रेल्वे हद्दीतील रिक्षा स्टॅण्ड बंद करण्याच्या निर्णयाविरोधात रिक्षाचालक आक्रमक

कल्याण : रेल्वे हद्दीतील गेली चाळीस वर्षे जुने रिक्षा स्टॅण्ड बंद करण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. रेल्वे प्रशासनाचा हा निर्णय अन्यायकारक असून याविरोधात चक्काजाम करुन रिक्षाचालकांसह तीव्र आंदोलन करण्याचा इशारा रिक्षा टॅक्सी चालक मालक असोसिएशनने मध्य रेल्वेच्या कल्याण स्टेशन डायरेक्टर आणि केडीएमसी आयुक्तांना दिला आहे.

रेल्वे स्टेशन परिसरात स्मार्ट सिटी अंतर्गत सॅटीसचे काम सुरु आहे. सँटीस काम सुरू असताना प्रशासनाकडुन वाहतूक व्यवस्था संदर्भात नियोजन व उपाययोजना केलेल्या नाहीत यामुळे वाहतुक व्यवस्थेचा बोजवारा उडाला आहे. महापालिका, रेल्वे, स्मार्ट सिटी, आरटीओ, वाहतुक पोलिस प्रशासनाचे समन्वय नाही. रेल्वे प्रशासनाने होम प्लॅटफॉर्म क्रमांक १ समोरील जुना रिक्षा स्टॅण्ड पर्यायी व्यवस्था न करता अनेक दिवसापासुन कायमस्वरूपी बंद केलेला आहे. नियोजना अभावी स्टेशन परीसरात नित्यरोज वाहतुक खोळबुंन वाहतुक विस्कळीत होत आहे. त्याचे खापर नाहक रिक्षा चालकांवर फोडले जात आहे.

नित्यरोज वाहतुक पोलिसांकडुन होणारा हजारो रुपये दंड नाहक रिक्षा चालकांना भरावा लागत आहे. महापालिका हद्दीत पुर्वी पासुन प्रशस्त रिक्षा स्टँड उपलब्ध नाही. रेल्वे हद्दीतील गेली चाळीस वर्षे जूने उर्वरित दोन स्टँड पर्यायी व्यवस्था न करता कायम स्वरूपी बंद करुन फक्त दोन छोट्या लाईन मिटर प्रमाणे रिक्षा वाहतुक करण्यासाठी उपलब्ध करून देण्याचे रेल्वे प्रशासनाने नियोजन केले आहे. मिटर प्रमाणे रिक्षा वाहतुक करण्यास रिक्षा चालकांची हरकत नाही पंरतु १०० %मिटर प्रमाणे रिक्षा वाहतुकीला प्रवाशांचा प्रतिसाद नाही शेअर पध्दतीने रिक्षा वाहतुक व रिक्षा स्टॅण्ड आवश्यकता आहे.

नियोजित सॅटीस स्टेशन परीसर वाहतुक सुधारणा प्रकल्प आराखड्यात प्रशस्त रिक्षा स्टॅण्ड व वाहतुक व्यवस्था काही एक विचार केलेला नाही. रिक्षा वाहतुक सार्वजनिक प्रवासी व्यवस्था प्रमुख घटक आहे. महापालिका, रेल्वे, स्मार्ट सिटी, आरटीओ, वाहतुक पोलिस, पोलिस प्रशासन यांची एक समन्वय समिती नेमून स्टेशन परिसरातील वाहतुक व्यवस्था व रिक्षा स्टॅण्ड बाबत तातडीने निर्णय घ्यावेत अशी मागणी रिक्षा टॅक्सी चालक मालक असोसिएशन अध्यक्ष प्रणव पेणकर यांनी महापालिका आयुक्त  व स्टेशन डायरेक्टर यांना दिलेल्या निवेदनात केलेली आहे.

पर्यायी व्यवस्था न करता रेल्वे स्टेशन हद्दीतील जुने रिक्षा स्टॅण्ड जोर जबरदस्ती बंद केल्यास कोणतीही पुर्व सुचना न देता रेल्वे स्टेशन परिसरात संपुर्ण रिक्षा लॉक करून चक्काजाम करुन तीव्र आदोलंन छेडले जाईल. उद्रेक व कायदा सुव्यवस्था गंभीर प्रश्न निर्माण झाल्यास संपुर्ण जबाबदारी रेल्वे प्रशासन व संबधित यंञणा यांची राहील असा इशारा रिक्षा टॅक्सी चालक मालक असोसिएशनने दिला आहे.

