डोंबिवलीतील कॅप्टन विनय कुमार सचान स्मारकावर भाजपने केला कारगिल विजय दिवस साजरा

कारगिल विजय दिनाच्या निमित्ताने दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी भारतीय जनता पार्टी कल्याण जिल्ह्याच्या वतीने डोंबिवली येथील कॅप्टन विनय कुमार सचान यांच्या स्मारका जवळ पुष्प अर्पण करून शहिदांना मानवंदना देण्यात आली.

२६ जुलै १९९९ हा कारगील विजय दिन म्हणून साजरा केला जातो. भारतावर कुरघोडी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या पाकिस्तानला धुळीस मिळवून आपल्या सैनिकांनी पाकिस्तानचा धुव्वा उडवला याचा सार्थ अभिमान सर्व भारतीयांना आहे. तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखाली त्यावेळी सरकारने पाकिस्तान सरकारला मान खाली घालण्यास भाग पाडले. त्या कारगिल युद्धामध्ये बरेच जवान शहीद झाले. अनेक भारतीयांना प्राण गमवावे लागले परंतु एक इंच ही मागे न हटता पाकिस्तानला आणि पाकिस्तानी घुसखोरांना यमसदनी धाडून पाकिस्तानचे मनसुबे उध्वस्त केले.

 कारगिल युद्धातील सर्व शहिदांना मनपूर्वक मानवंदना करण्यात आली. या कार्यक्रमास महाराष्ट्र प्रदेश भाजपचे सरचिटणीस आमदार रवींद्र चव्हाण, जिल्हाध्यक्ष शशिकांत कांबळे, डोंबिवली ग्रामीण अध्यक्ष नंदू परब, कल्याण जिल्हा महिला आघाडीच्या अध्यक्षा रेखा चौधरी, खुशबू चौधरी, प्रमिला चौधरी आदी पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

-कुणाल म्हात्रे

लॉकडाऊनचं आर्थिक संकट आणि कल्याण पूर्वेत व्यावसायिकाची गळफास घेऊन आत्महत्या

लॉकडाऊनमुळे आर्थिक संकटात अडकलेल्या कल्याण पूर्व तिसगाव नाका परिसरातील एका व्यवसायिकाने गळफास घेऊन आत्महत्या केली असल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याबाबत जनमत वृत्त संस्थेचे याच भागात वास्तव्यास असणारे पत्रकार आनंद गायकवाड यांनी आपल्या शब्दात एक लेख प्रसिद्ध केला आहे.

पत्रकार आनंद गायकवाड यांचा लेख खालीलप्रमाणे :-

गेली ३० ते ३५ वर्षे अनेक संकटांवर मात करीत आपल्या कुटूंबियांच्या उपजिविकेची समर्थ पणे जबाबदारी पार पाडणाऱ्या कल्पाण पूर्वेतील एका प्रिन्टींग प्रेस व्यवसायीकाने लॉकडाऊन मुळे आर्थिक संकटात सापडल्याने अखेर गळफास लावून आपले जिवन संपवल्याची ह्यदस्पर्शी घटना कल्याण पूर्वेतील तिसगांव नाक्यावर सोमवारच्या रात्री घडली आहे . तिसगांव नाक्यावरील मातोश्री इमारती मध्ये रहाणारे बंडू श्रीराम पांडे असे या व्यवसायीकाचे नांव असून अवघ्या ५६ वर्षे वयाच्या या दुदैवी व्यवसायीकाच्या पश्चात पत्नी आशा ( ५१ ) विवाहीत मुली चेतना ( २८ ) , रोशनी ( २६ ) आणि अविवाहीत मुलगी श्रुतीका असा परिवार आहे.

