Kalyan Student Suicide : पात्रता नसलेले शिक्षक असलेल्या खाजगी शाळा संस्थांवर कारवाईसाठी मुख्यमंत्र्यांना पत्र

Kalyan East : कल्याण पूर्वेतील चिकणीपाडा परिसरात एका शाळकरी विद्यार्थ्याने शिक्षिकेच्या नावे सुसाईड नोट लिहून आत्महत्या केली होती. ही बाब लक्षात घेता माजी नगरसेवक उदय रसाळ यांनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्राद्वारे कारवाई करण्याची मागणी केली आहे. प्राथमिक प्रशिक्षित मान्यता प्राप्त पात्रता नसलेले शिक्षक घेऊन खाजगी शाळेच्या माध्यमातून भरमसाठ फी घेऊन व्यापार करणाऱ्या संस्थामुळे विद्यार्थी व पालकांचे नुकसान होत आहे. त्यामुळे अशा संस्थांवर कारवाई करावी असे पत्रात नमूद करण्यात आले आहे.

प्रशिक्षित पात्रता म्हणजे डी.एड, बी.एड पदवीधारक. या व्यतिरिक्त इतर कुणालाही विद्यार्थ्यांना शिकवण्याची पात्रता नसते. या प्रशिक्षणात बाल मानसशास्त्र हा महत्त्वाचा विषय असतो. परंतु खाजगी शाळांमध्ये अधिक नफा मिळवण्यासाठी भरमसाठ फी घेऊन पात्रता नसलेले शिक्षक म्हणून कमी पगारावर रुजू केले जातात. अशा शिक्षकांना बाल मानसशास्त्र माहीत नसल्याने विद्यार्थ्यांशी कसे वागावे हे या शिक्षकांना ठाऊक नसते. त्यामुळे समाजात अघटित प्रकार समोर येतात असे उदय रसाळ यांनी पत्राद्वारे म्हटले आहे.

कल्याण डोंबिवलीत अशा अनेक शाळा आहेत ज्यात अशाच प्रकारची शिक्षक भरती आहे. एखादा विद्यार्थी शिक्षकांच्या भीतीने किंवा शिक्षकाच्या कार्य पद्धतीने सरळ आत्महत्या करतो हे प्रचंड भयानक आहे. जे मुलं आत्महत्या करत नाहीत त्या मुलांचा बौद्धिक विकास अशा शिक्षकांमुळे खुंटतो किंवा मुलं पुढील शिक्षणात मागे पडतात. काल दि १२ ऑगस्ट २४ रोजी, कल्याण पूर्व येथील एका शाळेतील बारा वर्षाच्या मुलाने असेच शिक्षकांच्या त्रासामुळे जीव दिला. असे अप्रशिक्षित शिक्षक ज्या ज्या शाळेमध्ये भरणा केले आहेत अशा संस्थांची त्वरित चौकशी करून कारवाई करावी. आणि अशा संस्था तसेच शाळांबाबत प्रशिक्षित शिक्षक भरती बाबत कठोर नियमावली करण्यात यावी. जी सर्व प्रकारच्या शाळांना लागू व्हावी अशी मागणी मा. मुख्य मंत्री आणि शिक्षण मंत्री यांच्याकडे केली आहे.

– उदय रसाळ (माजी नगरसेवक)

Kalyan Student Suicide : Letter to Chief Minister to take action against private school institutions with unqualified teachers

शिंदेशाही वर पुन्हा काळ चक्र; Dinkar Shinde यांचं निधन

Dinkar Shinde : महाराष्ट्राचे प्रख्यात गायक प्रल्हाद शिंदे यांचे तृतीय पुत्र गायक दिनकर शिंदे यांचे आज रात्री २ च्या दरम्यान अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या अचानकपणे जाण्याने शिंदे कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. कल्याण पूर्वेतील आनंदवाडी येथील राहत्या घरापासून त्यांची अंतिम यात्रा निघणार असून शहरासह राज्यभरातील त्यांच्या चाहत्या वर्गात शोककळा पसरली आहे.

महाराष्ट्राचे लोकसंगीतकार गायक प्रल्हाद शिंदे यांची गाणी आजही अजरामर आहेत. त्यांच्या आवाजातील जादू ही केवळ त्यांच्या पुरतेच मर्यादित न राहता त्यांच्या आवाजाचा वारसा त्यांनी आपल्या आपत्यांनाही दिला. त्यातीलच एक अपत्य म्हणजे दिनकर प्रल्हाद शिंदे. वयाच्या ५८ व्या वर्षी त्यांनी मुंबईच्या जे जे रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. त्यांची अनेक गीते, भक्तिगीते, भीमगिते, कव्वाली लोकांच्या पसंतीस उतरली आहेत. महाराष्ट्र भरात त्यांनी आपले संगीताचे कार्यक्रम सादर केले असून अजूनही ते संगीतमय प्रवासात जगत होते. मात्र आज १३ ऑगस्ट रोजी त्यांचा संगीतमय आयुष्याचा प्रवास इथेच थांबला आहे.

अवघ्या महाराष्ट्राला ज्यांनी आपल्या आवाजाने वेड लावले त्या संगीतकार प्रल्हाद शिंदे यांचे २००४ साली निधन झाले होते. त्यांच्या पश्चात त्यांना आनंद शिंदे, मिलिंद शिंदे, दिनकर शिंदे, चंद्रकात शिंदे, सूर्यकांत शिंदे, सूरज शिंदे, किरण शिंदे अशी अपत्ये आहेत. मागील वर्षीच दिनकर शिंदे यांचे पुत्र सार्थक शिंदे यांचे निधन झाले होते. त्यांच्या अकाली मृत्यूने दिनकर शिंदे खचून गेले होते. मात्र एकामागोमाग एका वर्षी पिता पुत्राच्या निधनाने शिंदेशाही घरण्यावर दुःखाचा मोठा डोंगर कोसळला आहे.

Dinkar Shinde passed away