निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरातील राजकारणाला ‘आयपीएल लिलावा’ प्रमाणे रंग; राजकारण्यांच्या बेडूक उड्यांनी पक्षनिष्ठेला सुरुंग

कल्याण : महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यभरात राजकीय पक्षप्रवेशांचा धडाका सुरू झाला आहे. किंबहुना एकाच युती आघाडी मधील राजकीय पक्ष एकमेकांचे प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते आपल्या पक्षात खेचून आणण्यासाठी जोरदार प्रयत्न करीत आहेत. विशेषतः कल्याण डोंबिवलीत शिवसेना आणि भाजप मध्ये आपसातच ही पक्षप्रवेशाची रस्सीखेच सुरू असून एकमेकांचे दिगग्ज पदाधिकारी व माजी नगरसेवक आपल्या पक्षात खेचून घेण्याचे काम सध्या सुरू आहे. नेत्यांच्या दलबदलू राजकारणामुळे सामान्य मतदार व कार्यकर्ते मात्र संभ्रमात अडकले आहेत.

महानगरपालिका निवडणुकांचे बिगुल लवकरच वाजण्याची शक्यता असल्याने त्यापूर्वीच आयपीएल ट्रेड/लिलाव प्रमाणे शहरात राजकीय मंडळी या पक्षातून त्या पक्षात बेडूक उड्या घेत आहेत. पक्षनिष्ठा खुंटीला टांगून, पक्षातील प्रमुख नेत्यांचे विचार पायदळी तुडवून केवळ वैयक्तिक स्वार्थ साधण्यासाठी हे प्रवेश होत असल्याचे मत सर्वसामान्य मतदारच व्यक्त करू लागले आहेत. याउलट पक्षप्रवेश घेतल्यानंतर “पक्षाच्या, साहेबांच्या विचारांनी प्रेरित होऊन पक्ष प्रवेश केला” असे पक्षप्रवेश करणारे अजूनही रेटाळून म्हणतात. मात्र हे फक्त ‘बोलाची कढी आणि बोलाचा भात’ असल्याचे आता सुजाण मतदार म्हणू लागले आहेत. तर काही पक्षप्रवेशामागे पक्षातील नाराजी, अंतर्गत वाद, हेवेदावे आणि अंशतः स्वाभिमान ही देखील कारणे पुढे केली जात आहेत.

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्ष प्रवेश करून घेण्यासाठी मोठं मोठी अमिषे आणि मोठ्या पदांची प्रलोभने दिली जातात. अशा परिस्थितीत पक्षनिष्ठेचा विचार करण्यापेक्षा स्वतःचा फायदा पाहण्यामागे प्रथम प्राधान्य सध्याच्या काळात दिले जात आहे. ग्राउंड लेव्हलवर सुरू असलेल्या या राजकारणामुळे पाच वर्षांत पाच पक्षही फिरण्याचे विक्रम सहज शक्य होत आहेत. इतकेच नव्हे तर नेत्यांच्या सरड्याप्रमाणे सततच्या बदलणाऱ्या रंगांमुळे कार्यकर्त्यांनाही “कोणता झेंडा घेऊ हाती?” असे म्हणण्याची वेळ आली आहे. परंतु असे असले तरी, “खिसा गरम तर कशाची शरम?” असे म्हणून सारे काही आलबेल बनले आहे. शेवटी ‘जिथे भेळ तिथेच खेळ’.

  • संतोष दिवाडकर (पत्रकार)

In the backdrop of elections, city politics takes on the color of an ‘IPL auction’

कल्याण पूर्वेत भाजपा पक्ष प्रवेश सोहळ्याने संघटनेला नवी ऊर्जा

कल्याण : आमदार सुलभा गायकवाड यांच्या जनसंपर्क कार्यालयात नुकताच भारतीय जनता पक्षात भव्य पक्ष प्रवेश सोहळा पार पडला. या कार्यक्रमात विजय जोशी, शीतल मंडारी, केतन रोकडे, स्नेहल रोकडे, विकी जोशी, प्रल्हाद शेळके यांनी आपल्या शेकडो पदाधिकारी व कार्यकर्त्यांसह भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय जनता पार्टीत जाहीर प्रवेश केला. या प्रवेशामुळे भाजपाच्या संघटनेला कल्याण पूर्वेत नवी ऊर्जा मिळाल्याचे म्हटले जात आहे.