वर्धा जिल्ह्यातील पुलगांव या आपल्या मुळगावाहून ८० च्या दशकात व्यवसाया निमित्त कल्याण पूर्वैत स्थानिक झाल्या नंतर बंडू पांडे यांचा ओम शांती प्रिन्टर्स या नावाने प्रिटींग प्रेस चा व्यवसाय मोठ्या जोमात चालला होता. गेल्या ६ ते ७ वर्षा नंतर त्यांनी उल्हासनगर कॅम्प नं . ३ मध्ये आपल्या व्यवसायात जम बसविला होता. या दरम्यान त्यांच्या वर अनेक संकटे आली. अशाही परिस्थितीत त्यांनी प्रत्येक संकटावर मात करून आपल्या व्यवसायात भरभराट निर्माण केली होती. परंतु गेली १७ ते १८ महिने कोरोनाच्या लॉकडाऊन मुळे प्रिटींग प्रेसचा व्यवसाय पुर्ण पणे ठप्प झाला होता. अशातच उल्हास नगर कॅम्प नं. ३ मधील प्रेस च्या गाळ्याचे भाडेही वाढू लागल्याने त्यांनी गेल्या पंधरा दिवसां पासून प्रिन्टींग प्रेसचे साहित्य विकण्यास सुरुवात केली होती. या सर्व परिस्थितीमुळे नैराश्य आल्याने त्यांनी सोमवारच्या रात्री घरातील एका खोलीत जाऊन पंख्याला गळफास लावून आत्महत्या केली. या समयी त्यांची पत्नी आणि दोन मुली दुसऱ्या रुम मध्ये होत्या. फाशी घेण्यापूर्वी त्यांनी हाताच्या नसा कापून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यातून जिव जात नसल्याने घरातील पंख्याला गळफास लावून आत्महत्या केल्याचे प्रथम दर्शनी नागरीकांकडून सांगितले जात आहे.

अत्यंत कष्टमय जिवन जगत असतांनाच त्यांनी आपल्या एका मुलीला डॉक्टर केले आहे. त्यांनी काही काळ एका पतसंस्थेत वसुली अधिकारी म्हणूनही पार्ट टाईम नोकरी केली होती. अखेर लॉकडाउने निर्माण केलेल्या आर्थिक संकटामुळे आलेल्या नैराश्येतून आत्महत्या केल्याचे बोलले जात आहे. त्यांच्या पार्थिवावर विठ्ठलवाडी स्मशान भूमीत मोठ्या शोकाकूल वातावरणात त्यांच्या मुलींनी मुखाग्नी देऊन अंत्यसंस्कार करण्यात आला. या समयी समर्थ मित्र मंडळ, तिसाई नागरी सहकारी पतपेढीचे सर्व सदस्य, पदाधिकारी तसेच त्यांचे चाहते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

लेखणी :- आनंद गायकवाड (पत्रकार)

लॉकडाऊनमुळे अनेक व्यापारी क्षेत्रातील लोक सध्या अडचणीत आणि तणावात असल्याचे चित्र पहायला मिळत आहे. सतत लादल्या जाणाऱ्या निर्बंधांचा परिणाम अनेक व्यावसायिकांवर होताना दिसत आहे. यामुळे हसत्या खेळत्या कुटुंबांच्या चेहऱ्यावर सुखाची चिन्हे दिसेनाशी होऊ लागली आहेत. कोरोना महामारीमुळे प्रशासनाची नामुष्की असल्याने लॉकडाउन रुपी संकट आ वासून उभे आहे. परंतु आत्महत्या हा यावर मार्ग नसून एका वादळाप्रमाणे सामना करा हे ही दिवस बदलतील. शेवटी जीवनच महत्त्वाचे आहे. संयम ठेवा आत्महत्या करू नका असे आवाहन आमच्या कडून केले जात आहे.

-संतोष दिवाडकर

अंगारकी चतुर्थीला टिटवाळा महागणपती मंदिरातील मुखदर्शन राहणार बंद

मंगळवार दिनांक २७ जुलै रोजी अंगारकी चतुर्थी असून प्रतिवर्षी आपल्या लाडक्या गणरायाचे दर्शन घेण्यासाठी अनेक गणेश भक्त लांबून लांबून टिटवाळा नगरीत येत असतात. यावेळी मोठ्या प्रमाणांत मंदिर परिसरात गर्दी होत असते.

