मलंगगडच्या चिरड गावचा पूल वाहतुकीसाठी धोकादायक ; गावकऱ्यांनी बांबूंचा दिला आधार

खोणी-तळोजा महामार्गाच्या जवळपास असलेल्या चिरड गावचा पूल वाहतुकीसाठी धोकादायक झाला आहे. सध्या या पुलाचे संरक्षक कठडे कोसळले असून पुलाच्या कठड्यांना बांबूच्या काठ्यांचा आधार दिलेला आहे. मात्र हा पूल जीर्ण झाल्याने कोसळण्याची भीती व्यक्त गावकऱ्यांकडून केली जात आहे.

अंबरनाथ तालुक्यातील मलंगगड भागात असलेल्या चिरड शेलारपाडा या गावांच्या जोड रस्त्याला असलेला पूल हा वाहतुकीसाठी धोकादायक बनला आहे. या पुलावरून नागरिक ये-जा करत असल्याने अपघाताची भीती व्यक्त केली जात आहे. मात्र असे असताना प्रशासनासह लोकप्रतिनिधी दुर्लक्ष करत असल्याने त्यांचं हे दुर्लक्ष अपघातांना निमंत्रण देऊ शकत असं येथील लोकांचं म्हणणं आहे.

माजी मंत्री शबीर शेख यांच्या कार्यकाळात २६-२७ वर्षांपूर्वी या पुलाचे काम झाले होते. मात्र त्या नंतर या पुलाचे कोणत्याही प्रकारचे काम झालं नसल्याने सध्या या पुलावर अपघाताची भीती व्यक्त केली जात आहे. चिरड गाव हा खोणी तळोजा या महामार्गाला लागूंन असल्यानं वाहनांची मोठ्या प्रमाणात या पुलावरून ये जा होत असते. त्यामुळे या पुलावर अपघात होऊ नये म्हणून ग्रामस्थांनी बांबुच्या काठ्यांचा आधार दिला आहे. मात्र अधिक पाऊस झाला आणि या पुलामुळे अपघात घडल्या नंतर प्रशासनाला जाग येणार का ? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

-संदेश दाभणे

“खुलेआम मारतो तो राजसाहेब ठाकरे…आपल्याला अशीच माणसं आवडतात” – हिंदुस्थानी भाऊ राज ठाकरेंच्या भेटीला

संपूर्ण देशभरात लोकप्रिय असलेला व ज्याने समाज माध्यमातून लोकांमध्ये स्वतःची वेगळी अशी ओळख निर्माण अशा हिंदुस्थानी भाऊ ने आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची सदिच्छा भेट घेतली. या दरम्यान दोघांमध्ये काही वेळ चर्चा झाली व त्यानंतर राज ठाकरेंबद्दल बोलताना त्याने आपल्या शैलीतून उत्तर दिले.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे आपल्या भाषणातून रोखठोक मुद्दे मांडत असतात. सध्या एकच आमदार असला तरीही महाराष्ट्राच्या राजकारणात त्यांचं वजन खूप अधिक आहे. त्याचबरोबर लोकप्रियता देखील तितकीच लाभली आहे. रोखठोक बोलण्याच्या बाबतीत हिंदुस्थानी भाऊ देखील देशभरात प्रसिद्ध आहे. तोंडातून निम्म्या शिव्या हसडणारा पण चांगल्या वाईटाची पारख असल्याने भाऊला देखील लोकांचे प्रेम लाभले आहे. मुळात पाकिस्तानला भाऊने सळो की पळो करून सोडले आहे. तरी काही प्रमाणात भाऊच्या स्टाईलवर फिदा झालेले फेन पाकिस्तानात देखील आहेत.