कार्यक्रमात माजी आमदार नरेंद्र पवार, जिल्हाध्यक्ष नंदू परब, जिल्हा निवडणूक प्रमुख नरेंद्र सूर्यवंशी, भा.ज.यू.मो. जिल्हाध्यक्ष वैभव गायकवाड, माजी नगरसेवक अभिमन्यू गायकवाड, मनोज राय, रितेश खराटे, विक्रम तरे, हेमलता पावशे, इंदिरा तरे, मंडळ अध्यक्ष संतोष शेलार, विजय उपाध्याय, अमित गायकवाड, मयुरेश तरे, प्रज्वल खैरनार आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी मराठा कोळशेवाडी मंडळ महिला मोर्चातील नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले. सर्व नवे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचे मान्यवरांकडून स्वागत करण्यात आले व त्यांच्या पुढील कार्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या. राष्ट्रहित, विकास आणि सुशासन या पक्षाच्या विचारधारेवर दृढ विश्वास ठेवून या सर्व मान्यवरांनी परिवर्तनाच्या प्रवासाची भक्कम सुरुवात केली आहे अशा भावना यावेळी आमदार सुलभा गायकवाड यांनी व्यक्त केल्या.

BJP party entry ceremony in Kalyan East gives new energy to the organization

News : Mahesh Gaikwad भाजप प्रवेश चर्चेला पूर्णविराम; शिंदेंनी राखली ५५ हजार मतांची ताकद

Mahesh Gaikwad News : शिवसेना उबाठाचे जिल्हाप्रमुख दीपेश म्हात्रे हे आज भारतीय जनता पार्टीत प्रवेश करणार आहेत. त्यांच्या समवेत अन्य काही माजी नगरसेवक व काँग्रेसचे पदाधिकारी सामील होणार आहेत. मात्र याच यादीत दुसरे महत्त्वाचे नाव महेश गायकवाड यांचे असल्याच्या चर्चांना दिवसभरात उधाण आले होते. मात्र म्हात्रेंच्या भाजप प्रवेशाच्या पूर्वसंध्येस एकनाथ शिंदेंनी महेश गायकवाड यांच्या खांद्यावर पुन्हा एकदा अधिकृतपणे धनुष्यबाणाची जबाबदारी सोपवून ५५ हजार मतांसह कल्याण पुर्वेची कमान राखली असल्याची चर्चा आहे. यामुळे भाजप प्रवेशाच्या चर्चा तूर्तास थांबल्या आहेत.

महेश गायकवाड यांनी विधानसभा निवडणुकीत कल्याण पूर्व मतदारसंघातुन भाजप आमदार सुलभा गायकवाड यांच्या विरोधात अपक्ष निवडणूक लढवून जवळपास दुसऱ्या क्रमांकाची ५५ हजारहून अधिक मते मिळवून सर्वांच्याच भुवया उंचावल्या होत्या. याच ५५ हजार मतांनी भाजपला भुरळ घातली असल्याचे राजकीय जाणकारांना वाटत आहे. विधानसभा निवडणुकी दरम्यान महेश गायकवाड यांना पक्ष विरोधी भूमिका घेतक्याबद्दल शिंदेंच्या शिवसेनेतून पायउतार व्हावे लागले होते. त्यानंतर बराच काळ त्यांचा पुनःप्रवेशही झाला नव्हता. त्यामुळे अशा परिस्थितीत भाजपचे आमंत्रण स्वीकारले जाऊ शकते अशीही चर्चा रंगली होती. मात्र दीपेश म्हात्रेंच्या प्रवेशा पूर्वीच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महेश गायकवाड यांच्यावर कल्याण पूर्व व उल्हासनगर विधानसभा संपर्क प्रमुख पदाची जबाबदारी दिली आहे.

भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष पद डोंबिवलीचे आमदार रवींद्र चव्हाण यांना प्राप्त झाल्यानंतर याच पार्श्वभूमीवर कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या निवडणुकीला भाजपच्या दृष्टीने अनन्यसाधारण असे महत्त्व प्राप्त झाले आहे. गणेशोत्सव काळात रवींद्र चव्हाण यांनी विधानसभेत भाजपा समोर लढलेले भक्कम प्रतिस्पर्धी दीपेश म्हात्रे तसेच महेश गायकवाड यांच्या घरी गणरायाचे दर्शन घेतल्या पासूनच शहरात त्यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चा रंगल्या आहेत. मात्र महेश गायकवाड यांनी असे काही नसल्याचे स्पष्टीकरण या अगोदरही माध्यमांना दिले होते. आता शिंदेंनी त्यांच्यावर पदभार सोपवल्याने उठलेले चर्चांचे वादळ शांत झाले असे म्हणायला हरकत नाही. परंतु सध्याच्या राजकारणात उलथापालथ सामान्य आहे, त्यामुळे कोणतेही पद कुणालाही बांधून ठेऊ शकत नाही हेही तितकेच खरे.

News : Mahesh Gaikwad BJP entry talks come to an end; Shinde retains strength of 55 thousand votes