या वर्षीदेखील  कोरोनाचे सावट असून अंगारकी चतुर्थीच्या दिवशी मंदिराच्या आवारात भाविकांची खूप गर्दी होण्याची शक्यता आहे . कोरोना महामारीचे संकट हे अद्यापही टळले नसल्याने अंगारकी चतुर्थीला कोरोना प्रतिबंधक नियम भाविकांकडून पाळले गर्दी अभावी पाळले जाणार नाहीत. आणि म्हणूनच मंगळवार दिनांक २७ जुलै रोजी अंगारकी चतुर्थीला मंदिराचे आवार पूर्ण दिवस रात्र बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे मुखदर्शन देखील बंद राहील असे मंदिर विश्वस्तांकडून  एका प्रसिद्धी पत्रकाव्दारे सांगण्यात आले आहे. भाविकांना होणाऱ्या त्रासाबद्दल विश्वस्तांनी  दिलगिरी व्यक्त केली असून ग्रामस्थांनी व्यापारी व भाविकांनी सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

-कुणाल म्हात्रे

पूरग्रस्त भागाचे तहसील कार्यालयामार्फत पंचनामे सुरु

दोन दिवसांपूर्वी आलेल्या पुराच्या पाण्यामुळे नदी किनारी आणि खाडी किनारी राहणाऱ्या नागरिकांच्या घरांचे, शेतीचे इतर मालमत्तांचे मोठे नुकसान झाले आहे. झालेल्या या नुकसानाचे सर्वेक्षण करून पंचनामे करण्यास कल्याण तहसील कार्यलयाच्या वतीने सुरवात करण्यात आली आहे.

      पुरामुळे नुकसान झालेल्या नागरिकांना भरपाई देण्यासाठी तातडीने पंचनामे करण्याचे आदेश राज्यशासनाने सर्व जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहे. त्यानुसार जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या आदेशानुसार कल्याणचे तहसीलदार दीपक आकडे यांनी कल्याण तालुक्यातील पूरग्रस्त भागाचे पंचनामे करण्याचे आदेश सर्व तलाठ्यांना दिले आहेत. त्यानुसार आजपासून  पूरग्रस्त भागांचे सर्वेक्षण करून पंचनामे करण्यात येत आहेत. त्यामुळे पूरग्रस्तांना काही प्रमाणात का होईना दिलासा मिळण्याचे चिन्ह दिसू लागले आहेत.   

      कल्याण मधील उंबर्डे, सापर्डे, बारावे, योगीधाम, भवानीनगर, शहाड, बंदरपाडा, वडवली, अटाळी, आंबिवली, म्हारळ, कांबा, वालधुनी आदी परिसरातील आधी घरांमध्ये पाणी शिरलेल्याचे पंचनामे करण्यात येणार असून त्यानंतर शेती नुकसानीचे पंचनामे करण्यात येणार असल्याची माहिती मंडल अधिकारी लक्ष्मण पवार यांनी दिली.

-कुणाल म्हात्रे

आधारवाडी डम्पिंग ग्राउंडवर पुन्हा कचरा टाकायला सुरुवात

गेल्या अनेक वर्षांच्या मेहनतीनंतर कल्याण डोंबिवली महानगर पालिकेने आधारवाडी डम्पिंग ग्राउंड बंद केले. मात्र दोन दिवस झालेल्या पावसामुळे आणि आलेल्या पुरामुळे  कल्याण मधील उंबर्डे आणि बारावे येथील कचरा प्रक्रिया केंद्र पाण्यात बुडाल्याने शहरातील अनेक भागात कचऱ्याचे ढीग लागले होते. अखेर आज आधारवाडी डम्पिंग ग्राउंड पुन्हा सुरु करण्याची नामुष्की केडीएमसी प्रशासनावर ओढवली आहे.

      आधारवाडी डम्पिंग ग्राउंड बंद करण्यासाठी केडीएमसीच्या वतीने विविध ठिकाणी कचरा प्रक्रिया केंद्र आणि कचरा वर्गीकरण केंद्र उभारली असून काल आलेल्या पुरामुळे हे कचरा प्रकल्प पाण्यात गेले आहेत.  बारावे आणि उंबर्डे येथील या प्रकल्पांमध्ये पाणी साचल्याने हे प्रकल्प नियमांचे उल्लंघन करून बांधले असल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे.

