हेड विशाल बोडके यांनी आमच्याशी बोलताना सांगितले.

-संतोष दिवाडकर

पहा व्हिडीओ : ‘आर के बाजार’ चं रक्तदान शिबिर
गणेश विद्या मंदिर शाळेत विद्यार्थ्यांचं औक्षण करून स्वागत

कल्याण : शाळा टप्प्याटप्प्याने सुरू होता असताना आजपासून केडीएमसी क्षेत्रातील १ली ते इ.७ वी च्या विद्यार्थ्यांचेही वर्ग सुरू झाले आहेत. मुलांना शाळेत कोरोनासंबंधित शासकीय नियमावलीनुसार प्रवेशउत्सव साजरे होत असताना कल्याण पूर्वेतील गणेश विद्या मंदिर शाळेत विद्यार्थ्यांचे औक्षण करून स्वागत करण्यात आले.

कोरोना संक्रमणामुळे गेल्या दीड-दोन वर्षांपासून बंद असलेली शाळा १ डिसेंबर रोजी सुरू होणार होती. परंतु पुन्हा ओमिक्रोन यामुळे शाळा १५ डिसेंबरपासून सुरू होणार असे घोषित करण्यात आले होते. कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील शाळा १६ डिसेंबर म्हणजेच आज सुरू करण्यात येतील असे केडीएमसी प्रशासनाने जाहीर केले होते.  त्याप्रमाणे विद्यार्थ्यांचा प्रवेश उत्सव साजरा करून सर्व शाळा सुरू होत आहेत. कल्याण पूर्वेकडील नागरिक सेवा मंडळ संचलित गणेश विद्या मंदिर या  शाळेतील मुलांना शिक्षकांनी औक्षण करून त्यांचे तोंड गोड केले. प्रत्येक विद्यार्थ्यास भेटवस्तूही देण्यात आली.

 मुलांच्या प्रवेश उत्सवासाठी सगळी शाळा स्वच्छ आणि सॅनिटाइझ  करून शिवाय फुले, फुगे,व रांगोळी यांनी शाळा सजवून गाण्याच्या सुरात ढोल-ताशांच्या गजरात  अतिशय भारावलेल्या व आनंदी वातावरणात पालकांच्या सहकार्याने विद्यार्थ्यांना  प्रवेशाचा  सोहळा साजरा करण्यात आला असल्याची माहिती शाळेतील शिक्षिका ललिता मोरे यांनी दिली. तसेच यासाठी नागरिक सेवा मंडळाचे पदाधिकारी, तिन्ही विभागाच्या मुख्याध्यापिका सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

-कुणाल म्हात्रे

एकाच वर्षात कल्याण डोंबिवली मनपाला मिळाला दुसरा पुरस्कार

कल्याण :- महाराष्ट्र ऊर्जा अभिकरण या संस्थेकडे क.डो.मनपाने ऊर्जा बचतीबाबत केलेल्या उपक्रमांच्या सादरीकरणाला दोन पुरस्कार मिळाले असून, कोविड इनोव्हेशन अवॉर्ड नंतर या पुरस्कारामुळे महापालिकेच्या शिरपेचात आणखीन एक मानाचा तुरा खोवला गेला आहे. त्यामुळे राज्यपातळीवर महापालिकेस मोठा बहुमान प्राप्त झाला आहे.

मेडा या महाराष्ट्र शासनाच्या नोडल एजन्सीमार्फत म्युन्सिपल सेक्टर, बिल्डींग सेक्टर, हॉस्पिटल सेक्टर यामध्ये उर्जा बचतीबाबत केलेल्या उपाययोजनांची, राबविलेल्या उपक्रमांची माहिती यावर्षीच्या सोळाव्या उर्जा संवर्धन पुरस्कारासाठी सर्व महापालिका स्तरावर मागविण्यात आली होती. महापालिकेच्या विदयुत विभागाने, महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या नेतृत्वाखाली व शहर अभियंता सपना कोळी- देवनपल्ली यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या फॉरमॅटमध्ये उर्जा संवर्धन व वीज बचतीसाठी स्ट्रीट लाईट, पाणी पुरवठा, जल/मल नि:सारण या विभागामध्ये जे काम केले त्या संदर्भातील माहिती सप्टेंबरमध्ये पाठविली होती.

या सादरीकरणाच्या आधारे महाराष्ट्र ऊर्जा अभिकरणाच्या निवड समितीने विदयुत विभागास प्रकल्प सादरीकरणासाठी वेळ दिली होती, त्यानुसार महापालिकेच्या विदयुत विभागाचे कार्यकारी अभियंता प्रशांत भागवत व त्यांच्या सहका-यांनी निवड समितीसमोर केलेल्या प्रकल्प सादरीकरणाच्या आधारे मंगळवारी दोन क्षेत्रांमध्ये मनपास पुरस्कार जाहिर करण्यात आले, यामध्ये म्युन्सिपल सेक्टरमध्ये सर्टिफिकेट ऑफ मेरीट हा प्रथम पुरस्काराचा बहुमान महापालिकेस जाहिर करण्यात आला. त्याचप्रमाणे हॉस्पिटल सेक्टरमध्ये शास्त्रीनगर हॉस्पिटलसाठी दुस-या क्रमांकाचा पुरस्कार महापालिकेस जाहिर करण्यात आला.

मनपा परिसरात परंपरागत जुने सोडियम दिवे काढून उर्जा बचतीसाठी स्मार्ट एलईडी दिवे बसविण्यात आले, महापालिकेने नविन इमारतींना सौर उर्जा यंत्र बसविणे बंधनकारक केले आहे, त्याअनुषंगाने आतापर्यंत सुमारे १९१० इमारतींवर सौर उर्जा यंत्रणा बसविल्यामुळे वर्षाला जवळ जवळ १२ कोटी युनिट विजेची बचत होत आहे, पाणी पुरवठा करणारे जुने पंप बदलून महापालिकेने नविन प्रकारचे उर्जा बचतीचे पंप बसविले, त्याचप्रमाणे शास्त्रीनगर रुग्णालयातही उर्जा बचतीसाठी जुने परंपरागत दिवे काढून एलईडी दिवे तसेच उर्जा कार्यक्षम वातानुकूलित यंत्रणा बसविण्यात आली.

भविष्यात महापालिकेमार्फत इलेक्ट्रीक बसेस चालविण्याचा महापालिकेचा मानस आहे, त्याचप्रमाणे आयरे, कचोरे, बारावे, उंबर्डे या परिसरात घनकच-यापासून जैविक इंधन तयार करण्याचे ५ प्रकल्प उभारण्यात आले. या सर्व माहितीच्या सादरीकरणाअंती राष्ट्रीय ऊर्जा संवर्धन दिनाचे औचित्य साधून महापालिकेस हे पुरस्कार जाहिर करण्यात आले आहेत.

-कुणाल म्हात्रे