News : Mahesh Gaikwad भाजप प्रवेश चर्चेला पूर्णविराम; शिंदेंनी राखली ५५ हजार मतांची ताकद

Mahesh Gaikwad News : शिवसेना उबाठाचे जिल्हाप्रमुख दीपेश म्हात्रे हे आज भारतीय जनता पार्टीत प्रवेश करणार आहेत. त्यांच्या समवेत अन्य काही माजी नगरसेवक व काँग्रेसचे पदाधिकारी सामील होणार आहेत. मात्र याच यादीत दुसरे महत्त्वाचे नाव महेश गायकवाड यांचे असल्याच्या चर्चांना दिवसभरात उधाण आले होते. मात्र म्हात्रेंच्या भाजप प्रवेशाच्या पूर्वसंध्येस एकनाथ शिंदेंनी महेश गायकवाड यांच्या खांद्यावर पुन्हा एकदा अधिकृतपणे धनुष्यबाणाची जबाबदारी सोपवून ५५ हजार मतांसह कल्याण पुर्वेची कमान राखली असल्याची चर्चा आहे. यामुळे भाजप प्रवेशाच्या चर्चा तूर्तास थांबल्या आहेत.

महेश गायकवाड यांनी विधानसभा निवडणुकीत कल्याण पूर्व मतदारसंघातुन भाजप आमदार सुलभा गायकवाड यांच्या विरोधात अपक्ष निवडणूक लढवून जवळपास दुसऱ्या क्रमांकाची ५५ हजारहून अधिक मते मिळवून सर्वांच्याच भुवया उंचावल्या होत्या. याच ५५ हजार मतांनी भाजपला भुरळ घातली असल्याचे राजकीय जाणकारांना वाटत आहे. विधानसभा निवडणुकी दरम्यान महेश गायकवाड यांना पक्ष विरोधी भूमिका घेतक्याबद्दल शिंदेंच्या शिवसेनेतून पायउतार व्हावे लागले होते. त्यानंतर बराच काळ त्यांचा पुनःप्रवेशही झाला नव्हता. त्यामुळे अशा परिस्थितीत भाजपचे आमंत्रण स्वीकारले जाऊ शकते अशीही चर्चा रंगली होती. मात्र दीपेश म्हात्रेंच्या प्रवेशा पूर्वीच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महेश गायकवाड यांच्यावर कल्याण पूर्व व उल्हासनगर विधानसभा संपर्क प्रमुख पदाची जबाबदारी दिली आहे.

भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष पद डोंबिवलीचे आमदार रवींद्र चव्हाण यांना प्राप्त झाल्यानंतर याच पार्श्वभूमीवर कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या निवडणुकीला भाजपच्या दृष्टीने अनन्यसाधारण असे महत्त्व प्राप्त झाले आहे. गणेशोत्सव काळात रवींद्र चव्हाण यांनी विधानसभेत भाजपा समोर लढलेले भक्कम प्रतिस्पर्धी दीपेश म्हात्रे तसेच महेश गायकवाड यांच्या घरी गणरायाचे दर्शन घेतल्या पासूनच शहरात त्यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चा रंगल्या आहेत. मात्र महेश गायकवाड यांनी असे काही नसल्याचे स्पष्टीकरण या अगोदरही माध्यमांना दिले होते. आता शिंदेंनी त्यांच्यावर पदभार सोपवल्याने उठलेले चर्चांचे वादळ शांत झाले असे म्हणायला हरकत नाही. परंतु सध्याच्या राजकारणात उलथापालथ सामान्य आहे, त्यामुळे कोणतेही पद कुणालाही बांधून ठेऊ शकत नाही हेही तितकेच खरे.

News : Mahesh Gaikwad BJP entry talks come to an end; Shinde retains strength of 55 thousand votes