      बारावे व उंबर्डे या दोन डम्पिंग ग्राउंडवर प्रशासनाने कोणत्याही प्रक्रियेविना कचरा टाकायला सुरुवात केली ही बाबच बेकायदेशीर आहे. स्थानिक नागरिकांनी या गोष्टीस आक्षेप घेतला होता. कोणतेही डम्पिंग ग्राउंड नवीन सुरू करताना त्या साइटवर गेल्या शंभर वर्षात पुराचे पाणी आलेले नाही अशी साइटच फक्त बायोगॅस प्लांट किंवा डम्पिंग साठी घेता येते. उंबर्डे व बारावे या डम्पिंग वर पुराचे पाणी भरल्याने सद्यस्थितीत कचरा टाकता येत नाही. केंद्र शासनाच्या व राज्य शासनाच्या निकषाप्रमाणे ही बाब बेकायदेशीर असल्याचा आरोप माहिती अधिकार कार्यकर्ते श्रीनिवास घाणेकर यांनी केला आहे.

 आधारवाडी डम्पिंग ग्राउंड बंद करण्याच्या वेळेस घाणेकर यांनी प्रशासनाला सविस्तर पत्र दिले होते. त्या पत्रामध्ये समग्र आकडेवारी सकट सर्व परिस्थिती प्रशासनाला विदीत केलेली होती. पुराचे पाणी या दोन्हीही डम्पिंग वर भरलेले असल्याने या ठिकाणी केलेले कचऱ्याचे संकलन हे पूर्णपणे बेकायदेशीर असून दीड महिना उलटून सुद्धा दिलेल्या पत्रावर प्रशासनाने काहीही कारवाई केलेली दिसत नसून प्रशासन फक्त नागरिकांची दिशाभूल करत असल्याची टीका माहिती अधिकार कार्यकर्ते श्रीनिवास घाणेकर यांनी केली आहे. दरम्यान उंबर्डे आणि बारावे या कचरा प्रकल्पांवरील पुराचे पाणी ओसरेपर्यंत आणि पुन्हा हे प्रकल्प कार्यन्वित होईपर्यंत आधारवाडी डम्पिंग ग्राउंडवर कचरा टाकण्यात येणार आहे. तर कचरा प्रकल्प बंद असल्याने शहरात जागोजागी कचऱ्याचे ढीग साचल्याचे दिसून आले.

-कुणाल म्हात्रे

फक्त एक चुकीचा निर्णय आणि कुटुंबावर कोसळला दुःखाचा डोंगर; कल्याण पूर्वेतील दोघांना मलंगगडच्या ओढ्यात जलसमाधी

कल्याण पूर्व आमराई येथील राहणाऱ्या दोन तरुणांचा मलंगगड भागातील ओढ्याच्या पाण्यात बुडुन मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना काल घडली होती. २४ तासानंतर दोन्ही तरुणांच्या मृतदेहाचा शोध घेण्यात NDRF च्या जवानांना यश आले आहे. या घटनेनंतर दोन्ही कुटुंब आणि आमराई परिसरात शोककळा पसरली आहे. तर झाल्या घटनेनंतर मलंगगड विभागात देखील हळहळ व्यक्त केली जातेय. इशांत मोहोडकर आणि विनायक परब अशी मृत तरुणांची नावे आहेत. दोघेही १८-१९ च्या वयोगटातील होते.