-कुणाल म्हात्रे

महावितरण विभागाची मोठी कारवाई; १ कोटी २९ लाखाची वीज चोरी उघड

कल्याण :- महावितरणच्या कल्याण परिमंडलात गेल्या आठवड्यात विशेष पथकांनी वीजचोरी शोध मोहिमेत ३ हजार ७१८ वीज जोडण्यांची तपासणी केली. यात विशेष पथकांनी तब्बल ५०३ वीज चोरट्यांना कारवाईचा दणका देत एक कोटी २९ लाख रुपयांची ९ लाख १० हजार युनिट विजेची चोरी उघडकीस आणली. तर पथकांच्या तपासणीत १७० ठिकाणी २६ लाख रुपयांच्या (७५ हजार ७३२ युनिट) विजेचा अनधिकृत वापर आढळून आला. संबंधितांवर फौजदारी व दंडात्मक कारवाईची प्रक्रिया सुरू असून आतापर्यंत १८ लाख रुपये वसूल करण्यात आले आहेत.व्यापारी आणि वीज ग्राहक मधील चोरट्यांची चोरी पकडण्यात वीज विभागाला यश आले आहे .

कल्याण परिमंडलाचे मुख्य अभियंता धनंजय औंढेकर यांच्या मार्गदर्शनाखाली व अधीक्षक अभियंते दीपक पाटील, दिलीप भोळे, राजेशसिंग चव्हाण, किरण नागावकर यांच्या नेतृत्वाखाली महिला कर्मचारी, पोलिस, सुरक्षारक्षक, जनमित्र, कर्मचारी यांचा समावेश असलेल्या विशेष पथकांकडून ही धडक मोहीम राबवण्यात आली. तपासणी करण्यात आलेल्या एकूण वीज जोडण्यांपैकी १३.४७ टक्के जोडण्यांमध्ये मीटरशी छेडछाड अथवा थेट मीटर बायपास करून वीजचोरी झाल्याचे निदर्शनास आले. संबंधित ५०१ ग्राहकांवर वीज कायदा २००३ च्या कलम १३५ नुसार कारवाई सुरू आहे. तर अनधिकृत वीजवापर आढळलेल्या १७० जणांवर कलम १२६ अन्वये कारवाई करण्यात येत आहे.

कल्याण पूर्व आणि पश्चिम विभागातील पारनाका, वाडेघर, उंबर्डे, नेतीवली, हाजीमलंग, नांदिवली, शीळ, सोनारपाडा भागात १८२ ठिकाणी ४३ लाख २४ हजार रुपयांची (२ लाख ४३ हजार युनिट) वीजचोरी आढळून आली. उल्हासनगर व कल्याण ग्रामीण विभागातील अंबरनाथ पश्चिम, लालचक्की, तानाजी नगर, इंदिरा नगर, बुवापाडा, खुंटवली, व्हिनस चौक, सेक्शन-२५, कुला कँप, गोवेली, कोन, मांजर्ली, फर्डेपाडा, धसई, शहापूरच्या ग्रामीण परिसरात ८५ जणांकडे २४ लाख ९४ हजार रुपयांची (१ लाख ७१ हजार युनिट) वीजचोरी सापडली.

वसई विभागात वलिव, कोल्ही, गोखिवरे, नायगाव, उमेलमन तर विरार विभागात बाजार वार्ड, फुलपाडा, मानवेलपाडा, चंदनसार, बरफपाडा भागात ४१ लाख २० हजार रुपयांची (२ लाख ५९ हजार युनिट) वीजचोरी उघड झाली. तर पालघर विभागात बोईसर शहराचा काही भाग, नांदगाव, चिंचणी, वानगाव, सरावली, देलवाडी, दांडी परिसरात १९ लाख ५२ हजार रुपयांच्या (२ लाख ३० हजार युनिट) वीजचोरीचा पर्दाफाश करण्यात विशेष पथकाना यश आले.

वीजचोरी हा गंभीर स्वरुपाचा सामाजिक गुन्हा असून या गुन्ह्यात कडक शिक्षा व दंडात्मक कारवाई सुरू आहे. कल्याण परिमंडलात वीज चोरी शोध व कारवाईच्या मोहिमा नियमितपणे सुरू राहणार आहेत. तसेच ही मोहिम अधिक तीव्र करण्यात येईल, अशी माहिती मुख्य अभियंता धनंजय औंढेकर यांनी दिली आहे.

-रोशन उबाळे