कला दिग्दर्शक राजू सापते यांच्या दुर्दैवी आत्महत्येनंतर मनसे चित्रपट कामगार सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर कार्याध्यक्ष शालिनी ठाकरे यांच्या पुढाकाराने मराठी चित्रपट, टीव्ही क्षेत्रातील मान्यवरांनी राजसाहेब ठाकरेंची भेट घेऊन त्यांना परप्रांतीय युनियनच्या दादागिरीमुळे भेडसावणाऱ्या समस्यांबाबत चर्चा केली. यावेळी अमेय खोपकर यांच्या समवेत हिंदुस्थानी भाऊ देखील राज ठाकरेंच्या भेटीला गेला असल्याचे सूत्रांकडून सांगितले जात आहे.

हिंदुस्थानी भाऊंनी राज ठाकरेंची सदिच्छा भेट घेतल्यानंतर बाहेरील उपस्थित जमावाने भाऊंना भेटीबाबत विचारले असता भाऊने देखील त्याच्याच स्टाईलमध्ये उत्तर दिले. “खुलेआम मारतो तो राजसाहेब ठाकरे… आपल्याला अशीच माणसं आवडतात” असे उद्गार त्याने गाडीत बसण्यापूर्वी काढले. सध्या हा व्हिडीओ मनसे कार्यकर्त्यांमध्ये व्हायरल होऊ लागला आहे.

-संतोष दिवाडकर

कल्याणमध्ये राष्ट्रवादीत धनदांडग्यांच्या गटाकडून गरिब कार्यकर्त्यांचा छळ ; राष्ट्रवादी विद्यार्थी कॉंग्रेसच्या माजी जिल्हाध्यक्षांचा आरोप

राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीमध्ये धनदांडग्यांच्या गटाकडून गरिब कार्यकर्त्यांचा छळ सुरु असून आपल्याला विश्वासात न घेता पदमुक्त केल्याचा आरोप राष्ट्रवादी विद्यार्थी कॉंग्रेसचे कल्याण डोंबिवली माजी जिल्हाध्यक्ष प्रसाद महाजन यांनी केला आहे. याबाबत त्यांनी प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांच्याकडे तक्रार करत संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

      ३० जानेवारी २०२० रोजी प्रसाद महाजन यांना राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस पक्षाच्या कल्याण डोंबिवली जिल्हा अध्यक्ष या पदावर नियुक्ती करण्यात आली. पदभार स्वीकारल्यानंतर काही दिवसातच संपूर्ण देशभर कोरोना प्रादुर्भावामुळे संपूर्णता लाकडाऊन लावण्यात आल्याने सर्व कॉलेज शाळा बंद असल्याने विद्यार्थ्यांशी थेट संपर्क होणे शक्य नव्हते. अशातही महाजन यांनी संपर्कातील राष्ट्रवादी विचारांशी एकनिष्ठ असणारया विद्यार्थ्यांशी संपर्क करुन संघटना बांधणी सुरू केली. विद्यार्थी संघटना वाढीस सुरवात केली.

 या नियुक्तीला कालावधी १६ महीनेही पुर्ण झालेला नसताना अचानकपणे जुन २०२१ मध्ये विश्वासात न घेता कुठल्याही प्रकारची चर्चा न करता पदमुक्त करण्यात आले. पक्षातील एक धनदांडग्यांचा गट संघटनेत काम करणाऱ्या सामान्य कुटुंबातील गरिब कार्यकर्ताचा छळ करत अपमानास्पद वागणूक देत सतत हेटाळणी करत असल्याचा आरोप प्रसाद महाजन यांनी केला आहे.

या सर्व प्रकाराला राष्ट्रवादी विद्यार्थी कॉंग्रेसचे कोकण विभाग अध्यक्ष किरण शिखरे हे जावाबदार असून त्यांनी २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत अपक्ष उमेदवाराचा प्रचार केला असल्याचे महाजन यांचे म्हणणे असून याबाबत पक्षातील वरीष्ठ नेत्यांकडे तक्रार केली असून याविषयी सखोल चौकशी करत योग्य ती कारवाई करण्याचे शाश्वत आश्वासन पक्षातील वरीष्ठ नेत्यांकडून देण्यात आले असल्याचे महाजन यांनी सांगितले.