अशी घडली दुर्दैवी घटना :- संपूर्ण जिल्ह्यात गेली चार पाच दिवस मुसळधार पाऊस सुरू होता. अनेक ठिकाणी पाणी साठले होते. नद्या,ओढे,नाले दुथडी भरून वाहत होते. पुलांवरून पाणी वाहत होते. निसर्गप्रलय सुरू असताना शहरी भागात राहणाऱ्या तीन तरुणांचा मलंगगड भागात वर्षा पर्यटनाला जाण्याचा मोह झाला. त्यांनी इतर मित्रांनाही संपर्क केला असेलच मात्र बाहेरील पावसाचा रुद्रावतार पाहता काहींना पर्यटनाला जाणे जमले नसेल. त्यामुळे इन मिन तिघेच मलंगगड भागात जाण्यास निघाले. दुपारी पावसाचा आस्वाद घेत तिघेही मलंगगड भागात आले. या भागातील चिंचवली भागात ते थांबले होते. आणि तितक्यात दोघांना पाण्यात उतरण्याचा मोह झाला. असं म्हणतात की आग आणि पाणी यांच्या नादाला कधीही लागू नये. प्रचंड पावसाने धो धो पाणी वाहत असतानाही ते दोघे पाण्यात उतरले. पावसा पाण्याचा त्या दोघांनाही अंदाज नव्हता. आणि प्रवाहा बरोबर ते दोघेही वाहून गेले. किनाऱ्यावर उभ्या असणाऱ्या त्यांच्या तिसऱ्या मित्राच्या काळजाचा ठोका चुकला. त्याच्या डोळ्या देखत त्याचे दोन्ही मित्र निघून गेले होते. तेच शेवटचे क्षण आणि तीच शेवटची भेट. पोहता येत नसल्याने मी पाण्यात उतरलो नसल्याचे त्याने पोलिसांना सांगितले.

घटना घडल्यानंतर स्थानिकांना खबर देण्यात आली. यानंतर घटनास्थळी पोलिसांनी धाव घेतली. त्याअगोदर स्थानिकांनी देखील दोघे कुठे दिसतात का हे पाहण्याचा प्रयत्न केला. मात्र नजरेला पाण्याशिवाय काही पडत नव्हते. पोलिसांनी घाबरलेल्या तिसऱ्या तरुणास पोलीस ठाण्यात चौकशीसाठी नेले. पाण्याचा प्रवाह इतका भयावह होता की त्यात शोधकार्य करणे अवघडच.

२४ तासांनी मृतदेहांचा शोध :- स्थानिक रहिवासी पाण्यात उतरून शोध घेत होते मात्र काही तपास लागत नव्हता. खासदार श्रीकांत शिंदे यांच्या निर्देशानंतर दुसऱ्या दिवशी शुक्रवारी NDRF च्या जवानांची शोधमोहीम सुरू झाली. दुपारच्या सुमारास इशांत मोहोडकरचा मृतदेह शोधण्यास जवानांना यश आले. घटनास्थळी हिललाईन पोलीस, स्थानिक ग्रामस्थ, ग्रामपंचायतीची लोक, शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच मा. नगरसेवक महेश गायकवाड, पत्रकार असे अनेक लोक जमले होते. दुसऱ्या तरुणाच्या मृतदेहाचा शोध अनेक तासानंतरही लागत नव्हता. यानंतर स्कुबा डायव्हर्सला पाचारण करण्यात आले. पाण्याच्या तळाशी जाऊन शोधमोहीम पुन्हा सुरू झाली. आणि तासाभरातच दुसरा मृतदेह पाण्या बाहेर आला. विनायक परबचा हा मृतदेह होता. आणि यानंतर जवानांच सकाळपासून सुरू असलेला शोधकार्य सायंकाळी थांबलं.

कसे होते हे दोघे तरुण ? :- इशांत मोहाडीकर हा १९ वर्षांचा होता. तर विनायक परबचा १८ वा वाढदिवस अवघ्या १२-१३ दिवसांवर आला होता. मात्र त्या अगोदरच काळाने घाला घातला. दोघां बद्दल सांगायचं झालं तर दोघेही लहानापासूनचे एकाच चाळीत राहणारे बालमित्र. ‘ओम धर्मवीर’ या चाळीत दोघेही एकमेकांशी खेळत वाढले होते. दोघेही सामान्य घरातील होते आणि शिवाय घरच्यांना एकुलते एक असे वंशाचे दिवे होते अशी माहिती प्राप्त झाली आहे. दोघांच्या घरची परिस्थिती फारशी चांगली नाही. इशांतचे वडील वायरमन म्हणून कुटुंबाची उपजीविका करतात तर विनायकचे कुटुंबीय हातगाडी लावून छोटासा व्यवसाय करतात. ते पूर्वी राहत असलेली चाळ डेव्हलपमेंट प्रोजेक्टसाठी गेल्याने मोहाडीकर कुटुंबीय प्रतापगड चाळीत तर परब कुटुंबीय विशाल नगरीत राहत असल्याची माहिती आहे. परब हे पूर्वापार पासूनचे शिवसैनिक आहेत.

