डोंबिवलीत घरात एकट्या राहणाऱ्या महिलेचा खूण

डोंबिवली : महिलेच्या खूनाने डोंबिवली हादरली आहे. घरात एकट्या राहणाऱ्या महिलेचा खून झाल्याची धक्कादायक घटना सांस्कृतिक राजधानी असलेल्या डोंबिवली टिळक नगर येथे घडली आहे. या हत्येमागे कोण आहे ? हा शोध आता सुरू होत आहे. (Dombivli crime)

प्राथमिक माहितीनुसार डोंबिवली पूर्व टिळक नगर चौकातील ‘आनंद शीला’ या सोयसायतीत राहणाऱ्या महिलेचा प्राथमिक गळा दाबून खून झाल्याची खळबजनक घटना घडली आहे. ५८ वर्षीय घटस्फोटीत विजया बावीस्कर या घरात एकट्या राहत होत्या. अज्ञात इसमाने आधीच्या रात्री घरात घुसून या महिलेचा खून केल्याची प्राथमिक माहिती समोर आलेली आहे.

सकाळच्या वेळेस घरकाम करणारी महिला कामासाठी घरात आली असता झालेला सर्व प्रकार तिच्या डोळ्यासमोर दिसला. त्यानंतर तिने तात्काळ शेजाऱ्यांना या घटनेची माहिती दिली. त्यानंतर ही माहिती टिळक नगर पोलीस ठाण्याला मिळाली. आता या घटनेचा अधिक तपास पोलीस करत आहेत. विजया बाविस्कर यांच्या नातेवाईकांच्या म्हणण्यानुसार साधारण तीस वर्षांपूर्वी त्यांचा घटस्फोट झाला होता. मागील तीन वर्षांपासून ते या इमारतीत राहत होत्या.

-संतोष दिवाडकर

Murder of a woman living alone in a house in Dombivali

खोणी तळोजा महामार्गावर अपघात; ट्रक खाली चिरडून दुचाकीस्वार ठार

मलंगगड : कल्याण शहराजवळ असलेल्या मलंगगड भागात आज सकाळी मालवाहतूक करणारा ट्रक आणि दुचाकीस्वाराचा अपघात झाला. या अपघातात ट्रक खाली चिरडून दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला आहे. सध्या ट्रकचालक फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

खोणी तळोजा (Khoni Taloja) महामार्ग हा प्रचंड रहदारीचा मार्ग मानला जातो. या मार्गावर सततच्या होणाऱ्या अपघातामुळे या मार्गाला मृत्यूचा सापळा म्हटले जात आहे. आज सकाळी ११:३० च्या दरम्यान झालेल्या अपघातात जवळच्याच पाली गावातील रवी ठाकरे नामक इसमाला आपला जीव गमवावा लागला आहे. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा करीत मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवुन दिला. अपघातानंतर ट्रक चालक फरार झाला असून ट्रक आणि क्लिनरला ताब्यात घेऊन पोलिसांनी चौकशी सुरू केली आहे.

स्थानिकांकडून मिळालेल्या माहितीनुसार याच ठिकाणी मागील महिन्यात ट्रक आणि एर्टीगा गाडीत भीषण अपघात झाला होता. यात देखील दोघा तिघांना प्राणाला मुकावे लागले होते. हा महामार्ग आणखी किती जणांचा जीव घेणार हे काही सांगता येत नाही. मात्र प्रशासनाने सतत होणाऱ्या अपघातांचे कारण जाणून घेऊन तांत्रिक बाबींचा अभ्यास करणे काळाची गरज बनली आहे. वेळीच यावर तोडगा न निघाल्यास मृत्यूची मालिका अशीच सुरू राहू शकते.

-संदेश दाभने

Accident on Khoni Taloja Highway; The truck crushed down and killed the biker

भयानक थंडीत उघड्यावर झोपणाऱ्या बेघरांना ब्लॅंकेट वाटप

कल्याण : भर थंडीत उघड्यावर झोपणाऱ्या गोरगरीब बेघरांना नागरी हक्क संघर्ष समितीने मकरसक्रांत आणि नामांतर दिवसाचे औचित्य साधून ब्लॅंकेटचे वाटप केले आहे. त्याचबरोबर गोरगरिबांना वस्तू दान करण्याचे आव्हान ही करण्यात आले आहे. दोन वर्ष करोनाचा कहर त्यात गरिबांचा कामधंदा गेला. खाण्याचे हाल, उघड्यावर दुकानाच्या आसऱ्याला झोपायचे, त्यात महा भयंकर थंडी. अशा परिस्थितीत काही लोक जगतात. त्यांचे जगणे रात्री अपरात्री फिरल्यावर समजते.

