Kalyan East मध्ये शिंदेंच्या Shivsena पक्षात अंतर्गत धुसफूस; सर्व पद घेतली काढून

Shivsena Kalyan East : एकनाथ शिंदे यांच्या कल्याण पूर्वेतील शिवसेनेत फार आधीपासूनच अंतर्गत धुसफूस असल्याचे समोर येत आहे. शिवसेनेच्या विभाजनानंतर एकनाथ शिंदें सोबत असलेल्या पदाधिकारी वर्गातही गटतट बनल्याने पक्षासाठी हे नुकसानकारक बनले आहे. कोळसेवाडी पोलीस स्थानकात शिंदेंच्या पदाधिकाऱ्यांमध्ये झालेल्या राढ्यानंतर आता शिंदेंच्या सेनेने शेवटी कल्याण पूर्वेतील महत्त्वाच्या फळीची कार्यकारिणी बदलून टाकण्याचा निर्णय घेतला आहे.

शिवसेनेचे कल्याण जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे यांनी गुरुवारी एक परिपत्रक जारी केले असून त्यांनी कल्याण पूर्वेतील पुरुष व महिला उप शहरप्रमुख पर्यंतची सर्व पदे स्थगित करीत असल्याचे म्हटले आहे. तर आजवर केलेल्या कामाचा आढावा घेऊन नव्याने मुलाखती घेऊन पुन्हा नव्याने पद नियुक्ती केली जाईल असेही त्यांनी या परीपत्रकात म्हटले आहे. यामुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत.

मागील महानगरपालिका निवडणुकीत शिवसेना हा कल्याण पूर्वेतील मोठा पक्ष ठरला होता. पुढे शिवसेनेचे दोन भाग झाल्यानंतर शिंदेंच्या शिवसेनेने तरीही आपलं पारडं जड ठेवलं. अगोदरच पक्षात गटातटाचे राजकारण असताना त्यातच विधानसभा निवडणुकीत शहर प्रमुखाने बंड पुकारल्याने पक्षाने त्यांच्यावर कारवाई केली. यानंतर आता पुन्हा एक अंतर्गत वाद बाहेर पडल्यानंतर कल्याण जिल्हा प्रमुख गोपाळ लांडगेंनी मोठा निर्णय घेत पदांची नवनियुक्ती करण्याचा निर्णय घेतला आहे. कल्याण पूर्वेतील अंतर्गत डॅमेज कंट्रोल करण्यासाठी आता खासदारांना विशेष लक्ष द्यावे लागतेय का? असे सवाल उपस्थित केले जात आहेत. परिस्थिती न बदलल्यास याचा फटका पक्षाला आणि लाभ मात्र इतरांना मिळू शकतो.

Internal dispute within Shinde’s Shivsena party in Kalyan East

Dombivali Ro Ro Boat ने होणार मुंबईचा प्रवास सोपा

Dombivali Ro Ro Boat : रेल्वेची जीवघेणी गर्दी आणि रस्त्यावरील वेळघेणी वाहतूक कोंडी यामुळं डोंबिवलीकर त्रस्त झाला आहे. त्यामुळे आता लवकरच डोंबिवलीकरांना मुंबईचा प्रवास जलमार्गाने करण्याचा पर्याय उपलब्ध होणार आहे. डोंबिवली मोठागाव जलवाहतूक प्रकल्पाच्या कामाला अधिकृतपणे सुरुवात झाली असून रो-रो बोटसाठी जेट्टीच्या कामाचे भूमिपूजन नुकतेच संपन्न झाले आहे.

महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाच्या माध्यमातून सुमारे १००० कोटी रुपयांचा डी.पी.आर. तयार करण्यात आला असून प्राथमिक स्वरूपात ८० कोटी रुपये मंजूर झाले आहेत. यातील डोंबिवली मोठागाव जेट्टीसाठी २२ कोटी रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या पूर्ततेनंतर डोंबिवलीहून मुंबई, नवी मुंबई, वसई आणि विरार या ठिकाणी नागरिकांना त्यांच्या वाहनांसह जलमार्गाने रो-रो बोटीने प्रवास करता येणार आहे. यामुळे नागरिकांचा वेळ आणि इंधन खर्च वाचणार आहे. शिवाय वाहनांमुळे होणारे प्रदूषणही मोठ्या प्रमाणात कमी होईल. वाहतुकीच्या दृष्टीने हा प्रकल्प क्रांतिकारी ठरणारा असून सागरी परिवहन क्षेत्रालाही मोठी चालना मिळू शकते.