आई वडिलांनी आता काय करावं ? :- आज हे दोघेही मित्र जगाचा निरोप घेऊन निघून गेलेत. मात्र त्यांच्या पश्चात त्यांच्या कुटुंबियांवर दुःखाचा मोठा डोंगर कोसळला आहे. जन्मदाती आई आणि संगोपन करणाऱ्या पित्याने आपल्या पोटच्या लेकराला गमावले आहे. ज्याच्यासाठी जगायचं तोच निघून गेल्याने जीवनाचा आधार हरपला असल्याचे दुःख त्यांना आता झाले आहे. प्रत्येक आई वडिलांच्या आपल्या मुलांवर जीव असतो. त्याचबरोबर काही स्वप्न, इच्छा, आकांशा या देखील असतात. मात्र नियतीने सर्वावरच पाणी फेरल आहे.

तमाम तरुणांना हात जोडून नम्र विनंती :- आणि विनायक सारख्या तरुणांना आवाहन करण्यात येत आहे की तुम्ही तारुण्यात ज्या चुका करता जे निर्णय घेता त्या आधी स्वतःच्या जीवाची नाही पण घरच्यांची तरी पर्वा करावी. अश्या ठिकाणी फिरायला जाणे, नको ते साहस करणे जीवावर बेतणारे आहे. तारुण्य हे मजा करायचं वय आहे असे समजून जगा पण त्याचबरोबर आपण काय करतोय ? त्याचे काय परिणाम होऊ शकतात याचाही विचार करा. घरातील तरुण मुलं घराबाहेर पडतात आणि अश्या घटना घडतात की त्या माता पित्यांना पुढील आयुष्यात फक्त अंधार शिल्लक राहतो. तरुणांनो आपल्या आई वडिलांचा विचार करा असे साहस करणे टाळा. मजहजा एका विशिष्ट पद्धतीने स्वतःची व इतरांची काळजी घेऊन करा. आज इशांत आणि विनायकच्या कुटुंबियांच्या मनाची जी अवस्था आहे ती पाहून तरी सावध व्हा. अन्यथा क्षणभराची मजा आयुष्याला सजा बनू शकते हे वेगळं सांगायला नको. हुल्लडबाजी बंद करून आई वडिलांसाठी जगा असं विनंतीवजा आवाहन तमाम तरुणांना हात जोडून करीत आहे. तुम्हाला यावर काय वाटतं ? कमेंट मध्ये अभिप्राय कळवा.

-संतोष दिवाडकर

मोबाईल टॉवरसाठी लागणारे महागडे मशीन चोरणारी टोळी गजाआड; कल्याण क्राईम ब्रँचचा यशस्वी शोध

मोबाईल टॉवरच्या केबल कनेक्शनसाठी लागणाऱ्या महागड्या मशीनची ठाणे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात चोरी होण्याच्या घटना घडल्या आहेत. कल्याण क्राईम ब्रांचने यशस्वीरित्या अशा चोरी करणाऱ्या टोळीच्या मुसक्या आवळल्या असून तिघा जणांना तुरुंगाची हवा दाखवली आहे.