दरम्यान याबाबत राष्ट्रवादी विद्यार्थी कॉंग्रेसचे कोकण विभाग अध्यक्ष किरण शिखरे यांना विचारले असता, प्रसाद महाजन हा मूळचा शिवसैनिक त्यामुळे त्यांनी मला पक्षनिष्ठा शिकवू नये. कल्याण डोंबिवली विद्यार्थी अध्यक्ष पदाची जबाबदारी प्रसादकडे असताना संघटनेचे काम असमाधान कारक होते. त्या मुळे विद्यार्थी प्रदेश अध्यक्ष व स्थानिक राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हा अध्यक्ष अप्पा शिंदे व जिल्हा कार्याध्यक्ष डॉ. वंडार पाटील यांच्या शिफारशी वरून सुजित रोकडे यांना जबाबदारी देण्यात आली आहे. आज राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस मध्ये मोठ्या प्रमाणात युवा सेनेचा प्रवेश होत असून प्रसाद महाजन हे आरोप जाणीवपूर्वक सुपारी घेऊन करत असल्याचे त्यांनी सांगितले.

-कुणाल म्हात्रे

मलंगगड भागातील ओढ्यात असंख्य खेकड्या माश्यांचा मृत्यू ; ओढ्यात मिसळले गेले प्रदूषित पाणी

अंबरनाथ तालुक्यातील मलंगगड भागातील ओढ्यात प्रदूषित किंवा रासायनिक पाणी सोडल्याने ओढ्यातील मासे मोठ्या प्रमाणात मृत्युमुखी पडले आहेत. इतक्या माशांचा मृत्यू कसा झाला असावा ? हा प्रश्न पाहता या गंभीर प्रकरणात प्रशासनाने लक्ष घालावे अशी मागणी ग्रामस्थ करत आहेत.

कल्याण जवळील मलंगगड परिसरात असलेल्या करवले कुंभार्ली येथील ओढ्यात मोठ्या प्रमाणात मासे मृतावस्थेत आढळले आहेत. विशेष म्हणजे पाण्याला देखील तेलसदृश तवंग आणि पांढरा फेस आल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे प्रदूषणास कारणीभूत असलेल्या पोल्ट्री फार्म आणि कंपन्यावर कारवाई करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे. मात्र हे मृतावस्थेत असलेले मासे आणि खेकडे या परिसरातील आदिवासींनी उल्हासनगर, कल्याण आणि आजूबाजूच्या शहरांसह ग्रामीण भागात देखील विक्रीसाठी नेले असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले आहे. त्यामुळे हे मासे जर कुणी खाल्ले तर विषबाधा होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे आता सध्या या परिसरात प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मात्र एवढी मोठी घटना होऊन देखील प्रदूषण नियंत्रण महामंडळाने कोणत्याही प्रकारची गांभीर्याने दखल घेतली नसल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. पुढील काही दिवस परिसरातील नागरिकांनी नदीमधील मासे खाऊ नयेत असे आवाहन ग्रामस्थांनी केले आहे.

मलंगगड हा अंबरनाथ तालुक्यातील एक ग्रामीण भाग आहे. कल्याण पासून जवळ असल्याने कल्याणकर देखील मोकळी हवा घेण्यासाठी या भागात येतात. कारण हा भाग संपूर्णपणे निसर्गाने नटलेला आहे. परंतु आता या भागात काही ठिकाणी जीन्स बनवण्याचे कारखाने बनवले गेले आहेत. ज्यातून प्रक्रिया न करता पाणी सोडले जाते. ओढ्यातून जाणाऱ्या शुद्ध पाण्यात हे पाणी मिसळल्याने या भागात जल प्रदूषण वाढीस लागले आहे. त्यामुळे शासनाने वेळीच लक्ष घालावे अशी मागणी जोर धरू लागली आहे.

