निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरातील राजकारणाला ‘आयपीएल लिलावा’ प्रमाणे रंग; राजकारण्यांच्या बेडूक उड्यांनी पक्षनिष्ठेला सुरुंग
कल्याण : महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यभरात राजकीय पक्षप्रवेशांचा धडाका सुरू झाला आहे. किंबहुना एकाच युती आघाडी मधील राजकीय पक्ष एकमेकांचे प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते आपल्या पक्षात खेचून आणण्यासाठी जोरदार प्रयत्न करीत आहेत. विशेषतः कल्याण डोंबिवलीत शिवसेना आणि भाजप मध्ये आपसातच ही पक्षप्रवेशाची रस्सीखेच सुरू असून एकमेकांचे दिगग्ज पदाधिकारी व माजी नगरसेवक आपल्या पक्षात खेचून घेण्याचे काम सध्या सुरू आहे. नेत्यांच्या दलबदलू राजकारणामुळे सामान्य मतदार व कार्यकर्ते मात्र संभ्रमात अडकले आहेत.
महानगरपालिका निवडणुकांचे बिगुल लवकरच वाजण्याची शक्यता असल्याने त्यापूर्वीच आयपीएल ट्रेड/लिलाव प्रमाणे शहरात राजकीय मंडळी या पक्षातून त्या पक्षात बेडूक उड्या घेत आहेत. पक्षनिष्ठा खुंटीला टांगून, पक्षातील प्रमुख नेत्यांचे विचार पायदळी तुडवून केवळ वैयक्तिक स्वार्थ साधण्यासाठी हे प्रवेश होत असल्याचे मत सर्वसामान्य मतदारच व्यक्त करू लागले आहेत. याउलट पक्षप्रवेश घेतल्यानंतर “पक्षाच्या, साहेबांच्या विचारांनी प्रेरित होऊन पक्ष प्रवेश केला” असे पक्षप्रवेश करणारे अजूनही रेटाळून म्हणतात. मात्र हे फक्त ‘बोलाची कढी आणि बोलाचा भात’ असल्याचे आता सुजाण मतदार म्हणू लागले आहेत. तर काही पक्षप्रवेशामागे पक्षातील नाराजी, अंतर्गत वाद, हेवेदावे आणि अंशतः स्वाभिमान ही देखील कारणे पुढे केली जात आहेत.
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्ष प्रवेश करून घेण्यासाठी मोठं मोठी अमिषे आणि मोठ्या पदांची प्रलोभने दिली जातात. अशा परिस्थितीत पक्षनिष्ठेचा विचार करण्यापेक्षा स्वतःचा फायदा पाहण्यामागे प्रथम प्राधान्य सध्याच्या काळात दिले जात आहे. ग्राउंड लेव्हलवर सुरू असलेल्या या राजकारणामुळे पाच वर्षांत पाच पक्षही फिरण्याचे विक्रम सहज शक्य होत आहेत. इतकेच नव्हे तर नेत्यांच्या सरड्याप्रमाणे सततच्या बदलणाऱ्या रंगांमुळे कार्यकर्त्यांनाही “कोणता झेंडा घेऊ हाती?” असे म्हणण्याची वेळ आली आहे. परंतु असे असले तरी, “खिसा गरम तर कशाची शरम?” असे म्हणून सारे काही आलबेल बनले आहे. शेवटी ‘जिथे भेळ तिथेच खेळ’.
- संतोष दिवाडकर (पत्रकार)
In the backdrop of elections, city politics takes on the color of an ‘IPL auction’