बैल बाजार स्मशान भूमि समोर स्मार्ट स्टोर जवळ एक तीस वर्षाचा व्यक्ती प्ल्यास्टिकच्या गोणीत स्वतःला टाकून थंडीत कुडकुडत झोपला होता. सर्व शरीर त्याने त्या गोणीत गुंडाळून घेतलेले होते. त्याला उठवले असता त्याने त्याची करुण कहाणी सांगितली. “साहेब काम धंदा नाही पोटाला अन्न नाही विदर्भातील थंडी पेक्षा ही त्या मानाने थंडी कमी. करोना मुळे कोणी काम देत नाही. मृत्यू पण येत नाही”. बोलतांना त्याच्या डोळ्यात पाणी होतेच मात्र ब्लॅंकेट मिळाल्याचे समाधानही.

अशीच एक प्लास्टिक पालव टाकलेली पाच दहा घर फोर्टीज हॉस्पिटलच्या मागे कल्याणच्या मध्यवर्ती पॉश वस्तीत अशी घर आहेत हेच आश्चर्य आहे. कल्याणच्या लोकांना, नेते आणि कार्यकर्ते म्हणवणाऱ्या लोकांना माणुसकी असेल तर त्यांनी जरा तिकडे फिरून यावे. पावसाळ्यात हे लोक कसे राहत असतील? असा विचार आला तर अंगावर शहारे आले. लाईट नाही, पाणी नाही. साप, विंचू, घुशी यांची भीती नाही. तरी लोक चिमुरडे घेऊन येथे राहतात. त्यांच्या कडे ढुंकूनही कोणी पहात नाही. अश्या बेवारस वस्तीत जाऊन सामाजिक भान ठेवून शनिवारी रात्री ब्लॅंकेट वाटन्यात आले.

अशीच एक स्वाभिमानी वयोवृद्ध आजी कृषी बाजार समितीच्या गेट वर सापडली. अंगावर फक्त साडी, विना स्वेटर केळ्याची पान आणि काही भाजी रात्री थंडीत विकायला बसली होती. आजी कुठून आली? विचारले असता ती म्हणाली जळगाव वरून. आता रात्र भर थंडीत राहणार काय? तर म्हणाली पोटा पुढे थंडी काय आहे पोरांनो? कुठून उर्मी येते यांना जगण्याची हे एक कोडे आहे. या घरात बसण्याच्या वयात ही म्हातारी एव्हड्या लांबून थंडीत केळीची पाने विकायला आली.
सलाम त्या आजीच्या स्वाभिमानाला.

लोक जेथे आसरा मिळेल तेथे झोपली होती. दुकानाच्या थंड गार लादीवर, अंगावर असेल तो पातळ कपडा, अंगाखाली काही नाही व त्यात डास. काही लोकांच्या म्हणन्यानुसार ते नशेडी म्हणून घोषित केले जातात. पण काही लोक नशा न करता ही झोपलेले होते. आणि ही त्यांची हौस नसून त्यांची मजबूरी होती. ज्याकडे येथील व्यवस्था आणि समाजाने दुर्लक्ष केले आहे.

१४ जानेवारीच्या रात्री ब्लॅंकेट वाटण्याच्या अनुभवाने एक रात्र वैऱ्याची, निसर्गाच्या थंडीच्या प्रकोपाची अनुभवायला मिळाली. रात्रीच भयानक वास्तव आणि स्मार्ट सिटी बनायला निघालेल्या शहराच काय होणार? लोक स्मार्ट केंव्हा होणार? माणसात माणुसकी केंव्हा येणार? असे अनेक प्रश्न घेऊन सकाळी पाच वाजता चार भिंतीच्या सुरक्षित ब्लॉकच्या घरात ब्लँकेट घेऊन झोपलो. स्वतःला,सुशिक्षित समजणाऱ्या समाजाला येथील भांडवलदारांना, राजकारणी नेत्यांना, लोकशाही म्हणून तीचा खून पाडणाऱ्या सत्ताधारी व्यवस्थेला शिव्या देत.