-संदेश दाभणे

कल्याण मध्ये लस घेण्यासाठी निघालेल्या महिलेचा खड्ड्याने घेतला बळी

कल्याण पश्चिमेतील गांधारी रोडवर दीरासोबत दुचाकीवरून लस घेण्यासाठी जाताना दुचाकीला खड्ड्यांमुळे अपघात होऊन  महिला जखमी झाली होती. उपचारा दरम्यान या महिलेचा मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे. या महिलेचे नाव दिव्या राहुल कटारिया असे आहे.

कल्याण पश्चिम भागातील ऋतू कॉम्प्लेक्स या हायप्रोफाईल सोसायटीत राहणाऱ्या  शिक्षिका दिव्या कटारिया या २३ जून रोजी त्यांच्या दीरा सोबत दुचाकीवरून घेण्यासाठी निघाल्या होत्या. त्यांच्या दुचाकीतले पेट्रोल संपल्याने त्या पेट्रोल पंपाच्या दिशेने निघाल्या होत्या. त्यांची दुचाकी त्यांचे दीर चालवत होते. गांधरी रस्त्यावर त्यांच्या दुचाकीने एका वाहनाला ओव्हरटेक केले. मात्र रस्त्यावरील पाण्याने भरलेला खड्डा त्यांच्या लक्षात आला नाही त्यामुळे त्यांची दुचाकी रस्त्यातील  खड्ड्यात जोराने आदळली.

यावेळी दिव्या यांना गंभीर दुखापत झाली. त्यांना उपचारासाठी एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. घटनेच्या चार दिवसानंतर उपचार घेत असताना दिव्या यांचा मृत्यू झाला असल्याची माहिती दिव्याचे दीर अर्जुन कटारिया यांनी दिली आहे. खड्यांनी एका महिलेचा बळी गेल्याने कटारिया कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या घटनेमुळे रस्त्यावरील खड्डे आता नागरिकांचा जीव घेउ लागले असल्याची बाब प्रकर्षाने समोर आली आहे.

-कुणाल म्हात्रे

मा.नगरसेवक महेश गायकवाड यांच्या संकल्पनेतुन उभा राहणार नवा कोरा मराठी चित्रपट ‘डाव’ ; चित्रपटाचा मुहूर्त सोहळा संपन्न

क.डों.म.पा. चे मा.नगरसेवक महेश गायकवाड हे आता एका नव्या क्षेत्राकडे निघाले आहेत. त्यांच्या संकल्पनेतुन ‘डाव’ हा मराठी चित्रपट उभा राहणार आहे. आणि या चित्रपटाचा महूर्त सोहळा आज कल्याण येथे पार पडला. या सोहळ्याला सिनेमात असणारे कलाकार, संगीतकार, दिग्दर्शक आणि संपूर्ण टीम उपस्थित राहिली होती.

‘नाथ प्रोडक्शन’ च्या माध्यमातून मराठी चित्रपट ‘डाव’ चे चित्रीकरण १३ जुलैपासून सुरू केले जाणार आहे. नावाप्रमाणेच या चित्रपटात पत्त्यांचा डाव आणि त्यातून निर्माण होणारा जुगार आणि जुगाडाचा डावपेच अशी संपुर्ण मनोरंजनाची मेजवानी प्रेक्षकांना पहायला मिळणार आहे. अनेकसे ट्विस्ट, एक्शन, ड्रामा, कॉमेडी अशी सर्व फोडणी या चित्रपटात घालण्यात आली आहे.

‘तुझ्यात जीव रंगला’ फेम राणा दा म्हणजेच हार्दिक जोशी या चित्रपटात नायकाच्या भूमिकेत दिसणार आहे. तर नायिकेची भूमिका कोण करणार ? हे मात्र गुपितच आहे. या चित्रपटात खलनायक आणि इतर महत्वाच्या भूमिका कल्याण मधील काही नवोदित कलाकार साकारणार आहेत. याशिवाय भाऊ कदम आणि आणखीन दिगग्ज कलाकार देखील चित्रपटात दिसणार असल्याचे दिग्दर्शक अमित कोळी यांनी या सोहळ्यात प्रेक्षकांशी बोलताना सांगितले आहे. या चित्रपटाच्या टायटल सॉंग ने प्रेक्षकांना चांगलेच मोहित केले. मिलिंद शिंदे यांचे चिरंजीव मधुर शिंदे यांनी हे गाणे आपल्या शिंदेशाही आवाजाच्या शैलीत गायले आहे. त्याचप्रमाणे प्रसिद्ध गायक शकील अहमद यांचेही संगीत या चित्रपटाला लाभणार आहे. त्याचबरोबर चंद्रकला दासरी व यशश्री दासरी यांच्या आवाजातील गाणी देखील असणार आहेत. करण आणि दर्शन हे स्वतः चित्रपटाचे संगीत दिग्दर्शन करत आहेत.

