जनतेचे नाव पुढे करीत राजकारण्यांचे पक्षप्रवेश; पॅनलच्या जमवाजमवीसाठी पक्षनिष्ठा खुंटीला

कल्याण : महानगरपालिका निवडणुकीला अवघा चार आठवड्यांचा अवधी राहिला असून त्यापूर्वी पक्षप्रवेश सोहळे शहरात पार पडत आहेत. पॅनलमध्ये निवडून येण्यासाठी जो तो आपला विचार करीत असून इच्छूकांसह माजी नगरसेवकांनी शिवसेना भाजप मध्ये प्रवेश घेण्याची धडपड सुरू ठेवली आहे. मात्र हे पक्षप्रवेश करताना, “आम्ही जनतेच्या हितासाठी, प्रभागाच्या विकासासाठी प्रवेश करतोय” असा केविलवाणा निर्वाळा करीत स्वतःचे राजकीय स्वार्थ साधले जात असल्याचे उघडपणे दिसून येत आहे.

कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत यंदा पॅनल पद्धत असल्याने सरसकट चार उमेदवारांना एकत्र लढत द्यावी लागणार आहे. त्यात महायुती, महाविकास आघाडी, मनसेसह अन्य घटकपक्ष आपले नशीब अजमावणार आहे. मात्र या पद्धतीत लहान पक्ष व अपक्ष लढणाऱ्यांना निवडणूक लढवणे अवघड होणार आहे. याच बाबीचा फायदा मोठ्या पक्षांना होणार आहे. त्यामुळे शिवसेना उबाठा, मनसे, काँग्रेस पक्षांतील माजी नगरसेवक आपापल्या पदाधिकारी कार्यकर्त्यांना घेऊन जनतेच्या विकासाचे नाव पुढे करीत स्वतःचे राजकीय भवितव्य अबाधित ठेवण्यासाठी दलबदलू राजकारण करण्यास कोणताही कमीपणा ठेवत नाहीत. अशा परिस्थितीत सुगीचे दिवस असणाऱ्या पक्षांसोबत जाऊन पुन्हा नगरसेवक बनायचे हा एकमेव उद्देश साध्य करण्यासाठी पक्षनिष्ठा खुंटीला टांगून पक्ष बदलले जात आहेत.

आगामी महापालिका निवडणुकीत शिवसेना भाजपात झालेली प्रचंड ट्रॅफिक पाहता निवडणूक महायुतीत लढावी की स्वतंत्र लढावी असाही मोठा प्रश्न शिवसेना भाजपला पडलेला आहे. दोन्ही पक्षांत प्रचंड गर्दी झाल्याने उमेदवारी दिल्यानंतर पुन्हा नाराजीनाट्ये रंगणार आहेत. त्यामुळे ऐनवेळेस स्वतंत्र लढण्याची नामुष्की ओढवू शकते. याउलट दोन्ही ठाकरे एकवटले असून दोन्ही पक्ष एकत्रितपणे निवडणूक लढवण्याची दाट शक्यता आहे. किंबहुना महायुतीपुढे टिकायचे असेल तर ठाकरेंचे एकत्र लढणेच शहाणपणाचे ठरेल असे मत राजकीय जाणकार व्यक्त करीत आहेत.

✍️ संतोष दिवाडकर 8767948054