नागरी हक्क संघर्ष समिती तर्फे हे वाटप करण्यात आहे. माणुसकी मनात जिवंत असणाऱ्या लोकांच्या मदतीने रात्री जागून सामाजिक भूक भागवणारे कार्यकर्ते हजर होते. बाबा रामटेके, हेमंत कांबळे, अभिजित पंडित, राजू रणदिवे, अक्षय गायकवाड, प्रवेश सिंग, रमेश बर्वे, ऍड.सुनील चतुर्वेदी, कलाकार फोटोग्राफर मनोज घुसळे.

दरम्यान ब्ल्याॅंकेट वाटप कार्यक्रम पुढे दहा दिवस चालू राहणार आहे. ज्यांना नवीन ब्लॅंकेट/चादर देणे असतील त्यांनी स्टार ऑप्टिकल ताल बार समोर, मुरबाड रोड कल्याण पश्चिम येथे द्यावे. मदत करण्यासाठी पत्रकार बाबा रामटेके यांच्या ८०९७५४०५०६ नंबरवर संपर्क साधण्याचे संघटनेने आव्हान केले आहे.

-रोशन उबाळे

कल्याण डोंबिवलीत विनामास्क फिरणाऱ्यांवर कारवाया सुरूच

कल्याण : महापालिका क्षेत्रात गेल्या काही दिवसापासून कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. कोरोनाची साथ नियंत्रणात ठेवण्याच्या दृष्टीने महापालिका आयुक्त डॉ.विजय सूर्यवंशी यांनी यापूर्वीच दिलेल्या आदेशानुसार महापालिकेच्या प्रभागातील पथके पोलिसांच्या मदतीने महापालिका परिसरात दररोज विना मास्क फिरणा-या लोकांवर कारवाई करत असूनही अजून काही नागरिक रस्त्यांवर, सार्वजनिक ठिकाणी फिरतांना मास्क न घालत फिरत असल्याचे निदर्शनास येत आहे.

१० जानेवारी ते १४ जानेवारी या पाच दिवसात सार्वजनिक ठिकाणी विना मास्क फिरणा-या ७७९ व्यक्तींकडून महानगरपालिका कर्मचारी पथकाने पोलिसांच्या मदतीने ३ लाख ८९ हजार ५०० रुपये इतका दंड वसूल केला आहे. तरी गर्दीच्या ठिकाणी, अथवा बाजारात, किराणा दुकान, मॉल या ठिकाणी जातांना नागरिकांनी मास्क परिधान करावा तसेच सोशल डिस्टंसिंगचे पालन करावे. तसेच कोविड अनुरुप वर्तनाचा अवलंब करावा, असे आवाहन महापालिकेमार्फत करण्यात आले आहे.

-कुणाल म्हात्रे

“क.डों.म.पा.च्या जम्बो कोविड सेंटर मध्ये भ्रष्टाचार” – राष्ट्र कल्याण पार्टीचा आरोप

कल्याण : वाढती कोरोना रुग्णसंख्या लक्षात घेता रुग्णांवर उपचार करण्यासाठी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या वतीने डोंबिवलीच्या एमआयडीसी भागात जम्बो कोविड सेंटर उभारण्यात येत आहे. मात्र या कोविड सेंटर मध्ये भ्रष्टाचार झाल्याचा आरोप राष्ट्र कल्याण पार्टीचे महासचिव राहुल काटकर यांनी केला असून संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी त्यांनी पालिका आयुक्तांकडे केली आहे.

 डॉबिवली औद्योगिक क्षेत्र फेज – १ मधील इंडस्ट्रियल युनिट मेकानो इंडीया प्रा. लि. या कंपनीतील इमारत क्र. २ मध्ये डेडिकेटेड कोविद हॉस्पिटल तयार करण्यात येत आहे. हे हॉस्पिटल तयार करण्यासाठी महानगरपालिकेतर्फे हॉस्पिटल तयार करण्याचे काम मे. एम अंक इंजिनियर्स या कंपनीला दिलेले आहे. याठिकाणी सार पत्रकाप्रमाणे कोणतेही काम करण्यात आलेले नाही. या कामामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला असल्याचा आरोप राष्ट्र कल्याण पार्टीने केला आहे.