डोंबिवली, ठाणे, नवी मुंबई, मुंबई, वसई आणि विरार यांना जलमार्गाने जोडणारा हा ऐतिहासिक प्रकल्प नागरिकांच्या दैनंदिन प्रवासाला सुलभ, वेगवान आणि पर्यावरणस्नेही सिद्ध करू शकतो. हा प्रकल्प यशस्वी ठरल्यास ही मार्गिका कल्याण शहराला देखील जोडली जाऊ शकते. एका रो रो बोटमध्ये शेकडो प्रवासी आपल्या वाहनांसह प्रवास करू शकतात. सध्या ही सेवा मुंबई ते भाईंदर येथे सुरू असून चारचाकी वाहन धारकांना २४० रुपये तर दुचाकी धारकांना ६० रुपये तिकीट आकारले जात आहे. या प्रवासातून पैसे, वेळ, इंधनाची बचत होत असून वाहतूक कोंडी व प्रदूषणमुक्त प्रवास डोंबिवलीकरांना करता येणार आहे. सागरी मार्गाने सुरू होणारी ही परिवहन सेवा येत्या काळात क्रांती घडवून आणू शकते.

Travel to Mumbai will be easier with Dombivali Ro Ro Boat

कल्याण डोंबिवलीत झोपडपट्टी पुनर्वसन योजना; रवींद्र चव्हाण यांची प्राधिकरण अधिकाऱ्यांशी चर्चा

डोंबिवली : मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण क्षेत्र हद्दीत कल्याण, डोंबिवली विभागातील खासगी आणि सरकारी जमिनीवर झोपडपट्टी पुनर्वसन योजना प्रभावीपणे राबविण्यात यावी. प्रत्येक लाभार्थी घटकाला या योजनेचा लाभ मिळाला पाहिजे यादृष्टीने प्रयत्न करण्याच्या सूचना माजी मंत्री तसेच डोंबिवलीचे आमदार रवींद्र चव्हाण यांनी बुधवारी झोपडपट्टी पुनर्वसन योजनेच्या मुंंबईतील अधिकाऱ्यांना दिले.

झोपडपट्टी पुनर्वसन योजनेची मुंबई महानगर प्रदेश प्राधिकरण क्षेत्रात किती अंमलबजावणी झाली? आणि करायची असेल तर ती कशा पध्दतीने करता येईल? लाभार्थींना या योजनेचा अधिकाधिक लाभ कसा मिळेल? तसेच कल्याण डोंबिवली पालिका क्षेत्रात झोपडपट्टी पुनर्वसन योजना अधिक प्रभावीपणे राबविण्यात यावी, या दृष्टीने भाजप प्रदेश कार्याध्यक्ष आणि आमदार रवींद्र चव्हाण यांनी बुधवारी मुंबईत झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांबरोबर बैठक घेतली. यावेळी प्राधिकरणाचे उपजिल्हाधिकारी अश्विनी जोशी, तहसीलदार विजय वाकोडे, साहाय्यक अधिकारी हर्षद घोटेकर उपस्थित होते.

मुंबई महानगर प्रदेश प्राधिकरण क्षेत्रात कल्याण डोंबिवली पालिकेसह, ज्या स्थानिक स्वराज्य संस्था भागात ही योजना तातडीने राबविण्यासाठी अनुकूल परिस्थिती आहे तेथे या योजनेचा विनाविलंब शुभारंभ करावा. या योजनेतून खरा लाभार्थी अजिबात वंचित राहता कामा नये. प्राधिकरणाच्या अन्य क्षेत्रातही खासगी, शासकीय जमिनींवर झोपडपट्टी पुनर्वसन योजना अधिक प्रभावीपणे, गतिमानतेने राबविता येईल यासाठी प्राधिकरणाने वेगाने हालचाली सुरू कराव्यात. या योजनेच्या अंमलबजावणीत काही अडथळे येत असतील तर त्याचे शासन पातळीवर निराकरण करण्यासाठी आपण पुढाकार घेऊ, असे आश्वासन आमदार रवींद्र चव्हाण यांनी झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांना दिले. प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनीही ही योजना कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात राबविण्यासाठी आम्ही सज्ज असल्याचे सांगितले.

Slum rehabilitation scheme in Kalyan Dombivali; Ravindra Chavan discusses with authority officials