रविवारचा वापर असाही ! दुर्ग संवर्धकांनी दिली भिवगडावरील पाण्याच्या टाकीला नवसंजीवनी

राजेप्रतिष्ठान दुर्गसंवर्धन विभाग कर्जत आणि अखंड भिवगड संवर्धन समिती गौरकामथ यांच्या संयुक्त सहभागाने किल्ले भिवगडावरील अनेक वर्षांपासून गाळाखाली लोप पावत चाललेल्या पाण्याच्या टाकीला पुनर्जीवित करण्यात आले आहे. किल्ल्यावरील पाण्याच्या टाकीत वर्षानुवर्षे साचलेला गाळ बाहेर काढणे हे जिकरीचे काम होते. मात्र दुर्ग संवर्धकांनी हे काम पार पाडले.

मागील वर्षातील सप्टेंबर महिन्यापासून टाकीत साचलेला गाळ उपसण्याची मोहीम साधारण ३ महिन्यांपूर्वी सुरू केली होती. या कालावधीत १२ रविवार मोहिमा घेऊन हे काम आता पूर्ण झाले आहे. ह्या मोहिमेला महाराष्ट्रभरात दुर्गसंवर्धन करत असणाऱ्या विविध संघटनांनी एकत्र येऊन हे कार्य पूर्ण करून समाजाला एक नवीन आदर्श घालून दिला आहे. सर्व संघटनांनी एकत्र येऊन महाराष्ट्रातील गडकोट येणाऱ्या पिढीला बघता येईल ह्यासाठी प्रयत्न करत असल्याचा भावना व्यक्त केल्या. याच मोहिमेत शिवशाहीर गणेश तानाजी ताम्हाणे (रायगड जिल्हा अध्यक्ष,
महाराष्ट्र शाहीर परिषद) यांनी संपूर्ण भिवगड आपल्या शाहिरीने दुमदुमून सोडला. यामुळे काम करताना शिवभक्तांमध्ये अधिक ऊर्जा निर्माण झाली होती.

भिवगड मोहिमेसाठी कल्याण, डोंबिवली, अंबरनाथ, बदलापूर, ठाणे, कर्जत, मुरबाड, खालापूर, नवीमुंबई, पुणे अशा विविध भागातुन दुर्गसंवर्धक आले होते. किल्ले भिवगड पाण्याची टाकी स्वच्छ करण्यासाठी सह्याद्री प्रतिष्ठान (अंबरनाथ), शिव प्रतिष्ठान हिंदुस्थान, दुर्गजागर प्रतिष्ठान (रायगड/ठाणे), सज्जनगड संवर्धन समिती (सातारा), शिवकार्य प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य आदींनी पुढाकार घेतला होता. तसेच भिवगडावरील आणखीन तीन टाक्यांच्या संवर्धनाच काम बाकी असून संपूर्ण काम होई पर्यंत प्रत्येक रविवारी ही मोहीम सुरू राहणार असल्याचे राजे प्रतिष्ठाण दुर्ग संवर्धन विभाग महाराष्ट्र अध्यक्ष राहुल महाजन यांनी एम एच मराठीशी बोलताना सांगितले.

-संतोष दिवाडकर

Water tank on Bhivgada fort cleaned by fort keepers

Video – मोहिमेत गायलेली शाहिरी
कॅन्सर बरा करतो सांगून भोंदू बाबाने लाटले 32 लाख रुपये

कळवा : कळव्यात राहणाऱ्या एका महिलेने डोंबिवलीच्या रामनगर पोलिस ठाण्यात एक धक्कादायक तक्रार नोंदवली आहे. जळगावच्या भोंदूबाबाने करणीची बाधा काढण्याच्या नावाखाली तब्बल 32 लाख 15 हजार 875 रुपयांचा गंडा घातला आहे.

कळव्यातल्या खारीगाव येथील एका गृहिणीने डोंबिवली रामनगर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीनुसार पोलिसांनी जळगाव जिल्ह्यातल्या भडगावातील गंजेवाडा शनि चौकात राहणारा पवन पाटील नामक इसमाच्या विरोधात भादंवि कलम ४२०, ४०६, महाराष्ट्र नरबळी आणि इतर अनिष्ट अघोरी प्रथा व जादूटोणा प्रतिबंध कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार डिसेंबर २०१९ पासून आजतागायत पवन बापुराव पाटील या भोंदूबाबाने तक्रारदार यांच्यासह डोंबिवली पूर्वेकडील न्यू आयरे रोडला राहत असलेल्या त्यांच्या आईची देखील फसवणूक केली आहे. तक्रारदार महिलेसह त्यांचा भाऊ आणि आईला त्यांच्या अंगात इच्छामाता सप्तश्रृंगीदेवी संचारत असल्याचे भासवले. साऱ्यांचा विश्वास संपादन करण्यासाठी या भोंदूबाबाने स्वत:च्या हातातून कधी खडीसाखर, कधी कुंकु व त्यामध्ये सप्तश्रृंगी देवीच्या चांदीची प्रतिमा हातचलाखीने काढून दाखवली.

तसेच या बाबाने त्यांच्या कुटुंबावर कुणीतरी करणी केल्याची भीती घातली. करणी काढण्यासाठी खर्च करावा लागणार असल्याचे सांगून या बाबाने तक्रारदार महिलेच्या व तिच्या आईच्या खात्यामधून वेळोवेळी स्वत:च्या बँक खात्यामध्ये ३१ लाख ६ हजार ८७४ रूपये ऑनलाईन ट्रान्स्फर करवून घेतले. तसेच १ लाख ९ हजार रुपये किंमतीच्या भेटवस्तूही घेतल्या. अशाप्रकारे पवन पाटील या भोंदू बाबाने ३२ लाख १५ हजार ८७४ रुपयांची फसवणूक करून आमचा विश्वासघात केल्याचा आरोप तक्रारीत केला आहे. या प्रकरणी वपोनि सचिन सांडभोर यांच्या मार्गदर्शनाखाली पो नि सुरेश सरडे अधिक तपास करत आहेत.

-संतोष दिवाडकर

In Kalwa, under the guise of cancer, Bhondu Baba looted Rs 32 lakh