याठिकाणी प्लायवुड ज्या कंपनीचे व जेवढ्या जाडीचे लावण्यास सांगितले होते ते लावण्यात आलेले नाही. तसेच जे लावण्यात आलेले आहेत ते देखील निकृष्ट बर्जाचे भंगार मधील घेऊन लावण्यात आलेले आहे. सनमाईका देखील सुमार दर्जाच्या लावण्यात आल्या असून त्यामध्ये देखील बरेचसे सनमाईका तुटलेले वापरण्यात आले आहे. अल्युमिनियम व स्टील अत्यंत निकृष्ट दर्जाचे वापरण्यात आलेले आहे. बाथरूम मध्ये लावण्यात आलेले सर्व साहित्य निकृष्ट व दुष्यम दर्जाचे आहेत. लोकल कंपनीचा कलर वापरण्यात आला आहे, तसेच तो देखील योग्य प्रकारे लावण्यात आलेला नाही. तात्पुरते स्वरूपात सर्व बाजूने लावण्यात आलेले पत्रे भंगार मधून घेऊन लावण्यात आलेले आहेत.

निविदा प्रमाणे कंपनी ने दुसऱ्या कोणालाही काम देऊ नये असे असताना कंपनी ने थर्ड पार्टीला काम दिले आहे. मे. एम डॅक इंजिनियर्स या कंपनीचे मालक दिलीप महादेव गावडे यांचा मृत्यू झालेला आहे. तसेच कंपनीचे मालक यांच्या बनावट सही करून महानगरपालिकेची दिशाभूल व फसवणूक करण्यात येत आहे. त्यामुळे या सर्व कामांची तृतीय पक्षातर्फे तपासणी करण्यात यावी, जेणेकरून कामाची गुणवत्ता आपल्या निदर्शनास येईल. निविदा देण्यात आलेल्या कंपनीचे एकही बिल देण्यात येऊ नये तसेच आतापर्यंत देण्यात आलेल्या बिलाची रक्कम देखील कंपनी कडून वसूल करण्यात यावी आणि या कंपनीला काळ्या यादीमध्ये टाकण्यात यावे, तसेच ज्यांनी महानगरपालिकेची दिशाभूल व फसवणूक करून भ्रष्टाचार केला आहे त्यांच्याविरोधात कायदेशीर गुन्हा दाखल करण्यात यावा व कर्त्यव्यात कसूर करून कंत्राटदार यांना पाठीशी घालणाऱ्या जबाबदार अधिकारयांवर शिस्तभंगाची कारवाई करण्याची मागणी राष्ट्र कल्याण पार्टीने केली आहे.

-कुणाल म्हात्रे

संक्रातीच्या सणाला कल्याण डोंबिवलीत हजारो कोरोना रुग्णांना डिस्चार्ज

कल्याण :- नव्या वर्षाच्या सुरुवातीपासूनच वेगाने वाढत असलेल्या कोरोना रुग्णांच्या संख्येने सर्वसामान्य नागरिक चिंताग्रस्त झाले होते. मात्र संक्रांतीच्या दिवसाला समाधानकारक अशी बातमी समोर आली आहे. कल्याण डोंबिवली मनपा क्षेत्रात आज तब्बल १२१६ रुग्णांना डिस्चार्ज म्हणजेच बरे झाले असल्याची नोंद करण्यात आलेली आहे. यामुळे या वाढत्या आकड्यांमधून काहीसे दिलासादायक वृत्त संक्राती निमित्त कल्याण डोंबिवलीकरांना मिळाले आहे.

मागील काही दिवसांपासून क.डों.म.पा. क्षेत्रात दररोज हजारो नवे कोरोना रुग्ण नोंदवले जात आहेत. जवळपास १० हजारांहून अधिकचे रुग्ण या १४ दिवसांत नोंदवले गेले आहेत. मात्र आज नव्या रुग्णापेक्षा बरे झालेले रुग्ण अधिक प्रमाणात नोंदवले गेले आहेत. या आकडेवारी मध्ये दोन रुग्णांचा मृत्यू झाल्याची नोंदही करण्यात आलेली आहे. आजच्या आकडेवारी नुसार क.डों.म.पा. क्षेत्रात एकूण ११ हजार ३५७ रुग्ण सध्या उपचार घेत आहेत. बदलत्या वातावरणामुळे सध्या प्रकृतीच्या तक्रारी मोठ्या प्रमाणावर समोर येत आहेत.