बजरंग बादशाह यांची ही कथा असून पटकथा देखील त्यांनीच केलेली आहे. चित्रपटातील संवाद संकेत हेगाणा व राकेश शिर्के यांनी लिहले आहेत. कौशल भारती छायाचित्रण तर विकी बिडकर कला दिग्दर्शक म्हणून असणार आहेत. मुहूर्त सोहळ्याला झी टॉकीज निर्माते अन्वय नायकोडी तसेच अरबाज मोघल देखील उपस्थित होते. याशिवाय निर्मिती प्रबंधक चेतन मुरूमकर, गीतकार अजय वाघमारे आणि चित्रपटाचे सहाय्यक दिग्दर्शक युगंधर शिंदे असनार आहेत. तर सर्वात महत्त्वाचा कॅमेरा डिपार्टमेंट श्रीनिवास शिंगे आणि राहुल बर्गे पाहणार आहेत. राधा सागर, भाग्यश्री मोटे, नितीन रूपवते, भरत ठाकूर, टिना सोनी, जॉनी रावत, विश्वजीत सोनी हे कलाकार म्हणून दिसणार आहेत.

‘नाथ’ प्रोडक्शनच्या माध्यमातून ‘डाव’ हा चित्रपट पुढे येणार असून त्यामागे अनेक लोकांचे मोठे योगदान असणार आहे. नगरसेवक महेश गायकवाड यांच्या संकल्पनेतला हा चित्रपट असून प्रसिद्ध उद्योजक संजय गायकवाड यांचे या चित्रपटाला मोलाचे सहकार्य लाभणार आहे. कल्याणचे कॉमेडी किंग आणि गायक बजरंग बादशहा तसेच वैशाली ठाकूर आणि सुजाता पवार हे या चित्रपटाची निर्मिती करणार आहेत. तर दिग्दर्शक अमित कोळी यांच्या नजरेतून या चित्रपटाचे दिग्दर्शन होणार आहे. या चित्रपटाच्या चित्रीकरणाला १३ जुलै पासून सुरुवात होणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले आहे. त्यामुळे तमाम कल्याणकर आणि संपूर्ण महाराष्ट्र लवकरच हा नवा ‘डाव’ पाहण्यासाठी नक्कीच आतुर असतील.

महूर्त सोहळ्याचे काही क्षण :-

-संतोष दिवाडकर

महिला मारहाण प्रकरणी नऊ जणांना पोलिसांनी केली अटक ; घटनेचा संपूर्ण तपास करणार असल्याची पोलिसांकडून माहिती

कल्याण कोळसेवाडी भागात काल रात्री एका महिलेला मारहाण झाली होती. या प्रकरणाबाबत कोळसेवाडी पोलिसांनी रीतसर गुन्ह्याची नोंद केली असून व्हडीओ मध्ये असणाऱ्या जणांना अटक केली आहे.

कोळसेवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका महिला प्रवासीची रिक्षाचालकाने छेड काढल्याचे बोलले जाते. यावरून महिलेला व तिच्या मित्रांना जमावकडून मारहाण झाली होती. या संदर्भात कोळसेवाडी पोलिसांनी रीतसर तक्रार नोंदवून नऊ जणांना आता ताब्यात घेतले आहे. संपूर्ण प्रकरणाचा खोलवर तपास करून कारवाई करणार असल्याचेही यावेळी पोलिसांकडून सांगण्यात आले. त्यामुळे पोलिसांच्या चौकशीत संपूर्ण प्रकरणातील दोन्ही बाजू व्यवस्थितपणे उजेडात येतील.