गुन्हे शाखा घटक ३ कल्याणकडून करण्यात आलेल्या तपासात मोबाईल टॉवर संबंधित महागडं मशीन चोरणारी टोळी गजाआड झाली आहे. मशीन चोरीचे गुन्हे विविध पोलीस स्थानकात दाखल करण्यात आले होते. या प्रकारच्या चोरीचे गुन्हे वाढत असल्याने क्राईम ब्रांचची डोकेदुखी वाढली होती. त्यानंतर गुन्हे शाखा घटक ३ कल्याणचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजू जॉन यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अंमलदार हवालदार दत्ताराम भोसले यांनी गोपनीय महितगारामार्फत गुप्त माहिती काढली आणि पोलीस अधिकाऱ्यांसमवेत सखोल तपास केला. या तपासा नंतर तिघांना संशयित म्हणून ताब्यात घेण्यात आले. कैलास सावंत, अकबर शेख आणि संजय सौदे अशी तिघांची नावं असून तिघेही उल्हासनगर येथील राहणारे आहेत.

अटक केलेल्या तिघांची कसून चौकशी केली असता त्यांनी स्लायसिंग मशीन, ओटीडीआर मशीन, लेझर लाईट पॉवर मीटर अशा विविध प्रकारच्या महागड्या मशिन्स चोरी केल्याचे कबूल केले आहे. या नंतर कल्याण तालुका पोलीस ठाणे, हिललाईन पोलीस ठाणे आणि शिवाजीनगर पोलीस ठाण्यात नोंदवलेले तीन गुन्हे उघडकीस आले आहेत. याशिवाय आणखी गुन्ह्यांची देखील उकल होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

पोलीस आयुक्त जयजीत सिंग, सहाय्यक पोलीस आयुक्त सुरेश मेकला, अप्पर पोलीस आयुक्त संजय येनपुरे, पोलीस उप आयुक्त लक्ष्मीकांत पाटील, सहाय्यक पोलीस आयुक्त एन टी कदम यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा घटक ३ कल्याणचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजू जॉन, सहाय्यक पोलीस निरीक्षक भूषण एम दायमा, पोलीस उप निरीक्षक नितीन मगदूम, मोहन कळमकर, पोलीस हवालदार दत्ताराम भोसले, राजेंद्र घोलप, राजेंद्र खिलारे, सचिन साळवी, मंगेश शिर्के, हरिश्चंद्र बांगरा, पोलीस शिपाई अजितसिंग राजपूत, सचिन वानखेडे, गुरुनाथ जरग या सर्वांनी ही यशस्वी कामगिरी केली आहे.

-संतोष दिवाडकर

क.डों.म.पा.च्या बारावे आणि उंबर्डे कचरा प्रकल्पात पाणीच पाणी

आधारवाडी डम्पिंग ग्राउंड बंद करण्यासाठी केडीएमसीच्या वतीने विविध ठिकाणी कचरा प्रक्रिया केंद्र आणि कचरा वर्गीकरण केंद्र उभारली असून रात्री झालेल्या पावसामुळे हे कचरा प्रकल्प पाण्यात गेले आहेत.  कल्याण मधील बारावे आणि उंबर्डे येथील या प्रकल्पांमध्ये पाणी साचल्याने हे प्रकल्प नियमांचे  उल्लंघन करून बांधले असल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे.

बारावे येथे उभारण्यात आलेला कचरा वर्गीकरण प्रकल्प कल्याण डोंबिवली महानगरपालिकेने एन.जी.टी कोर्टाच्या सर्व नियमांचे उल्लंघन करत हा प्रकल्प बारावे येथे चालू केला आहे. घनकचरा उपायुक्त रामदास कोकरे यांनी नागरिकांना आश्वासन दिले होते की सर्व नियमांचे पालन करून हा प्रकल्प येथे चालवला जाईल परंतु या ठिकाणी कचराच कचरा अस्तव्यस्त पडलेला आहे यावर कोणत्याही प्रकारची प्रक्रिया केली जात नाही महापालिकेने लावलेल्या सर्व मशिन्स बंद आहेत.

केडीएमसी आयुक्तांनी आधारवाडी डंपिंग ग्राउंड बंद करून एका ठिकाणी नागरिकांना दिलासा दिला तर दुसऱ्या ठिकाणी नियमांचे उल्लंघन करून प्रकल्प चालु केला असल्याचा आरोप येथील नागरिकांनी केला आहे. या प्रकल्पाला विरोध नसून सर्व नियमांचे पालन करून तो झालाच पाहिजे मात्र हे प्रकल्प नागरिकांच्या जीवावर बेतता कामा नये अशी प्रतिक्रिया बारावे गोदरेज हिल सामाजिक संस्थेचे अध्यक्ष सुनिल घेगडे यांनी दिली.