-संतोष दिवाडकर

राजमाता जिजाऊ जयंती निमित्ताने ‘आम्ही यशस्वी महिला’ परिसंवाद

कल्याण : विविध पदांवरील अधिकाऱ्यांचे जीवन कसे असते. त्या पदावर जाण्यासाठी कशाप्रकारे अभ्यास व कष्ट घ्यावे लागतात. अशा प्रकारे प्रश्नांची उत्तरे मिळविण्यासाठी पाली भाषा प्रचार आणि प्रसार ट्रस्ट संचलित सम्राट अशोक विद्यालयात राजमाता जिजाऊ यांच्या जयंती निमित्ताने आम्ही यशस्वी महिला ऑनलाइन परिसंवाद आयोजित केला होता.

 शाळेतील मुलींनी विचारलेल्या प्रश्नांना टिळक नगर विद्यामंदिरच्या मुख्याध्यापिका लीना मॅथ्यू म्हणाल्या, शिक्षणातून सुसंस्कारित होणे आवश्यक आहे. मला माझ्या आई-वडिलांच्या आणि शिक्षकांच्या योगदानामुळे मी खेळाडू  झाली आणि शिक्षण पूर्ण करून शिक्षिका झाली आता मुख्याध्यापिका आहे. उच्च न्यायालयातील वकील मनीषा भिलारे यांनीही मुलांना आपण कष्ट करून स्वतःच्या पायावर उभं राहण्याचा सल्ला दिला. प्रत्येकाचं जीवन कष्टमय असते असंही त्या म्हणाल्या.

उद्योजक लीना शिर्के यांनी चिकाटी आणि परिश्रम महत्त्वाचे आहेत अपयश येते पण खचून न जाता प्रयत्न करा. माझ्यासारख  तुम्हालाही यश मिळेल असे त्या म्हणाल्या. परिसंवादात शाळेतील मुख्याध्यापक गुलाबराव पाटील सह शिक्षक विद्यार्थी उपथित होते. गायत्री चव्हाण. सुहानी चौधरी. सुवार्ता पवार. प्रशिक थोरात  या मुलींनी सहभाग  घेतला. परिसंवादाचे प्रस्ताविक व आभार सहशिक्षिका माधुरी काळे यांनी मानले. जिजामातांच्या भूमिकेत मनस्वी मढवी व बाल शिवाजी मंथन मढवी हे आजच्या कार्यक्रमाचं आकर्षण होते.

-कुणाल म्हात्रे

भूमिपूजन सोहळे आटपून खासदार श्रीकांत शिंदेंचं निकटवर्तीयाच्या घरी स्नेहभोजन

मलंगगड :- मलंगगड भागात विविध ठिकाणच्या रस्ते कामाच्या भूमिपूजनाचे कार्यक्रम संपन्न झाल्या नंतर खासदार श्रीकांत शिंदे यांनी त्यांचे निकटवर्तीय अक्षय बाळाराम काठवले यांच्या निवास्थानी जाऊन सदिच्छा भेट घेतली. याच ठिकाणी श्रीकांत शिंदे आणि त्यांच्या समवेत असलेल्यांनी स्नेहभोजन केले. अक्षय काठवले यांच्याशी विविध कामाच्या विषयांवर चर्चा केली.

या वेळी खासदार श्रीकांत शिंदे, गोपाळ लांडगे, वामन म्हात्रे, धनंजय बोडारे, महेश गायकवाड तसेच असंख्य शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. खासदारांनी काठवले यांच्या निवासस्थानी बैठक घेऊन मलंगगड भागातील रखडलेल्या कामांबाबत चर्चा केली. लवकरात लवकर कामे केली जातील असे आश्वासन शिंदे यांनी काठवले यांना दिले. अक्षय काठवले यांनी खासदारांना महाराष्ट्र ग्रामीणमधील खेडेगावांची गावठाण विस्ताराची समस्या तात्काळ मार्गी लावण्यासंदर्भात एक निवेदन देखील दिले आहे. या निवेदनाचा स्वीकार करत खासदार श्रीकांत शिंदेंनी अक्षय काठवले यांच्याशी सविस्तर चर्चा देखील केली आहे.

-संदेश दाभने

ताडीच्या अतिसेवनाने डोंबिवलीत दोघांचा मृत्यू

डोंबिवली :- ताडीचे सेवन केल्याने दोन तरुणांचा मृत्यू झाल्याची घटना डोंबिवली शहरात घडली आहे. कोपर भागात राहणाऱ्या सचिन पाडमुख आणि स्वप्नील चोळके या तरुणांचा यात मृत्यू झाला आहे. विष्णू नगर पोलिसांनी या प्रकरणी ताडी विक्रेत्या विरोधात गुन्हा दाखल करीत त्याचा शोध सुरू केला आहे.