-संतोष दिवाडकर

कोळसेवाडी पोलीस ठाण्यात क्रॉस कंप्लॅन्ट नोंदवून तोडपाणी ? आमदार गणपत गायकवाड यांचा महिला मारहाण प्रकरणावरून गंभीर आरोप

कल्याण कोळसेवाडी येथे काल रात्रीच्या सुमारास एका महिलेला व तिच्या दोन मित्रांना रिक्षाचालक व त्याच्या संबंधित जमावाने मारहाण केली होती. या घटनेनंतर महाराष्ट्रभरात संताप व्यक्त केला जात आहे. मात्र स्थानिक पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद होण्यास उशीर होत असल्यावरून स्थानिक आमदारांनी पोलीस ठाण्याला धारेवर धरले आहे.

रात्रीच्या सुमारास एक तरुणी रिक्षा प्रवास करीत होती. दरम्यान रिक्षा चालकाने तिची छेड काढल्याचे बोलले जात आहे. त्या तरुणीने तिच्या दोन मित्रांना बोलावून घेतले. हे तरुण रिक्षाचालकाला जाब विचारत होते. मात्र यादरम्यान रिक्षाचालक व त्याच्या संबंधित जमावाने त्या महिलेला व तिच्या दोन्ही मित्रांना अमानुषपणे मारहाण केली. शिवाय एका व्यक्तीने पट्टा काढून त्याने मारहाण केली. घटनेचा व्हिडीओ व्हायरल देखील झाला. शिवसेना नेत्या नीलम गोऱ्हे आणि भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी गुन्हा दाखल करण्यासाठी विलंब होत असल्याने नाराजी व्यक्त केली. त्याचप्रमाणे स्थानीक आमदार गणपत गायकवाड यांनी देखील गुन्हा दाखल करण्यास विलंब होत असल्याने कोळसेवाडी पोलीस स्थानकाच्या कारभारावर गंभीर सवाल उपस्थित केले आहेत.

“झालेली घटना अत्यंत दुर्दैवी आहे. कोळसेवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करायला गेलेल्या माणसावरच तक्रार दाखल करतात. मागील दोन वर्षांचा रेकॉर्ड काढला तर लक्षात येईल की या पोलीस ठाण्यात क्रॉस कंप्लॅन्ट अधिक प्रमाणात आहेत. दोघांच्याही विरोधात गुन्हे दाखल करून दोघांना अटक करायची व नंतर तोडपाणी करून त्यांना सोडून द्यायचे. पोलिसांच्या या धोरणामुळे या भागात गुन्हेगारीला खतपाणी मिळत आहे.”

– गणपत गायकवाड (स्थानिक आमदार)

गणपत गायकवाड हे कल्याण पूर्व विधानसभा क्षेत्राचे आमदार आहेत. त्यांच्या विधानसभा क्षेत्रा अंतर्गत कोळसेवाडी पोलीस स्थानक हद्दीत हा प्रकार घडला असून त्यांनी या बाबत पोलिसांच्या भूमिकेवर सवाल उपस्थित केला आहे. झालेली घटना गंभीर स्वरूपाची असल्याने पोलिसांनी गंभीर दखल घेण्याची मागणी आमदारांनी केली आहे.

-संतोष दिवाडकर

कोळसेवाडी महिला मारहाण प्रकरणी भाजप नेत्या चित्रा वाघ आक्रमक ; कोळसेवाडी पोलिसांवर व्यक्त केली नाराजी

कल्याण कोळसेवाडी येथे काल रात्रीच्या सुमारास एका तरुणीला व तिच्या दोन मित्रांना मारहाण झाली होती. एक रिक्षाचालक आणि त्याने जमवलेल्या तरुणांनी या तिघांना मारहाण केली होती. यासंदर्भात गुन्हा का दाखल झाला नाही ? असा सवाल करत भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी कोळसेवाडी पोलिसांवर नाराजी व्यक्त केली आहे.