-कुणाल म्हात्रे

मोहिली उदंचन केंद्रात पाणी शिरल्याने कल्याण डोंबिवलीच्या पाणी पुरवठ्यावर परिणाम

मागील चार-पाच दिवसांपासून पडत असणारया मुसळधार पावसामुळे उल्हास नदीच्या पातळीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. परिणामी उल्हास नदीकिनारी असलेल्या केडीएमसीच्या मोहिली उदंचन आणि जलशुद्धीकरण केंद्रामध्ये गुरुवारी पहाटे रोजी उल्हास नदीचे पाणी शिरल्याने पाणीपुरवठा बंद करण्यात आला आहे.

ही केंद्र बंद असल्यामुळे संपूर्ण ‘अ’ प्रभाग, ब प्रभागातील बिर्ला कॉलेजच्या बाजूच्या परिसर आणि वालधुनी भागातील पाणीपुरवठा बंद करण्यात आला आहे. तर मोहीली उदंचन केंद्रातील पाणीपुरवठा बंद केल्याने डोंबिवली पूर्व आणि डोंबिवली पश्चिम भागांचा पाणीपुरवठा पहाटे तीन वाजल्यापासून बंद करण्यात आला आहे.

सद्यस्थितीत बारावे जलशुद्धीकरण केंद्रातून कल्याण पूर्व आणि कल्याण पश्चिमेतील खडकपाडा, क प्रभागक्षेत्र परिसरात  पाणीपुरवठा सुरळीत सुरू आहे. मोहिली जलशुद्धीकरण केंद्र आणि  मोहिली उदंचन केंद्रामध्ये साचलेले पाणी ओसरल्यानंतर आवश्यक ती दुरुस्ती करून पाणीपुरवठा सुरू करण्यात येणार असल्याचे केडीएमसीतर्फे सांगण्यात आले आहे.

-कुणाल म्हात्रे

आषाढी एकादशी निमित्त सिद्धार्थ विद्या मंदिर मध्ये रंगला पालखी सोहळा

कल्याण पूर्वेतील विद्यार्थी सहाय्यता प्रतिष्ठानचे सिद्धार्थ विद्या मंदिर मध्ये आषाढी एकादशीनिमित्त शाळा स्तरावर पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. महाराष्ट्राला फार मोठी संत परंपरा लाभलेली आहे. त्यानिमीत्ताने संत ज्ञानेश्वर माऊलींचे पूजन, तुळशी पूजन करून सोहळयाची सुरवात करण्यात आले.

 शाळेच्या मुख्याध्यापिका कल्पना शेवाळे व ज्योत्स्ना चाळसे यांनी दीपप्रज्वलन केले. विठूरायाची आरती गायन सर्व शिक्षकांनी केले. यावेळी हनुमंता पावडे यांनी एकादशीची सुरवात केव्हा व कशी झाली आणि उपवास का केला जातो, याविषयी माहिती दिली. तर अशोक काठे यांनी आपल्या मधुर वाणीने अभंग व गवळणीची गायन केले. शेवटी प्रासादिक अभंगांचे  गायन करून प्रसाद वाटप करण्यात आले. त्यांना शर्मिला साळुंके आणि रामदास चौरे यांनी साथ दिली.

यावेळी विठूनामाच्या गजरात सर्व शिक्षकांनी फेरा धरला, फुगडी खेळली त्याचबरोबर पालखी नाचवली अशा पध्दतीने शाळेतच पंढरपूर अवतरल्याचा अनुभव सर्वांना घेतला. या पारंपरिक सोहळ्याचे सूत्रसंचालन शर्मिला साळुंके यांनी केले तर सर्व उपस्थितांचे आभार चौधरी सर यांनी मानले.

-कुणाल म्हात्रे