विषारी ताडीमुळे हा मृत्यू झाल्याची आधी चर्चा होती मात्र ताडीच्या अतिसेवनामुळे हा मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांना डॉक्टरांकडून मिळाली आहे. स्वप्नील चोळके हा डोंबिवली शहर वाहतूक विभागात वॉर्डन म्हणून कार्यरत होता. सचिन आणि स्वप्नील हे दोघे मित्र सोमवारी सायंकाळी आपल्या आणखी दोन मित्रांसह कोपर गाव रेल्वे रुळालगत असलेल्या ताडी सेंटरमध्ये ताडी पिण्यासाठी गेले होते. नऊ वाजण्याच्या सुमारास सचिन आणि स्वप्नील घरी परतत असताना रस्त्यात त्यांना त्रास जाणवू लागला.

ताडी पिऊन इतर दोघांची तब्येत सुद्धा खालावली होती, मात्र सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे.
दोन्ही मृतकांचे शवविच्छेदन केले असता ताडीचे अति सेवन केल्यामुळे त्यांना झोप लागली आणि त्यात त्यांच्या हृदयावर ताण येऊन त्यांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला अशी माहिती डॉक्टरांनी दिली असे विष्णुनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक पंढरीनाथ भालेराव यांनी सांगितले.

-संतोष दिवाडकर

‘एपीएमसी’ मार्केटमध्ये किरकोळ ग्राहकांना ‘नो एन्ट्री !’ – क.डों.म.पा. आयुक्त

कल्याण : कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील वाढती कोरोना रुग्णसंख्या लक्षात घेता कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये किरकोळ ग्राहकांना प्रवेश बंदी करण्यात आली असून घाऊक व्यापारी आणि त्यांचे कर्मचारी यांचे लसीचे दोन डोस झालेले असणे बंधनकारक असल्याचे केडीएमसी आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी सांगतिले आहे.

कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये खरेदीदार देखील जात असतात. त्यामुळे पहाटेच्या वेळेला मोठी गर्दी पाहायला मिळते. यासाठी बाजार समितीला किरकोळ ग्राहकाला परवानगी देऊ नये, घाऊक व्यापारी आहेत त्यांचे कर्मचारी आहेत त्यांनी सुद्धा लस घेतली असेल त्यांनाच परवानगी द्यावी. बाजार समितीमध्ये  गर्दी होणार नाही यासाठी इतर जिल्ह्यातून येणाऱ्या वाहनांची संख्या नियंत्रित करण्याच्या सूचना आयुक्तांनी केल्या आहेत.

 लक्ष्मी मार्केट मध्ये देखील मोठ्या प्रमाणात गर्दी होताना दिसते तिथे देखील एक दिवसा आड ओटे सुरु ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. पालिका क्षेत्रातील आठवडी बाजार पुढील आदेश येईपर्यंत बंद असणार आहेत. मोठ्या गृहसंकुलांमध्ये २५ टक्के सदनिका मधील रहिवासी पॉझिटिव आले तर त्या गृह संकुलातील सर्वांची कोरोना चाचणी करण्याच्या सूचना पालिकेच्या वतीने देण्यात आल्या आहेत. त्याचप्रमाणे घरकाम करणारे किंवा अजून काही नोकरचाकर असतील त्यांचे लसीचे दोन्ही डोस झालेले असणे बंधनकारक असणार आहे. संसर्ग असलेल्या घरांमध्ये कोणालाही परवानगी देऊ नये ही सर्व जबाबदारी त्या हाउसिंग सोसायटीचे असणार आहे. या नियमांचे उल्लघन करणाऱ्या गृहसंकुलाला पहिल्यांदा ५ हजारांचा दंड असून दुसऱ्या वेळी देखील नियम मोडल्यास त्या गृहसंकुलाला १० हजारांचा दंड करण्यात येणार आहे.

 वाढती कोरोना रुग्ण संख्या लक्षात घेता जेवढ्या खाटा लागतात त्याच्यापेक्षाही जास्त व्यवस्था केलेली आहे. नऊ हजार सहाशे पंचावन्न आपल्याकडे खाटा असून त्यामध्ये २९९५ ऑक्सिजनचे बेड असल्याचे पालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी सांगितले.

-कुणाल म्हात्रे