काल रात्रीच्या सुमारास एक तरुणी रिक्षाने प्रवास करीत होती. याच रिक्षाच्या चालकाने तिची छेड काढली असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे या तरुणीने तिच्या दोन मित्रांना बोलावून घेतले. हे दोन्ही मित्र रिक्षाचालकाला जाब विचारण्यासाठी आले होते. मात्र असे असताना रिक्षाचालकाच्या संबंधित जमावाने राहुल गडेकर आणि बंटी प्रधान या दोघांना मारहाण केली. त्यांच्या समवेत त्या तरुणीला देखील अमानुष मारहाण करण्यात आली. व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये एक इसम पट्ट्याने मारहाण करताना देखील दिसत आहे.

तरुणीला मारहाण केल्याची घटना संपूर्ण महाराष्ट्रात पसरली. मात्र तरीही दुपार पर्यंत मारेकऱ्यांवर गुन्हा दाखल झाला नाही. यामुळे भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी ठाणे पोलीस आणि कोळसेवाडी पोलीस स्थानक यांच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त केली आहे. झालेली घटना निंदनीय असून पोलीस कशाची वाट पाहत आहेत असा सूर उमटवला गेला आहे.

“कल्याण कोळसेवाडीतील संतापजनक घटना व त्यावर ठाणे शहर पोलिसांची अजब कार्यपद्धती. बचावाला येणार्यांनाचं पोलिसांनी पोलिस स्टेशनला बसवून ठेवलयं व मारेकरी अद्याप मोकाट आहेत. अशाने संकटात सापडलेल्यांना मदत करायला लोक पुढे धजावतील का ? नियम कायदे ढिगाने बनवलेत हो. पण त्याची अंमलबजावणी कधी होणार ??”

– चित्रा वाघ (भाजप प्रदेश उपाध्यक्षा)

-संतोष दिवाडकर

फळेगाव सेवा सहकारी सोसायटीच्या अध्यक्षपदी भुषण जाधव बिनविरोध

कल्याण तालुक्यातील प्रसिद्ध असलेली फळेगाव सेवा सहकारी सोसायटीच्या अध्यक्षपदी बाजार समितीचे संचालक भूषण जाधव यांची बिनविरोध निवड झाली आहे. त्यांच्या निवडीने फळेगाव पंचक्रोशीतील गावात आनंदाचे वातावरण पसरले आहे.

      शुक्रवारी फळेगाव सेवा सोसायटीच्या चेअरमन पदाची निवडणूक घेण्यात आली. निवडणूक अधिकारी म्हणून स. रा. भांगे तसेच सेवा सोसायटीचे सचिव भानुदास कोंडे होते. चेअरमन पदासाठी भूषण जाधव यांचा एकमेव अर्ज आल्याने अर्जाची छाननी करून चेअरमनपदी भूषण जाधव यांची बिनविरोध निवड करण्यात आली. फळेगाव सेवा सोसायटीचे सदस्य सुदाम पाटील, राजाराम चौधरी, दिनेश जाधव, आनंता जाधव, आत्माराम तारमळे, सुनील जाधव, दर्शना जाधव, सुनंदा देसेकर हे आहेत.

 फळेगाव सेवा सोसायटीचे नवनिर्वाचित चेअरमन भूषण जाधव यांना शुभेच्छा देण्यासाठी शिवसेना तालुका प्रमुख वसंत लोणे, कल्याण पंचायत समितीचे सदस्य रमेश बांगर, फळेगाव गाव कमिटीचे अध्यक्ष गोपाळ जाधव, पोलिस पाटील प्रकाश जाधव, बंचू बांगर, चिमा भोईर, जगन जाधव, उपतालुका प्रमुख बंधू जाधव, माजी सभापती मिनाक्षी जाधव, चंद्रकांत भोईर यांच्यासह सेवा सोसायटीचे सदस्य उपस्थित होते.

-कुणाल म्हात्रे